Tuesday, November 20, 2007

भाजीत गोम आणि साप

खरंतर मला हे लिहायला खूप उशीर झाला आहे. नंदन ने सुरू केलेल्या "जे जे उत्तम ते" प्रकल्पात विद्या ने मला टॅग केलं पन तेव्हा काहि ना काही कारणाने लिहिणं जमलं नाही. आता लिहित आहे.

--------------------------------------------------------
"माझी जन्मठेप" या पुस्तकातून हा उतारा घेतला आहे. या पुस्तकातला असा एखादा उतारा निवडणं अवघड आहे. सगळच्या सगळं पुस्तक, शब्दनशब्द हेलावून टाकणारा, उर्जा, स्फूर्ती देणारा आहे.
अंदमान जेल मधल्या प्राथमिक हाल अपेष्टांचे हा उतारा प्रतिनीधी आहे असे म्हणायला हरकत नाही.

---------------------------------------------------------
भाजीत गोम आणि साप

अंदमान मध्ये एक भयंकार जातीची गोम आहे हे आम्ही मागे सांगितलेच आहे. त्या गोमीची लांबी दिड फूट असून विष जाज्वल्य असते. सकाळी बंदिवानांची एक टोळी बंदिगृहाकरिता भाजी आणण्यासाठी धाडण्यात येई. रानात आणि मार्गात ओसाड जागेत त्या देशात अळू यथेच्छ उगवते. त्यातच काही पालेभाज्याही उगवतात. ती टोळी हातात मोठेमोठे विळे घेऊन ही बेटेच्या बेटे सरसहा कापीत जाई व त्या कापलेल्या पाल्याचे ढीगचे ढीग रचून मग ते गाडीत भरून बंदिगृहात धाडण्यात येत.तेच मोठ्मोठ्या जुड्या करून दोन चार विळीवर घाव मारून त्या भाजीच्या प्रचंड डेगेत टाकण्यात येत आणि उबाळले जात. बंदिवानांची भाजी शिजवण्याचा बहुधा हा प्रकार असे. अशा चालढकलीत इतका निष्काळजीपणा केला जाई कि केव्हा केव्हा या भाजीच्या पाल्याच्या ढिगात मोठाल्या गोमी आणि सर्पहि त्या डेगेत शिजले जात! अर्धी-कच्ची ती भाजी तेव्हा वाढण्यात येई तेव्हा तेही सपासप वाढले जात. खाताना भाजीतले पान म्हणून उचलावे तो गोम हाती येई! परंतु अंदमानातील ही सापाची आणि गोमीची भाजी हा जरी एक आश्चर्यकारक मेवा होताच त्याहून आश्चर्यकारक मेवा म्हटला म्हणजे त्या प्रकारच्या भाजीत बारीसाहेबांच्या श्ब्दाचा आणि समर्थनाचा जो मसाला पडे तो! आम्ही एकट्यानेच नव्हे तर आणखीहि बऱ्याच राजबंद्यांनी ह्या गोमी भाजीतून काढून दाखविल्या आहेत. आणि लगेच बारीसाहेबापर्यंत जाऊ नये म्हणून प्रतिवाधी केले आहेत. परंतु त्या निर्ढावलेल्या अधिकाऱ्याने हसून उत्तरे द्यावी "ऒ! इट टेस्टस वेरी वेल!" सुपरीटेंडंट पर्यंत कागाळ्या केल्या तरी तेही होस हो करून निघून जात! निरूपायाने गोम किंवा सापाचा तुकडा फेकून देऊन बंदीवानांनी ती भाजी तशीच खावी. नाहितर खावे कशाशी? आणि खाल्ले नाहीतर कामात थोडीच सूट मिळणार! ते काबाडकष्टी काम करावे कशाचे बळावर? हा पेच बारीस माहित असेल म्हणून तो कोणीही अधिकारी तिकडे फारसे लक्ष देत नसत. केव्हा केव्हा माझ्या आणि माझ्या इतर राजबंदिंच्या प्रतिवादाचा परिणाम होऊन बारीस थोडाफार ठपका मिळत असे. अशा वेळेपैकीच एका वेळेस ह्या गोमीच्या प्रकारावरून बारी मला शांतविण्यासाठी गोंजारीत म्हणाले होते "अहो सावरकर! ह्या बदमाष लोकांचा विचार सोडून द्या. तुमची समाजातील उच्च प्रतीची स्थिती मला माहित आहे. हे पहा मी तुम्हाला एकट्याला पाहिजे तर भाजी करवून देतो. पण तुम्ही ह्या सर्व बंदिवानांसमक्ष अन्नाबिनातील न्यूने उघडकिस आणू नका. ती गुरे आहेत!पाहता पाह्ता ते माझ्या डोक्यावर चढतील. आजवर अशा शेकडो गोमी ह्या लोकांनी गुप्चूप फेकून देऊन भाजी खाल्लेली आहे. पण त्यातला कोणी मेलेला नाही!"
एकूण अशी विषारी भाजी खाऊन बंदिवान मेले; कि मग ती सुधारण्याची योन्य वेळ येईल अशी बारीसाहेबांची समजून होती

