Thursday, May 31, 2007

एक दिवस गंमतीचा....

काही काही दिवस जबऱ्या हटके असतात....म्हणजे लौकिकार्थाने त्यात काहिही खास नसतं (वाढदिवस, पगारवाढ वगैरे वगैरे)पण नेहमीच्या घटनाच अशा काहि चमत्कारीक घडतात कि दिवस वेगळा होऊन जातो. तसाच हा एक दिवस...२९ मे २००७.
माझ्या शाळेतल्या मैत्रिणीचा वाढदिवस या पलिकडे याला काहिहि महत्त्व नव्हतं....पण काहि मजेशीर गोष्टींमुळे हा दिवस लक्षात राहिल.

घटना १.

नुकत्याच घेतलेल्या insurance policy साठी आज मेडिकल होती. डॉ. सकाळी ८.३० ला येणार होते, म्हणून मी आदल्या रात्री ८.३० ला जेवून त्या नंतर काहि न खाता पिता बसले होते. ९ वाजले, ९.३० वाजले....डॉ. चा पत्त नव्हता. न राहवून (भूक न सहन होऊन लिहायचं म्हणजे मी अगदीच ’हि’ आहे असं कबूल केल्यासारखं होईल ना!!!) insurance agent ला फोन केला.

"अरे ...., ते डॉ. अजून आले नाहीत."
"हो, निघालेत ते. २० मिनिटात येतील"

१-१ मिनिट मोजत बसले. १५ व्या मिनिटाला डॉ चा फोन....
"मी ट्रॅफिक मध्ये अडकलोय. अजून अर्धा तास लागेल"
"अहो मला ऑफिस असतं. तिकडे वेळेत जावं लागतं. आता आज नका येऊ. शिवाय पोटात अन्नाचा कण नाही गेले १३ तास.... (लाज नाही वाटत..खात्या पित्या गुटगुटीत मुलीला उपवास घडवता!!! कुठे फेडाल???)"
"मग उद्या येऊ? हवं तर ऑफिसमध्येच येतो. जास्त काहि नाही...ECG & blood test आहे."
मी उडालेच..."अहो ऑफिसमध्यए काय?? तिकडे कुठे करणार हे सगळं"
"एखादी isolated room असेलच ना... तिकडे करू"
(वा!!! काय तयारी आहे डॉ ची...कर्तव्यदक्षता अशी असावी.... )
"आहे हो...पण तिकडे तुम्हाला नाही सोडणार"
"का?"
(कारण तुम्ही माझ्या कं च्या CEO चे जावई नाही)
"नाही सोडणार. शनिवारी करूयात आता या टेस्ट्स"

घटना २.

वरच्या सगळ्या प्रकारामुळे ऑफिसला उशीराच्या बसने जावं लागणार होतं. १२.३० ची शटल असते..जिच्यासाठी १२ पासून बुकिंग चालू होतं..... मी १२.०४ ला पोचले....बघते तर शटल बुकिंग फ़ुल झालं होतं...
"अहो, १२ ला सुरू करता ना? मग इतक्यात कसं झालं?"
"मॅडम, ३० च शीट असतात....भरले"
"पण इतक्यात??? तुम्ही असं म्हण्ताय कि लोक ऊठ्सूठ विमाननगरला जातात."
"आता ३० भरायला किती वेळ लागतो? आणि १५ मि. झाली कि आता"
"१५ कुठे?? ५ तर झालीत. तुमचं घड्याळ पुढे आहे...."
"नाही!!! मी कं चे घड्याळ बघून च बुकिंग घेतो..."
त्याच्यावर वैतागून मी बाहेर जाऊन बस ची वाट बघत उभी राहिले.
बस आली. बुकिंग केलेले लोक चढले.....नेमके आज सगळे आले होते...एकाला तरी न यावंसं वाटावं!!!
बुकिंग केलेलेच लोक चढले आहेत हे बघायला एक security वाला आला.
"मॅडम, बस फुल झाली."
"ते दिसतंय...पण २ जागा आहेत अजून..."
"अहो तिथे किन्नर (क्लिनर) बसतो."
"आता आपल्याला कुठे माऊंट अबू ला जायचंय कि किन्नर पाहिजे....उतरवा त्याला. मला ऑफिसला जायचंय"
"असं नाही करता येत आम्हाला"
"उतरवताय त्याला कि मी उतरवू?"
किन्नर च बिचारा गरीब होता....खाली उतरला आणि मी ड्रायव्हर शेजारी बसून ऑफिसला आले.

