Wednesday, June 27, 2007

स्टेनलेस स्टील

स्टेनलेस स्टील हा प्रकार ज्या कोणा महाभागाने शोधून काढला त्याला माझे कोटी कोटी प्रणाम!!! जगातल्या इतर कुठल्याहि शोधापेक्षा सामान्य माणसाला या शोधाइतका फ़ायदा झाला नसेल.
स्टील म्हणजे मायमराठीत खरं तर लोखंड!!! स्टेनलेस म्हणजे डाग नसणारे....(दाग अच्छे होते है वगैरे विसरा!!!) काय कमाल कल्पना आहे....लोखंड म्हणलं कि वाटतं जड वस्तू, आठवतो तो लाल गंज.... कधी हिरवी करडी बुरशी. (पाण्याचा पाईप बघितला असेल तर सहमत असालच). पण स्टेनलेस स्टीलने हे सगळं खोडून काढलं... हे ना जड, ना याला गंज चढतो. स्पर्श पण इतक सुखद कि जणू रेशमी साडी वरून हात फ़िरवावा. स्टेनलेस स्टील हे भारतात internet पेक्षाहि लवकर प्रसिद्ध झालं असावं. पितळी भांडी वापरणारी आजी स्टेनलेस स्टीलची भांडी कधी वापरू लागली तिलाच कळलं नाही :) घासायला सोपी, दिसायला छान...म्हणून सगळ्यांनीच स्वागत केलं. आज हि काहि खेड्यात वीज नसेल पण स्टेनलेस स्टील नक्कि असेल.
मला तर स्टेनलेस स्टील फार मनापासून आवडतं. कारण भांडी घासायचा मनस्वी कंटाळा आहे...त्यामुळे शक्यतो जमेल तितकि भांडी कामवाल्या बाईकडून घासून घ्यायचा माझा प्रयत्न असतो. बाईला स्टीलची भांडी द्यायला बरी ना!! acralic किंवा काचेची भांडी दिली तर उगाच ती फुटतील, तडा जाईल अशी भिती जास्त....(आई अशी भांडी घरी घासायला लावते...मग तर मल स्टेनलेस स्टील ची जास्तच आठवण येते) पाहिजे त्या आकाराची स्टेनलेस स्टीलची भांडी मिळत असताना लोक कशाला त्या महागड्या dinner set च्या मागे लागतात कळत नाही. एक तर महाग महाग म्हणून जपून वापरायचं आणि कधीकाळी वापरलंच कि स्वत: घासत बसायचं...सांगितलाय कोणी नसता त्रास? मस्त branded steel आणा (neelam वगैरे).छान टिकाऊ असतं...लहान मुल घेईल का...मग ते फ़ुटेल का....चिंता नको!!! साध्या आपटण्याने वा पडण्याने स्टेनलेस स्टील ला काहिहि होत नाही....ते काय काचेचं भांडं नाही एक चरा, टवका गेला तरी विद्रूप दिसायला. परत अगदी स्वत: घायायची वेळ च आली तर साबणाचा एक हात फ़िरवा कि स्वच्छ नि पूर्ववत सुंदर :) No tention!!!
मला तर त्या अति महाग भांड्यांचा मुळीच सोस नाही नि कौतुक तर त्याहून नाही, जी भांडी घरच्या बाईलाच त्रास देतात ती भांडी काय कामाची??? अशा गोष्टी दुकानातल्या शोकेस मध्येच बऱ्या. मी तर खुष आहे स्टेनलेस स्टील वर आणि त्याच्या जनकावर!!!

Wednesday, June 13, 2007

गोळे बाई

गोळे बाई.... माझ्या मनात एक विशिष्ठ स्थान असलेली व्यक्ती. मनाचा एक संपूर्ण कप्पा मी गोळे बाईंना दिलाय असं म्हणलं तरी अतिशयोक्ती ठरू नये!!!
माझ्या वयाच्या तिसऱ्या - चौथ्या वर्षी आमची गट्टी जमली. अर्थात...त्या माझ्या बालवर्गाच्या शिक्षिका होत्या. प्रसन्न हसरं व्यक्तिमत्व... मोतिया गोरा रंग, अगदी माझी मैत्रिण होऊन माझ्याशी बोलणं. मला सगळंच आवडलं होतं...अगदी पहिल्या दिवसापासून. आई-बाबा आजहि सांगतात कि मी शाळेच्या पहिल्या दिवशीदेखील अजिबात रडले नाही. याचं कारण गोळे बाईच असाव्यात. इतक्या छान बाई मिळाल्यावर का रडेन मी? आज अचानक मला त्यांची आठवण यायचं कारण म्हणजे नुकताच शाळेत जाऊ लागलेला माझा भाचा... काल शाळेत रडला....म्हणलं साहजिक आहे "त्याच्या शाळेत गोळे बाई नाहित!!!" इतकं बालवर्ग आणि बाईंचं गणित माझ्या डोक्यात पक्कं आहे. :)
गोळे बाई म्हणजे एकदम tip top बाई... मला तर त्या अगदी हेमामालिनी च वाटायच्या!!! deam girl सारख्या माझ्या dream बाई :) केसांचा यू कट, त्याला एखादी छानशी क्लिप लावलेली. डाव्या हातात गोऱ्या मनगटावर शोभून दिसणारं काळ्या पट्ट्याचं घड्याळ, चेहऱ्यावर लोभस हासू, शक्यतो हलक्या फिकट रंगाची पान-फुलाचं डिझाईन असलेली साडी....खांद्याला पर्स, त्यात नेहमी ४-५ गोळ्या, चॉकलेट्स. आजहि मला त्यांचं हे रूप जसच्या तसं आठवतं...जणू मी आत्ता अर्ध्यातासापूर्वी भेटलेय त्यांना. मी शाळेत जाणं कधीहि टाळलं नाही...अगदी आई बाबा एखाद दिवशी म्हणाले तरीहि.... कारण मग मी माझ्या लाडक्या बाईंच्या भेटीला मुकायचे!!!
बाईंना पण मी खूप आवडायचे....त्या आधीच माझ्या लाडक्या अन मी त्यांची लाडकी म्हणून मग त्या माझ्या अजून खूप खूप लाडक्या :) बाई कशा बोलतात, कशा बसतात, कधी काय करतात याचं मी अगदी बारिक निरिक्षण करत असे.... घरी आलं कि आईने दिलेला खाऊ खाऊन लगेच मी "गोळे बाई" व्हायची (शाळा शाळा हा माझा आवडता खेळ!!!) माझा खेळ बघून घरी सगळ्यांना आज शाळेत काय झालंय ते कळायचं, इतकं त्यात साम्य असायचं..... बड्बड्गीत, गोष्टी सांगण्यात बाई पटाईत. फळ्यावर त्या अशा काहि चित्र काढायच्या कि वाटावं पुसूच नये. जसे टपोरे डोळे तसंच टपोरं अक्षर..... कुठलाहि सण असला कि आदल्या दिवशी त्याची गोष्ट, महत्त्व सांगायच्या...सुसंगत चित्र फळ्यावर काढायच्या. All rounder बाई!!!
शाळेत पहिल्या शिक्षक दिनाला मी त्यांच्या साठी गुलाबाचं फूल घेऊन गेले होते...ते देऊन मी त्यांना नमस्कार केला. बाईंना इतका आनंद झाला होता, कि त्यानंतर मी जवळ जवळ एक-दोन दिवसाआड त्यांच्यासाठि फूल घेऊन जायचे. आणि कधी ते फूल त्यांच्या साडीच्या रंगाला matching झालं तर मला अगदी आभाळाला हात लावल्यागत व्हायचं. बाईंना पण याआधी किती वेळा विद्यर्थ्यांनी फुलं दिली असतील....पण दर वेळी त्या त्याच आनंदाने हसायच्या आणि फुल डोक्यात घालायच्या. कधी कधी मला दुसऱ्या दिवशी येऊन सांगायच्या "स्नेहल, फुल छान होतं असं अंजू मंजू ने सांगितलंय". अंजू मंजू या त्यांच्या जुळ्या मुली...माझ्याहून ३-४ वर्षांनी मोठ्या. असंच बाई एकदा म्हणाल्या "अगं, अंजू मंजू ने त्यांच्या नवीन बाहुलीचं नाव ’स्नेहल’ ठेवलंय"...वा!!!! "आज मै उपर, आसमान नीचे" हा अनुभव मी पहिल्यांदा त्या दिवशी घेतला. म्हणजे जितकि बड्बड मी घरी त्यांच्याबद्दल करायची तितकीच त्याहि माझ्याबद्दल करयच्या तर.... (केवळ एक वेगळं नाव म्हणून अंजू मंजू ने ते नाव ठेवलं असेल असा खडूस विचार तेव्हा माझ्या चिमुकल्या मनातहि आला नाही)
मी शाळेत जायला कधी उशीर केला नाही.....शाळा कधी बुडवली नाही. ्सगळ्या स्पर्धेत भाग घेतला, नंबर मिळवला, शिकवलेलं बरंच आपोआप लक्षात राहायचं....बाईंची लाडकि व्ह्यायला इतकि कारणं पुरेशी होती...मला आपलं उगाच वाटायचं कि माझे गोरे गुबगुबीत गाल बाईंना आवडतात नि मी त्यांना फूल देते म्हणून पण मी त्यांना आवडते.
बघता बघता शाळेतलं पहिलं वर्ष संपलं...बाईंनी "उत्तम" असा शेरा मारून प्रगती पुस्तक हातात दिलं. पुढच्या वर्षी आता गोळे बाई नसणार शिकवायला हे कळलं त्याक्षणी मला रडूच आलं होतं. शाळा नकोशी झाली. मग त्यांनी आणि आई ने मिळून माझी समजूत घातली..... वर्गात नसले तरी बाई माझे लाड करत राहतील अशी खात्री झाल्यावरच मी रडं बंद केलं.
जून मध्ये परत शाळा सुरू झाली. सवयीप्रमाणे मी गोळे बाईंच्या वर्गात (म्हणजे बालवर्गात) गेले.... बाईंनीच मग दुसऱ्या वर्गात पाठवलं....
त्यानंतर मात्र बाईंनी मला वर्गात असं कधीच शिकवलं नाही.....पण आम्ही भेटायचो...दर शिक्षकदिनाला फुल, गुरूपौर्णिमेला नमस्कार.....कुठलंहि बक्षिस मिळालं कि बाईंची शाबासकि हे अगदि ठरलेलं. जणू मी आम्ही दोघींनी ते सगळं गृहित धरलं होतं.
चवथी नंतर शाळा बदलली.... आता बाईंची भेट क्वचित होत असे. पण मनात त्या तशाच होत्या. मी पुढे पुढे जात राहिले...शाळा, कॉलेज, नोकरी...... चार वर्षांपूर्वी अशाच अचानक डेक्कन वर भेटल्या....तेच सुंदर हासू घेऊन!!! मी आता नोकरी करते....IT मध्ये..याचं काय कौतुक त्यांना!!! बोलता बोलता कळलं कि त्या एक वर्षात निवृत्त होणार...म्हणलं "बाई, मग आपल्या बालवर्गाचं काय? तुम्ही नाहित तर मुलं खूप काहि गमावतील" माझ्या त्या भाबड्या प्रेमाला बाई नी हसत माझी पाठ थोपटत प्रतिसाद दिला.
आता बाई निवृत्त झाल्या असतील.....जे त्यांच्याकडे शिकले ते खरेच भाग्यवान!!! आणि मी सगळ्यांहून जास्त...कारण माझ्या पहिल्या शिक्षिकेवर मी जितकं प्रेम केलं त्याहून कितीतरी पट अधिक त्यांनी माझ्यावर केलं.

Friday, June 08, 2007

परिपक्वता...

