Wednesday, August 11, 2010

फिर मिलेंगे

"अगं पूर्ती, बोलत का नाहियेस. बोल ना"
".........."
"इतके सगळे जमले आहेत म्हणून बोलता येत नाहीये का तुला?? आठवतं, १० वर्षांपूर्वी आमच्याकडे या घरी पहिल्यंआदा आली होतीस तेव्हा पण जास्त काहीही बोलली नव्ह्तीस. मग लग्न करून घरी आलो तरी २-३ दिवस गप्प गप्प च होतीस. मीच विचारलं तेव्हा म्हणालीस कि खूप जण असताना तुला दडपण येतं. वेडाबाई!!! मग केरळ मधे गेल्यावर मस्त बोलायला लागली होतीस. मस्त होते ना गं ते दिवस!! तर आज पण खूप जण जमले आहेत परत म्हणून का बोलत नाहीयेस तू?"
".........."
"रागावली आहेस माझ्यावर? तुला आधी काही कल्पना न देता मला असं अचानक जावं लागतंय म्हणून?"
तिच्या डोळ्यात फ़क्त पाणी...
"मला पण अगदी आयत्यावेळी कळलं गं. नाहीतर आपण ठरवलेलं सगळं असं अर्धवट टाकून जाईन का मी?"
".........." ती एकदा डोळे भरून बघून घेते त्याला.
"पण आता मी इथे नसेन तर तू काळजी घ्यायचीस हा! गाडी नीट चालवत जा. ओम ला सांभाळ आणि त्याबरोबर स्वत:ला पण. सगळ आपण ठरवलंय तसं कर.. तुझ्याच वर सोपवतोय ना मी सगळं शेवटी. पण तू करशील ना राणी? पैशाची काळजी नको..त्याची सोय मी आधीच केली आहे. आपल्या एजंट मेहतांना माहीत आहे सगळं आणि माझ्या कपाटात फ़ाईल आहे त्यात पण एकत्र आहे सगळं"
नजर वर फ़िरवून ती नुसतीच मान हलवते.
"सगळी घाई ना माझी आयत्यावेळी! :) म्हणतेस्च की नेहमी तू तसं. आणि खरं पण आहेच ते. मला इतका ताण घ्यायचा नव्हता गं पण ऑफिस म्हण्लं कि हि अशी दगदग येतेच ना! त्यात यंदा माझं promotion due!"
"नाही रे...तुला चिडवायला म्हणते मी तसं. ्पण तू ताण जरा कमी केला असतास तर!! ओम ला कसं समजावू मी?"
"अगं, होईल सगळं नीट हळूहळू. तू धीराची आहेस माहीत आहे मला"
"म्हणून मला असं एकटीला सोडून निघालास? कसे राहू आम्ही तुझ्याशिवाय?"
"अगं मलाच नाही कळलं ग...."
".........."
"हो, आणि मी आहेच ना तुझ्याबरोबर! आठव ओम झाला तो दिवस....ओम ने विश्वनिर्मीती झाली म्हणून आपण आपलं विश्व देणार्या बाळाचं नाव ओम ठेवलं. आणि तू म्हणाली होतीस कि ओम मध्ये तुला मी दिसतो. खरं सांगू, मला माझीच भीती वाटते गं. तुझ्यासोबत, ओम आहे. आपलं हे घर आहे...मी तिथे एकटाच असेन ना! मल सगळंच नवीन... "
".........."
"बोल ना गं. विमानाची वेळ होत आली. बोल ना"
ती हलकेच त्याच्या जवळ गेली....चेहर्यावरून अलगद हात फ़िरला. "मी घेईन काळजी. आणि तू पण एकटा नको समजुस तिथे स्वत:ला... माझी इथली कामं झाली कि मी येईन च तुझ्याकडे."
आपले थरथरते ओठ तिने त्याच्या कपाळावर टेकवले...

इतक्यात ताई आल्या आणि तिला आत घेऊन गेल्या... इकडे बाकी सगळी तयारी झालीच होती. Ambulance हलली.

पूर्ती ने इतका वेळ मनाला घातलेला बांध फ़ुटला.... अश्रूंनी निरोप देत होती ती त्याला जो तिला मागे ठेवून पुढे चालला होता...

(पूर्ण काल्पनिक!! ऑफिस मध्ये "sad demise" ची अशीच एक ई-मेल आली नी हे सगळं.... देव असं दु:ख कोणालाही न देवो हीच प्रार्थना!)