घटना ३.

ऑफिसला आले तर information security ची टेस्ट द्या अशी मेल आली होती. join झाल्यापासून हि मेल मी पाचव्यांदा बघत होते...आणि टेस्ट देता येत नव्हती कारण मला log in च करता येत नव्हतं. दर वेळी "Emp No not found in database!!!" असं दिसायचं
आज एकूणच डोकं जरा सटकलं होतं. पूर्ण info. security group ला मेल केली....चांगली खरमरीत.
१५ मिनिटात एका मुलीचा फोन आला..... तिला पण चांगलं चेपलं.... सरते शेवटी तिने मला माझं log in create करून दिलं आणि मग टेस्ट दिली.

घटना ४.

रात्रीचे आठ वाजले होते. मी अजून ऑफिस मध्ये. ८.३० ला माझा client interview होता. हा client जरा जास्तच फाडतो असं ऐकलं होतं....धुकधुक होतीच.
interview सुरू झाला. सुरूवातीलाच
"tell me about your earlier projects"
वा!!! मज पामरासी आणि काय हवे? माझी गाडी अशी धाड्धाड सुटली कि बास......
अमुक तमुक करता करता ३२ मि. झाली आणि आमची मुलाखत संपली. ग्राहक काका खुष होते....त्यांनी लगेच मॅनेजर काकांना तसं कळवलं......मॅनेजर एकदम "मोगॅम्बो....खुष हुवा!!!" style मध्ये माझ्या डेस्कजवळ आला आणि उद्यापासून project वर आहेस म्हणाला. ग्राहकाने याआधी २ लोकांना नाकारल्यामुळे बेजार झाला होता बिचारा!!!
अधिक मासात एका ब्राह्मणाला खुष केल्याचं पुण्य पदराशी (साडी नव्हती..पण असं म्हणायची पद्धत असते..) बांधून मी घरी जायला निघाले.
उद्याचा दिवस म्हणजे ३० मे कसा असेल याचा विचार करत...........