साधारण सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे.... आईने मला विचारलं "तुला सांगली ला जायला जमेल का या गुरूवारी?"
"का गं? एकदम सांगली??"
"लग्न आहे ’तिचं’ "
"अरे वा!!! मजा आहे. अगं पण असं अचानक अवघड आहे जमणं.... कधी ठरलं लग्न?"
"बरेच दिवस झाले.... बरंच समजावून झालं, रडून झालं...पण ती ऐकत नाही म्हणून मग आई बाबांनी करून द्यायचं ठरवलं"
मग या नंतर आईने मला स्टोरी जरा डिटेल मध्ये सांगितली.
’ती’ माझी एक लांबची मावसबहिण. लहानपणापासून हुषार...हुषार म्हणून आधीच हौशी असलेल्या आई बाबांनी जास्तच लाडात वाढवलेली. तिचा दहावी, बारावी चा निकाल म्हणजे ९० च्या पुढे किती हेच कळायचं बाकि असायचं...तिथेपर्यंत ती जाणार याची खात्रीच!!! मग इतर ४ हुषार पण ठरलेल्या वाटेने जाणाऱ्यांप्रमाणे तिनेहि Computer Engineer व्हायचं ठरवलं.
करता करता ३ वर्ष पार पडली. चवथे सुरू होताच campus drive चालू झाला. एखाद दुसरी कंपनी निसटली असेल..आणि तिचं एका मोठ्या कंपनीत सिलेक्शन झालं. वा!!! परत अपेक्षित कौतुकाचा वर्षाव. लठ्ठ पगार, पुण्यात नोकरी..... सगळेच जणू हरखून गेले होते. शेवटचं वर्षहि झालं.....ती पुण्यात आली. कदाचित खूप स्वप्न उराशी घेऊन.....
काळजी घे, वेळेत खात-पित जा.....वगैरे सूचना आई बाबांनी दिल्याच. पैशाची काळजी करू नकोस......वगैरे पण होतंच. या सगळ्यात एकच सांगायचं राहिल..."आम्हाला काळजी वाटेल असं काहि वागू नकोस"
तिचं आता स्वतंत्र आयुष्य सुरू झालं..... कोषातलं फुलपाखरू जणू बागेत अचानक सोडलं गेलं. नवीन कंपनी, नवीन वातावरण......सगळच मखमली, गुलाबी!!! आमच्यासारखे काहि नातेवाईक होतेच पुण्यात....पण तिने नेहमीच येणं-जाणं टाळ्लं. दिवसातले ११-१२ तास तर कंपनीतच जात होते....आर्थिक स्वयंपूर्णता हि होती.
अशा वेळी मोहाचे क्षण म्हणजे जणू तुमची सावली असतात. २२-२३ चं वय.... मित्र मैत्रीणींचा गराडा. इतके दिवस निर्णयात आई बाबा असतात...आता सगळं स्वत:च ठरवायचं. thrilling वाट्तं सगळंच. आपण चुकू असं चुकूनहि मनात येत नसावं. कारण तसा विचार करण्याची शक्ती च मिळाली नाहि कधी!!!
पुढचं एखादा चित्रपट वाटावा इतकं साहजिक आहे...... ती एका मुलाच्या प्रेमात पडली....तो पण. तो हरियाना मधल्या कुठल्या तरी गावातला. तो पण हुषार..... गुलाबी रंग अजूनच गडद झाला, मखमल अजूनच मऊ!!! तिने घरी सांगितलं... कडाडून विरोध ठरलेला..... एकदा, दोनदा....अनेकदा........ शेवटी आई बाबांनी लग्न करून द्यायचं ठरवलं. ती अशी का वागतेय किंवा ते का इतका विरोध करताहेत हे दोघांनीहि विचारात घेतलं नाही. "आमची इतकि हुषार मुलगी अशी वागेल असं वाटलं नव्हतं" असं ते म्हणतात. "मला सगळं देणारे आई बाबा लग्नाला का विरोध करताहेत" असं ती म्हणते. गैरसमजाची भिंत.... कोणी तोडतच नाहिये...कि त्यांना ती दिसतच नाहिये???
थोड्याशा अनिच्छेनेच लग्न पार पडलं. वाटलं झालं सगळं सुरळित........ पण कहानी का climax अभी बाकि है!!!
राजा राणीचं नवीन आयुष्य सुरू झालं. प्रेमात पडले, घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलं.... पण लग्नातली जबाबदारी, घ्यायची खबरदारी न यांनी विचारात घेतली ना यांच्या आई बाबांनी.
नोकरी, घर याच्यात ती गुंतून गेली.....त्याचं MBA करायचं आधीच ठरलं होतं, तो त्यामागे होता. लग्नाच्या ३ च महिन्यांनी दोघांना कळलं कि ते आता आई बाबा होणार आहेत!!! या गोष्टिला मानसिक तयारीच नाही...... त्याला MBA करायचं आहे....आणि तो शिकणार म्हणून तिला नोकरी गरजेची आहे. आता काय?? काहि नाही...... show must go on!!!
हे सगळं ऐकून मावशीला त्रास झाला.... साहजिक आहे. काल्पर्यंतची मुलगी, उद्या आई होणार...या नाजूक अवस्थेत नवरा सोबत नसणार (तो परगावी असणार). "काय हि गडबड? इतके शिकलेले लोक...असं कसं करतात?" हे आणि वर सगळ्या मोठ्या लोकांचं मत.....
पण मी म्हणते सगळी चूक त्यांचीच आहे????? पालक, मोठे म्हणून तुम्ही काहिच चुकला नाहि??? मुलीला (मुलाला देखील) शिकायला, नोकरीसाठी बाहेर पाठवताना काहि गोष्टिंची कल्पना आई बाबांनी द्यायला हवी. बाहेर काय प्रलोभनं असतात, चार लोकांमध्ये चांगला माणूस कसा ऒळखावा वगैरे. सतत आई बाबांजवळ राहिल्याने विचारशक्तीला खूप मर्यादा आलेल्या असतात..... बाहेर पडल्यावर आपली आपण चौकट ठरवायची आणि पाळायची असते. पण हे कोणीतरी सांगायला हवं होतं ना? आजकाल च्या जगात निर्णय मुलांनीच(अपत्य) घ्यायचा आहे, पण तो निर्णय बरोबर घेण्याची क्षमता आई बाबा म्हणून तुम्ही द्यायला हवी ना? तिचा त्याच्याशी लग्न करायचा निर्णय बरोबर असेल (कारण तो शिक्षण, नोकरी वगैरे दृष्टिने योग्य आहे) पण मग आता जी जबाबदारी तिला एकटिला पेलावी लागेल(त्याचं MBA होईपर्यंत) त्याचं काय? मुलीचं लग्न म्हणलं कि साड्या, दागिने, हळवं होणं इतकंच......कि त्यापुढे जाऊन तिला काहि महत्त्वाच्या गोष्टि सांगायला हव्यात??? आपल्या देशात अजून तरी सांगायलाच हव्यात. निदान २२-२५ या वयापर्यंत तरी!!!
खूप शिकलेले लोक याबाबतीत चुकतात....सरळ आहे. आपलं शिक्षण आपल्याला तांत्रिकदृष्ट्या परिपक्व बनवतं...... पण मानसिक परिपक्वता कुठलंच लौकिक शिक्षण देत नाही. तिथे महत्त्वाचे ठरतं upbringing, आई बाबा नी तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावं म्हणून घेतलेले कष्ट....संस्कार......तुमची जगाकडे बघण्याची आणि आकलन करण्याची शक्ती. या सगळ्यात पालकांचा वाटा खूप मोठा आहे. निर्णय पुढच्या पिढिलाच घेऊदेत...पण तुम्ही त्यांना योग्य निर्णय घेण्याची परिपक्वता द्या. त्याने तुमचा उतार वयातील त्रास नि पुढच्या पिढिचा तरूणाईतला मनस्ताप नक्किच कमी होईल.

Thursday, May 31, 2007

एक दिवस गंमतीचा....

काही काही दिवस जबऱ्या हटके असतात....म्हणजे लौकिकार्थाने त्यात काहिही खास नसतं (वाढदिवस, पगारवाढ वगैरे वगैरे)पण नेहमीच्या घटनाच अशा काहि चमत्कारीक घडतात कि दिवस वेगळा होऊन जातो. तसाच हा एक दिवस...२९ मे २००७.
माझ्या शाळेतल्या मैत्रिणीचा वाढदिवस या पलिकडे याला काहिहि महत्त्व नव्हतं....पण काहि मजेशीर गोष्टींमुळे हा दिवस लक्षात राहिल.

घटना १.

नुकत्याच घेतलेल्या insurance policy साठी आज मेडिकल होती. डॉ. सकाळी ८.३० ला येणार होते, म्हणून मी आदल्या रात्री ८.३० ला जेवून त्या नंतर काहि न खाता पिता बसले होते. ९ वाजले, ९.३० वाजले....डॉ. चा पत्त नव्हता. न राहवून (भूक न सहन होऊन लिहायचं म्हणजे मी अगदीच ’हि’ आहे असं कबूल केल्यासारखं होईल ना!!!) insurance agent ला फोन केला.

"अरे ...., ते डॉ. अजून आले नाहीत."
"हो, निघालेत ते. २० मिनिटात येतील"

१-१ मिनिट मोजत बसले. १५ व्या मिनिटाला डॉ चा फोन....
"मी ट्रॅफिक मध्ये अडकलोय. अजून अर्धा तास लागेल"
"अहो मला ऑफिस असतं. तिकडे वेळेत जावं लागतं. आता आज नका येऊ. शिवाय पोटात अन्नाचा कण नाही गेले १३ तास.... (लाज नाही वाटत..खात्या पित्या गुटगुटीत मुलीला उपवास घडवता!!! कुठे फेडाल???)"
"मग उद्या येऊ? हवं तर ऑफिसमध्येच येतो. जास्त काहि नाही...ECG & blood test आहे."
मी उडालेच..."अहो ऑफिसमध्यए काय?? तिकडे कुठे करणार हे सगळं"
"एखादी isolated room असेलच ना... तिकडे करू"
(वा!!! काय तयारी आहे डॉ ची...कर्तव्यदक्षता अशी असावी.... )
"आहे हो...पण तिकडे तुम्हाला नाही सोडणार"
"का?"
(कारण तुम्ही माझ्या कं च्या CEO चे जावई नाही)
"नाही सोडणार. शनिवारी करूयात आता या टेस्ट्स"

घटना २.

वरच्या सगळ्या प्रकारामुळे ऑफिसला उशीराच्या बसने जावं लागणार होतं. १२.३० ची शटल असते..जिच्यासाठी १२ पासून बुकिंग चालू होतं..... मी १२.०४ ला पोचले....बघते तर शटल बुकिंग फ़ुल झालं होतं...
"अहो, १२ ला सुरू करता ना? मग इतक्यात कसं झालं?"
"मॅडम, ३० च शीट असतात....भरले"
"पण इतक्यात??? तुम्ही असं म्हण्ताय कि लोक ऊठ्सूठ विमाननगरला जातात."
"आता ३० भरायला किती वेळ लागतो? आणि १५ मि. झाली कि आता"
"१५ कुठे?? ५ तर झालीत. तुमचं घड्याळ पुढे आहे...."
"नाही!!! मी कं चे घड्याळ बघून च बुकिंग घेतो..."
त्याच्यावर वैतागून मी बाहेर जाऊन बस ची वाट बघत उभी राहिले.
बस आली. बुकिंग केलेले लोक चढले.....नेमके आज सगळे आले होते...एकाला तरी न यावंसं वाटावं!!!
बुकिंग केलेलेच लोक चढले आहेत हे बघायला एक security वाला आला.
"मॅडम, बस फुल झाली."
"ते दिसतंय...पण २ जागा आहेत अजून..."
"अहो तिथे किन्नर (क्लिनर) बसतो."
"आता आपल्याला कुठे माऊंट अबू ला जायचंय कि किन्नर पाहिजे....उतरवा त्याला. मला ऑफिसला जायचंय"
"असं नाही करता येत आम्हाला"
"उतरवताय त्याला कि मी उतरवू?"
किन्नर च बिचारा गरीब होता....खाली उतरला आणि मी ड्रायव्हर शेजारी बसून ऑफिसला आले.

घटना ३.

ऑफिसला आले तर information security ची टेस्ट द्या अशी मेल आली होती. join झाल्यापासून हि मेल मी पाचव्यांदा बघत होते...आणि टेस्ट देता येत नव्हती कारण मला log in च करता येत नव्हतं. दर वेळी "Emp No not found in database!!!" असं दिसायचं
आज एकूणच डोकं जरा सटकलं होतं. पूर्ण info. security group ला मेल केली....चांगली खरमरीत.
१५ मिनिटात एका मुलीचा फोन आला..... तिला पण चांगलं चेपलं.... सरते शेवटी तिने मला माझं log in create करून दिलं आणि मग टेस्ट दिली.

घटना ४.

रात्रीचे आठ वाजले होते. मी अजून ऑफिस मध्ये. ८.३० ला माझा client interview होता. हा client जरा जास्तच फाडतो असं ऐकलं होतं....धुकधुक होतीच.
interview सुरू झाला. सुरूवातीलाच
"tell me about your earlier projects"
वा!!! मज पामरासी आणि काय हवे? माझी गाडी अशी धाड्धाड सुटली कि बास......
अमुक तमुक करता करता ३२ मि. झाली आणि आमची मुलाखत संपली. ग्राहक काका खुष होते....त्यांनी लगेच मॅनेजर काकांना तसं कळवलं......मॅनेजर एकदम "मोगॅम्बो....खुष हुवा!!!" style मध्ये माझ्या डेस्कजवळ आला आणि उद्यापासून project वर आहेस म्हणाला. ग्राहकाने याआधी २ लोकांना नाकारल्यामुळे बेजार झाला होता बिचारा!!!
अधिक मासात एका ब्राह्मणाला खुष केल्याचं पुण्य पदराशी (साडी नव्हती..पण असं म्हणायची पद्धत असते..) बांधून मी घरी जायला निघाले.
उद्याचा दिवस म्हणजे ३० मे कसा असेल याचा विचार करत...........