Saturday, May 15, 2010

थोडं ट्रॅफिक ...थोडा विचार

नेहमीप्रमाणे अगदी शेवट्पर्यंत ई-मेल्स करत करत ऑफिसचा दिवस संपला आणि मी गाडी काढून असंख्य माणसांपैकी एक होऊन सवयीप्रमाणे रस्त्यातून वाट(??) काढू लागले. घड्याळ बघितलं... ७:४०! आज जरा उशीर च झाला.... रोज ठरवते ७ ला निघायचं पण आज देखील जमलं नाही. निघता निघता काही तरी आठवतं आणि मग ते काम उरकता उरकता वेळ होतोच.
(इतक्यात सिग्नल हिरवा झाला अन माझं वेडात मराठी नार (घेऊनी कार) दौडली एक झालं)
डोक्यात अजून ऑफिस घोळतच होतं... नवीन "select" केलेला माणूस लवकर आला पाहीजे. client ने काम नक्की पकक केलं पाहिजे. घरी आई चे पाय दुखायचे थांबले असतील का? नाहीतर आता डॉक्टर कडे जाऊन आलं पाहीजे. काही व्याप नसताना माझी इतकी धावपळ आणि दमछाक होतेय, ज्यांना मुलं वगैरे आहेत त्या कसं manage करत असतील. आपलं वजन पण वाढतंय बहुतेक... "पुरानी जीन्स" घालून बघैतली पाहिजे. आणि सकाळी लवकत उठून काही व्यायाम केला पाहिजे.
असे एक ना अनेक विचारांमागून विचार आणि सिग्नल मागून सिग्नल मी मागे टाकत होते. आणि अचानक मनात आलं कि आपण विचार करतो म्हणजे तरी नक्कि काय? कालच एक जण सांगत होता कि रात्री नीट झोप लागली नाही, डोक्यात काही विचार चालू होते. हे विचार चालू असणं म्हणजे तरी काय?
काहीतरी घडतं आपल्या सभोवती, काही ऐकतो-बघतो आपण. त्या सगळ्याचा आपल्या आकलन शक्ती प्रमाणे एक अर्थ लावतो. बहुतेक वेळा अर्थ नीट उमगत नाही किंवा मनाला पटत नाही आणि त्यामुळे मग झालेल्या, ऐकलेल्या-बघितलेल्या घटनेमुळे काही प्रश्न पडतात, हे प्रश्न आपणच आपल्या मनाला घालतो आणि मग त्याची उत्तरं शोधतो. काही शक्यता-अशक्यता पडताळून बघतो. यालाच आपण विचार करणं म्हणतो?? हो बहुतेक :)
म्हणजे घटना - प्रश्न - उत्तर / शक्यता-अशक्यता हि प्रक्रिया म्हणजे विचार करणे आहे तर... आणि या प्रक्रियेअंती जो निष्कर्ष मन काढतं तो होतो आपण केलेला विचार, कधी सुचलेला विचार असंही म्हणतो आपण!
म्हणजे असं आहे - आत्ता मला overtake करून गेलेला माणूस आज रात्री काय जेवेल याचा काहीही विचार नाही. का?? तर मला तो प्रश्न च पडत नाही :) पण मी काय जेवेन?? याचा काही तरी विचार आहे, कारण मला तो प्रश्न (बर्याचदा) पडला... (हाहाहा)
वा!!! असा काहीतरी विचार मनात आला कि भन्नाट वाटतंय एकदम... अरे हो! पण हा विचार तरी का आला? कारण मला प्रश्न पडला की माणूस विचार करतो म्हणजे नक्कि काय करतो? :)
गंमत आहे ना!!! बघाच..थोडा विचार करून :)

Friday, April 16, 2010

माझी झेन राणी

"हा घे पेढा!!" पेढ्याचा बॉक्स पुढे धरत ती म्हणाली.
"काय? कसला?" एरवी एका ऑफिसमधे असून पण आमचं फारसं बोलणं व्हायचंच नाही.
"कार घेतली मी." तिच्या चेहर्यावर एक मस्त आनंद आणि अभिमान.
मलाच ते खूप आवडलं होतं, माझ्यापेक्षा एखाद दोन वर्षाने मोठ्या असलेल्या तिने स्वत: गाडी घेतली होती!! वा!!! तेव्हाच ठरवलं, स्नेहल बाई हा आनंद तुम्हाला हवा असेल तर आधी गाडी शिका. एरवी दादा सतत म्हणायचाच कि शिकून घे गाडी, पण मलाच भीती वाटायची. वाटायचं बाईक चं कसं काही झालं की पाय टेकता तरी येतात. कार मधे तो पण स्कोप
नाही, कसं जमणार आपल्याला? बाईक म्हणजे कसं on-field वाटतं, सगळं आपल्या control मधे आहे असं. या कार मधे काचेपलिकडून असं ते काय जमणार?

त्याच आठवड्यात driving school मध्ये नाव देऊन आले, तरी जमेल कि नाही अशी धाकधूक मनात होतीच. पण आमचे नांगरे मास्तर एकदम मस्त होते, पहिल्याच दिवशी म्हणाले "गाडी शिकणं म्हणजे काही अवघड नाही. हे A, B, C, D लक्षात ठेवा कि झालं A = Accelerator, B = Brake, C = Clutch, D = Driver. गाडीत हे इतकं सांभाळलंत कि सगळं आलं म्हणून समजा". तरी पण यायचं ते टेन्शन आलंच होतं. यू टर्न शिकताना फुटलेला घाम अजून आठवतो. L-shape reverse, half clutch, night driving मास्तर एक एक शिकवायचे. चुकलं तरी मजेशीर च बोलायचे. एक दिवस म्हणे "गाडीचा क्लच खराब झालाय का?" मी चमकून बघितलं तसे म्हणतात "नाही, तुम्ही दाबत च नाही म्हणून म्हणलं" मग एक दिवस म्हणे, " अहो ते स्टीअरींग अलगद धरा, इतकं घट्ट धरायला ती काय तलवार आहे का?" :) नांगरे अगदी नावाप्रमाणे डोक्याची नांगरणी च करायचे. करत करत एक महिना झाला आणि RTP Inspector ने मज गोंधळलेल्या नवशीक चालकाला एकदाचा परवाना (कसा काय कोण जाणे?) दिला. विनाशकाले विपरीत बुद्धी!
दुसरं काय :)

गाडी शिकले तरी दादाची गाडी फारशी चालवायचं धाडस नव्हतं. कुठे ठोकूच आपण याचा कोण विश्वास मला!! गाडी शिकून ३ वर्ष झाली आणि मी सगळं मिळून ३०० कि.मी पण गाडी चालवली नव्हती. मग अचानक आठवला पेढा देतानाचा तिचा तो चेहरा, त्यावरचा तो अभिमान आणि मग ठरवलं कि आता आपणही घेऊ गाडी. घरी सांगितल्यावर पहिला प्रश्न "चालवणार आहेस का? ठेवायची असेल तर नको घेऊस" मी अगदी मोठा "होssssssss" म्हणून मोकळी. मग बर्याच गाड्या बघितल्या. Alto, Wagon R, Zen Estilo, Spark, Indica, Santro. लहान मुलाला दुकानात नेल्यावर जसं सगळीच खेळणी आवडतात तसं काहीसं सुरुवातीला माझं झालं. पण मग Alto जरा बेसिक आहे, Wagon R एकदम manly आहे, Spark चे interiors खास नाहीत, Indica म्हणजे cab वाटते आणि Santro घरी आहेच असं elimination theory वापरत सगळ्या निकालात काढल्या आणि Zen Estilo घ्यायची ठरली.