Tuesday, May 22, 2007

सामान्य पोलीस

त्यादिवशी तारीख होती १४ एप्रिल..डॉ. आंबेडकर जयंती!!! माझा साप्ताहिक सुट्टीचा वार असल्याने काहि रेंगाळ्लेली कामं उरकायचं मी ठरवलं होतं. त्यातलंच एक म्हणजे digicam च्या service center मध्ये जाऊन माझा कॅमेरा परत घेऊन येणं. आता हे service center बाजीराव रोडला आहे...तिकदे आज जाऊ नये असले मौलिक विचार मला त्यादिवशी सुचले नाहित.
वेळ साधारण संध्याकाळी ६.३० ची असेल. मुख्य रस्त्यावर पार्किंग मिळेल न मिळेल म्हणून मी एका गल्लीत गाडी लावून बाजीरव रोड ला आले. पाहाते तर एक बरीच मोठी मिरवणूक....एका ट्रक्वर स्पीकरची भिंत, कुठलंस असंबद्ध गाणं....भारताचा नकाशा, डॉ. आंबेडकरांचा पुतळा, त्याला हार.......मिरवणूकित साधारण ३००-३५० लोक सामील...त्यातले पन्नास एक जण विचित्र अंगविक्षेप करत स्नायू मोकळे करत होते. दया आली मला......माझी, माझ्या देशाची. खुद्द डॉ. आंबेडकर जरी आज आले तरी त्यांना काहिसं असंच वाटेल. विचार आणि त्यानुसार आचार हा क्रम आणि शक्तीच आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर गमावून बसलो कि काय? मला रस्ता ओलांडायचा होता, पण मिरवणूकिमुळे थोडा वेळ थांबावं लागलं. त्या लोकांबरोबर असलेली ८-१० पोलीसांची फौज मात्र कधी नाचणाऱ्याला आत ढकल, कधी गाड्यांना रस्ता मोकळा करून दे, कधी माझ्यासारखीला "ताई, जरा थांबा" असं सांगणे आणि इतर बऱ्याच गोष्टी करत होते.
कमाल वाटली ती त्या ८-१० पोलीसांची..... त्यांच्यापैकी कोणीच उच्च अधिकारी नसावेत. म्हणजे ते सगळे हुकुमाचे ताबेदार होते. या अशा मिरवणूका पुण्याला नवीन नाहीत. या मिरवणूकांना कुठलंहि सामाजिक, राजकिय कारण पुरे!!! शिवाय दरवर्षी मॅरेथॉन, दोन पालख्या, गणपती हे तर वेगळंच.... कारण काहिहि असो, अशी काहि समाजसमूहाच्या गोष्टी म्हणजे या पोलिसांच्या सहनशीलतेचा अंत असावा!!! गणपती.....मराठी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. एक दिवस तरी घरी राहून बाप्पाचा आशिर्वाद घ्यावासा सगळ्यांनाच वाटत असणार...अगदी नाहीच जमलं तर निदान अनंत चतुर्दशी ला तरी. पण पोलिसाला कसं शक्य आहे ते? मंजूर झालेली रजा जिथे अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रद्द होऊ शकते तिथे नियोजीत वेळी रजा कुठून मिळणार??? घरच्यांचा रोष ओढवत असेल कि.... शिवाय मिरवणूक, मोर्चा म्हणलं कि ते संपेपर्यंत उभी ड्य़ुटी!!! जनतेला शक्य तितक्या सबुरीने आवरायचं...धिंगाणा करणाऱ्यांना सरळ करायचं. पालखी आली, विसर्जन मिरवणूकित गणपती आला कि सगळे लोक दर्शन घेऊन नमस्कार करायला पुढे धावतात....