Tuesday, May 22, 2007

सामान्य पोलीस

त्यादिवशी तारीख होती १४ एप्रिल..डॉ. आंबेडकर जयंती!!! माझा साप्ताहिक सुट्टीचा वार असल्याने काहि रेंगाळ्लेली कामं उरकायचं मी ठरवलं होतं. त्यातलंच एक म्हणजे digicam च्या service center मध्ये जाऊन माझा कॅमेरा परत घेऊन येणं. आता हे service center बाजीराव रोडला आहे...तिकदे आज जाऊ नये असले मौलिक विचार मला त्यादिवशी सुचले नाहित.
वेळ साधारण संध्याकाळी ६.३० ची असेल. मुख्य रस्त्यावर पार्किंग मिळेल न मिळेल म्हणून मी एका गल्लीत गाडी लावून बाजीरव रोड ला आले. पाहाते तर एक बरीच मोठी मिरवणूक....एका ट्रक्वर स्पीकरची भिंत, कुठलंस असंबद्ध गाणं....भारताचा नकाशा, डॉ. आंबेडकरांचा पुतळा, त्याला हार.......मिरवणूकित साधारण ३००-३५० लोक सामील...त्यातले पन्नास एक जण विचित्र अंगविक्षेप करत स्नायू मोकळे करत होते. दया आली मला......माझी, माझ्या देशाची. खुद्द डॉ. आंबेडकर जरी आज आले तरी त्यांना काहिसं असंच वाटेल. विचार आणि त्यानुसार आचार हा क्रम आणि शक्तीच आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर गमावून बसलो कि काय? मला रस्ता ओलांडायचा होता, पण मिरवणूकिमुळे थोडा वेळ थांबावं लागलं. त्या लोकांबरोबर असलेली ८-१० पोलीसांची फौज मात्र कधी नाचणाऱ्याला आत ढकल, कधी गाड्यांना रस्ता मोकळा करून दे, कधी माझ्यासारखीला "ताई, जरा थांबा" असं सांगणे आणि इतर बऱ्याच गोष्टी करत होते.
कमाल वाटली ती त्या ८-१० पोलीसांची..... त्यांच्यापैकी कोणीच उच्च अधिकारी नसावेत. म्हणजे ते सगळे हुकुमाचे ताबेदार होते. या अशा मिरवणूका पुण्याला नवीन नाहीत. या मिरवणूकांना कुठलंहि सामाजिक, राजकिय कारण पुरे!!! शिवाय दरवर्षी मॅरेथॉन, दोन पालख्या, गणपती हे तर वेगळंच.... कारण काहिहि असो, अशी काहि समाजसमूहाच्या गोष्टी म्हणजे या पोलिसांच्या सहनशीलतेचा अंत असावा!!! गणपती.....मराठी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. एक दिवस तरी घरी राहून बाप्पाचा आशिर्वाद घ्यावासा सगळ्यांनाच वाटत असणार...अगदी नाहीच जमलं तर निदान अनंत चतुर्दशी ला तरी. पण पोलिसाला कसं शक्य आहे ते? मंजूर झालेली रजा जिथे अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रद्द होऊ शकते तिथे नियोजीत वेळी रजा कुठून मिळणार??? घरच्यांचा रोष ओढवत असेल कि.... शिवाय मिरवणूक, मोर्चा म्हणलं कि ते संपेपर्यंत उभी ड्य़ुटी!!! जनतेला शक्य तितक्या सबुरीने आवरायचं...धिंगाणा करणाऱ्यांना सरळ करायचं. पालखी आली, विसर्जन मिरवणूकित गणपती आला कि सगळे लोक दर्शन घेऊन नमस्कार करायला पुढे धावतात....अशावेळी यातल्या किती पोलीसांना देवदर्शन, नमस्कार वगैरे त्याक्षणी शक्य होतं माहित नाही. आपण जरी बाप्पाला "पुढच्या वर्षी लवकर या" म्हणत असू तरी हे पोलीस कदाचित "लवकर निघा, सावकाश जा आणि वेळेत पोहोचा" असं काहिसं बाप्पाला सांगत असावेत. दिवसभर ढोल ताशाने बधिर झालेले कान, गर्दी रेटता रेटता घामेजलेलं शरीर......१०-१२ तास उभं राहून गेलेले पाय या अवस्थेत माणूस यापलिकडे अजून काय भक्ती करू शकतो?
इतर कोणीहि नोकरदार माणूस इतकि सामाजिक उपेक्षा सहन करत नसेल जितके हे पोलीस करतात. तुम्ही काम करा वा न करा.....टिका हि ठरलेली. अगदी कॉलेज जाणारी विशीची मुलं पण हे कसे चुकतात आणि त्यांच्यामुळे किती त्रास होतो यावर तावातावाने बोलतील. तुम्ही-मी कोण अशी उपेक्षा इतक्या दिर्घ काळ सहन करू शकेल? जनतेचा राग पण चुकिचा असतो असं माझं म्हणणं नाहिये...पण त्या सगळ्याला हे कनिष्ठ (हुद्द्द्यच्या उतरंडीनुसार) अधिकारी कितपत जबाबदार असतात??? ९५% वेळा यांना केवळ काम बजावले जाते....ते कुठल्या पद्धतीने करावे, कोणी करावे याबाबतीत यांना सहभागी करून घेतलंच जात नाही. आणि बहुतेक वेळा अंमलबजावणीपेक्षा मूळ निर्णयच चुकिचा असतो......पण ज्याचा पूर्ण रोष निर्णय अमलात आणणार्या कनिष्ठ वर्गावर काढला जातो. हे पोलीस म्हणजे काय 'पब्लिक ने ओलीस’ ठेवण्यासाठीच पोलीसखात्यात भरती होतात का?
आज कुठल्याहि क्षेत्रात महिला आणि पुरूष वर्गासाठी वेगळी स्वच्छतागृहे असतात... पोलीसखात्यात या गोष्टीसाठी मागणी करावी लागली होती. हे किती जणांना माहित आहे? ते आमच्या सेवेसाठी आहेत, पण आम्ही त्यांचा किती आदर..आदर जाऊ दे, त्यांना किती सहकार्य करतो??? पोलीसखातं म्हणजे एकदम महान, कार्यदक्ष आहे असं मला अजिबात म्हणायचं नाहिये...पण उठसूठ त्यांच्याबद्दल अनास्था बाळगणं कितपत योग्य आहे?
एका देशासाठी सैनिकवर्ग जितका महत्त्वाचा आणि अभिमानाची बाब आहे तितकाच पोलीसवर्ग पण नाही का? खरंतर पोलीस हे शहर, गाव यांच्या वेशीतले सैनिकच ना!!! चित्रपटात पण सैनिकांवर गाणी आहे....पोलीस तिथेहि उपेक्षितच!!!
निर्णयक्षमता आणि अधिकार असणारे लोक हे खरे या खात्यातील बेजबाबदार लोक आहेत......शहर वाहतूक, कायदाव्यवस्था यासाठी ठळक नियोजन लागतं. तेच नसेल तर कनिष्ठ वर्गाला वेठीस धरून काय उपयोग? तुमचे IAS सारखे अधिकारीच अकार्यक्षम असतील तर मग सामान्य पोलीस...जो दिलेलं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि करूनहि रोषाला सामोरा जातो...त्याच्यावर आगपाखड करणं बंद झालं पाहिजे.

Saturday, May 19, 2007

नवीन गडी...नवा राज

या ७ तारखेपासून पंचमोध्याय सुरू झाला...माझ्या एका मित्राच्या भाषेत मी नवीन थाळीत जेवायला लागले. (as per him...anywhere u go, its same food in a different plate!!!) नेहमीप्रमाणे join झाल्यावर इथल्या लोकांनी ते काय काय नि कसं करतात ते अगदी फुगवून फुगवून सांगितलं. खरं तर कुठेहि जा, कंपनीबद्दल पूर्णत: चांगलं ऐकायला मिळणारे दिवस म्हणजे हे induction चे दिवस!!! वेगवेगळे लोक येऊन काय काय बोलत होते... मी मात्र बॅंकेच्या लोकांची वाट बघत होते...हो, एकदा का salary account ओपन झालं कि काम भागलं. पहिल्या दिवशी दिलेला चहा आणि जेवण मात्र चांगलं होत. (खाल्ल्या अन्नाबद्दल मी नेहमीच खरं बोलते.)
अजून पहिला दिवस संपतो न संपतो तोच माझ्या इथल्या नवीन मॅनेजर चा फोन...कि उद्या येऊन भेट. मी मनात म्हणलं जरा श्वास तर घेऊन द्या...नंतर आहेच बैल राबायला!!! ठरल्याप्रमाणे त्याला भेटायला गेले तर हा माणूस माझ्यासाठी जेवायचा थांबला होता. बाप रे!!! हे मला जरा नवीन होतं. मग जरा अनौपचारिक गप्पा मारत आमचं जेवण झालं (आज मी डबा नेला होता....त्यामुळे quality n taste बद्दल काहि शंका नको!!!) माझ्या आजवरच्या सगळ्या मॅनेजरप्रमाणे हा पण non-smoker.... देवाची कृपा!!!
जेवण झाल्यावर टिम शी ओळख....एकूण लोक ४...सगळे तेलुगू :( म्हणजे मला कायम आंग्ल भाषेत च बोलावं लागणार (कोकाटे क्लास लावावा कि काय?) बरंय निदान मॅनेजर तरी मराठी आहे. मोजून मापून कोकणस्थ आहे!!!
पुढे दोनच दिवसात मला मशिन मिळालं, मॅनेजर काकाने स्वत:हून net connection दिलं...वा वा वा!!! कामाला (कि टिपीला???) सुरूवात झाली. प्रोजेक्ट तसा बरा आहे...अजून काम खेचणं आता माझ्याकडे लागलंय. बघू....काय घाई आहे?
तर मी बसते ती जागा pantry च्या अगदी जवळ आणि मॅनेजरच्या बरीच लांब आहे...त्यामुळे पामर सुखी हे सांगणे नकोच!!! आजूबाजूला पूर्ण आंध्रप्रदेश आहे....त्यांच्याबरोबर काम करता करता मी एक दिवस कदाचित तेलुगू ब्लॉग लिहायला लागेन...शक्य आहे, कालच नाही का त्यांच्या नादी लागून मी आंध्र मेसमध्ये जाऊन ३ वेळा भात खाल्ला!!
इथल्या काहि आवडलेल्या गोष्टी, ५०० र. मध्ये बससेवा!!! तेहि चांगल्या लक्झरी बस, रेडिऒ नीट ऐकू येईल अशा. (आधीच्या कंपनीच्या बस्मध्ये रेडिऒ कमी नि खरखर जास्त ऐकू यायची) लायब्ररीमध्ये non technical पुस्तकं, management चे पुस्तकं भरपूर आहेत. परवाच ’wise and other wise' आणलंय. yaahoo messenger इथे officially चालतो :)
ज्याचा तीव्र निषेध करावासा वाटतॊ ते म्हणजे icicidirect , मायबोलीवर बंदि आहे. हा काय अन्याय!!! icicidirect नाही तर मी चार पैशाचे २० पैसे कसे करायचे हो?? आणि मायबोली नाही तर मग आम्ही आमचं मन कुठे जाऊन हलकं करायचं??? श्या...अजून थोड्यादिवसाने आवाज उठवला पाहिजे या विरुद्ध!!! पण सध्या जरा शांत आहे मी....नवीन गडि आहे ना...जरा सरावले कि मी पण माझे अंतरंग दाखवायला सुरू करेन!!! :)

Thursday, May 10, 2007

स्वभाव

मनुष्यस्वभावाला औषध नाही म्हणतात ते अगदी खरंय. संस्कार, शिक्षण, आजूबाजूचा परिसर याने काहि चांगल्या सवयी माणूस लावून घेऊ शकतो आणि अशा सवयींमुळे स्वभावात थोडेफार बदलहि होतात. पण लक्षात कोण घेतो? माणसाच्या व्यक्तिमत्वातील हि अतिशय महत्वाची बाजूच अनेकदा दुर्लक्षित राहते असं माझं मत आहे. कित्येकदा स्वभावदोषाला खतपाणीच घातलं जातं.
त्यातहि स्वभावात काहि काहि लोक टोकाचे असतात...कोणी अति तापट, अतिशय सरळ, नको इतके स्पष्टवक्ते, साखरपेरणी करून स्वार्थ साधणारे..असे अनेक. कुठलीच व्यक्ती हि सगळ्यांशी समान कधीच वागत नाही असं मला वाटतं. आपण समोरच्याशी काय बोलतो, वागतो याचा समोरची व्यक्ती सोडून अनेक गोष्टींशी संबंध असतो...जसे तुम्हा दोघातले आधीचे नाते, चालू असलेला चर्चेचा विषय, त्या क्षणाचे तुमची मानसिकता, समोरच्या व्यक्तीचे वय वगैरे वगैरे. म्हणूनच तर "तू माझी अमुक-तमुक आहेस म्हणून ठीक नाहीतर दाखवलं असतं", "आधीच माझा मूड नाहीये त्यात अजून तुझं परत नको", "आजोबा, वयाकडे बघून सोडून देतोय" अशी वाक्ये आजवर कित्येकदा ऐकली असतील. आपण स्वत:हि कित्तीतरी वेळा विचित्रपणे बोलत असतो किंवा समोरच्याच्या बोलण्याचा सोयीस्कर अर्थ काढत असतो. अगदी त्या व्यक्तीला आगाउ, नाटकी, शिष्ठ वगैरे लेबलं लावून मोकळे होतो.
आपलं रूप, बुद्धी जशी निसर्गदत्त आहे तसंच स्वभावाबाबतीत म्हणावं लागेल. पण मूळच्या स्वभावाला थोडं वेगळं वळण देता येतं ते संस्काराने, शिक्षणाने.... आता हे वळण म्हणजे नक्कि काय? तर आपल्या स्वभावातील जो dominating गुण आहे त्याला काबूत ठेवायला शिकणे. तापट माणसाने ऊठ्सूट आरडाऒरडा केला तर कोण त्याच्याशी मैत्री करायला धजेल? नको इतके सरळ असाल तर दुनिया तुम्हाला हातोहात विकेल...तुमच्या दरवेळी अति स्पष्ट्वक्तेपणामुळे किती लोक निष्कारण दुखावले जात असतील देव जाणे. स्वत:च्या स्वभावाचे असे टोकाचे कंगोरे लक्षात घेऊन काहि सकारात्मक कृती केली, प्रयत्न केला तर खरं शहाणपण. गुण आणि अवगुण यात एक धूसर रेषा असते....ती धूसर असली तरी त्याची खूणगाठ मनाशी पक्कि कराल तर बरंच जग, लोक तुमच्या जवळ येईल. कारण स्वभाव नि लोकसंग्रह हे सरळ प्रमाणात असतात. आपला स्वभाव सगळ्यात जास्त फायदा किंवा नुकसान आपलं स्वत:च करत असतो. जितके चांगले संस्कार होतील, चांगले वातावरण असेल, चांगले वाचन होईल तितक्या लवकर हि गोष्ट माणूस आत्मसात करू शकतो.
रूप निसर्गदत्त असलं तरी आपण अधिक चांगले दिसायचे प्रयत्न करतोच कि...मग हेच स्वभावाच्या बाबतीथि करून पाहूया. "मी अशीच आहे", "मला बदलणं शक्य नाही" हि वाक्य निष्कारण आत्मघातकि ठरायला नकोत..... शेवटी परिपक्वता म्हणजे काय? ती स्वभावाची एक अशी अवस्था आहे जिथे तुमचा स्वभाव सगळ्यांना आपलंस करू शकतो, समजून घेऊ शकतो. rational behaviour हे अनेकदा प्रयत्नपूर्वक मिळवलेलं असतं. कुठलीहि गोष्ट प्रयत्नानेच मिळते.... चांगली व्यक्ती होण्यासाठी उत्तम स्वभाव असावा लागतो...आणि त्यासाठी कष्ट घ्यावेच लागतील.