कलर, variant, कुठल्या banke चं लोन वगैरे ठरलं आणि गाडी बुक केली. ८ मार्च (महिला दिन!!!) ला घ्यायची असं पण ठरलं. आकाशातल्या देवाचं अधून मधून माझ्याकडे लक्ष जातं तसं यावेळी गेलं आणि त्याने देशाच्या अर्थसंकल्पात चारचाकी वाहनांच्या किंमती कमी केल्या!!! किंमत चांगली १३-१५ हजार ने कमी झाली.. मी लगेच डीलर ला फोन केला आणि गाडी नंतर दिलीत तरी चालेल पण नवीन कमी झालेल्या किंमतीनेच द्या असं सांगितलं. महिला दिनाचा मुहूर्त अशा रितीने चुकला. मग गाडी १६ मार्च २००८ या दिवशी आली. माझ्यापेक्षा हि जास्त आनंद आई-बाबा, दादा-वहिनींना झाला होता. गाडी ठोकायची माझी भीती अजून कायम होती म्हणून शो-रूम पासून दादानेच ती चालवत आणली. बाबांनी एकदम झकास पूजा केली आणि मी पहिल्यांदा त्या माझ्या गाडीचं स्टीअरींग हातात घेतलं. १-२ कि.मी च्या त्या फेर्यात मी साधा तिसरा पण गीअर टाकला नव्हता! आता हसू येतं :) पण तेव्हा अगदी फाटायचीच...

मी गाडी चालवावी ही माझ्याहून तीव्र इच्छा आई-बाबांची होती. मग रोज रात्री जेवण झालं कि ते माझ्याबरोबर गाडीतून चक्कर मारायला यायचे. रोज वेगळ्या रस्त्यावर गाडी घे असं सांगायचे. कितीदा भर रस्त्यात गाडी बंद पडली तरी चिडायचे नाहीत. सुरूवातीला ऑफिसला येताना पण २-३ वेळा दादा सोबत असायचाच. तो थोडा चिडका आहे पण यावेळी सांभाळून घ्यायचा. कदाचित मी गाडी चालवतेय याची त्याला पण तितकीच भीती वाटत असावी!! सुरुवातीचे सहा महिने अगदी जेमतेमच चालवली गाडी, हळूहळू आत्मविश्वास(!!!) वाढत गेला आणि म्हणून मग गाडी चालवणं पण. तरी रोज ऑफिसला गाडी नव्हतेच आणत. ऑफिसची बस होतीच. आणि कोथरूड ते विमान नगर असं पुणे दर्शन नकोच वाटायचं कार ने. एकदा एक मित्र म्हणाला पण "त्या गाडीची काय श्रावणी शुक्रवारी पूजा वगैरे तरी करतेस कि नाही. चालवणं तर राहूच दे" :) इतकं चिडवून घेत होते मी!!!

त्या आकाशातल्या देवाचं परत एकदा माझ्याकडे लक्ष गेलं आणि यावेळी त्याने ऑफिसची बस बंद केली. आता माझ्याकडे पर्याय नव्हता! तसंही कामामुळे मी आता आठवड्यातून १-२ वेळा कार आणत होते पण बस नाही त्यामुळे ते आता सक्तीचं झालं. बघता बघता बाइक इतकीच कार सवयीची झाली. कुठूनही कुठेहि घुअसवता येऊ लागली. गर्दीत घुसणार्याला दाबायला(हे टिपिकल driver जातीतलं बोलणं) जमलं. पार्कींग सोयीचं वाटू लागलं. गाडी चालवणं यातलं दडपण गळून पडलं आणि मी ते enjoy करू लागले. १.५ वर्षात फक्त ४००० कि.मी धावलेल्या गाडीने म्हणूनच आज २५ महिने पूर्ण झालेल्या दिवशी १०००० कि. मी चा टप्पा गाठला!

या १०,००० मधे बरेच मजेशीर प्रसंग आले. जुन्या बाजारात रात्री ८ वाजता पोलिसासमोर बंद पडलेली गाडी, भर पावसाळ्यात तेव्हा फुटलेला तो घाम! एक बाईक वाला स्किड होऊन माझ्याच झेन ला चाटून, एक मोठा ओरखडा आणून गेला तेव्हाचा राग! एक दिवस रात्री घरी येताना battery drain होऊन सुरुच न झालेली गाडी आणि बरोबर एक मित्र होता
म्हणून त्यावेळी आलेला तो धीर! आपल्या महान महानगरपालिके ने माझ्या नेहमीच्या रस्त्यात अचानक खणून ठेवलेला एक खड्डा आणि त्यात मी नेम धरून घातलेली गाडी! मस्त चिखलाने माखली होती बिचारी, जवळचा एक security guard आणि अजून २-३ लोकांनी मदत केली म्हणून बरं! ऑफिसमध्येच एकदा टायर पंक्चर झालं आणि मग BPO
cab च्य driver ने ५ मिनिटात चाक बदलून दिलं, परत वळूनही न बघता, एक पैशाची अपेक्षा न करता!!! PUC करता गाडी चालू ठेऊन मी मस्त खाली उतरले आणि किल्ली आत, गाडी lock झाली. एक फोन केला आणि बाबा बिचारे duplicate किल्ली घेऊन रिक्षेने १० कि.मी. आले. असा बराच दंगा केला मी गाडी चालवताना :) म्हणा त्यात
नवीन काय! वो तो अपुन का style है!!! पण या सगळ्यातून दर वेळी नवीन शिकत गेले. मजा येत गेली. माझ्या मुलीकडे स्वत:ची कार आहे आणि ती छान चालवते, मला घेउन जाते असं आई जेव्हा कोणाला सांगते ना तेव्हा मनाला जे समाधान मिळतं ते फार सुंदर, मन शांत करणारं आहे.

गाडीचं loan पण आता संपलं आहे, आजच RTO मधून नवीन RC पण घेऊन आलेय. झेन राणी आता पूर्णपणे माझी आहे. गाणी हा आमच्या दोघींचा हळवा छंद आहे. गाणी लावली कि ती आणि माझं मन मस्त भरधाव सुटतं. नशीब तिला ब्रेक आहेत, मनाला तर ते पण नाहीत! :) झेन राणी कितीही वर्षाची झाली तरी मला कायमच आवडेल.. पहिल्या गोष्टींच आणि आपलं नातं च असं खूप जवळीकीचं असतं ना!!!