अशावेळी यातल्या किती पोलीसांना देवदर्शन, नमस्कार वगैरे त्याक्षणी शक्य होतं माहित नाही. आपण जरी बाप्पाला "पुढच्या वर्षी लवकर या" म्हणत असू तरी हे पोलीस कदाचित "लवकर निघा, सावकाश जा आणि वेळेत पोहोचा" असं काहिसं बाप्पाला सांगत असावेत. दिवसभर ढोल ताशाने बधिर झालेले कान, गर्दी रेटता रेटता घामेजलेलं शरीर......१०-१२ तास उभं राहून गेलेले पाय या अवस्थेत माणूस यापलिकडे अजून काय भक्ती करू शकतो?
इतर कोणीहि नोकरदार माणूस इतकि सामाजिक उपेक्षा सहन करत नसेल जितके हे पोलीस करतात. तुम्ही काम करा वा न करा.....टिका हि ठरलेली. अगदी कॉलेज जाणारी विशीची मुलं पण हे कसे चुकतात आणि त्यांच्यामुळे किती त्रास होतो यावर तावातावाने बोलतील. तुम्ही-मी कोण अशी उपेक्षा इतक्या दिर्घ काळ सहन करू शकेल? जनतेचा राग पण चुकिचा असतो असं माझं म्हणणं नाहिये...पण त्या सगळ्याला हे कनिष्ठ (हुद्द्द्यच्या उतरंडीनुसार) अधिकारी कितपत जबाबदार असतात??? ९५% वेळा यांना केवळ काम बजावले जाते....ते कुठल्या पद्धतीने करावे, कोणी करावे याबाबतीत यांना सहभागी करून घेतलंच जात नाही. आणि बहुतेक वेळा अंमलबजावणीपेक्षा मूळ निर्णयच चुकिचा असतो......पण ज्याचा पूर्ण रोष निर्णय अमलात आणणार्या कनिष्ठ वर्गावर काढला जातो. हे पोलीस म्हणजे काय 'पब्लिक ने ओलीस’ ठेवण्यासाठीच पोलीसखात्यात भरती होतात का?
आज कुठल्याहि क्षेत्रात महिला आणि पुरूष वर्गासाठी वेगळी स्वच्छतागृहे असतात... पोलीसखात्यात या गोष्टीसाठी मागणी करावी लागली होती. हे किती जणांना माहित आहे? ते आमच्या सेवेसाठी आहेत, पण आम्ही त्यांचा किती आदर..आदर जाऊ दे, त्यांना किती सहकार्य करतो??? पोलीसखातं म्हणजे एकदम महान, कार्यदक्ष आहे असं मला अजिबात म्हणायचं नाहिये...पण उठसूठ त्यांच्याबद्दल अनास्था बाळगणं कितपत योग्य आहे?
एका देशासाठी सैनिकवर्ग जितका महत्त्वाचा आणि अभिमानाची बाब आहे तितकाच पोलीसवर्ग पण नाही का? खरंतर पोलीस हे शहर, गाव यांच्या वेशीतले सैनिकच ना!!! चित्रपटात पण सैनिकांवर गाणी आहे....पोलीस तिथेहि उपेक्षितच!!!
निर्णयक्षमता आणि अधिकार असणारे लोक हे खरे या खात्यातील बेजबाबदार लोक आहेत......शहर वाहतूक, कायदाव्यवस्था यासाठी ठळक नियोजन लागतं. तेच नसेल तर कनिष्ठ वर्गाला वेठीस धरून काय उपयोग? तुमचे IAS सारखे अधिकारीच अकार्यक्षम असतील तर मग सामान्य पोलीस...जो दिलेलं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि करूनहि रोषाला सामोरा जातो...त्याच्यावर आगपाखड करणं बंद झालं पाहिजे.