Friday, November 09, 2007

मॅच

हितगुज दिवाळी अंक २००७ साठी मी हि कथा पाठवली होती. ती इथे प्रकशित झाली आहे - मॅच

मॅच
"पव्या, बोल हेड की टेल?"

माझा चुलतभाऊ मंदार सोफ्यावर रेलून बसत चिडवण्याच्या सुरात म्हणाला. मंदार माझा नात्याने चुलतभाऊ, पण तसा मित्रच.... केवळ दहा महिन्यांनी लहान. त्यामुळे लहानपणापासून एकत्रच उंडारलो होतो.... अगदी चड्डी न घालता येण्याच्या वयापासून, सेडान कार मध्ये कोणाला फिरवावं या आणि अशा सगळ्या मित्र मैत्रिणी आम्ही शेअर केलेल्या. त्यात पठ्ठयाला चुकून एक सुंदर मुलगी पटली होती आणि तिला ’अक्कल’ जरा कमी असल्याने ती मंद्याशी लग्नाला तयार झाली होती. अशी देवाची कृपा माझ्यावर कधी होते हे बघण्यात कॉलेजची सहा नि नोकरीतली चार वर्षे गेली आणि मग अस्मादिकांनी 'अरेंज्ड मॅरेज' करण्याची मनाची तयारी केली. तर आजचा हा माझा चौथा कांदापोहे कार्यक्रम!! दर वेळी कार्यक्रम झाल्यावर माझी ’खेचायला’ येणारा मंद्या आज आधीच येऊन माझी ’खेचत’ बसला होता.

"काय हेड की टेल? तू ये एकदा..मग कळेल"
"वैतागतो काय यार? बरं..सांग दिल कि दिमाग??"मंद्याची टकळी चालूच होती.
"दोन्ही"
"टॉस केल्यावर एकच काहीतरी मिळतं"
"गधड्या, ही काय मॅच आहे...टॉस करायला???"
"मग काय आहे?? सांग दिल की दिमाग?"
"जाऊन आल्यावर सांगतोssss..." असं म्हणत मी गाडी चालू केली. सोबत आई बाबा होतेच. मंद्याचं शेवटचं वाक्य आठवून मला जाम हसू येत होतं ...

"लग्न म्हणजे मॅच नाहीतर काय आहे?" या मॅच मधले प्रमुख खेळाडू दोन...मी- पव्या उर्फ प्रवीण आणि ती (ठरली की नाव सांगतोच) !!! तर एक खेळाडू दुसर्‍या खेळाडूला भेटायला चालला आहे. आजचा प्राथमिक सिलेक्शनचा राऊंड. इकडून सिलेक्टर्स मी आणि आई..तर तिकडून ती आणि तिची आई. दोन्हीकडचे बाबा न्यूट्रल!!! बरोबर आहे... अध्यक्ष असाच हवा!