Friday, May 04, 2007

माधुरी दिक्षित


हे नाव आपल्या कोणालाहि अनोळखी नसेल... हिचं नाव ’माधुरी’ ठेवावं असं ज्या/जिला कोणी वाटलं तो खरंच मस्त माणूस असणार. नावाप्रमाणेच मधुर चेहरा आणि हास्य असणारी हि माधुरी दिक्षित!!!
चारचौघींसारखी मराठी कुटुंबात वाढलेली हि मुलगी.... निसर्गदत्त सौंदर्य घेऊन जन्माला आली आणि दिवसेंदिवस ते सौंदर्य खुलतच गेलं. प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजध्यक्ष एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते "अबोध नंतर माधुरी माझ्याकडे portfolio करता आली. नवीन चेहरा असल्याने मी तिला मेक-अप साठी लवकर यायला सांगितलं होतं. ठरलेल्या वेळेला ती आली. तिला बघितल्यावरच मला जाणवलं कि या जातिवंत सुंदरीला जास्त मेक-अप ची गरज नाही. ओठांचा शेपहि इतका perfect कि नुसतं lipstick लावा कि काम झालं" आणि खरंच असावं ते.... एक ’साजन’ पिक्चर सोडला तर इतर सगळ्यामध्ये मला ती आवडली आहे. (साजन मध्ये खूप pimples आहेत तिला....आणि माठ cameraman ने closeup घेऊन घेऊन ते सगळ्यांना बघण्याची शिक्षा केली.)
वयाच्या सोळाव्या वर्षी माधुरीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.... घरून थोडासा विरोध पत्करूनच!!! पहिला सिनेमा आला नि गेला.... मग अधिक गंभीरतेने विचार करून तिने photo session केले. कस्तुरी च ती...फोटो बघून दिग्दर्शक विचार न करतील तरच आश्चर्य!!! अबोध नंतर २ वर्षांनी ’तेजाब’ आला. बस्स!!! माधुरी रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर होती. ’एक-दोन-तीन’ या गाण्यावर नाचणारी माधुरी, ’सो गया ये जहॉं’ मध्ये अनिल कपूर कडे भांबावून बघणारी माधुरी!!! स्टेप कट, काळे टपोरे डोळे, सरळ नाक...छोटी जिवणी...एकूणच त्यावेळच्या दाक्षिणात्य चेहऱ्यांना आणि उत्तर भारतीय बाहुल्यांना कंटाळ्लेल्या लोकांना माधुरी आवडली. सरोज खान तर आजहि तिचे मनापासून कौतुक करते. ’एक-दोन-तीन’ या गाण्यासाठी माधुरीने प्रचंड मेहनत घेतली होती. जवळ जवळ आठ दिवस रोज ती या नाचाची practise करायची. There are no short cuts to serene and complete success हे किती आधीच माहित होतं तिला!!!
तेजाब हि केवळ सुरूवात होती. त्यानंतर राम-लखन, दिल पासून DTPH, देवदास हा प्रवास थक्क करणारा आहे. १९८७ पासून १०-१२ वर्ष माधुरी bollywood मध्ये चमकत राहिली. नजर खिळवून ठेवणारं सौंदर्य, ताकदीचा अभिनय...आपण ज्या वेगाने चालूहि शकणार नाही त्या वेगाने नाचणारी माधुरी... पुढे जाऊन तर लोकांनी तिला ’लेडी अमिताभ’ म्हट्ले. तिचे एकूण चित्रपट पाहता खूप कमी चित्रपट खऱ्या अर्थाने flop झाले.... तिच्या नावावर सिनेमा चालत असे. आणि हे सगळं यश माधुरीच्या गुणांवर तिने मिळवलं होतं.... कुठलीहि अनावश्यक तडजोड, थिल्लरपणा न करता. १०-१२ वर्ष चंदेरी जीवन जगताना एकाहि वादात, वादळात हि अडकली नाही वा कुठल्या एकाबरोबर हिचं नाव केवळ gossip च्या पुढे जाऊन जोडलं गेलं नाही. (हे खूप अवघड आहे...आजूबाजूला इतके सुंदर, श्रीमंत...तुमची स्तुती करणारे लोक असताना त्या नात्यातील व्यावसायिकता ओळ्खून स्वत:ला सावरून पुढे नेणं...आणि हे सगळं वयाच्या विशीत!!! सोपं नाही ते. एक हिंदी सिनेमा ’दीवाना’ हिट झाला नि दिव्या भारतीने साजिद नाडियादवाला शी लग्न केले. वय फक्त १८. या सगळ्याची परिणीती पुढे कशात झाली ते जगजाहिर आहे.)
माधुरीच्या सिनेमांचं वैशिठ्य म्हणजे गाणी आणि तिची नृत्य-अदा!!! ’एक-दोन-तीन’ , ’बडा दुख दिया तेरे लखन ने’, ’धक धक करने लगा’, ’हमको आजकल है इंतजार’, ’है के सेरा सेर....हमे प्यार का है आसरा चाहे जो हो’, ’माई नी माई मुंडेर पे तेरे’..... किती गाणी!!! आणि त्यातली माधुरी..... facial expressions कोणी हिच्याकडून शिकाव्यात. डोळे, ओठ यांच्या सुबक हालचालीतून इतकं व्यक्त करायची माधुरी कि बास!!! ते सगळं बघताना मी (एक मुलगी असून) घायाळ होते तर मुलं वेडी न होतील तरच आश्चर्य!!!
प्रत्येक गोष्ट, जी वर जाते, तिला खाली यावंच लागतं. हा निसर्गनियम आहे. माधुरीची कारकिर्द त्याला अपवाद नाही. पण हे माधुरीला माहितच असावं. (or she was prepared for it) नवऱ्याबद्दलच्या कल्पना, अपेक्षा यावर पण ती जणू ठाम होती. लग्न करायचं ठरल्यावर रितसर भेटून, बोलून आपला हात तिने श्रीराम नेने च्या हातात दिला. तिच्यासारखाच तिचा नवरा...देखणा नि कर्तत्ववान!!! लग्नानंतर ५-६ वर्ष केवळ नवरा, मुल नि घर.... आता मुलं जरा मोठी झाली. And even Madhuri is back in shape after 2 deliveries.... आता ती परत येतेय!!! पण कधी, कुठल्या रोल मध्ये...अजून तरी माहित नाही...पण तिचे पुनरागमनहि तितकेच यशस्वी ठरो... उघड्या-बोडक्या, अश्लील नाच करणाऱ्या आजकालच्या मुलींपेक्शा माधुरीने परत आपली जादू चालवावी. Madhuri..this true fan of yours...is just waiting for your come back. Come back soon and with equal grace as before!!!

Wednesday, April 18, 2007

पुढचे पाऊल...

उद्या माझा या कंपनीतला शेवटचा दिवस.... पूर्ण दिवस कदाचित formalities पूर्ण करण्यातच जाईल. कदाचित जाता जाता सहकारी काहि भावुक बोलतील, काहि चांगलं बोलतील... नेहमीप्रमाणे ६ वाजले कि मी घरी जायला निघेन. पण ते सध्यासाठी शेवटचं असेल.... निदान पुढचे २-३ वर्षतरी मी दुसरीकडे कुठे असेन.
HR वाले एक टिपिकल exit interview घेतील. का, कुठे, कधी, कसं या त्यांच्या ठरलेल्या प्रश्नांना मी पण ठरलेलीच उत्तरे देईन.... सवय झालीये का मला आता याची?? सगळंच रूटिन वाटू लागलंय. १० वी च्या send off ला रडायचं नाही असं ठरवूनही वर्गात गेल्यावर भावना अनावर झालेली मी आणि आजची मी, पहिल्या वहिल्या नोकरीमध्ये office boy (जो माझ्याहून कमीतकमी १०-१२ वर्षाने मोठा होता) अहो जाहो म्हणवून घेताना अवघडणारी मी आणि आताची मी.....बदललेय नक्किच!!! काळानुसार सगळ्याची सवय होत गेली कि वयाप्रमाणे घराबाहेरच्या जगाबद्दल भावना बोथट होत गेल्या?
या कंपनीने मला बरंच काहि दिलंय... खूप गोष्टी शिकले. And I have due respect for all that....
मुख्य म्हणजे या कंपनीने मी शोधत असलेलं brand name मला दिलं. आत आल्यापासून दुसऱ्या आठवड्यापासून ते आजतागायत मला सतत प्रोजेक्ट(billable) वर ठेवलं. इथले बरेच लोक ६-८ महिने बेंचवर असताना मी खरंच नशीबवान आहे. माझ्या मॅनेजरने एक प्रोजेक्ट in process कसा ठेवायचा ते शिकवलं. (ज्याचा मला KT ला अतिशय फायदा झाला. ) याच मॅनेजरशी पुढे माझे इतके खटके उडाले कि जाता जाता त्याने people manager कसा नसावा हे शिकवले. (no one likes too pushy manager)
प्रचंड मोठा, देखणा कॅंपस, ४-५ हजार लोक या सगळ्यात सुदैवाने मला कधीच हरवल्यासारखं झालं नाही. याचं एक मुख्य कारण माझे सहकारी असावेत. १५-१६ जणांची माझी टिम जबरदस्त आहे.... त्यांना सोडून जाताना खरंच वाईट वाटतंय.... गेल्या २० महिन्यात आमची ३-४ मोठी टिम आऊटिंग्ज झाली. जाम धमाल केली प्रत्येक वेळी आम्ही. पहिल्या दिवशी मोजक्या २-३ लोकांना ओळ्खत होते नि आता सहज बाहेर पडलं कि ट्रेनीपासून delivery head, location head अशी अनेक लोकं हाय करतात.
खूपच well defined processes, professional attitude towards implementation of it हे एक ठळक वैशिष्ठ्य आहे इथलं... अगदी आजहि मी final settlement बाबत मेल केली तर व्यवस्थित उत्तर मिळालं.
माझ्या resource manager शी जेव्हा मी resignation बद्दल बोलले तेव्हा त्याचा पहिला प्रश्न "why?"
"मनासारखं काम नाही....भविष्यात पण मिळेल असं सध्या दिसत नाही. आणि काम नसेल तर growth कशी होईल?"
"u will not always get what u want when u expect it. Sometime u need to wait and watch"
"गेले सहा महिने मी तेच करतेय. release द्या म्हणून ओरडतेय. but all went in vain. And now I dont have time to wait and watch...as I am planning to retire by 40-42..."
तो मस्त हसला....
मग रितसर एक एक टप्पा करत करत आजचा दिवस आला.... आता काम तसं काहिच नाहिये. गेला आठवडाभर breakfast ४० मिनिटे, लंच १ तास...परत संध्याकाळी कॅंटीन अर्धा तास असं चालू आहे. उद्या संध्याकाळी हा करियरमधला चतुर्थ अध्याय संपेल...नि पंचम सुरू होण्यापूर्वी २ आठवडे मी "सुशिक्षित बेकार" असेन. माणसाला जी गोष्ट आधी मिळालेली नसते ती अचानक भरपूर मिळाल्यावर त्याचा गोंधळ उडतो... तसंच आता या २ आठवडे सुट्टीचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे मला :)
पंचम अध्याय आधीच्या सगळ्यापेक्षा जास्त फलदायी असावा.... मी १००% दिलं तर मोबदला म्हणून मला त्यांनी ११०% द्यावं. शेवटी देण्या-घेण्यानेच तर संबंध दृढ होतात ना!!!

Monday, April 16, 2007

पाऊस

ऊन्हाळा सुरू झाला.... बघता बघता पारा ४० अंशापर्यंत गेला.... संध्याकाळी घरी जातानापण रस्त्यावरच्या गरम वाफा नको वाटतात. मग असंच एका रविवारी आभाळ दाटून येतं...उकाडा जास्तच जाणवू लागतो. अचानक जोराचं वारं वाहू लागतं...वाटतं, आता हे ढग पळून जाणार. शिशिर ऋतुमुळे घराच्या मागच्या औदुंबराची पाने गळायलाच आलेली....अशातच या वाऱ्याने ती एकदम गळू लागली. वा!!! एखाद्या सिनेमात बघावं तसं दिसतंय अगदी.....वारा जरा कमी होतॊ...एक थेंब, दोन, तीन...पाऊस पडायला लागला. ऊन्हाने तापलेल्या मातीवर पाणी, त्या मातीचा तो सुवास...खॊल श्वास घेऊन मी तो मनात साठवते. अजून रस्ता ओला झाला नाही इतक्यात दिवे जातात... मी हातातलं पुस्तक (पानिपत) बंद करून खिडकीतून पाऊस बघत बसते.... पाण्याचे ते टपोरे थेंब, आमच्या बागेतली सगळी झाडे स्वच्छ धुवून निघतात. पावसाचा जोर कमी होतो.. कोकिळा ऒरडतेय. पाऊस थांबला...अरे वा!!! दिवे पण आले. मी वर्ल्ड कपची मॅच बघायला लागते. आता मला कोण जिंकतंय/ हारतंय याने काहिच फरक पडत नाही.... बाकि काहि बघण्यासारखं नाही म्हणून खरं तर मी मॅच लावली आहे.
आज परत सोमवार....नवीन आठवडा चालू....आणि हो, चालू कंपनीमधला शेवटचा आठवडा!!! या आठवड्यात काम तसं काहिच नाही (आधी होतं असंहि नाही :))... दिवसभर टंगळमंगळ करते.... बाहेर काय चालू आहे हे मला माझ्या क्युबिकल मध्ये बसून काहिच कळत नाही. सहा वाजले..... मी घरी जायला उठते.... अरे....आजपण पाऊस!!! बरं झालं, आज लखनवी नाहि घातला. उगाच खराब झाला असता. शी!!! किती बोर विचार करतेय मी धुंद पावसात. सगळी लॉन एकदम टवटवीत दिसतेय... रोजचाच हा कॅंपस पावसात मस्तच दिसतो.... पाठीमागे वळून एकदा तो २५ एकर परिसर पाण्यात न्हाताना बघते. युन्हिवर्सिटी नंतर मला फक्त याच कॅंपसने मोहिनी घातली. आणि हि मोहिनी पावसात जास्तच गहिरी होते.
एखाद्या यंत्राप्रमाणे मी बसमध्ये जाऊन बसते. वा!!! आज खिडकीची जागा :) उपरवाला कुछ तो मेहेरबान है गरीब पे। mp3 player काढला....या वातावरणात मला अजून वेडं करणारं गाणं चालू आहे...
"तू हि मेरी शब है, सुबह है...तू हि मेरी लम्हा
तू हि मेरा रब है खुदा है...तू हि मेरी दुनिया"

माझ्या आयुष्यात कधी येणार असा माणूस? असा पाऊस असावा.... काहिहि न ठरवता त्याने मला ऑफिसमध्ये पिक-अप करायला यावं... कार नको, बाईक च!!! रिमझिम पावसाचे थेंब मला भिजवताहेत....पण त्याहून जास्त मी त्याच्या मनकवड्या प्रेमाने भिजतेय. पावसाचा जोर वाढतो...तसं आम्ही जवळच्या भजी-चहा च्या गाडिजवळ थांबतो.... मस्त वाफाळता चहा!!! इतक्यात कोणी त्याच्या ओळखीचं दिसतं....मस्त जोरात शिट्टी मारून तो त्या मित्राला हात करतो. (हो, त्याला खणखणीत शिट्टी वाजवता यायलाच हवी) पाऊस जवळ जवळ थांबला....गार वारा सुटलाय. त्याबरोबर उडणारे माझे केस मी बांधयला बघते...."राहू दे गं....असेच छान दिसतात"
बाईकला किक मारून आम्ही पुढे जायला निघतो.

कित्येक पावसाळे कोरडे गेले नि कित्येक जाणार आहेत माहित नाही..... दर वर्षी बाहेर पडणारा पाऊस मला आतल्याआत अजून अजून कोरडा करत जातो. काहितरी नसल्याची तीव्र जाणिव करून देत पाऊस पडत राहतो..... एकाजागी शांत बसून मी तो नुसता बघत असते.... कदाचित असा एकटिने अनुभवायचा हा शेवटचा पाऊस असा विचार करत, पुढच्या वेळी माझ्या शेजारी बसून पाऊस बघायला तो असेल. त्याचं जवळ असणंच मला धुंद करणारं असेल..... पावसाच्या एका एका थेंबातून प्रेमाचा कणनकण विरघळत जाईल.

Thursday, April 12, 2007

नावात बरंच काहि आहे..

