Monday, July 23, 2007

अनिल कपूर

"इतक्यात कुठला सिनेमा बघितलास?" माझा एक मित्र मला चॅट वर विचारत होता.
"अरे, मी कमीच बघते. त्यातहि शाहरुख, रानी किंवा प्रीती नसलेले बघायचे म्हणजे चॉईस कमीच ना!!!" मी
"hmmm...." तो नुसताच हंबरला (आणि त्याने हे वाचलं तर मला मारणार आहे ;))
"पण चिनी कम बघितला..आणि आवडला मला. तब्बू आणि इलाय राजा साठी बघितला." मी
"वा!!! मला पण आवडला. तब्बू मस्त च आहे. मला आवडते" इति मित्र.
मग आमचं चॅट एकमेकांच्या आवडत्या actors/ actress वर गेलं. मग कोण छान दिसतं, कुठला सिनेमा छान वगैरे....

"ए, तुला जर chance मिळाला तर कोणाला भेटायला आवडेल?" अचानक मध्येच त्याचा प्रश्न.
"अनिल कपूर!!!!" माझं उत्स्फूर्त उत्तर.
"काय????" तो जरासा चमकलाच..... मग मी त्याला पटवून दिलं कि अनिल कपूर (AK) कसा versatile आहे वगैरे.....