Friday, November 20, 2009

अपेक्षित....अनपेक्षित

"ए बाई, नको इतका negative विचार करूस" माझा एक मित्र मला कळकळीने सांगत होता.
"यात negative काहीही नाहिये, I am just preparing myself for the worst" मी त्याला शांतपणे सांगायचा प्रयत्न केला, पण डोळ्यात चुकार थेंब आलेच
"ते बघ...." मित्र
"काही नाही रे, I am OK" मी
"मग तसं मला पण वाटू दे that u r OK" तो

पण हे माझं नेहमीचं असतं. एखादी गोष्ट व्हावी म्हणून मी जितका प्रयत्न करते, तयारी करते; तेवढीच तयारी ते नाहीच झालं तर दुसरं काय करता येईल याची. एकाच गोष्टीची अपेक्षित आणि अनपेक्षित शक्यतांची तयारी करायची म्हणजे त्याने होणारा त्रास कमी होतो हा अनुभव. :) जसा त्रास कमी होतो तसाच होणारा आनंद ही कमीच होतो. पण मग ही त्या "preparing myself for the worst" ची किंमत असावी.

कधी कधी बरं वाटतं हे सगळं. जरा मोठे, शहाणे झाल्याचं समाधान(??) मिळतं. वाटतं, कि जमतंय आपल्याला परिस्थितीशी जुळवून घ्यायला. पण मग मनात जे सकारात्मक आहे ते अगदी तस्संच झाल्यावर काही वर्षांपूर्वी जसा निरागस आनंद व्हायचा तसा अनुभव आता फ़ारसा मिळत नाही. तेव्हा म्हणजे मी काहिही विचार न करता जगायचे तेव्हा. आला प्रसंग उत्स्फूर्त पणे जगायचे, न आधी विचार केलेला, न त्या क्षणी करणार आणि एकदा होऊन गेल्यावर तर बातच सोडा :)

अगदी छोट्या-छोट्या गोष्टीत आशा लावून धरायचे मी! छोटी म्हणजे किती छोटी असावी.... बाबा काही कामानिमित्त गावात गेलेत तर येताना त्यांनी ढोकळा आणावा. मग कधी विसरून त्यांनी नाही आणला कि मन हिरमुसायचं. "मला हवा होता" हे त्या वयातही मला बोलता आलं नाही, पण मनात धुसफुस व्हायची. असंच आई कधी कधी तिच्या बांगड्यांबरोबर माझ्यसाठी कानातंलं आणायची तेव्हा काय आनंद व्हायचा. चप्पल तुटली कि शिवून आणण्यापेक्षा नवीन घेऊ असं बाबा म्हणाले कि एकदम हवेत गेल्यासारखं व्हायचं. खरेदीला गेले अन पहिल्या १-२ दुकानात मनपसंत काही मिळलं नाही कि खट्टू व्हायचे.
"दिल है छोटासा, छोटीसी आशा..." असं अगदी.

१२ वी नंतर "preparing myself for the worst"(आपण याला PMFTW) ला सुरूवात झाली बहुतेक. मार्क धड ना चांगले, धड ना वाईट. ना आनंद होत होता ना वाईट वाटत होतं. इंजिनीरींग ला free seat मिळत नव्हती. payment ची बाबांची तयारी होती (म्हणजे त्यांना त्रास घेऊन ते करयाला तयार होते) पण "free seat ची लायकी नाही तर payment तरी कशाला" असं मी म्हणत होते. मग यातून च एक पर्याय पुढे आला तो BCS चा. Bachelor of Computer Science. मला admission मिळाली, पुढे MCS पण झाले. आणि खरोखरच कुठून तरी इंजिनीरींग करून त्यामानाने काहीच धड न करता आलेले बरेच जण मी आज बघते त्यापेक्षा आपलं चालू आहे ते बरंय.

तर जे हवंय ते मिळत नसेल, घडत नसेल तर पर्याय खुले ठेवता आले पाहिजेत आणि त्यातून अनेकदा चांगलच हाती लागतं हे जाणवलं.पुढे कधीतरी एकदा खूप निराश झाले होते, म्हणजे निराशेचं कारण मला बरंच अपेक्षित होतं, पण ते तसं घडलं तर आपण काय करायचं ह्याचा विचारच केला नव्हता. दर वेळी ती नकारत्मक शक्यता मन अमान्य करत राहिलं आणि ज्यादिवशी त्याला तोंड द्यायची वेळ आली तेव्हा गळून गेल्यासारखं झालं. खूप त्रास झाला, मनाने हिंदोळे, हेलकावे झेलले. एक शक्ती असावी कुठेतरी तसं मी अलगद त्या निरशेतून बाहेर आले.आणि तिथे PMFTW चा पहिला धडा मिळाला. नकारात्मक विचार टाळून उपयोग नाही तर त्यावर उपाय/ पर्याय शोधता आला पाहिजे.

आता सवय च झालीये. जवळ-जवळ सगळ्याचा दोन बाजुने विचार केला जातो, दोन दिशा दिसतात आणि मनाची एक तयारी असते कि यातला एक मार्ग आपल्याला घ्यायचा आहे.सकरात्मक असेल तरी मग हुरळून जाता येत नाही, कारण मार्ग चालू करायचा असतो आणि त्यात अडथळे नको म्हणून परत PMFTW ची तयारी :) नकारात्मक तोंड द्यायला तसं कठीण च असतं. दर वेळी जाणवतं, कि मी तयार आहे यासाठी असं आपल्याला फ़क्त वाटतं, पण तशी तयारी असतेच असं नाही. पण पर्यायाचा विचार झालेला असतो आणि तो पर्याय निवडताना निम्मा त्रास तुम्ही सहन केलेला असतो त्यामुळे आता प्रत्यक्ष तोंड देताना थोडा कमी त्रास :)कदाचित होणारा १००% त्रास ३०% आधी आणि ७०% नंतर असा विभागला जातो म्हणून असेल.