"नावात काय आहे?" हे शेक्सपियरचं एक अतिप्रसिद्धी लाभलेलं वाक्य... पण हे नेहमीच सगळीकडे लागू होऊ शकेल का?
विचार करूया -
  • दूध डेअरी चे नाव "पाणचट" असे आहे.
  • बेकरी ने ब्रेड चे नाव "पुराना" असे ठेवले.
  • भाजी मंडई चे नाव "पालापाचोळा" आहे.
  • एका मोठ्या हॉस्पिटल चे नाव "यमसदन" असे आहे.
  • गिफ्ट शॉप चे नाव "घेऊन टाका" असे आहे.
  • तुम्ही ज्या भागात राहता त्या भागाचे नाव "कटकट नगर" आहे.
  • एखाद्या सुंदर टुमदार बंगल्याचे नाव "काळापैसा" आहे.
  • रसवंतीगृहाचे नाव "अपेय पान" आहे
  • बॅंकेचे नाव "अफरातफर" आहे.
  • रेल्वे चे नाव "बर्निंग ट्रेन" आहे.
  • गॅरेज चे नाव "डब्बा गाडी" आहे.
  • गाण्याच्या क्लास चे नाव "भसाडा गायन शाळा" आहे.

तर "नावात काय आहे?" याचा मतितार्थ खरं तर जाती धर्मात काय आहे असा अपेक्षित असावा शेक्सपियर ला. म्हणजे मी स्नेहल नसून सुझी असते तरी फारसा काहि फरक पडत नाही. माणसाची वृत्ती, स्वभाव महत्त्वाचा!!!

पण इतरवेळा, माणसाव्यतिरिक्त सगळीकडे नाव महत्त्वाचंच असतं ना....कारण इतर गोष्टींना आपण विशिष्ठ कार्य नेमून दिलं आहे. बॅंक, रेल्वे, बस, डेअरी.... काहिहि म्हणलं तरी आपल्यासमोर त्याची एक प्रतिमा असते.... माणसाच्याबाबतीत नुसत्या नावावरून काहि ठोक प्रतिमा तयार करता येत नाही....करू नये. तरीपण एखाद्याचे नाव हिटलर, फुलनदेवी असेल तर मनात शंकेची पाल चुकचुकेलच ना!!! मग "नावात काय आहे?" या म्हणण्यात किती तथ्य आहे? म्हणूनच मला वाटतं कि नावात बरंच काहि आहे. :) तुम्हाला काय वाटतं?

Thursday, April 05, 2007

ऑर्कुट आणि Testimonial

आज बऱ्याच दिवसांनी ऑर्कुटवर मनसोक्त टाईमपास करायला मिळाला. (असतो एकेक दिवस चांगला न काय:)) सगळे स्क्रॅप्स बघून रीप्लाय करून झाले.... नेहमीप्रमाणे न बघता मेल्स डिलीट केल्या.... नेहमीच्या कम्युनिटीज बघून झाल्या..... तरी पण वेळ होताच...म्हणून मग काहि लोकांना स्वत:हून स्क्रॅप करून hi, hello करायला सुरूवात केली.
बरेच जुने लोक मला या ऑर्कुट मुळे भेटले..शाळा (अगदी प्राथमिकचे लोक पण), कॉलेज, ऑफिस १, ऑफिस २, ऑफिस ३, ऑफिस ४, मायबोली....असे कितीतरी जण. कोण कुठे, काय करतात.... वगैरे बरंच इथेच कळलं. बऱ्याच बातम्या लोक परत इथे भेटल्यामुळे समजल्या. परत अरे माझा हा मित्र त्या "आऊच्या काऊ" (अभिजीत कडून हा शब्द उधार घेतलाय) ला पण ओळखतो असले शोधदेखील इथेच लागले. मित्र-मैत्रिणींचे फोटो, त्यांच्या नवरा-बायको, पोरंटोरं इ. चे फोटो.... (हे म्हणजे अगदी टिपिकल असतात...गळ्यात हात घातलेले नवरा बायको, घोडा, खेळण्यातली स्कूटर वरचं मूल वगैरे वगैरे) हे तर आहेच.
ऑर्कुटमुळे हे सगळं तर परत नव्याने कळ्लच....पण जरा हट्के वाटलं ते इथलं testimonial प्रकार. म्हणजे हे ऑर्कुटवालेच तुम्हाला सांगणार "Have a great friend? Write a testimonial and let people know!"..मग आम्ही विचार करणार कि कोण बाबा असा great friend?? आणि त्याबद्दल जगाला सांगणारे आम्ही असे कोण great? बरं पण ते जाऊ दे.... मी काहि काहि लोकांच्या होमे पेज वर अक्षरश: ७-८ testimonials पाहिले आहेत. मस्त मस्त लिहिलेलं असतं पब्लिकने.... माझ्याच ओळखीच्या माणसांबद्द्ल काहि नवीन कळतं. ते वाचताना मला इतकं बरं वाटतं तर प्रत्यक्ष ज्याच्या बद्दल लिहिलंय तो बहुतेक २ क्षण हवेत तरंगूनच खाली येत असेल. इथले पंखा (fan) प्रकार पण तसाच!!! लोकांना १७-१८ पंखे आहेत...वा!!! आम्हाला celebrities ना पंखे असतात हेच माहित... असाच चुकून एकदा मला माझा पंखा दिसला.... दचकून बघितलं कि कोण बाबा... तर तो निघाला माझा ex-colleague. आता करीयरच्या सुरूवातीला केली असेल चुकून मी काहि मदत त्याला...पण तेव्हढ्याने हा पंखा झाला असेल हे माहित नव्ह्तं.
माझा कॉलेज मधला प्रोजेक्ट पार्टनर एकदा मला म्हणाला माझ्यासाठी आत्ताच्या आत्ता testimonial लिहून दे. म्हणलं आत्ता काय? सुचत नाही काहिच... तर म्हणे नाही..जे सुचेल, वाटेल ते लिही. असं असेल तर काय!!! लिहिलं ७-८ ओळी आणि केलं submit. तर ते वाचून हा पठ्ठ्या म्हणतो.."हे काय असं? चांगलं लिही कि काहितरी." आता हा म्हणजे कळस होता...एकतर मनात येईल ते लिहा..वर परत चांगलं??? आता नसेल माझ्या मनात त्याच्या बद्दल त्यावेळी चांगलं आलं तर काय करणार? (तसंहि आम्ही एकमेकांना कॉलेज पासून शिव्याच घालतो) तर हे असं आहे. testimonial हे ९०% चांगलं सांगणारे नि १०% इतर सांगणारे असावेत बहुतेक.... हो, आता बहुतेकच... मला कुठे अनुभव या testimonial प्रकाराचा??? सांगायला हे खंडीभर मित्र-मैत्रीणी आहेत.... याहू वर शे-दोनशे, ऑर्कुटवर शेकडा+... पण एकाला माझ्याबद्दल काय लिहावं कळत नसावं किंवा आवर्जून सांगावं असं म्या पामरात काहि नसावं. इतरांचे testimonials वाचूनच एखादा उसासा सोडायचा आणि कधी कोणी चार शब्द आपल्याबद्द्ल लिहिल चांगलं अशी आशा ठेवून ऑर्कुटमधून लॉगऑफ करायचं.

Monday, March 26, 2007

कौसल्या


आज रामनवमी... पुरूषोत्तम रामाचा जन्म पुराणकाळात आजच्या दिवशी झाला. दशरथ राजाचा राम हा पहिला पुत्र. असं म्हणतात कि रामजन्मानंतर संपूर्ण अयोध्यानगरी आनंदून गेली होती. राजाला पुत्र झाला, राज्याला वारस मिळाला... पुढे हा दशरथपुत्र खरोखर एक आदर्श राजा झाला. इतका कि "रामराज्य" हि एक संकल्पना झाली.
पण मला नेहमी वाटतं कि या सगळ्यात रामाची आई, राणी कौसल्या, कुठेतरी हरवून गेली. एक आदर्श पुरूष घडायला एका आईचे योगदान, संस्कार सगळ्यात महत्त्वाचे असतात. कौसल्या हि दशरथाची पहिली राणी. त्यानंतर अजून २ राण्या झाल्या. सगळ्यात धाकटी कैकेयी. कैकेयी हि आवडती राणी!!! पण राणी कौसल्येने कधी सवतीमत्सर केल्याचा उल्लेख नाही. पुत्रप्राप्तीसाठी ओटि मिळालेला प्रसाद देखील हिने वाटून घेतला. याच प्रसाद भक्षणाचे फलित म्हणजे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे चार दशरथ पुत्र!!!
कृष्णाच्या बाललीलांप्रमाणे रामाच्या बाललीला फारशा नसाव्यात. निदान त्याचा उल्लेख तरी कमी आढळतो. पण त्याच कोवळ्या संस्कारक्षम वयात कौसल्येने रामाला घडवण्यासाठी केलेले प्रयत्न पण दुर्लक्षितच राहिले. हा काळ असा असतो कि मूल सगळ्यात जास्त आईजवळ असते. आई हेच विश्व!!! पण रामाने चंद्राचा हट्ट केला आणि कौसल्येने तो प्रतिबिंब दाखवून पुरा केला याउपर आई-मुलगा यांच्या नात्याचा विशेष उल्लेख नाही. कैकेयीने भरताला राजगादीवर बसवण्यासाठी रामाला वनवासात जायला सांगितले. कैकेयीच्या अशा वागण्याने दशरथ कोसळला होता. ज्याला जन्म दिला तो आता वनवासात जाणार आणि ज्याच्याबरोबर जन्म काढला तो दु:खाने विव्हळ होतोय, हे सगळं कसं सहन केलं असेल कौसल्येने? वनवासात जा असं सांगणाऱ्या आईबद्दल मनात कटूता न ठेवता विनम्र भाव ठेवणे याचं बाळकडू रामाला याच कौसल्येने दिलं असेल ना!!! लेखकांनी उर्मिलेचं (लक्ष्मणाची बायको) दु:ख मांडलं, पण पुत्रवियोग सहन करणारी कौसल्या दिसलीच नाही का?
अजाणतेपणे कर्णाला जन्म देणारी कुंती, शंभरपुत्रांची आई गांधारी, कृष्णाला जन्म देणारी देवकी आणि संगोपन करणारी यशोदा सगळ्यांचा पुराणकाळात स्वतंत्र उल्लेख, अस्तित्व दिसून येतं. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई, सानेगुरूजींची आई यांनी मुलांवर लहानपणी केलेले संस्कारांचे महत्त्व सगळेच जाणतात. मग नेमकी कौसल्याच का दुर्लक्षित राहिली? सर्वश्रेष्ठ पुरूष जिच्या पोटी जन्माला आला ती आई तितकीच महान नसणार का? शंकरासारखा नवरा मिळावा म्हणून बायका व्रत करतात मग रामासारखा मुलग व्हावा अशी इच्छा होत नाही का यांना? कि पतिसुख, पतिप्रेम हे पुत्रसुख आणि पुत्रप्रेमाहून जास्त प्रिय आहे बायकांना?
कलियुगात यशोदा, देवकी, जानकी, उर्मिला अशा नावाच्या मुली सहज दिसतील पण कोणी मुलीचे नाव कौसल्या ठेवलेलं ऐकलं आहे?
कोणी काहिहि म्हणो, माझ्यामते राम जितका श्रेष्ठ, नरोत्तम आहे तितकीच त्याची आई कौसल्या महान आहे. आज या रामनवमीदिवशी माझा कौसल्येला शतश: प्रणाम!!! असे पुत्र जन्माला घालण्याचे आणि घडवण्याचे सामर्थ्य कलियुगात अधिकाधिक स्त्रियांना लाभो.

Friday, March 23, 2007

सात्विक संताप

ऑफिस मध्ये रोज कितीतरी फॉरवर्ड मेल्स येत असतात...सगळं काहि मी बघतेच असं नाही. काहिकाहि लोक तर इतके फॉरवर्डस पाठवतात कि अशा लोकांसाठी एक rule लिहावासा वाटतो. पण न जाणो खरंच एखादी चांगली मेल आली अशा व्यक्तीकडून तर आपली miss नको व्हायला असा विचार करून मी कोण्या एका मेलच्या प्रतिक्षेत अशा १०० मेल्स सहन करून शहाण्या मुलीसारखी डिलीट करते.
आजहि अशाच एका व्यक्तीकडून एक मेल (खरंतर अनेक, पण त्यातली हि एक) आली. सवयीप्रमाणे डिलीट करणार इतक्यात त्यातल्या subject ने लक्ष वेधले गेले. subject होता - Let's salute these officers.....today....and year after year......we are enjoying freedom because of them only.....
बघू तरी मेल म्हणून ओपन केली. त्यातला मजकूर हा असा होता -
Today is 23rd March.
The day to be remembered as today is their 75th death anniversary...
We must salute these brave officers today also who sacrificed their lives for us only.
For our INDEPENDENCE only...
Sahidon ki chitaaoo pe lagenge har baras mele, Watan per marne waloon ka bas yahi baaki nishan hoga… (Bhagat Singh)


आज २३ मार्च आहे हे सकाळी लक्षात आलं होतं....माझी जाम चिडचिड झाली ते The day to be remembered as today is their 75th death anniversary हे वाचून.
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांना २३ मार्च १९३१ साली इंग्रज सरकारने फाशी दिले. आज या गोष्टीला ७६ वर्षे झाली, ७५ नाही. प्रखर विचारांचे भगतसिंग यांच्या फाशीने उभा देश हेलावला होता. २३ वर्षाच्या या मुलाने जे मतप्रदर्शन, जनजागरण केले होते ते तोंडात बोट घालायला लावणारे आहे. आपल्याच देशातील काहि महान नेत्यांनी भगतसिंगांवर कडाडून टिका केली होती. असे असतानाहि आज देशभराच्या सगळ्या शालेय पाठ्यक्रमाच्या इतिहासात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या त्रयीचा स्वतंत्र उल्लेख आहे. २३ मार्च १९३१ पासून आजतागायत त्यांच्या बलिदानाला आम्ही "शहीद" म्हटले आहे. हे सगळं काय केवळ शाळेत गुण मिळवण्यापुरतं??
तेजस्वी क्रांतिकारकांच्या रक्ताची हिच किंमत करते आमची पिढी?? अमिताभ, राणी मुखर्जी, शाहरूख खान यांचे वाढदिवस मुखोद्गत असतील पण भगतसिंगांना फाशी झाली तो दिवस, जो आमच्या स्वातंत्र्यलढ्यातला महत्वाचा दिवस आहे तो लक्षात राहत नाही. इतके casual केलंय आम्हाला स्वातंत्र्याने??
प्रत्येकाची गती वेगवेगळ्या क्षेत्रात असते, सगळं लक्षात ठेवणे वस्तुत: शक्य नाही हे मलाहि मान्य आहे. मी स्वत: कित्येक महत्वाचे दिवस, घटना विसरते. पण एखादि मेल ज्यात ऐतिहासिक किंवा इतर महत्त्वाचे काहि आहे असे आपण जेव्हा इतर १५-२० लोकांना वाचायला फॉरवर्ड करतो तेव्हा एकदाहि तपशीलात जायची गरज वाटत नाही??? तुमचा जन्मदिवस समजा एका वर्षाने कोणी पुढे मागे केला तर काय प्रतिक्रिया असेल?? तुम्ही तर असे कोण ज्यांच्या बाबतीत लोक लक्षात ठेवतील... पण भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी देशासाठी प्राणार्पण केले आहे, त्याची निदान दिवस लक्षात ठेवून तरी चाड ठेवा. आजच्या पिढीला केवळ पूर्ण आयुष्य देशात घालवा असं म्हणलं तरी त्रास होईल, जीव देणं तर लांबच!!!