मी तसा बर्‍यापैकी अनुभवी खेळाडू म्हटलं तरी हरकत नाही. दोन वेळा भोपळे आणि तीन वेळा मॅच कॅन्सल!!! पण माझा टीम मधला सहभाग, अस्तित्व महत्त्वाचं... काय?? दोन वेळा भोपळे म्हणजे मी एकदा इंजिनीयरिंगच्या दुसर्‍या वर्षाला असताना एकीला आडूनआडून प्रपोज केलं होतं. अपयशी झालो. आणि त्यानंतर पहिल्या नोकरीत एक आवडू लागली हे ज्या क्षणी कळलं त्याच्या पुढच्याच आठवड्यात तिने साखरपुड्याचे पेढे हातावर ठेवले!! पुढे तीन वेळा मॅच कॅन्सल म्हणजे ’लग्नासाठी’ मुली बघायला लागलो तेव्हा प्राथमिक फेरीनंतर ’पिच रिपोर्ट’, ’ढगाळ हवामान’ वगैरे कारणं देऊन मी ती कॅन्सल केलेली. आजची ’ती’ कितपत अनुभवी आहे माहीत नाही.

दोन खेळाडू भेटले....गप्पा, चहा वगैरे झालं. दोन्ही खेळाडूंनी ’होम पिच’ (त्यांची बाग) वर पाय मोकळे केले. एकमेकांची ’स्टाईल’ जाणून घेतली. ती ’स्टाईल’ आपल्या ’स्टाईल’ शी कितपत जुळते वगैरे काही कंपॅटॅबिलिटी टेस्ट झाल्या. मी तिचा एकूण टीमस्पिरीट आजमावला. माझ्या (घरच्या) टीम मध्ये कशी वाटेल वगैरे. शेवटी ’होम पिच’ वरच्या बॅडलाईटमुळे (तिन्हीसांज) खेळाडू परतले. आणि परत गाडी सुरू करून घरी!

मला यावेळी का कोणास ठाऊक, पण ही मॅच होऊनच जाऊ देत असं वाटलं. ’पिच रिपोर्ट’, ’ढगाळ हवामान’, ’बॅड लाईट’ अशा काहीही सबबी आठवल्या नाहीत. (विनाशकाले विपरीत बुद्धी ते हेच वाटतं). उतावीळ मंद्याचा रात्री फोन आलाच...
"काय रे कशी आहे?"
"चांगली आहे..."
"बस क्या!! मुझे शेंडी?? काकू सांगत होती की तू एकदम गाणं वगैरे गुणगुणत आहेस म्हणून"
"काहीही........ आणि बाय द वे, तिला दिल, दिमाग दोन्ही आहे"
"ओह हो.....पण पहिल्या भेटीत तू दिमागवाल्या गोष्टी करत होतास? हरी ओंम!!! पव्या....म्हणून तुला मुलगी पटली नाही बघ" हा मंद्याचा आगऊपणा.
"ही पटणार गड्या...बघ.."
'सुंदरा मनामध्ये भरली' अशी काहीशी माझी अवस्था. आई-बाबांना पण ती पसंत. चला...इकडे सिलेक्शन टीम आणि अध्यक्ष यांचा होकार आला. फोनवर बोलणं झालं नि तिकडून पण अपेक्षित होकार आला. अशा रितीने दोन खेळाडूंची टीम तयार झाली. तिचं नाव ’दिशा’. (माझी दशा नाही केली म्हणजे मिळवलं)

आता मॅच साठी महत्त्वाची म्हणजे खेळाडूंची मानसिक एकात्मता आणि तयारी. त्यासाठी वारंवार भेटणे चालू झाले. अधून मधून मग तिचे नातेवाईक, कधी माझेपण आमची तयारी (??) बघायला म्हणून भेटत असत. वर परत ’हे दिवस एंजॉय करा, नंतर आहेच’ हे असलं कोचसारखं सूचना करणं होतंच!