कोणाला वाटेल सगलं निरस होत असेल याने... इतका विचार करायची गरज आहे का? मी म्हणेन, तसं निरस नाही होत काहीच. ही सगळी विचार पद्धत इतकं अस्व्स्थ करते की तुम्ही सतत गुंतले जाता. कुठे काही नवीन मिळतंय का याचा शोध घेत रहता. खूप negativity चा विचार केल्यामुळे अगदी छोटी मनासारखी घटना पण मन सुखावून जाते. रोज च २५ -30traffic signal पार करून जाणार्याला एक दिवस अचानक त्यातले १५ traffic signal हिरवे मिळाले तर कसं होत असेल, अगदी तस्स! तयारी सगळ्या ३० signal ची ठेवा, कुठला लाल लागला तर काय करता येईल याचा विचार करून ठेवायचा. सगळेच हिरवे मिळाले तर सटासट पोचून काय करता येईल हे बघा.

अपेक्षित....अनपेक्षित! मस्त मजा आहे यात... जिंकायचं तर आहेच, पण एक पायरी हारले, घसरले तरी कसं जिंकता येईल हे ठरवायचं.

Tuesday, April 21, 2009

झोपी गेलेला...........

"काय करणार weekend ला?" मी काल एका मित्राला विचारलं
"काही नाही गं. झोपणार आहे :)" तो तसा प्रामाणिक च!
"हम्म, बरोबर आहे. office ची सवय अशी घरी मोडवत नसेल."
"अगदी अगदी.... घरी ८ तास, बस मधले २ तास आणि office मधले ४-५ तास..इतकी झोप हवीच ना. शिवाय IT मध्ये सध्या recession मुळे किती ते tension. त्यामुळे तर झोपेची गरज वाढलीच आहे. लोकांची tension मुळे भूक वाढते ना, तशी माझी झोप वाढलीये बघ :)"

लहानपणा पासून एकमेकांना खेचण्याची कला आम्ही अगदी मनापासून जोपासली आहे. आणि आमचा ग्रुप म्हणजे अगदी कुंभकर्णाचे वंशज. तो निदान ६ महिने तरी जागा असायचा (म्हणे)..पण आम्ही तर अगदी निद्रादेवीचे प्रामाणिक भक्त! तिला कधी नाही म्हणायचं नाही.."आलीस? ये...आल्यासारखी आता जरा शेजारी पण जाऊन ये...आणि ८-१० तास थांबच कशी!!!" वगैरे आमचे नि तिचे संवाद.

लहान असताना एक नरक चतुर्दशी सोडली तर मी कधी घड्याळात सकाळचे ५ बघितले नव्हते. ट्रिप वगैरे असेल तरी जास्तीत जास्त उशिरा ऊठायचं नी पटापट आवरायचं, हे ठरलेलं. आणि देव तारी त्याला कोण मारी? पूर्ण शालेय जीवनात माझी फ़क्त ३ च वर्ष सकाळची शाळा होती. प्राथमिक पर्यंत तर मी ९:३० पर्यंत वगैरे झोपायचे...आईने मग ब्रश, आंघोळीचं पाणी सगळं तयार ठेवून मला उठवायचं, दणादण आवरून मी शाळेत परत वेळेत हजर! एकदा ऊठलं कि गाडी जोरात, पण एकदा झोपलं कि मग ज्याचं नाव ते.

"झोप म्हणजे झोप म्हणजे झोप असते, तुमची आमची ती मुळीच सेम नसते" :) तुम्ही घरी झोपलेले आहात आणि बाहेर गेलेले आई बाबा दार वाजवून थकले...इतके कि त्यांनी घरावर दगड फेकून मारावे असं झालंय? बरं, आता त्या दगडाचा आवाज ऐकून झोपेतून बळंच ऊठून दाराऐवजी बाल्कनीचं दार उघडलं असं कधी झालंय?? झोपेचा वारसा आमचा वडिलोपार्जित आहे... माझी आजी झोपाळू. तिला त्या वेळच्या जीवनपद्धतीनुसार बरंच काम करावं लागायचं, पण ती झोप वगैरे कायम तब्येतीत काढायची. मग आमचे बाबा... कोयनेचा भूकंप पुण्यात बराच जाणवला... बाबा त्यावेळी घरात झोपले होते...आणि शेजार्यांनी येऊन ऊठवे पर्यंत बाबांना काहीही पत्ता नव्हता.माझी आत्येबहीण जे.जे ला MBBS करत होती... रात्री जागून परत पहाटे उठून अभ्यास. मग असंच एकदा २ ल झोपून परत ४:३० चा गजर लावून झोपली. २.३० तास पटकन गेले...आणि गजर झाला. इतकी साखरझोप या घड्याळाने मोडली...झालं...झोपेतच ते उचलून तिने खिडकी बाहेर फेकून दिलं. hostel चा watchman वेडाच व्हायचा बाकी राहिला असणार :) तिचाच अजून एक किस्सा.. मुंबई हून रत्नागिरीची गाडी...गाडी पहाटे रत्नागिरीला पोचली, हिने सवयीप्रमाणे ताणून दिली होती. कंडक्टर ने उठवलं..
"ताई, रत्नागिरी आलं"
"५ च मिनिटं झोपू दे" ही अजून झोपेतच :)
परत ५ मिनिटानी "ताई, ऊठा आता... गाडी आत मध्ये लावायची आहे."
"५ मिनिटं झोपू दे ना पण!!!"
"मग झोपा आणि चला परत मुंबईला"
मग एकदम खाडकन उठली. आता तीच ताई सलग ३२-३४ तास काम करते. पण आमचा कोणाचाच प्रश्न जागाण्याचा नाहीच आहे. एकदा झोपलो कि मग मात्र ऊठवणे हा एक project आहे!