अनिल कपूर.....एक नाव आणि रंग सोडला तर हिंदी चित्रपट्सृष्टीतल्या दिग्गज कपूर लोकांशी दूरान्वयेहि संबंध नाही. पदार्पण साधारण मिथुन, गोविंदा या लोकांच्या काळातलं..... तो एक काळ असा होता कि चांगला सिनेमा दुर्मिळ झाला होता.... ना चांगली कथा, ना गाणी.... नाच देखील भयानक!!! अशा वेळी AK आला.... "वो सात दिन" सारखे हट के सिनेमांमधून. आपल्या गावातून मोठा कलाकार होण्यासाठी बाहेर पडलेला तरूण लाजवाब आहे. चेहऱ्यावरची निरागसता, मनाचा सच्चेपणा सगळं छान जमलंय. मी हा सिनेमा खूप नंतर बघितला...(साहजिक आहे...सिनेमा आला तेव्हा मला मराठी जेमतेम कळायचं...हिंदि काय कप्पाळ कळणार?). पण जेव्हा बघितला तेव्हा AK जबरी आवडला.
AK ने एक से एक सुंदर आणि त्याहून महत्तवाचं म्हणजे variety movies केले.....तुम्ही म्हणाल ते तर आमिर ने पण केले. पण फ़रक आहे. आमिर ने variety इथे industry मध्ये settle झाल्यावर दिली....AK ने अगदी सुरूवातीपासून केलं. त्याचा कर्मा, मशाल, साहेब, मेरी जंग वगैरे आठवा..... कुठेच तो गुलफाम चेहऱ्याचा, हिरोईन च्या ओढणीशी खेळणारा नाही आहे. कर्मा मधला रोल तसा लहान...पण लक्षात राहतोच. साहेब मधला बहिणीच्या लग्नासाठी किडनी विकणारा भाऊ मन हेलावून सोडतो. मेरी जंग.....यातल्या performance बद्दल मी काय लिहू??? गिरिश कर्नाड, नूतन सारखे मोठे कलावंत....त्यांचा मुलगा AK... वडिलांचा खून होतो...त्या धक्क्याने आई वेडी होते....त्या सगळ्यातून स्वत:ला आणि लहान बहिणीला AK सावरतो...आई ला धक्क्यातून बाहेर काढतो. कथा अपेक्षित धाटणीची...पण AK rocks!!! त्याच्या ईश्वर पण असाच हट के सिनेमा...पण यातला कुठलाच सिनेमा सुपर डुपर हिट ठरला नाही. ते यश AK ला मि. इंडिया ने दिलं.
मला अजूनहि आठवतंय तो सिनेमा आला तेव्हा जवळ जवळ माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींनी तो थिएटर मध्ये जाऊन बघितला होता. जुन्या ब्रह्मचारी ची कथा घेऊन बोनी कपूर ने हा सिनेमा काढला.... एका अद्भुत घड्याळाने AK व्हिलन लोकांचा धुव्वा उडवतो... १५-२० अनाथ मुलांना जीवापाड प्रेम देतो.....आत्ता जी पिढी २५-३२/३३ मध्ये आहे..त्या सगळ्यांना हा सिनेमा तेव्हा जबरी आवडला असणार. कित्येक आठवडे या सिनेमाने यश चाखलं.....आणि हे यश पूर्ण बोनी आणि अनिल चं आहे.
इथून पुढे AK चमकू लागला..... तेजाब, राम लखन, बेटा, खेल वगैरे माधुरी बरोबर च सिनेमे.... सगळेच चांगले आहेत असं नाहिये..पण तो चमकत होता हे मात्र मान्य करायलाच हवं.
लम्हे पण एक सुंदर सिनेमा!!! (फक्त त्याने मिशी काढायला नको होती) याच दम्यान त्याचा आवडलेला आणि लक्षात राहिलेला सिनेमा म्हणजे परिंदा... परत एकदा माधुरी! खूप दिवसांनी भेटणाऱ्या मित्राचा खून प्रत्यक्ष डोळ्याने बघितला.....खून ज्याने केला त्याच्याकडे भाऊ काम करतो.....ज्याचा खून झाला तो परम मित्र आणि त्याची बहिण प्रेयसी...... AK चा पूर्ण emotional performance!!! (यातला नानाचा अण्णा पण मस्त!!!)
मध्ये बराच काळ AK गायब होता..... इकडे शाहरुख, अक्षय टाईप नवीन लोक येत होते. AK त्यावेळी होमवर्क करत असावा.
आणि मग तो परत आला.....१९४२...., नायक, विरासत, पुकार, ताल, कलकत्ता मेल, murder असे वेगळे सिनेमा घेऊन. नायक जरा जास्त च फिल्मी आहे पण AK साहजिकच भाव खाऊन जातो. विरासत.....मला अजून असा माणूस भेटला नाहिये ज्याला हा सिनेमा अजिबात आवडला नाहिये. Virasat is a same old but well described and well potrayed story!!! US return अनिल आणि वडिल गेल्यावर त्यांची गादी चालवणारा अनिल....दोन्हि आवडतात. ठाकूर झालेला अनिल अप्रतिम दिसतो. तब्बु वर प्रेम करणारा अनिल हळवा वाटतो.....all in all....विरासत मध्ये AK ची ताकद पुन्हा एकदा दिसून येते. ताल मधला practical अनिल भावुक अक्षयपेक्षा जास्त जवळचा वाटतो. या सिनेमातले त्याचे संवाद आणि संवाद्फेक दोन्हि नेहमीपेक्षा वेगळी आहे. सिनेमाच्या शेवटी मला वाटलं होतं कि, ऎश्वर्या का याला सोडून अक्षय कडे जातेय?
बिवी नं. १, No entry मध्येहि इतर कोणापेक्षाहि AK अधिक स्पष्ट लक्षात राहतो. अरमान हा पण त्याचा अजून एक वेगळा सिनेमा!! दीवाना मस्ताना मध्ये गोविंदा बरोबर केलेली धमाल मजा देऊन जाते.
AK ने काहि अगदीच बोअर सिनेमे पण केले....जसे लाडला, रूप कि रानी..., जुदाई वगैरे. पण त्याचा overall graph बघता असे खूप कमी सिनेमा आहेत. ८०% वेळा AK ने वेगळं दिलं आहे....वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा करियर स्पॅन तर नुसत्या पद्मिनी कोल्हापुरे ते बिपाशा यावरून च ओळ्खावा. आणि या इतक्या प्रचंड काळात जपलेली स्वच्छ प्रतिमा. AK हा खून हॅंडसम, चिकणा आहे असं माझ्या एका मैत्रिणी ने प्रत्यक्ष बघितल्यावर सांगितलं आहे. असं असून त्याचं नाव कोणाबरोबर घेतलं गेलं नाही. जिच्याशी लग्न केलं तिच्याच बरोबर अजून हि आहे. (आमिरने इथे मार खाल्ला..)
खरं सांगायचं तर अनेक आत्ताच्या किंवा त्याच्या काळ्च्या कोणापेक्षाहि AK सरस आहे. आज हि मला AK चा सिनेमा म्हणलं कि काहि वेगळं असेल याची खात्री असते.... त्याची मुलगी आता १७-१८ वर्षांची आहे म्हणे....
ती जर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सिनेमात येणार असेल तर AK ने अशीच variety करण्याची समज दिला पण द्यावी!!!
AK..... कोणी मानो वा ना मानो...पर तुस्सी ग्रेट हो!!!