बाकी आमचं ट्युनिंग चांगलं जमत होतं. सुरूवातीची एकदम अबोल, लाजरी दिशा हळूहळू खुलत चालली होती. मॅचचा आनंद घेण्याच्या दृष्टीने हे फारच महत्त्वाचं होतं. माझ्या काहीकाही स्ट्रॅटेजीजवर ती जाम लाजायची. आणि तसं झालं की मी पार पाघळायचो. तिला मी पहिलं गिफ्ट दिलं तेव्हाचा तिचा चेहरा.....अगदी कपिल देवने १९८३ मध्ये वर्ल्डकप जिंकल्यावर जसा होता तस्साच!!! ती खूप हळवी आहे....एकदा मी तिला विचारलं की माझ्यात असं काय बघितलंस आणि हो म्हणालीस? तर ती म्हणे "पहिल्याच दिवशी भेटलो...तेव्हा बागेत चालताना तू एकदाही मला सोडून पुढे गेला नाहीस. मी चहाचा घोट घेईपर्यंत तू थांबला होतास. जाताना माझ्याकडे बघून, हसून बाय केलास. तुझा हा केअरिंग स्वभाव आवडला." विचारलेल्या सराव प्रश्नाला दिशाने जबरी षटकार लगावून दिला होता. आणि त्या षटकारातला जणू मी बॉल आहे असं मला हवेत तरंगायला झालं होतं.

असं सगळं चालू असतानाच सिलेक्टर्सपासून प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांच्या मनात आमचा एक सराव सामना व्हावा असं ठरलं आणि आम्ही साखरपुड्याच्या तयारीला लागलो. सराव सामना त्यामुळे प्रेक्षक १०० वगैरेच..... शिवाय दिवसभराची मॅच चार तासात उरकली. सराव सामन्यात बराच गोंधळ लक्षात आला होता..जसं फोटोग्राफर दुसरा बघायला हवा.... हॉल जरा जास्त हवेशीर असावा. तिचा आणि माझ्या कपड्यांचा रंग साधारण साजेसा असावा (हे अर्थात तिकडचं म्हणणं). साखरपुड्याला तिची साडी मेंदी कलरची नि माझा शर्ट आकाशी...... म्हणजे जमीन-आसमानाचा फ़रक झाला होता. तर हे सगळं टाळायचं होतं. आता इतकं सगळं चालूच होतं तर एक-दोन वेळा मी पण संधी साधून ’तोंडओळख’ करून घेतली.

या मॅच मध्ये एक्स्ट्रा प्लेयर नसल्याने (आम्हाला नको पण होते!!!) फिटनेस महत्वाचा होता. म्हणून मग केळवणावर बंधने! मॅच मध्ये तिच्या दिसण्याला ’अति’ महत्त्व म्हणून मग एक महिना आधीपासून ब्यूटीपार्लर वगैरे. माझं काहीच नाही.....मी फक्त एक नवीन शेव्हींगकीट आणलं. साला आमच्याकडे बघतोच कोण! (मनातल्या मनात ’भोपळा' वाल्या दोघी डोकावून गेल्या). मॅचचा दिवस जवळ आला तशी धडधड वाढली..

ही पहिली नि शेवटची मॅच!!! हीच इनिंग कायम जपायची. आयला...मला कमिटमेंट फोबिया होतोय का??? छे छे!!! आय ऍम ऑलरेडी कमिटेड. मग कसलं टेन्शन??? तर....तेच तेव्हढं सांगता येत नाही बघा. तुम्हालाही अनुभव असेलच. जवळ जवळ ६००-७०० प्रेक्षक नक्की झाले. गुरूजीच्या नावाखाली अंपायर ठरला. मॅचच्या दिवशीचा मेनू ठरला. आणि तो दिवस आला.

गेले दोन दिवस मी आणि तिने एकमेकांना भेटलो नव्हतो. त्यामुळे एकत्र ज्यांना खेळायचं आहे त्यांनाच मनाचा अंदाज घेता येत नव्हता. एव्हाना मंद्याच्या लग्नाला दोन महिने झाले होते...त्यामुळे तो आपली काही खास मतं, ’टिप्पण्ण्या' देत होता. बहिणाबाईंचे काही फुकट सल्ले चालू होते....असा उभा रहा, तसा हास वगैरे. मला ऐन डिसेंबर मध्ये घाम फुटतो की काय असं झालं होतं. मॅच सुरू व्हायची वेळ अगदी दहा मिनिटांवर आली.