खूप चिडचिड होते माझी, संताप होतो.... कि काय होतंय, काय होणार आहे??

Tuesday, March 20, 2007

जीवघेणा छंद....

काल सकाळी ऑफिस ला आले.. नेहमीप्रमाणे Hi, good morning करत माझ्या डेस्कपाशी आले. योगेश (माझ्या शेजारी बसतो) आधीच आला होता. मी आलेले बघून त्याने पटकन वळून विचारलं
"काल पेपर मध्ये वाचलस का?"
" काय????"
"तो केदार देशपांडे गेला..."
"कोण रे??"
"अगं तो माझ्या ट्रेकिंग ग्रुप मधला... enduro-3 जिंकलेला..."
"काय सांगतोस??? कसा काय?"
"सकाळ ला आली आहे ना बातमी...वाचली नाहिस का?"
मी काहिच बोलले नाही.... मशिन चालू करून आधी इ-सकाळ उघडला....
तशी या केदारला मी कधी प्रत्यक्ष बघितले नाही. योगेश कडूनच मी त्याच्याबद्दल ऐकलं होतं, बरेच फोटो बघितले होते. केदार....इतर चार जणांसारखा मुलगा. BE झाल्यावर रितसर एका मोठ्या IT कंपनीमध्ये सर्व्हिस करत होता. लहानपणापासून याला ट्रेकिंगचा अतिशय नाद... केदार आणि मंदार (जुळा भाऊ) ने मिळून अनेक ट्रेक केले. सर्व्हिस सुरू झाल्यावर केदार ने कंपनीतच एक treker's club चालू केला. उन्हाळा,पावसाळा कुठलाहि ऋतू असो.... २-३ weekend गेले कि एखादा नवीन ट्रेक करायचा. long weekend ला काहितरी मस्त प्लॅन करायचा... हे सगळं अगदी रूटिन. जणू डोंगर, दऱ्या-खोऱ्या फिरणं हाच त्याच्यासाठी श्वास!!!
यावर्षी enduro3 हि स्पर्धा केदार ने आपल्या सोबत एक मित्र-मैत्रीण घेऊन प्रथम क्रमांकाने जिंकली. योगेशला त्या दिवशी झालेला आनंद अजून आठवतो मला!!! लगेच दुसऱ्याच दिवशी केदारचे enduro3 मधले फोटो बघितले. ते सगळं वाचताना, फोटो बघताना मलापण आनंद होत होता. आणि मला आश्चर्य वाटलं ते याचं कि इतका मोठा ट्रेक करून हा मुलगा दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिस मध्ये होता!!! अशा साहसाची, कष्टांची त्याला इतक्या लहानपणापासून सवय होती कि असं काहि केलं नाहि तरच त्याला चैन पडत नसावं.
दरम्यान केदार-मंदार चा वाढदिवस झाला. वयाची २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल योगेश त्याची फोनवर खेचत होता. तेव्हा कुठे कोणाला माहित होतं कि हा दिवस परत फिरून केदारच्या आयुष्यात येणारच नाहीये.
इ-सकाळ मध्ये ही बातमी वाचली अन क्षणभर काहि सुचेनासं झालं. हे कसं शक्य आहे असं राहून राहून वाटलं. कित्येक गड हा मुलगा लिलया चढला होता... सिंहगड तर त्याला अतिपरिचीत होता. धोक्याच्या जागा माहित नसणं, पुढचा मागचा विचार न करता काहितरी साहस करणं असं काहि केदार बाबतीत झालं असण्याची शक्यता कमीच. मग नक्कि काय झालं?? कि वेळच सांगून आली होती?? ज्या छंदासाठी तो जगत होता त्या छंदानेच त्याच्यावर झडप घालावी!!! आणि अशाप्रकारे कि त्याला कसला विचार करायची उसंतच मिळू नये?? हे सगळंच दुर्दैवी आहे.
मी कोण, कुठली.... आम्ही कधी प्रत्यक्ष भेटलो नाहि तर मला या यातना होत आहेत.... मंदार, त्याचा सख्खा जुळा भाऊ, त्याला काय होत असेल? लहानपणापासून सावलीसारखे सोबत असलेले हे जुळे भाऊ.... एक गेला तर दुसऱ्याचं अस्तित्व हरवावं इतके जवळ. आई-बाबांनी कसं सहन करावं?? तरणा ताठा, सुविद्य, सुसंस्कारी मुलगा.... नेहमीप्रमाणे ट्रेकला जातो आणि घरी परत येतो तो त्याचा मृतदेह!!! नियतीने क्रूर थट्टा केली या कुटुंबाची.
मला सगळे गड चढून बघायचे आहेत हि इच्छा असणाऱ्या केदार ने मरणाचा गड पण किती सहज पणे पार केला. पण तो इतक्या लवकर करायला नको होतास केदार!!!

Monday, March 12, 2007

मधुमिलन

२-३ दिवस सतत साडी नेसल्याने केतकीला कधी एकदा कपडे बदलेन असं झालं होतं. दगिने काढायला म्हणून ती आरशासमोर उभी राहिली. इतक्यात बेल वाजली. बघते तर प्रसन्न च होता.

"काय रे, आई बाबांना सोडायला जाणार होतास ना?"
"हो... चाललो आहे. एक काम राहिलं, म्हणून आलो परत वर." असे म्हणत त्याने तिला हातात एक बॉक्स देत मिष्किलपणे डोळे मिचकावले.
"काय?" केतकी.
"उघडून बघ. आणि मी येईपर्यंत घालून बस. मी आलोच."
"सावकाश जाऊन ये रे"
"आज नाही. अब ये दूरी सहि ना जाये..." बाहेर पडता पडता प्रसन्न केतकीच्या पाठीवर ओठ टेकवून गेला.
केतकी मनोमन लाजली.
(आज च्या रात्री या दोघांना एकांत मिळावा म्हणून घरातले सगळे पाहुणे, आई बाबा मामाकडे गेले होते.)

तो बॉक्स उघडून बघितला तर त्यात सुंदर सॅटिन चा, लेमन कलरचा २ पीस गाऊन होता. प्रसन्न ने दिलेल्या बॉक्स मध्ये असं काहि असेल हे वाटलंच नव्हतं तिला!!!
कपडे बदलून, चेहरा स्वच्छ धुवून केतकी ने तो गाऊन घातला. खूप गोड दिसत होता तो तिला. आरशात बघून ती स्वत:वरच जाम खूष होती. दोन दिवस सतत त्या मेक-अप मुळे तिला कंटाळा आला होता. केसाला नुसता एक fixer लावला. छान perfume, natural lipstic लावून केतकी टेरेस मधल्या आराम खुर्ची वर डोळे मिटून बसली.

तिचं मन मागे धावत होतं. सगळच कसं अचानक घडत गेलं होतं.
प्रसन्न हा एका मोठ्या IT कंपनीत project lead. मूळचा सोलापूरचा. आई-बाबा डॉक्टर. साधारण दहा वर्षांपूर्वी त्यांनी पुण्यात एक फ्लॅट घेऊन ठेवला होता. प्रसन्न च पुण्यातच settle व्हायचं ठरल्यावर त्या घराचं renovation करायचं ठरलं. एका interior decorator कडे प्रसन्न गेला आणि सगळं ठरल्यावर हि assignment केतकीच्या बॉस ने तिला दिली. घराची रचना, प्रकाशाचे प्रमाण वगैरे बघून केतकी ने कामाला सुरूवात केली. प्रत्येक वेळी ती आणि प्रसन्न भेटायचे तेव्हा केतकी काहितरी नवीन बदल सुचवायची त्याला. तिचे रंगसंगतीचे कौशल्य आफाट होते. बघता बघता अवघ्या ५ महिन्यात केतकीने वॉल restructing पासून furniture, lights सगळे पूर्ण केले. प्रसन्न आणि बॉस दोघेहि तिच्या कामावर खूष होते. शेवटचं पेमेंट करायला प्रसन्न ऒफिस मध्ये आला तेव्हा बॉस ने तिला केबिन मध्ये बोलावलं.

"केतकी, well done young lady"
"Thanks sir!!! I hope Mr. Prasanna is also happy" ती प्रसन्न कडे बघून म्हणाली.
"Oh yes, he is. Actually त्यासाठीच त्यांनी आज लंच ला बोलावलं आहे मला आणि तुला. पण I have got some more important work to do. But you go ahead please"
"सर...."
"प्लीज...." प्रसन्न म्हणाला.
"ऒके. मी इथे बाहेरच बसते. तुमचं बोलणं झालं कि या माझ्या केबिनमध्ये. मग जाऊ आपण"
"Sure!!!" हसत प्रसन्न म्हणाला.

त्याच लंच मध्ये त्याने तिला लग्नाबद्दल विचारले होते. (म्हणजे हे सगळे बॉस ला माहित होतं तर!!!) त्याच्या अचानक प्रश्नाने ती जरा गोंधळली होती. मला थोडा वेळ हवाय असं सांगून ती सरळ घरी गेली. तसा तो पण तिला आवडत होता... पण एकदम लग्न!!! ती आईशी बोलली. आईने तिला कशाचा विचार करायचा नि कशाचा नाही हे समजावलं. त्या सगळ्याचा विचार करता केतकी च्या मनाने होकार दिला. प्रसन्नला तिने हे सांगितलं तेव्हा कसला आनंद झाला होता त्याला

मग काय...त्याचे आई बाबा येउन आईला भेटले. साखरपुडा झाला. लग्नाची तारीख ठरली. सा.पु ते लग्न यामधल्या ३ महिन्याच्या काळात ते दोघं जवळ जवळ रोज भेटत होते.

"केतू, मी या weekend ला पुण्यात नाहिये. treking ला चाललो आहे."
"कुठे??"
"तोरणा"
"मी पण येऊ??"
या प्रश्नावर प्रसन्न खो खो हसत सुटला होता.
"इतकं हसायला काय झालं? नाहि येत मी."
"पर्वती चढली आहेस का कधी? तोरणा किती अवघड आहे माहित आहे??"
"चल, आत्ता चढून दाखवते पर्वती"

प्रसन्न च्या नंतर १५ मिनिटांनी ती वर पोचली होती आणि ते पण धापा टाकत. वर बसल्यावर नकळत त्याच्या खांद्यावर डोक ठेवून ती बसली.
"not bad huh!!! कधी जाऊयात मग तोरण्याला?" प्रसन्न ने विचारलं
"का? आता का? मगाशी किती हसू येत होतं"
"हो, पण पर्वती चढून मला हे सुख मिळत असेल(खांद्यावरच्या तिच्या डोक्यावर डोक टेकवत प्रसन्न म्हणाला) तर तोरणा म्हणजे ..........."
"वा वा...काय विचार आहेत!!! तोरण्याला लग्न झाल्याशिवाय जायचं नाही" त्याच्या खांद्यावरून डोक काढत केतकी म्हणाली.
"चालेल ना. असलं सुख मला लग्नानंतर हि हवंच आहे कि...."
"काय हा निर्लज्जपणा....." उभं राहत केतकी.
"अर्रेच्या, बायकोवर प्रेम करण्यात कसली लाज???"

----------------------------------------------------------------------------------------
"अगं, आपण HM साठि कुठे जाऊयात?"
"कुठेहि....."
"हे काय उत्तर?? सांग ना नीट"
"अर्रे!!! बरं तू सांग...तुला कुठे आवडेल??"
"मला काय... HM साठी कुठलंहि ठिकाण चालेल. तू मिठीत असलीस कि अजून काय हवं?"

हे असं काहि प्रसन्न बोलला कि केतकी लाजून चूर व्हायची.

----------------------------------------------------------------------------------------

"उद्यापासून भेटायचं नाही आपण?" प्रसन्न वैतागून विचारत होता.
"हो. उद्या घरी मुहूर्तमेढ उभी करणार. खूप पाहुणे असतील. परत मेंदि वगैरे...."
"निदान मेंदि दाखवायला तरी भेट कि......"
"ए, मेंदि रंगेल ना माझी? कि नाही?"
"आता हे मला कसं माहित असेल?"
"माठ्या, नवयाचं प्रेम असेल तर मेंदि रंगते असं म्हणतात"
"आईशप्पथ, कसल्या बावळट असता ग तुम्ही मुली. इथे मी प्रत्यक्ष भेटून प्रेमाचे पुरावे द्यायला तयार आहे ते नकोय पण मेंदिवर विश्वास.... जिथे माझं प्रेम तुला कळत नाही ते मेंदिला काय कळेल??"
"चिडू नको ना!!! सहाच तर दिवस आहेत. मग असेनच ना मी."
"हो.... या सगळ्याचा बदला घेणार आहे मी. आत्ता जमेल तितकि झोपून घे. मग कधी पूर्ण रात्र झोप मिळेल असण नाही."

----------------------------------------------------------------------------------------
काल लग्नाच्या दिवशीचे पण सगळे चोरटे सुखकर स्पर्श केतकीला आठवत होते. सप्तपदीच्या वेळी खांद्यावर ठेवलेला हात, मंगळसूत्र घालताना त्याने हळूच मारलेली फुंकर!!! अगदी आज सकाळी पूजेच्या आधी आसपास कोणी नाही हे बघून हळूच ओढलेला गाल. आठवणीने च शहारा आला केतकीच्या अंगावर.
डोळे उघडून तिने घड्याळ बघितले. अर्धा तास झाला.... अजून कसा नाही आला हा?

इतक्यात बेल वाजली. प्रसन्नच होता.... तिला त्या गाऊन मध्ये बघून जाम खूष होता. दारातूनच त्याने तिला एक flying kiss दिली.

"आवडला??" च्प्पल काढत त्याने विचारलं.
बाईसाहेब बेडरूम पर्य़ंत पोचल्या होत्या.