Sunday, July 08, 2007

वास्तुशास्त्र!!!

Real estate business ने आजकाल इतका सुवर्णकाळ पूर्वी कधी बघितला नसेल.... मागच्या वर्षीचा प्रति चौरस फूट चा भाव आज जवळपास ४०% ने वाढलेला आहे. आणि ठोस कारण काहि नाही. या दरवाढीवर सरकारी/ निमसरकारी कुठल्याच यंत्रणेचा control नाही. कुठल्या भागात जागेचा काय भाव असावा याचे काहि कोष्ट्क नाही. काहि शहरात (जवळपास सगळ्याच), काहि भागात जागेचे भाव असे चढले आहेत कि चांगल्या जागेत राहाणं हा अनेकांचा survival प्रश्न व्हावा!!! असो....यावर बरंच आहे लिहिण्यासारखं...ते नंतर कधीतरी :)

तर या अचानक फुगलेल्या real estate business मध्ये अनेक इतर व्यावसायिक आपली पोळी भाजत आहेत. यात अगदी interior decorator, designer sanitary accessories, सुतार, fabricator.....गेला बाजार अगदी माळी सुद्धा आले. आणि या सगळ्यात गेल्या ४-५ वर्षात अधिक भाव आला तो वास्तुशास्त्र या प्रकाराला!!! म्हणजे हे शास्त्र काहि नवं आहे का हो? नाही...पण लोक अचानक जागृत झाले याबाबत. घर बांधायला सुरूवात झाली किच लोक एखाद्या वास्तुशास्त्र जाणकाराला गाठा....घरातल्या प्रत्येक चौरसाबद्दल त्याचा सल्ला घ्या....त्याप्रमाणे घराच्या मूळ रचनेत अतोनात बदल करा असा सगळा प्रकार चालतो. पूर्वी ज्योतिषकार, पत्रिका बघून तारिखवार भविष्या सांगणे या लोकांची जाम चलती होती. तीच जागा आज या वास्तुशास्त्र वाल्या लोकांनी घेतली वाटतं.

मी नास्तिक नाही....देवावर माझी श्रध्दा आहे. अडचणीच्या वेळी त्याच्यावर हवाला टाकलेला आहे. आणि मी विचार केला त्याहून जास्त सकारात्मक रिझल्ट मला देवाने दिलेला आहे. देवपूजा, स्तोस्त्रपठण इ. मी मानते. या सगळ्याने जी पवित्रता निर्माण होते ती मला आवडते. पण तरीहि मला स्वत:ला देवाधिष्ठीत म्हणवणारे ज्योतिषकार कधीच आवडले नाही. तोच प्रकार या वास्तुशास्त्राचा!!! घराची रचना कशी त्यापेक्षा त्या घरात राहातं कोण यावर त्या घराचं सुख, उन्नती ठरते ना!!! घर म्हणजे पूर्वेकडे दरवाजा, दाराच्या दिशेने laughing buddha कि घर म्हणजे हसतमुखाने स्वागत, अगत्य...कुटंबातल्या लोकांचा एकमेकांवर विश्वास, प्रेम ??? मला वाटतं....businessman जसा काळा पैसा कसा खर्च करू असा विचार करत काहिहि करतो...तसं आज गरजेपेक्षा जास्त मिळणारा पैसा लोक अशा अनैसर्गिक गोष्टीवर खर्च करत असावेत.