Saturday, May 19, 2007

नवीन गडी...नवा राज

या ७ तारखेपासून पंचमोध्याय सुरू झाला...माझ्या एका मित्राच्या भाषेत मी नवीन थाळीत जेवायला लागले. (as per him...anywhere u go, its same food in a different plate!!!) नेहमीप्रमाणे join झाल्यावर इथल्या लोकांनी ते काय काय नि कसं करतात ते अगदी फुगवून फुगवून सांगितलं. खरं तर कुठेहि जा, कंपनीबद्दल पूर्णत: चांगलं ऐकायला मिळणारे दिवस म्हणजे हे induction चे दिवस!!! वेगवेगळे लोक येऊन काय काय बोलत होते... मी मात्र बॅंकेच्या लोकांची वाट बघत होते...हो, एकदा का salary account ओपन झालं कि काम भागलं. पहिल्या दिवशी दिलेला चहा आणि जेवण मात्र चांगलं होत. (खाल्ल्या अन्नाबद्दल मी नेहमीच खरं बोलते.)
अजून पहिला दिवस संपतो न संपतो तोच माझ्या इथल्या नवीन मॅनेजर चा फोन...कि उद्या येऊन भेट. मी मनात म्हणलं जरा श्वास तर घेऊन द्या...नंतर आहेच बैल राबायला!!! ठरल्याप्रमाणे त्याला भेटायला गेले तर हा माणूस माझ्यासाठी जेवायचा थांबला होता. बाप रे!!! हे मला जरा नवीन होतं. मग जरा अनौपचारिक गप्पा मारत आमचं जेवण झालं (आज मी डबा नेला होता....त्यामुळे quality n taste बद्दल काहि शंका नको!!!) माझ्या आजवरच्या सगळ्या मॅनेजरप्रमाणे हा पण non-smoker.... देवाची कृपा!!!
जेवण झाल्यावर टिम शी ओळख....एकूण लोक ४...सगळे तेलुगू :( म्हणजे मला कायम आंग्ल भाषेत च बोलावं लागणार (कोकाटे क्लास लावावा कि काय?) बरंय निदान मॅनेजर तरी मराठी आहे. मोजून मापून कोकणस्थ आहे!!!
पुढे दोनच दिवसात मला मशिन मिळालं, मॅनेजर काकाने स्वत:हून net connection दिलं...वा वा वा!!! कामाला (कि टिपीला???) सुरूवात झाली. प्रोजेक्ट तसा बरा आहे...अजून काम खेचणं आता माझ्याकडे लागलंय. बघू....काय घाई आहे?
तर मी बसते ती जागा pantry च्या अगदी जवळ आणि मॅनेजरच्या बरीच लांब आहे...त्यामुळे पामर सुखी हे सांगणे नकोच!!! आजूबाजूला पूर्ण आंध्रप्रदेश आहे....त्यांच्याबरोबर काम करता करता मी एक दिवस कदाचित तेलुगू ब्लॉग लिहायला लागेन...शक्य आहे, कालच नाही का त्यांच्या नादी लागून मी आंध्र मेसमध्ये जाऊन ३ वेळा भात खाल्ला!!
इथल्या काहि आवडलेल्या गोष्टी, ५०० र. मध्ये बससेवा!!! तेहि चांगल्या लक्झरी बस, रेडिऒ नीट ऐकू येईल अशा. (आधीच्या कंपनीच्या बस्मध्ये रेडिऒ कमी नि खरखर जास्त ऐकू यायची) लायब्ररीमध्ये non technical पुस्तकं, management चे पुस्तकं भरपूर आहेत. परवाच ’wise and other wise' आणलंय. yaahoo messenger इथे officially चालतो :)
ज्याचा तीव्र निषेध करावासा वाटतॊ ते म्हणजे icicidirect , मायबोलीवर बंदि आहे. हा काय अन्याय!!! icicidirect नाही तर मी चार पैशाचे २० पैसे कसे करायचे हो?? आणि मायबोली नाही तर मग आम्ही आमचं मन कुठे जाऊन हलकं करायचं??? श्या...अजून थोड्यादिवसाने आवाज उठवला पाहिजे या विरुद्ध!!! पण सध्या जरा शांत आहे मी....नवीन गडि आहे ना...जरा सरावले कि मी पण माझे अंतरंग दाखवायला सुरू करेन!!! :)