माझा दादा :) बाबा त्याला रोज सकाळी ऊठवायचे..संस्कृतचं पाठांतर कर म्हणून... बाबा ६ ला ऊठवायला लागायचे, दादा दर वेळी ५-५ मिनिट्म करून ३०-४० मिनिटं झोपून घ्यायचा. एकदा तर "बाबा, ५ च मिनिटं.. स्वप्न पडतंय" असं म्हणाला होता. बाबांना हसावं कि रागवावं कळ्लं नसणार त्यावेळी. हाच दादा अगदी पेपरला जाताना पण १० मिनिटं झोप काढूनच जायचा..वर तसं केलं तर पेपर बरा जातो हे logic! आईच्या सहनशक्तीचा अगदी अंत पाहिला आमच्या झोपेने. मी तर अजूनही २ मिनिटं आहेत असं बघूनहि परत झोपू शकते. झोपायला (अति) जास्त मिळावं म्हणून मी बाकिचं भराभर आवरायला शिकले...म्हणजे उठले सगळं आवरून मी ३०-३५ मिनिटात बाहेर पडू शकते..आणि याचा onsite ला फ़ार फ़यदा झाला :)

कॉलेग मध्ये चष्मा असलेल्या लोकांचं बरं असं वाटायचं. टयुबचा प्रकाश पडला कि डोळे बंद काय उघडे काय काही कळत नाही. असंच एकाला सरांनी खडू मारून दचकवलं होतं. कंपनीच्या बस मध्ये लोक जबरी मस्त झोपतात.. विप्रो मधला एक almost पडायचा बाकी राहिला होता. मी एकदा बस मध्ये ताणून दिल्याने २-३ stop पुढे उतरले आहे. मग झोप आली कि आता मोबाईल वर गजर लावूनच झोपते. परत earphone, vibrator सगळं चालू ठेवायचं! आत्ताच्या ऑफिस मध्ये एक tester कोपर्यातल्या cubicle मध्ये झोपायचा.. मला जाम हेवा वाटायचा त्याचा. पण मग पुढे त्याच्या manager ने त्याला एकदम highway cubicle मध्येच बसवला. त्यानंतर त्याचं वजन २ महिन्यात ४ किलो ने कमी झालं असं आम्ही त्याला चिडवतो :)

कित्ती प्रयत्न केला तरी मला अजून सकाळी लवकर ऊठायची सवय लागलेली नाही. आई कडून सगळ्यात जास्त मी या बाबतीत रागावून घेतलं असेल... हल्ली तिला रात्री झोप उशीरा लागते म्हणून मग सकाळी जाग येत नाही, तर मी ऊठल्यावर का ऊठवलं नाही म्हणून परत माझ्याच वर चिडते. :) पण मला झोपायला आवडतं त्यामुळे असं छान झोपणार्याला मी सहसा ऊठवत पण नाही. झोप म्हणजे सुख असतं... ते जग तुमचं असतं...तुम्ही वाटेल ती स्वप्न त्या जगात बघू शकता. सुदैवाने झोप उडावी असं भयंकर भीतीदायक किंवा तरल आल्हाददायक दोन्ही कधी फारसं कधी झालं नाहीये... म्हणजे भयंकर भीतीदायक कोणाच्याच बाबतीत नको म्हणा...आणि ठराविक तरल आल्हाददायक चालेल... म्हणजे झोप नाही तर निदान साखरझोप तरी मिळते. :)

अन्न हे पूर्ण्ब्रह्म आहे खरंच... पण अन्नाची चोरी करता येते. झोप पण अन्नाइतकीच गरजेची आहे माणसाला...पण ती चोरता येत नाही. ज्याच्या नशिबात जितकी तितकीच त्याला ती प्रसन्न होणार. आज मी चार तासच झोपणार म्हणलं की ७-८ तास झोप लागते. आणि आज जास्त झोपू म्हणलं की २ तासात जाग येते. आपल्याकडे इतके देव आहेत आणि त्याची आपण अगदी व्यवस्थित पूजा करतो...मग कोणी "निद्रा"देवी ची पूजा का नाही करत? म्हणजे या घरातल्या लोकांना शांत झोप मिळू दे..त्यांना जास्तीत जास्त स्वप्न बघता यावीत असं का कोणी त्या देवीकडे साकडं घालत?

चला...खूप च लिहिलं...झोप आली :) तसही हे पोस्ट मी ३ दिवस लिहिते आहे...लिहायला घेतलं की निद्रादेवी यायच्या, मग आमचं तत्व "आलीस? ये...आल्यासारखी आता जरा शेजारी पण जाऊन ये...आणि ८-१० तास थांबच कशी!!!" वगैरे :))

देवीची कृपा अशीच सगळ्यांवर राहो....

॥ श्री निद्रादेवी प्रसन्न॥

Wednesday, January 14, 2009

आवाज कि दुनिया

आज नेहमीप्रमाणे बस मध्ये वाचत बसले होते. शेजारचा माणूस मोबाईल वर गाणी ऐकत खिडकीतून बाहेर बघत बसला होता... ’झेन गार्डन’ वाचत होते... मस्त कथा...त्यामुळे मी एकदम तंद्रीमध्ये. अचानक एक विचित्र "हॅलो" ऐकू आला..चमकून बघितलं तर शेजारचा तो फोनवर बोलत होता. तो दिसायला एकदम आडवा माणूस...केस थोडे पांढरे..चेहर्यावर एक गंभीरपणा आणि आवाज एकदम पातळ... मला एकदम हसूच आलं. म्हणलं केवढा माणूस आणि कसा आवाज!!!!

पण हे असं खूप वेळा बघितलं आहे, आवाज आणि दिसणं यातली विसंगती. पण विसंगती कशी? म्हणजे अमूक अमूक आवाजाची व्यक्ती अशीच असेल हे तर मनाचा खेळ झाला. आणि मग तशी ती व्यक्ती नसेल कि मला आलं तसं एकदम हसू येतं, आश्चर्य वाटतं, क्वचित भ्रमनिरास, अपे़क्षाभंग वगैरे.