ग्राऊंडवर आधी मी उतरलो. सासूबाईंनी माझं अगदी औक्षण वगैरे करून स्वागत केलं... मी मनात म्हटलं ’अहो तुमच्या मुलीशी संसार हा काय युद्धाइतका भयंकर असणार आहे का?’ पण त्याक्षणी काहीही न बोलता सगळं करायचं असा मंद्याचा एक सल्ला आठवला. दोनच मिनिटात दिशा आली. आपुन खल्लास!!! ती ज ब री दिसत होती. म्हणजे कॉलेज मध्ये असताना मी आणि मंद्याने अनेक वेळा टप्पे टाकण्याचा प्रयत्न केलेल्या त्या ’शीतल’ पेक्षा उच्च दिसत होती. हे मंद्याला सांगायला म्हणून मागे वळलो तर तो कोपर्‍यात हातात डीजीकॅम नाचवत त्याच्या बायको शेजारी उभा होता. मनात आलं, आता इथून पुढे दिशा बद्दलचे असे सगळे हळवे, नाजूक क्षण फक्त माझे आहेत. ते मी अगदी मंद्याबरोबर पण शेअर नाही करणार. गुदगुल्या झाल्या.

मॅचच्या आधी जसे दोन्ही देशांचे राष्ट्रगीत असते त्याच धरतीवर इकडे गुरूजींनी दोन, मग तिच्या आत्याने एक, माझ्या मावशीने एक वगैरे मंगलाष्टके म्हणली (गायली म्हणणं चुकीचंच ठरेल). दर तीस सेकंदांनी अंगावर येणार्‍या अक्षता मानेवर अडकून टोचू लागल्या होत्या.... आणि अंतरपाट खाली आला. दिशाने मला हार घातला नि मी तिला..... अंपायरने 'मॅच सुरू करा'' असा इशारा दिला नि आमच्या मॅचचा पहिला बॉल पडला!

आम्ही दोघेही एकमेकांना ’मॅच’ असल्यामुळेच ही ’मॅच’ सुरू होऊ शकली. आमची ही मॅच ऊन, वारा, पाऊस या सगळ्यात अशीच चालू राहू दे, सिलेक्टर्सपासून प्रेक्षकांपर्यंत आम्हाला सगळ्यांचा प्रतिसाद, पाठींबा मिळू दे. जमेल आणि शक्य असेल तेव्हा चौकार, षटकार मारायला मिळू देत. दोघांचीही इनिंग रंगतदार, बहारदार व्हावी. कर्तव्य नीट पार पाडून देवाने आम्हाला आऊट करावं....आणि मागे राहिलेल्याला ताकदीनं उभं राहायचं बळ त्याने द्यावं.

तर मंडळी....मॅच आता सुरू झालेली आहे... जेवण करून जायचं. आणि मॅच संपेपर्यंत अशीच साथ द्यायची. कसं आहे... प्रेक्षकांशिवाय काही मजाच नाही ना कशाची!!!

Friday, November 02, 2007

आठवणीतली दिवाळी...

"झाली का दिवाळीची खरेदी?" मी चॅट वर एका मैत्रीणीला विचारत होते.
"नाही अगं अजून. पिल्लूची झाली." ती
"तुझी कधी?? काय घेणार आहेस?" परत मी
"अगं, बहुतेक काहिच नाही... काय घेणार? सगळं भरपूर आहे :)"
"डोकं, अक्कल कुठे मिळतंय का बघ. तेच कमी आहे तुझ्यात " माझा आगाऊपणा.
"हाहाहा....." जणू तिची याला पूर्ण मान्यता आहे.