"केतू, वाट बघत होतीस माझी??" तिच्या खांद्यांवर हात ठेवून तिच्याकडे रोहून बघत प्रसन्न विचारत होता.
"तू change करून ये" दुसरं काहितरी बोलायचं म्हणून ती म्हणाली.
"सांग ना....वाट बघत होतीस माझी??" तिच्या केसाचा fixer काढत तो म्हणाला.
तिचे छान मोकळे केस अलगद मानेवर, पाठीवर पसरले.
"जा आधी तू change करून ये"
"कशाला?? थोड्यावेळाने होणारच आहे कि...change!!!!"
त्याच्या या एकाच वाक्याने केतकीची धडधड इतकि वाढली कि लाजून काहिहि न बोलता ती मागे वळून चालू लागली. प्रसन्नने तिचा हात मागच्या मागेच धरला. सोडवून घ्यायचा प्रयत्नहि न करता ती जागीच उभी राहिली.. तसं प्रसन्न ने तिला जवळ ओढली.
पाठमोया तिला सरळ करत म्हणाला "आत्तापासूनच लाजतेस?? कसं व्हायचं देवा माझं"
"परवापासून नुसतं डोळ्यानीच बघतोय.... नऊवारीतील माझी केतू, पैठणी नसलेली केतू...आत्ता माझ्यासमोर हे असे मोकळे केस, अशी लाजरी हसरी केतू. सगळयाच वेळी छान दिसतेस ग. केतू, केतू...... I love u. मला दूर नको ठेवूस."
"ए, माझी मेंदि रंगली आहे. बघ..." हात पुढे करत केतेकी म्हणाली.
"त्या मेंदिपेक्षा चेहयावरची लाली बघ. जास्त सुंदर आहे"
हे ऐकूताच केतकीचे डोळे आपोआप मिटले गेले.
प्रसन्नने तिच्या जवळ जाऊन कपाळावर ओठ टेकले.
इतक्यात केतकी...
"अ...आऊच...."
"काय ग...काय झालं? केतू, डोळ्यात पाणी आहे तुझ्या.....काय झालं"
"काहि नाही. तुझा पाय जोरात लागला माझ्या बोटाला. विरोली मुळे दुखतय ते आधीच. एकदम कळ आली रे."
"काय?? बघू मला. आधी बोलायचं नाहीस का??"
प्रसन्न ने तिला बेडवर बसवलं.
"बघू कुठे ते...."
"अरे इतकं नाहिये बाबा. एकदम धक्क लागला नि कळ आली इतकंच"
"केतू, अग रुतली आहे विरोली बोटात. सुजलय बोट. कसं सहन केलंस?? सांगायचस ना सकाळीच. श्या आता घरात कापूस पण नाही."
हळूहळू अलगदपणे प्रसन्न ने दोन्हि पायातून विरोली काढली. "कशाला ग घालता असलं काहितरी तुम्ही बायका??"
"लग्न दु:खदायक असतं हे कळावं बाईला म्हणून" केतकी अगदी सहज बोलून गेली. पण क्षणात तिला चूक लक्षात आली.
प्रसन्न ने नुसतंच बघितलं तिच्याकडे. shaving kit मधलं antiseptic क्रिम आणून, जखमेवर लावत तो म्हणाला
"असेल दु:खदायक, तरी मी आहे ना.... जखमांवर मलम लावायला, फुंकर घालायला. इतका विश्वास तर आहे ना?"
पायावर मलम लावणारा त्याचा हात हातात घेऊन केतकी म्हणाली "तो विश्वास आहे...नक्किच!!!"
हात काढून घेऊन तो ते क्रिम ठेवून आला.

"प्रसन्न, Sorry....."
हा शांत एकदम. आजच्या या क्षणांची तो किती वाट बघत होता हे तिला माहित होतं. एकतर नेमकं आजच तिला पायाने त्रास द्यावा....खूप अपराधी वाटत होतं तिला.
"बोल ना रे.... sorry म्हणाले ना!!!" त्याचा खांद्यावर डोकं टेकवीत ती म्हणाली.
"केतू, sorry कशासाठी?"
"माझ्यामुळे तुझा मूड spoil झाला.....पण मला ते दुखत नाहिये जास्त. खरंच."
"ओह....असं काहि नाहिये गं. अगं आजच्या क्षणांची प्रत्येकच जण वाट बघत असतो ना!!! तुझ्यासारखी बायको असेल तर कोण वेडा होणार नाही?" तिच्या मांडिवर त्याने डोकं ठेवलं.
"पण म्हणून काय मी फक्त माझाच विचार करेन का ग? जे क्षण मला हवे आहेत ते जर तुला वेदना देत असतील तर मला त्रासच होईल. हे सुख, हा सहवास दोघांनी मिळून घ्यायचा... तुला नको असेल किंवा त्रास होत असेल तरी मी मला हवं तेच कराण्याइतका वाईट नाहिये ग मी"
केतकी मंद हसत होती. प्रसन्नचा हा गुण तिला पहिल्यांदाच दिसत होता. चेष्टेखोर, romantic प्रसन्न इतका समजूतदार, परिपक्व पण होता.
नंतर बराच वेळ ते दोघे गप्पा मारत होते. प्रसन्न तिच्या केसांशी मनसोक्त खेळत होता. तिच्या चेहयावरून बोट फिरवताना, मांडिवर डोकं ठेवून तिच्या डोळ्यात बघताना होणारे तिच्या चेहयावरचे बदल टिपत होता. बोलता बोलता केतकीला कधी झोप लागली कळलंच नाही.

कसल्यातरी आवजाने दचकून केतकी जागी झाली. घड्याळाचा गजर होत होता. प्रसन्नचा हात तिच्या गळ्याभोवती होता, तिला पटकन ऊठताहि येईना. हळूच त्याचा हात बाजूला करत ती उठली. खिडकिच्या पदद्यामागे घड्याळ होतं. गजर बंद केला. बघते तर काय रात्रीचे ३.१५ च वाजले होते. बेडरूम डेकोरेट करताना कोणीतरी हा मध्यरात्रीचा गजर लावण्याचा चावटपणा केला होता. बेडवर झोपलेल्या प्रसन्न कडे तिने बघितलं. छान शांत झोपला होता. तिला झोप लागल्यावर कधी जाऊन तो change करून आला, कधी झोपला काहि कळलंच नाही. केतकी चा पायाचा ठणका थांबला होता.

तशीच किती वेळ तरी ती त्याच्याकडे निरखून बघत होती. शेवटी झोपताना प्रसन्नच्या ओठांवर तिने अलगद ओठ टेकवले. तिच्या केसांमुळे त्याच्या चेहरा पूर्ण झाकला गेला. गजर झाल्यापसून इतका वेळ झोपेचं सोंग घेतलेला प्रसन्न याच क्षणाची वाट बघत होता. केतकीला काहि कळायच्या आत त्याने तिला इतक्या जोरात जवळ घेतलं....

"आआअह........" केतकी
या आवाजाने मिठी सैल करत प्रसन्न "अजून दुखतय?? sorry..."
केतकीला हसूच आवरत नव्हतं..... प्रसन्न कळायचं ते कळून चुकला.....
"मला फसवतेस काय.... थांब आता....सोडतो का बघ....." प्रसन्न तिला अजून जवळ घेत म्हणाला
..................
..............................................
................................
............

त्यानंतर ते दोघे नुसते स्पर्शानेच बोलत होते.
प्रसन्न मात्र मनात ३.१५ ला गजर लावणाया मित्राचे आभार मानत होता.

(समाप्त.)
(हे सगळं पूर्ण काल्पनिक आहे. याचे कोणाशी, कोणाच्या जीवनाशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.
पूर्णपणे काल्पनिक लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घेणे. काहि सूचना असल्यास नक्कि सांगा.)

Wednesday, March 07, 2007

८ मार्च...महिलादिन!!!

काल रात्री साधारण ११.३० ला झोपले. अजून पूर्ण झोप लागायची होती..इतक्यात ऑफिस मधल्या एका मैत्रिणीचा SMS आला. "Happy Womens Day!!!" घड्याळ बघितलं तर १२ वाजून गेले होते. तिला "same 2 u" टाकून झोपले. पण झोप लागली नाही. डोक्यात विचारचक्र सुरू झालं.
आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजेच आज महिलांचा गौरव, गुणगान, स्तुती केली जाणार. पेपर, टीव्ही सगळीकडे आज महिलांसाठी काहि खास असेल. त्यातले कित्येक जण आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने कशी आहे, स्वत:ला कशी सिद्ध करते वगैरे बोलतील. पण हे कितपत खरं आहे?? वस्तुस्थिती काय आहे हे जास्त महत्त्वाचं.
स्वातंत्र्यपूर्व काळापेक्षा आजची स्त्री नक्किच अधिक स्वावलंबी, कणखर आहे. यंदा देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे पूर्ण होतील. इतक्या मोठ्या काळात देशातील किती स्त्रिया महत्त्वाची पदे (आरक्षणाशिवाय) मिळवू शकल्या?? सक्रिय राजकारण ते अगदी रोजच्या जीवनातला दूधाचा व्यवसाय... कशाचाहि विचार करूयात.
एक महिला पंतप्रधान - स्व. इंदिरा गांधी, एक तडफदार पोलीस अधिकारी - किरण बेदी (इतरही काहि आहेत पण केलेले काम लक्षात घेता एकच नाव पुढे येते), एक top executive - इंद्रा नूयी, एक पत्रकार - बरखा दत्त, एक पी. टी. उषा, सानिया मिर्झा, अंजू बेबी जॉर्ज, कुंजरानी देवी. संगीत हा भारतीय सिनेमाचा आत्मा!! त्यातही किती कमी क्षेत्रात महिला आहेत. उषा खन्ना सोडून एक संगीत दिग्दर्शिका नाही. कॅमेरा, editing, script writting, lyrics इ. अनेक क्षेत्रात नाहीच आम्ही. महिलांवर होणाया अन्यायावर बोलायला १०० महिला जमतील पण किती जणी न्यायाधीश, सरन्यायाधीश होत्या/ आहेत?? Finance हा कुठल्याही व्यवसायाचा कणा.... किती महिला आज मोठ्या कंपनीच्या CFO आहेत?? राजकारण जे देशाची स्थिती बदलू शकते त्यात आमचा सहभाग किती? अर्थमंत्री, गृहमंत्री अगदी लोकासभा प्रवक्ती म्हणून कोण आहे?? दैनंदिन जीवनात आज media ला असाधारण महत्त्व आहे...तिथे किती महिला आहेत? वृत्तनिवेदिका, talk show वाल्या 'य' आहेत, पण न्यूज एडिटिंग सारख्या जागी किती??
सुंदर दिसावं हि कुठल्याहि स्त्रीची उपजत इच्छा असते... पण या बाह्यसौंदर्याचं महत्त्व आम्हीच नाही ना वाढवून ठेवलं? क्रिकेट सारख्या खेळावर चर्चेसाठी भिल्लांसारख्या कपड्यांची गरज असते??? शरीराचा जो भाग दिसू नये म्हणून कपडे घालावे तोच कपडे घालून उघडा पाड्ण्यात कसली महानता, कसलं स्त्रीत्व??? बड्या पार्टीज ना पुरूष मारे सूट-बूट घालून येतील आणि बायका खांदे उघडे, पाय उघडे असलं काहि घालून येतील. शरीरसंपत्तीचे भांडवल करायची इतकि सवय जडलिये कि त्याची अनावश्यकता, उथळता च दिसत नाही आम्हाला.
Fashion designing, tailoring, jwellery designing या सगळ्याच क्षेत्रात पुरुष जास्त पुढे आहे. साधी गोष्ट घ्या, पुण्यासारख्या शहरात उत्तम ब्लाऊज शिवणारे बहुसंख्य लोक हे पुरूष आहेत. पाककला हे तर पूर्वापार चालत आलेलं महिलाप्रधान क्षेत्र पण नावाजलेले, आघाडिचे सर्व शेफ पुरूष आहेत!!!
आपल्या सूनेला आपला मुलगा घरकामात मदत करतो याचा त्रास सासूला होतो कि सासयांना?? गृहिणी असणाया महिलेचा अनादर अनेकदा इतर महिलाच करताना दिसतात. दोन बायका एकत्र काम करत असतील तर त्यांचे पटणे हे खूप अवघड असते यावर क्वचितच दुमत असेल. माझा स्वत:चा अनुभव आहे कि एक पुरूष manager ज्या पद्धतीने महिला sub-ordinates, collegues ना वागणूक देतो ती एका महिला manager पेक्षा नक्किच चांगली असते. एक स्त्रीच स्त्री ला समजून घेत नसेल, अनाठायी ईर्षा, दु:स्वास करत असेल तर या महिलादिना चा काय उपयोग आहे?
शारिरीक भेद, क्षमता हे निसर्गदत्त आहे. ज्याप्रमाणात पुरूष शारिरीक शक्ती च्या जोरावर काहि ठिकाणी पुढे जाउ शकतील ते स्त्री साठी कठिण असेल. कारण लिंगभेद हा शेवटी शरीररचनेमुळे आहे, बुध्दी, वैचारिक शक्ती यावर ते अवलंबून नाही. स्त्रियांना असणारे भय, असुरक्षितता ही पण आकलनीय बाब आहे. (याबद्दल बोलण्या-लिहिण्याजोगे बरंच आहे, पण त्याबद्दल नंतर कधीतरी..) पण हे सगळे असूनहि आम्ही बौद्धीक आघाडीवर खूप मागे आहोत.
समानतेची बात करताना आम्हाला आरक्षण, अर्थव्यवस्थेत वेगळी तरतूद का लागते? (Tax exemption limit) जातीयवाद जितका धोक्याचा तितकाच हा भेद धोक्याचा नाही का?
समाज कुठल्याहि चांगल्या गोष्टीचे स्वागत, कौतुक करतो. सचिन ला कधीच ओरडून सांगावं लागलं नाही कि तो उत्तम क्रिकेटपटू आहे. लता मंगेशकर तुमच्या मागे लागली नव्हती कि माझी गाणी डोक्यावर घ्या. मनिष मल्होत्रा चा dress sense त्याच्या कामातून दिसून आलाच. २ वर्षापूर्वीपर्यंत चेष्टेचा विषय असलेले लालू प्रसाद यांच्या रेल्वे बजेट ची याच लोकांनी वाहवा केली. मुद्दा हा कि चांगल्या कामाची दखल नेहमीच घेतली जाते. त्याचे कौतुक करताना लोक मग अशा अमूक दिवसाची वाट बघत नाहीत. महिला पुढे असतील, स्वतंत्र असतील तर समाजाची मान्यता मिळणारच आहे... त्यासाठी आजच्या दिवशी आम्हीच आमचा सत्कार करून घ्यायची गरज नाही. जे साध्य झालंय तो मॅचचा पहिला बॉल आहे, अजून पूर्ण ५० षटकं खेळायची आहेत. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन कसे चालेल?