Thursday, May 10, 2007

स्वभाव

मनुष्यस्वभावाला औषध नाही म्हणतात ते अगदी खरंय. संस्कार, शिक्षण, आजूबाजूचा परिसर याने काहि चांगल्या सवयी माणूस लावून घेऊ शकतो आणि अशा सवयींमुळे स्वभावात थोडेफार बदलहि होतात. पण लक्षात कोण घेतो? माणसाच्या व्यक्तिमत्वातील हि अतिशय महत्वाची बाजूच अनेकदा दुर्लक्षित राहते असं माझं मत आहे. कित्येकदा स्वभावदोषाला खतपाणीच घातलं जातं.
त्यातहि स्वभावात काहि काहि लोक टोकाचे असतात...कोणी अति तापट, अतिशय सरळ, नको इतके स्पष्टवक्ते, साखरपेरणी करून स्वार्थ साधणारे..असे अनेक. कुठलीच व्यक्ती हि सगळ्यांशी समान कधीच वागत नाही असं मला वाटतं. आपण समोरच्याशी काय बोलतो, वागतो याचा समोरची व्यक्ती सोडून अनेक गोष्टींशी संबंध असतो...जसे तुम्हा दोघातले आधीचे नाते, चालू असलेला चर्चेचा विषय, त्या क्षणाचे तुमची मानसिकता, समोरच्या व्यक्तीचे वय वगैरे वगैरे. म्हणूनच तर "तू माझी अमुक-तमुक आहेस म्हणून ठीक नाहीतर दाखवलं असतं", "आधीच माझा मूड नाहीये त्यात अजून तुझं परत नको", "आजोबा, वयाकडे बघून सोडून देतोय" अशी वाक्ये आजवर कित्येकदा ऐकली असतील. आपण स्वत:हि कित्तीतरी वेळा विचित्रपणे बोलत असतो किंवा समोरच्याच्या बोलण्याचा सोयीस्कर अर्थ काढत असतो. अगदी त्या व्यक्तीला आगाउ, नाटकी, शिष्ठ वगैरे लेबलं लावून मोकळे होतो.
आपलं रूप, बुद्धी जशी निसर्गदत्त आहे तसंच स्वभावाबाबतीत म्हणावं लागेल. पण मूळच्या स्वभावाला थोडं वेगळं वळण देता येतं ते संस्काराने, शिक्षणाने.... आता हे वळण म्हणजे नक्कि काय? तर आपल्या स्वभावातील जो dominating गुण आहे त्याला काबूत ठेवायला शिकणे. तापट माणसाने ऊठ्सूट आरडाऒरडा केला तर कोण त्याच्याशी मैत्री करायला धजेल? नको इतके सरळ असाल तर दुनिया तुम्हाला हातोहात विकेल...तुमच्या दरवेळी अति स्पष्ट्वक्तेपणामुळे किती लोक निष्कारण दुखावले जात असतील देव जाणे. स्वत:च्या स्वभावाचे असे टोकाचे कंगोरे लक्षात घेऊन काहि सकारात्मक कृती केली, प्रयत्न केला तर खरं शहाणपण. गुण आणि अवगुण यात एक धूसर रेषा असते....ती धूसर असली तरी त्याची खूणगाठ मनाशी पक्कि कराल तर बरंच जग, लोक तुमच्या जवळ येईल. कारण स्वभाव नि लोकसंग्रह हे सरळ प्रमाणात असतात. आपला स्वभाव सगळ्यात जास्त फायदा किंवा नुकसान आपलं स्वत:च करत असतो. जितके चांगले संस्कार होतील, चांगले वातावरण असेल, चांगले वाचन होईल तितक्या लवकर हि गोष्ट माणूस आत्मसात करू शकतो.
रूप निसर्गदत्त असलं तरी आपण अधिक चांगले दिसायचे प्रयत्न करतोच कि...मग हेच स्वभावाच्या बाबतीथि करून पाहूया. "मी अशीच आहे", "मला बदलणं शक्य नाही" हि वाक्य निष्कारण आत्मघातकि ठरायला नकोत..... शेवटी परिपक्वता म्हणजे काय? ती स्वभावाची एक अशी अवस्था आहे जिथे तुमचा स्वभाव सगळ्यांना आपलंस करू शकतो, समजून घेऊ शकतो. rational behaviour हे अनेकदा प्रयत्नपूर्वक मिळवलेलं असतं. कुठलीहि गोष्ट प्रयत्नानेच मिळते.... चांगली व्यक्ती होण्यासाठी उत्तम स्वभाव असावा लागतो...आणि त्यासाठी कष्ट घ्यावेच लागतील.