सध्या ऑफिस, घर सगळीकडे एकच विषय आहे...दिवाळी!!! रस्त्यावरून जाता-येता दिवाळी मूड अगदी जाणवतो. रंगीबेरंगी आकाशकंदिल, पणत्या, लाईट्च्या माळा....सगळा गजबजाट! सगळी दुकाने लख्ख सजवलेली.... लोकांची खरेदीसाठी गर्दी. गेले कित्येक वर्ष, किंबहुना प्रत्येकच वर्षी हे अनुभवलंय. या आनंदोत्सवाला गणेशोत्सवाने सुरूवात होते आणि दिवाळीला उधाण येते. ’दसरा-दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ हे अगदी खरंय :)

पण गणपती, दिवाळी...खरं तर कुठल्याही सणाची जास्त मजा असते ती वयाच्या १५-१६ वर्षापर्यंत!!! पूर्ण निष्काळजी जीवन.... परिस्थितीची कमी जाणीव यामुळेच कदाचित निर्भेळ आनंद घेता येतो त्या वयात. कोणाशी तुलना करावी इतकं मोठं ना विश्व असतं ना तेवढा (अति) शहाणपणा असतो. अगदी ’विचार करण” म्हणजे सुद्धा ’स्वप्न बघण’ असतं तेव्हा!!! मला तर अजूनहि माझ्या त्या वयापर्यंतचीच दिवाळी जास्त आवडते.... दिवाळी म्हणलं कि मस्त ३ आठवडे सुट्टी, उन्हाळा नसल्याने अगदी भर दुपारी देखील बाहेर उंडारण्याची आईकडून मिळणारी मोकळीक, सहकुटुंब एकत्र कपडे खरेदी, बाबांनी आणलेले खूप सारे फटाके, आईने केलेले मस्त फ़राळाचे पदार्थ...वा!!!! नुसती ऐश, दंगा-मस्ती!!

सहामाही/ वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लागले कि मला आनंद व्हायचा. का? तर अभ्यास झालाय आणि कधी एकदा पेपर लिहिन म्हणून नाही तर त्यानंतर मोठी सुट्टी आणि त्यात करायच्या गंमतीच्या विचारानी :) मग परीक्षा सुरू झाली जस जसा एक एक पेपर होईल तसतसं मी आई-बाबांना दिवाळीत काय करायचं हे विचारून आणि सांगून वेडं करायचे. सुट्टीतला अगदी ठरलेला कार्यक्रम म्हणजे सकाळी ८-८.३० नंतर उठणे! सुट्टीत मी दूध पिणार नाही, मला चहाच हवा असा मग आईकडे हट्ट :) बाबांना बोनस मिळायचा आणि मग आमची मस्त कपडे खरेदी व्हायची. पण हे बोनस प्रकरण मला फ़ार नंतर कळलं.... माझी आई मला कपडे कधी घ्यायचे ते इतकं बेमालूमपणे समजावून सांगायची कि माझी अगदी खात्री असायची आई म्हणते तेव्हाच बाजारात छान छान कपडे येतात आणि तेव्हाच खरेदी करायची असते. मग ’तो’ खरेदीचा दिवस यायचा...सकाळी लवकर आवरून-जेवून आम्ही खरेदीला बाहेर पडायचो. आई बाबांचे एक ठरलेलं असायचं कि आधी आम्हा भावंडांची खरेदी....मग जे राहिल आणि त्यात जे शक्य असेल ते स्वत:साठी. (त्यांचा हा त्याग कळायला तर मला बरीच वर्ष जावी लागली) खरेदी झाली कि कुठल्यातरी मस्त हॉटेलमध्ये जाऊन तुडुंब पोटोबा व्हायचा. त्यावेळी, म्हणजे अगदी १७-१८ वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये जाणं हि चैन होती. कित्येक वर्ष मी न चुकता मसाला डोसाच खायचे! पंजाबी, पाव-भाजी वगैरे माहितच नव्ह्तं तेव्हा. डोसा, आईस्क्रिम वगैरे खाऊन पोटाने आणि मनाने तृप्तीची ढेकर देत आम्ही घरी यायचो. बाहेर खाल्लं म्हणून घरी काहिच करायचं नाही अशी सवय तेव्हाच्या आयांना नव्हती. (आता माझी पिढी जेव्हा आई झालीये तेव्हा आम्ही घरी खायला सुद्धा बाहेरचे पदार्थे आणतो!) कितीहि पोट भरलेलं असलं तरी थोडा दहिभात खाऊनच मी कित्येकदा झोपलेली आहे. त्याशिवाय सुटका नसायची. तेव्हा त्रास वाटणार्या या आग्रहात किती प्रेम, माया होती हे आज कळतं. काल केलेली कपडे खरेदी आज परत सकाळी, दुपारी काढून बघायची हि सवय तर मला अजूनहि आहे.