Monday, February 19, 2007

अमृततुल्य!!!

तशी मी काहि चहाभक्त (किंवा चहाटळ!!! ) नाही... पण दिवसातून दोन वेळा, सकाळी-दुपारी, चहा पिते. त्यातूनहि उगाच कुठलाहि, कसलाहि चहा नाहिच चालत बुवा...चहा कसा हवा अमृतासारखा!!! आणि घर सोडून असा चहा मिळण्याचे ठिकाण म्हणजे खास पुण्यातील काहि अमृततुल्ये. पुणेकरांची एक खासियत आहे... एकदा एखादि गोष्ट कुठे चांगली मिळते म्हणलं कि आम्ही लावलीच तिथे रांग. उदाहरणार्थ - चितळे बंधू मिठाई वाले, श्री/ बेडेकर मिसळ, हॉटेल वैशाली, हिंदुस्थान बेकरी चे पॅटिस इ. कुठल्याहि पक्क्या पुणेकराला या स्थळांचं आणि तिथल्या चवीचं, वासाचं एक अनाम आकर्षण असतं.
असंच अजून एक ठिकाण म्हणजे हि अमृततुल्य... इथला चहा न पिलेला पुणेकर म्हणवून घ्यायला शोभत नाही. पूर्वीपासून जिथे मराठी लोकांची वर्दळ असते अशा सगळ्या भागात हि अमृततुल्ये आहेत. नाव हे बहुतेक वेळा xxxxxx अ+इश्वर भुवन असं काहिसं. (जबरेश्वर भुवन वगैरे). क्वचित कधी त्रिवेणी, तुलसी अशी जरा हटके नाव असेल. पण नावात काय आहे?? नाव काहिहि असो..साधारण रंगरूप ठरलेली. एक दहा बाय दहा ते दहा बाय पंधरा घन चौरसाची जागा, त्यात साधारण ३ ते ४ ऍल्युमिनियम चे पत्रे लावलेले टेबल्स आणि बसायला लाकडी बाक. चहा करणारा दुकानाच्या एकदम दाराशी उभा, त्याच्या मागे गणपती/ मारूती/ साईबाबा असा एक फोटो, एका मोठ्या पातेल्यात चहा चे आधण ठेवलेले, त्याहून लहान पातेल्यात जवळच दूध. बसल्या जागी हाताला येईल अशा बेताने ठेवलेले चहा पावडर, साखर आणि वेलदोडा पावडर चे डबे. चहा गाळण्यासाठी एक मऊ पंचा किंवा मोठे गाळणे, ऍल्युमिनियमची चहाची किटली (याला चहाचे किमान २-३ तरी ओघळ पाहिजेतच).
तीन इंच उंचीचे जाड काचेचे पेले किंवा दोन इंच उंचीचे पांढरे कप नि बशी. रस्त्यावरून सहज दिसतील अशा पद्धतीने ३-४ बरण्या...त्यात बटर, नानकटाई, क्रिमरोल इ. गोष्टी. कुठल्याहि अमृततुल्यामध्ये यात फारसा फरक दिसणार नाही. एक कप चहाचा दर पण जवळ जवळ सारखाच... फ़क्कड चहा चा मात्र दर वेगळा!!! आता हे फक्कड चहा म्हणजे काय तर स्पेशल चहा हो... दूध जरा जास्त, वेलची थोडी हात सोडून...असा customised चहा. फक्कड हा खास अमृततुल्य वाल्यांचा शब्द :)
सकाळी सातला सुरू होणारी हि दुकाने दिवसभर चालू असतात... यांना ना दुपारची जेवणाची सुट्टी ना आराम (पुण्यातली इतर बहुतेक सर्व दुकाने दुपारी १ ते ४ बंद असतात हे जगविख्यात आहेच). सकाळी पहिला चहा करून अर्धा अर्धा कप दुकानाच्या दोन दिशेला ओतून हे दिवसाची सुरूवात करणार!!! चहाच्या प्रत्येक घाण्याची हातावर एक थेंब घेऊन चव बघायची आणि मग च त्यात दूध घालायचे हा रिवाज.... कित्येक पिढ्या असा चहा करत असतील नी कित्येक त्याचा आस्वाद घेत असतील. भर गर्दीच्या रस्त्यांवर, आता जिथे महागडी आणि विदेशी कॉफी शॉप्स आहेत तिथेहि... गरीबाची, एका अस्सल चहाबाजाची तल्लफ पुरी करायला हि अमृततुल्ये आहेत. धो धो पावसात किंवा डोकेदुखीच्या वेळी तुम्हाला ती ७० रुपयाची कडू कॉफी आठवते कि चहा?? रस्त्यात दोन जुने मित्र भेटल्यावर ते "चल, एक एक चहा मारू" म्हणतील कि कॉफी??
मी या अमृततुल्य वाल्यांची ऋणी आहे... कॉलेज मधले इतक्या सुंदर दिवसांच्या आठवणी आहेत यात. दिवसभर कंटाळून दुपारी चार वाजता एक चहा पिऊन practical ला जायचं.. ग्रुप मधली कुठलीहि पैज या चहावर संपायची.... सायकलच्या हवेसाठी चे पैसे हवा भरावी लागली नाहि कि चहा आणि क्रिमरोल पार्टी करायची :)
नंतर नोकरी सुरू झाल्यावर इराण्याचा चहा अनेकदा पिला... तो पण चहा असतो छान पण अमृततुल्य ला पर्याय नाही..
काल च्या TOI मध्ये एक बातमी वाचली(इंटरनेट वर ही बातमी सापडली नाही), अमृततुल्य वाल्यांचा धंदा लक्षणीय कमी झाला आहे.. वाढती महागाई, तरूण पिढीची बदललेली चव या सगळ्याचा त्यावर परिणाम झाला आहे. ते वाचलं आणि सगळ्या आठवणी दाटून आल्या..
देव करो नि हि अमृततुल्ये अशीच चालू राहोत.... बाजारात नवीन काहि येताना जुन्या गोष्टींचा बळी गेलाच (दिलाच) पाहिजे का??

Friday, February 09, 2007

ऐसा मित्र शिरोमणी

तो आणि मी...आमची मैत्री १२ वर्षांपूर्वीची!!!

अगदी पहिल्याच दिवशी मला कॉलेज मध्ये पोचायला उशीर झाला होता... वर्गात पोचले तर तास आधीच सुरू झाला होता... मी excuse me म्हणून आत शिरले... अगदी त्या क्षणाला मला दिसलेला तो हाच!!! सहा फूट दोन इंच उंची, शांत चेहरा...

नंतर कॉलेज रूटिन चालू झालं.. stats practical ला तो आणि मी एकाच बॅच ला आलो. सकाळी ७ ला practical असायचं, तर हा पठ्ठ्या त्या आधी १० मिनिटे येउन उभा असायचा!!! कॉलेज सुरू होऊन सहा महिने उलटून गेले तरी आम्ही कधीच बोललो हि नव्हतो... तशी ओळख झाली ती पहिल्या ट्रिपला...आणि बघता बघता आज १२ वर्ष हौउन गेली :)

खरं तर आमच्यात खूप कमी साम्य आहे...जवळ जवळ नाहीच म्हणलं तरी चालेल. दिसण्यापासून, खाण्यापासून ते अभ्यास, खेळ सगळंच वेगळं आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की इतके फ़रक असताना तो माझा इतका जवळचा मित्र कसा झाला?? ज्या गोष्टी मी जितक्या सहजपणे याच्याशी बोलू शकते, शकले...जितक्या शांतपणे हा माणूस ऐकतो तसं इतर कोणीच मला भेटलं नाही. म्हणजे ऐकताना फ़ाटे फ़ोडणे, सल्ले देणे हे असं करणारे बरेच आहेत... पण नुसतं ऐकणारा असा हाच!!! (त्याच्या या निर्विकार ऐकण्याच्या स्वभावाचाच त्याच्या बायकोला आता त्रास होते!!!) मध्यंतरी माझ्या आयुष्यात जरा वादळ उठलं होतं, मी एकटी पड्ले होते... पण तरीहि याने साथ सोडली नव्हती. माझ्या नकारत्मक, सकारात्मक सगळ्या आयुष्याचा हा सा़क्षीदार.... आज मी जेव्हा म्हणते कि मी चुकले होते का रे तेव्हा? तर तो नेहमी म्हणतो... "ज्या वेळेस तू तशी वागलीस तेव्हा तुला ते चूक वाटत होतं का?? नाही ना!!! मग? प्रत्येक वेळेची, वयाची विचारांची काहि गणितं असतात... मोठे झाल्यावर ती गणितं चुकिची वाटत असतीलहि पण म्हणून त्या त्या वेळेला तसं च बरोबर वाटतं"... असा धीर दिला कि इतकि उभारी येते.

आमच्याच ग्रुप मधल्या एक मुलगी त्याला आवडू लागली... होकाराची खात्री पटल्यावर साहेबांनी तिला प्रपोझ केलं...आणि अपेक्षित होकार कळल्यावर पहिलं कोणाला सांगितलं असेल तर मला!!! त्या दिवशी त्याच्यापे़क्षा जास्त आनंद मला झाला होता... आता मला जवळचा मित्र आणि तितकीच जवळची मैत्रिण मिळाली होती. तिघे एकत्र सायकल वर कॉलेज ला जायचो... computer assignments पण त्या दोघांनी एक आणि मी एक असा प्रकार असायचा.. पण print outs ३ असायची :) धमाल यायची.....
याच्या घरी शोकेस मध्ये drinks असतात असं कळलं तेव्हा कोण आश्चर्य वाटलं होतं.... drinks घेणारे सगळेच दारुडे असतात असं नाही इतकं कळायला तेव्हा अक्कल कुठे होती?
कॉलेज संपलं.... PG साठी सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी गेलो.. तो C-DAC साठी मुंबाईला... आता भेट कमी होत होती.... नवीन कॉलेज मध्ये नवीन लोक भेटले..पण या सम हाच!!!
नंतर मग जॉब!!! दुर्दैवाने त्याच्या कंपनी मध्ये layoff झाला आणि याचा जॉब गेला.... हे ऐकल्यावर मलाच खूप हादरा बसला होता. त्याला कसा धीर द्यायचा, काय बोलायचं विचार करत करत च त्याला भेटायला गेले तर हा एकदम शांत बसला होता!!! जणू काहि आता काय होणार आहे, काय करायचं आहे हे त्याला स्पष्ट माहित होतं. आणि झालंहि तसंच..... सुरूवातीच्या १-२ वर्षात त्याने जे काहि केलं, तो अनुभव आज त्याला इतका पुढे घेऊन गेला आहे कि मन भरून येतं.
दरम्यान त्याचं लग्न झालं, नवीन फ़्लॅट, गाडी..... settle झाला तो!!! अधून मधून तो परदेशी जात होता..कधी मी पण!!! आता भेटणं म्हणजे प्लॅन करावं लागत होतं....
या वर्षी गण्पतीतली गोष्ट... त्या दोघांचा फोन आला... "आम्ही दोघे germany ला जायचा विचार करतोय..." त्याला कंपनीने चांगली संधी दिली होती. ते पुण्याहून निघायच्या आधी आम्ही भेटलो....
फ़क्त आपण तिघे भेटू, ग्रुप मधलं इतर कोणी नको ही माझी अट!!! कारण जे आम्ही तिघे share करू शकतॊ ते इतर कुणाला कळण्याच्या पलिकडे आहे.... ज्या मित्रा बरोबर मी सायकल ने जायचे...आज त्याच्या कार मध्ये बसताना काय वाटलं असेल मला.... खूप छान....शब्दांच्या पलिकडले!!!
आता ते दोघे germany मध्ये आहेत...चॅट, orkut वर बोलणं चालूच असतं....कितीहि दूर असलो तरी मैत्री अजून तशीच आहे....तशीच राहिल!!!
आज हे सगळं आठवायचं कारण... काल बरेच दिवसांनी त्याला ईमेल केली... आज त्याचा रिप्लाय आला. "तुझी ईमेल सिग्नेचर छान आहे."...
मी ही सिग्नेचर लिहून जवळ जवळ महिना झाला.... कोणी हे नोटिस नाही केलं..आणि एका मेल मध्ये हे कदाचित फक्त तोच बघू शकतो!!!

Thursday, February 08, 2007

जागरुक मदत!!!

"स्नेहल, तू त्या xxxxx संस्थेसाठी काहि मदत करतेस का ग?" आज Office मध्ये चहा घेताना एका मैत्रिणीने विचारलं.
"नाही ग. मला जमेल असं वाटत नाही" मी
"त्यात काय न जमण्यासारखं आहे. मी करणार आहे या महिन्यापासून. दर महिना १००० रुपये!!!" ती.
"ओह!! आर्थिक मदत पण घेतात का ते? मला वाटलं कि त्यांना स्वयंसेवक हवे असतात" मी माझे अज्ञान पाजळले.
ही xxxxx संस्था एका मोठ्या कंपनीची चॅरिटी ग्रुप !!! म्हणून मला वाटलं होतं कि आर्थिक बाजू ती कंपनी बघते.
"अग नाही ते लोक पैसे पण घेतात" माझी मैत्रीण
"पण मग तू अशा ठिकाणी पैसे दे जिथे खरंच पैशाची गरज आहे. आणि जिथे तू केलेली मदत मोलाची असेल आणि म्हणूनच कोणच्या लक्षात राहिल. तू ज्या संस्थेला पैसे देत आहेस ते आर्थिक द्रुष्ट्या खूप सबळ आहेत मग त्यांनी स्वत:च्या नावावर लोकांचे पैसे का वापरावेत? आणि श्रेय स्वत:कडे का?? " मी थोडी चिडून बोलले.
"ए बाई, मी इतका विचार केला नव्हता!!! मदत करावीशी वाटली म्हणून केली" ती
यावर मी गप्पच बसले. पण मनात आलं कि किती हा आंधळेपणा !!! आपण ज्या हेतूने मदत करतोय त्याचा योग्य विनीमय होतोय कि नाही, संस्था काय काम करते, पैसे कुठे वापरते या कशाचीच माहिती असणं गरजेचं नाहीये??? कसली मदत ही. आणि अशी मदत करून आपण कसलं समाधान मिळवतो!!! कि अशाच दांडग्या संस्थांना जनतेच्या आंधळेपणाचे पुरावे देतो?? शिक्षणाने केवळ आर्थिक सुबत्त दिली आहे का समाजाला... वैचारिक सुबत्ता कशाने येईल??

"