Friday, May 04, 2007

माधुरी दिक्षित


हे नाव आपल्या कोणालाहि अनोळखी नसेल... हिचं नाव ’माधुरी’ ठेवावं असं ज्या/जिला कोणी वाटलं तो खरंच मस्त माणूस असणार. नावाप्रमाणेच मधुर चेहरा आणि हास्य असणारी हि माधुरी दिक्षित!!!
चारचौघींसारखी मराठी कुटुंबात वाढलेली हि मुलगी.... निसर्गदत्त सौंदर्य घेऊन जन्माला आली आणि दिवसेंदिवस ते सौंदर्य खुलतच गेलं. प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजध्यक्ष एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते "अबोध नंतर माधुरी माझ्याकडे portfolio करता आली. नवीन चेहरा असल्याने मी तिला मेक-अप साठी लवकर यायला सांगितलं होतं. ठरलेल्या वेळेला ती आली. तिला बघितल्यावरच मला जाणवलं कि या जातिवंत सुंदरीला जास्त मेक-अप ची गरज नाही. ओठांचा शेपहि इतका perfect कि नुसतं lipstick लावा कि काम झालं" आणि खरंच असावं ते.... एक ’साजन’ पिक्चर सोडला तर इतर सगळ्यामध्ये मला ती आवडली आहे. (साजन मध्ये खूप pimples आहेत तिला....आणि माठ cameraman ने closeup घेऊन घेऊन ते सगळ्यांना बघण्याची शिक्षा केली.)
वयाच्या सोळाव्या वर्षी माधुरीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.... घरून थोडासा विरोध पत्करूनच!!! पहिला सिनेमा आला नि गेला.... मग अधिक गंभीरतेने विचार करून तिने photo session केले. कस्तुरी च ती...फोटो बघून दिग्दर्शक विचार न करतील तरच आश्चर्य!!! अबोध नंतर २ वर्षांनी ’तेजाब’ आला. बस्स!!! माधुरी रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर होती. ’एक-दोन-तीन’ या गाण्यावर नाचणारी माधुरी, ’सो गया ये जहॉं’ मध्ये अनिल कपूर कडे भांबावून बघणारी माधुरी!!! स्टेप कट, काळे टपोरे डोळे, सरळ नाक...छोटी जिवणी...एकूणच त्यावेळच्या दाक्षिणात्य चेहऱ्यांना आणि उत्तर भारतीय बाहुल्यांना कंटाळ्लेल्या लोकांना माधुरी आवडली. सरोज खान तर आजहि तिचे मनापासून कौतुक करते. ’एक-दोन-तीन’ या गाण्यासाठी माधुरीने प्रचंड मेहनत घेतली होती. जवळ जवळ आठ दिवस रोज ती या नाचाची practise करायची. There are no short cuts to serene and complete success हे किती आधीच माहित होतं तिला!!!
तेजाब हि केवळ सुरूवात होती. त्यानंतर राम-लखन, दिल पासून DTPH, देवदास हा प्रवास थक्क करणारा आहे. १९८७ पासून १०-१२ वर्ष माधुरी bollywood मध्ये चमकत राहिली. नजर खिळवून ठेवणारं सौंदर्य, ताकदीचा अभिनय...आपण ज्या वेगाने चालूहि शकणार नाही त्या वेगाने नाचणारी माधुरी... पुढे जाऊन तर लोकांनी तिला ’लेडी अमिताभ’ म्हट्ले. तिचे एकूण चित्रपट पाहता खूप कमी चित्रपट खऱ्या अर्थाने flop झाले.... तिच्या नावावर सिनेमा चालत असे. आणि हे सगळं यश माधुरीच्या गुणांवर तिने मिळवलं होतं.... कुठलीहि अनावश्यक तडजोड, थिल्लरपणा न करता. १०-१२ वर्ष चंदेरी जीवन जगताना एकाहि वादात, वादळात हि अडकली नाही वा कुठल्या एकाबरोबर हिचं नाव केवळ gossip च्या पुढे जाऊन जोडलं गेलं नाही. (हे खूप अवघड आहे...आजूबाजूला इतके सुंदर, श्रीमंत...तुमची स्तुती करणारे लोक असताना त्या नात्यातील व्यावसायिकता ओळ्खून स्वत:ला सावरून पुढे नेणं...आणि हे सगळं वयाच्या विशीत!!! सोपं नाही ते. एक हिंदी सिनेमा ’दीवाना’ हिट झाला नि दिव्या भारतीने साजिद नाडियादवाला शी लग्न केले. वय फक्त १८. या सगळ्याची परिणीती पुढे कशात झाली ते जगजाहिर आहे.)
माधुरीच्या सिनेमांचं वैशिठ्य म्हणजे गाणी आणि तिची नृत्य-अदा!!! ’एक-दोन-तीन’ , ’बडा दुख दिया तेरे लखन ने’, ’धक धक करने लगा’, ’हमको आजकल है इंतजार’, ’है के सेरा सेर....हमे प्यार का है आसरा चाहे जो हो’, ’माई नी माई मुंडेर पे तेरे’..... किती गाणी!!! आणि त्यातली माधुरी..... facial expressions कोणी हिच्याकडून शिकाव्यात. डोळे, ओठ यांच्या सुबक हालचालीतून इतकं व्यक्त करायची माधुरी कि बास!!! ते सगळं बघताना मी (एक मुलगी असून) घायाळ होते तर मुलं वेडी न होतील तरच आश्चर्य!!!
प्रत्येक गोष्ट, जी वर जाते, तिला खाली यावंच लागतं. हा निसर्गनियम आहे. माधुरीची कारकिर्द त्याला अपवाद नाही. पण हे माधुरीला माहितच असावं. (or she was prepared for it) नवऱ्याबद्दलच्या कल्पना, अपेक्षा यावर पण ती जणू ठाम होती. लग्न करायचं ठरल्यावर रितसर भेटून, बोलून आपला हात तिने श्रीराम नेने च्या हातात दिला. तिच्यासारखाच तिचा नवरा...देखणा नि कर्तत्ववान!!! लग्नानंतर ५-६ वर्ष केवळ नवरा, मुल नि घर.... आता मुलं जरा मोठी झाली. And even Madhuri is back in shape after 2 deliveries.... आता ती परत येतेय!!! पण कधी, कुठल्या रोल मध्ये...अजून तरी माहित नाही...पण तिचे पुनरागमनहि तितकेच यशस्वी ठरो... उघड्या-बोडक्या, अश्लील नाच करणाऱ्या आजकालच्या मुलींपेक्शा माधुरीने परत आपली जादू चालवावी. Madhuri..this true fan of yours...is just waiting for your come back. Come back soon and with equal grace as before!!!