या वेडापायी आजकाल काहिहि ऐकायला मिळतं.... दक्षिणमुखी घर नको!!! मला दक्षिणमुखी मारूती माहित आहे.... घर काय प्रकार आहे विचारलं तर कळलं ज्या घराचा दरवाजा दक्षिणेला आहे ते म्हणे दक्षिणमुखी. विचार केला... मी लहानाची मोठी ज्या घरात झाले ते दक्षिणमुखीच होतं. पण आजहि त्या घराइतक्या रम्य आठवणी मला दुसर्या कुठल्याहि जागेच्या नाहीत. माझ्या आई-बाबांनी आम्हा भावंडांबद्दल याच घरात स्वप्ने बघितली...बरीचशी त्याच घरात पूर्ण झाली. आजच्या मानाने पैसे कमी असूनदेखील आताच्या आणि तेव्हाच्या सुख समाधानात फरक असा तो नव्हता!!! एका माणसाने म्हणे घर बांधून पूर्ण झाल्यावर वा.शा. वाल्याला बोलावलं (घर बांधूनहि पैसे शिल्लक राहिले असावेत!!!) तर त्या वा.शा. ने सांगितले कि तुमचे स्वच्छ्तागह चुकिच्या दिशेला आहे. मी चाट च!!! अहो दिवसाचे १५ मिनिटाचे अति महत्वाचे काम त्यात आमच्या पूर्वजांनी देखील दिशेचा विचार केला नाही. आणि "घाईची" लागली कि कुठे दिशा शोधत बसाल??? असो... तर त्या माणसाने toilet काढून पार drainage line बदलून प्रात:विधीसाठीची दिशा बदलली. मी म्हणलं..आता "पूर्वीपेक्षा कमी वेळात आणि जास्ती" होते कि काय? दिशेचा परिणाम म्हणून????

तर यातला विनोदाचा भाग सोडा.... पण वा.शा. हे एक चक्रव्यूह आहे. तुम्ही आत जाता...जातच राहता. बाहेर पडायचा मार्ग ना तुम्हाला दिसतो ना तुम्ही आत राहू शकता. एखादी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली आणि येनकेन कारणाने ते जमलं नाही तर...मन खातंच राहातं. आणि घर म्हणजे काय हो? वा.शा. प्रमाणे बांधलेल्या घरात जर आई बाबांना जागा नसेल तर कशाला ती वास्तुदेवता प्रसन्न होईल? घर बनतं ते माणसांनी कि योग्य दिशेला योग्य ठेवलेल्या वस्तुंनी??? पैसा आहे म्हणून तो उधळू नका.... तो पैसा मिळवण्याची शक्ती ज्या शिक्षणाने तुम्हा आम्हाला दिली त्याचाच वापर जरा सारासार विचार करण्यात करा. घराची गरज काय..संकल्पना काय हे तपासा.

वा.शा. प्रमाणे घर बांधलेले १००% सुखी आहेत असा पुरावा आहे? जो तो आपलं नशीब घेऊन येतो....प्रत्येकाला चढ उतार आहेतच. आणि चढ सोपा करतील ती तुमची नाती...तुमचे आचार विचार. उतारावर साथ देणारी पण तीच!!! मी रोज वायव्येकडे प्रात:विधी करूनहि मला promotion का मिळत नाही असं का म्हणणार आहात तुम्ही? मग कशासाठी हा अट्टाहास????

वेळीच जागे होऊया..... वा. शा. च्या वाढणाऱ्या स्तोमाला आवर घातलाच पहिजे.