मला आठवतंय माझ्या दादाचा एक मित्र होता...एकदम गोरा गोमटा, खात्या-पित्या घरचा. तो पहिल्यांदा घरी आला तेव्हा दार मीच उघडलं... आणि त्याचा आवाज ऐकून पळत जाऊन दादा ला सांगितलं कि "मुलीच्या आवाजाचा तुझा मित्र आला आहे". नंतर तो आमच्याकडे खूप वेळा आला, हळूहळू माझी ओळख वाढली तसं माझ्याशीही बोलायला लागला आणि मग त्याच्या त्या आवाजाची सवय झाली. पण माझ्या त्या निरोपामुळे मी त्याला त्याच्या नावाच्या feminine version नेच हाक मारायचे. मग मोठी झाले...आता त्याचं लग्न झालं नि मग कधीतरी मी त्याला त्याच्या मूळ नावाने हाक मारायला सुरूवात केली. :)

शाळेत एक बाई होत्या... मी शाळेत असताना चांगलं(??) गायचे वगैरे..त्यामुळे त्यांचा आनि माझा बराच संबंध आला. तबला सुरेख वाजवायच्या. पण आवाज एकदम फ़ाटलेला. त्या बोलायला लागल्या कि यांनी तबला भाषा शोधून काढावी असं वाटायचं.

आधीच्या कंपनीत माझ्या टीम मध्ये एक IIT fresher होता. डोकं एकदम मस्त. पण आवाज म्हणजे हसू आवरायचं नाही. त्याला ऑफिस मध्ये एकदा एका credit card साठी फोन आला. हे credit card वाले जनरल फोन करत असतात. ते ext. कोणाचं आहे हे त्यांना माहीतच नसतं. तर याने फोन घेतला..
"हॅलो"
"I m xyz from a bank."
"ok"
"mam, आप credit card में interested हो?"
"I m not a mam. My name is Susheel" (name changed here)
बास हे ऐकून आम्ही त्या cubicle मधले सगळे हसून पडायचे बाकी राहिले होतो. कित्येक दिवस आम्ही त्याची या एका dialogue वरून खेचायचो.

अजून एक मित्र आहे त्याचा आवाज एकदम भारदस्त आहे..पण दिसायला अगदी fresh out of college वाटतो. आणि असा त्याला अगदी official feedback मिळाला आहे :)

"स्नेहल, आज च्या बंड्याचा उद्या तुला verification call घ्यावा लागेल" असं मला आमचा HR सांगतो. हे असं पूर्वी पण अनेकदा मी केलंय...आता सवय झालीये. पण पहिल्यांदा असं करायचं होतं तेव्हा झेपलंच नव्हतं कि मी असं न बघितलेल्या माणसाचं कसं काय verification करणार? Telephonic interview नंतर हाच "तो" यासाठी हे सगळे खटाटोप. मग "त्या" चा आवाज, काही उत्तरं पडताळून बघायची आणि verification करायचं..असलं काहीतरी अजब तंत्र. म्हणजे मग मी आधी बोलले आणि verification केलं त्यात मध्ये त्या माणसाचा आवाज बसला असेल तर? पण हे असले प्रश्न मी मनात च ठेवते.

सगळी आवाजाची जादू, मजा आहे. आज च्या "नेट" च्या युगात तर चेहर्याआधी आवाजाची च ओळख होते. मायबोली, blog मुळे तर मी कित्येकांशी आधी फोन वर बोलले मग भेटले आहे. मजा येते कधीकधी. आवाज आणि ती व्यक्ती असं काही अजब सूत्र मनाशी मांडताना.

नोकरीमध्ये काम बदलत गेलं तसतसं आता मला distributed teams बरोबर काम करावं लागतं. तिथे तर अनेकदा फोन वर च बोलणं होतं. Client team तर सगळी आवाजानेच परिचीत असते. अशीच एक business analyst आहे..फोन वर तिचा आवाज कायम तोंडावर कोणी हात ठेवावा तसा येतो. त्यावरून मला वाटलं होतं कि एकदम मोठी, उदास बाई असेल... मग एक दिवस तिचा फोटो बघितला.. कमालच होती...ही बाई माझ्याच वयाची आणि सुंदर म्हणावी अशी आहे. तिचीच सहकारी आवाजावरून तरूण वाटते तर ती निघाली ४५ वर्षाची :)

हे तर झालं माझ्या सारख्या इतर काही लोकांचं. पण जे प्रतिथयश लोक असतात त्यांचा पण आवाज कित्येकदा गमतीशीर असतो. राणी मुखर्जी!!! कायम या बाईला सर्दी झालीये असा आवाज. श्रीदेवी... प्रचंड नकोसा वाटणारा अनुनासिक, अल्लड आवाज...सुनिल शेट्टी..उगाचच घसा बसल्यावर बोलतो तशातला काहीतरी आवाज. हेमामालिनी चा आवाज जरा भारी आहे. त्यात तिचा accent पण दाक्षिणी आहे. अजून च गंमत येते त्यामुळे! सचिन... काय अफ़ाट खेळतो, तोड नाही.. पण आवाजात मार खाल्ला आहेच.

काहीकाही आवाज मात्र वेड लावतात... श्रेया घोशाल, सुरेश वाडकर, लता, आशा, मन्ना डे, जगजित सिंग, हरीश भिमानी, अमिताभ... बरेच जण आहेत. पूर्वी दूरदर्शन वर बातम्या देणारे प्रदीप भिडे यांनी तर संपूर्ण करीअर जाहीराती, निरनिराळे कार्यक्रम यात आपल्या आवाजाचा ठसा उमटवत पुढे नेलं. कमाल असते.

आवाज हि देणगी आहे. आपण फ़ार फ़ार तर तो जपू शकतो...त्यातला fineness थोडा वाढवू शकतो.. पण तो एका मर्यादेपुढे कमावता येत नाही. ती शक्ती माणसाकडे नाही. जसा तुमचा-माझा रंग, उंची देव च ठरवून पाठवतो तसाच आवाजही. तरीही हसू आणणारे आवाज आहेत..वेड लावणारे आहेत तसेच चीड आणणारेही आहेत.

मी कित्येक मित्र-मैत्रीणींना फोन केल्यावर म्हणते... कामामुळे भेटणं होत नाही निदान आवाज तरी ऐकावा म्हणून फोन केला. नुसता त्यांचा आवाज ऐकला तरी जुन्या आठवणी जाग्या होतात..कोणी आसपास आहे असं वाटतं. अशा अनेकांचा आवाज एकमेकांना पोचवणार्या त्या Telecom industry ला खरंच सलाम!!!

नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा..
मेरी आवाज ही पेह्चान है..
गर याद रहे :)

आवाज कि दुनिया में आपका स्वागत है :)

Tuesday, December 02, 2008

१०वी अ आणि सरमिसळ वही

कायापालट झालेल्या घरात अजूनही सामान पूर्ण लावून झालेच नाही.... नक्की काय ठेवायचं, काय देऊन टाकायचं नि काय टाकूनच द्यायचं यावर आमच्या सगळ्यांची डोकी चालूच आहेत आणि माझे-आईचे, माझे-दादा चे वाद पण! :)
नवीन सगळंच एकदम झकास झालेलं असलं तरी, जुन्याची आठवण आहेच. त्या जुन्या जागांचे, सामानाचे संदर्भ आठ्वून मग मन हळवंहि होतंच.
असंच काही आवरताना आख्खी दोन पोती पुस्तकं (अभ्यासाची!!!!) आणि काही शाळा-कॉलेज(सुवर्णकाळ..) मधल्या वह्या सापडल्या... पुस्तकांमध्ये अर्थातच कॉलेजची जास्त होती. अगदी cobol, data structures पासून servlets, ASP.NET पर्यंत सगळं, शिवाय मोठ्या दादाचे mechanical चे TOM, SOM इ. ठोकळे आहेतच. परत त्यातही आमची विभागणी चालूच...काय ठेवायचं किंवा कोणा होतकरूला द्यायचं, काय रद्दीत घालायचं आणि काय जाळून टाकायचं. तसं बघितलं तर सगळंच जवळपास कमीतकमी १० वर्षापूर्वीचं...पण जीव अगदी काल घेतलेल्या वस्तूप्रमाणे त्यावर जडलेला आणि अडकलेला.... मग सगळं आवरता आवरता एका खोलीत मी आणि चारही बाजूने आम्हा भावंडांचा तो शाळा-कॉलेज चा सुवर्णकाळ असं झालं. ३-४ तास तरी ते तसंच असणार...
अशातच सापडलेली माझी १० वी मधली शाळेची एक वही... माझी १० वी!!! कित्ती वर्ष झाली??? पण २ वर्षापूर्वी शाळेत जात होते कि काय इतक्या अजून आठवणी ताज्या आहेत. सकाळी ८:३० ते ११ क्लास, मग १२ ते ५:३० शाळा... आत्ताच्या मानाने तसं कमी व्यस्त वेळापत्रक...पण तेव्हा किती "बिझी" आहोत असं वाटायचं :) बरं एवढं सगळं करताना अभ्यास वगैरे जेमतेमच. १० वी चं वर्ष असूनही biology च्या journalमधल्या frog vissera टाईप अवघड आकृत्या गौतमी कडूनच काढून घेतलेल्या... आणि तेव्हाच ठरवलं की भविष्यात आपण biology घेऊन काहीही दिवे लावू शकत नाही! कदाचि गौतमी नसती तर माझे ते journal १० मार्कहि गेलेच असते :)
क्लास नि शाळा असं सगळं मिळून माझं दप्तर टम्म फुगायचं! मग मी आणि स्वाती (वर्गात शेजारी बसायची) ने डोकंच लढवलं. शाळेतल्या तासांची निम्मी पुस्तकं तिने आणायची आणि निम्मी मी :) वह्या पण मी बिन पुठ्ठ्याच्या कव्हर च्या आणल्या होत्या...त्यातलीच एक २०० पानी वही परवा सामान आवरताना सापडली. मस्त पंचरंगी पोपटाचं चित्र असलेली...(पुढे result मध्ये व्हायचा तो आमचा पोपट झालाच!!!)
पहिल्या पानावर छान (?) अक्षरात नाव, तुकडी वगैरे... मग phyiscs चा अभ्यास... जेमतेम ३०-४० पानं भरलेली. म्हणजे वही दिवाळी नंतर काढली असणार आणि जेमतेम १-१.५ महिना वापरली असणार. मग पुढे घरी अभ्यास(??) वगैरे करताना काहीबाही लिहिलेलं...मराठी वाक्प्रचार वगैरे.... परत बरीच पानं कोरी! काहीतरी आठवून मी वही एकदम मागच्या पानापासून बघायला सुरूवात केली. काय असेल शेवटच्या पानावर :) हसू येतं आता... मागून biology चा अभ्यास (कि आभास!!!). किती नावडतं होतं biology कि वहीतही मी त्याला मागून सुरूवात केली होती. मग एक-एक पान करत मागे-मागे बघत चालले. phyiscs ची निदान ३०-४० पानं तरी होती, इथे biology चं सगळं १५-२० पानातच उरकलं होतं. So much I hated this subject!!!! मग १-२ ठिकाणी जाने-फेब्रु मधलं अभ्यासाच (त्यापेक्षा कधी झोपायचं याचंच जास्त) वेळापत्रक... मग काही संस्कृतची सुभाषितं, त्यांचे अर्थ. क्वचित ठिकाणी chemistry च्या reactions देखील!!! गणित हा स्वतंत्र आवडता प्रांत असल्याने या वहीत त्याचे घुसखोरी झाली नसावी! मग कधीतरी परिक्षा झाल्यावर मी आणि दादाने टेप करून आणायच्या गाण्यांची केलेली यादी. त्याचा आवडता किशोर आणि मी सगळी त्या वेळ्ची नवीन गाणी यादीत घेतलेली.... cassette च्या एका साईड ला ९ गाणी बसताता या हिशोबाने त्याने त्याची १८ आणि मी माझी १८ गाणी निवडून टिपून ठेवलेली. आई ग!!! काय धमाल होते दिवस!
रिझल्ट लागल्यावर बरंच काही रद्दीत गेलं असणार... मग कॉलेज सुरू झाल्यावर पण शाळेतले हे दिवस थोडे विसरल्यासारखेच झाले असणार. पण ही वही कशी कोण जाणे माझ्याच कप्प्यात राहिली..आणि आज आवरता आवरता माझ्या मनाचे किती कप्पे सताड उघडून गेली?? :)