आई ची फराळाची तयारी चालू व्हायची..... त्यात मग मी आणि दादा जमेल तितकी लुडबूड करायचो. नुकती भाजलेली गरम गरम भाजणी खाणे हा एकदम चकली खाण्याइतका आवडता प्रकार. रव्याचा गरम लाडू म्हणजे आहा!!!! दिवाळीत माझं अगदी ठरलेलं काम म्हणजे रांगोळी रंग आणणे, ते नीट काढुन ठेवणे आणि रांगोळी साठी एक चौकोन भर काव (गेरू) लावून ठेवणे. एकदा प्रचंड उत्साहाने रांगोळीसाठी एका पेपर ला उदबत्तीने भोकं पाडून ठेवली होती. वाट्लं कि त्याने रांगोळीचे ठिपके नीट एका अंतरावर येतील. पण त्या भोकाटून रांगोळी खाली आलीच नाही :) जाम पोपट!!!! वेळ तर वाया गेलाच शिवाय आईची चिडचिड झाली :(

दिवाळीत मोठ्या माणसांचा अजिबात हस्तक्षेप नसलेला कार्यक्रम म्हणजे किल्ला करणे! एखाद्या सकाळी दादा जाऊन कुठुन तरी माती घेऊन यायचा. मग त्यातले खडे वेगळे काढून टाकायचे. थोडी माती चाळून घ्यायची. गुहा तयार करायला एक डबा, विहिर/ तळं करायला एक हिंगाचा गोल डबा, सिंहासनाची जागा प्लेन होण्यासाठी एक फ़रशीचा तुकडा, ३-४ विटा वगैरे साहित्य आधीपासून च जमवलेलं असायचं. मला आवडायचं ते किल्ल्याच्या पायर्या करायला. गोल गोल फ़िरवत त्या पायर्या वरपर्यंत न्यायच्या.... मग २ बुरूज, भाजीवाली, गवळण यांची जागा...सगळं एकदम ठरलेलं. अगदी जमलंच तर एखादं शेत वगैरे पण! (आता जिम वगैरे पण ठेवावी लागेल :)) सगळं झालं कि मग चाळ्लेल्या मातीने एक फिनिशिंग टच द्यायचा....हळीव पेरायचे कि झालं. मग त्यावर खेळणी मांडायची, पणती लावायची. हरखून जायला व्हायचं. दिवसभर मातीत खेळायला मिळायचं. इतक्या हौसेने केलेला किल्ला नंतर मात्र बॉंब लावून ऊडवून द्यायचा.... आणि वर कोणाचा किल्ला एका बॉंबमध्ये उडाला, कोंणाला २ लागले याचे चर्चा. लहानपण देगा देवा........

बाबांनी कितीहि फटाके आणले तरी सगळ्यात आधी काय तर त्याची सम विभागणी. अगदी लवंगीच्या माळा, पानपट्टी सगळे मोजून वेगळे काढून ठेवायचो. नरक चतुर्दशीला पहिला फटाका कोणाचा याची मित्र मैत्रीणीत स्पर्धा असायची. दादा कधी कधी हातात लवंगी उडवायचा.....ती उडेपर्यंत मी नुसती ओरडत असायचे. दादा मात्र आपण फ़ार शूर असल्याचा आव आणायचा. मन्सोक्त फटाके उडवून झाले कि मग फ़ुसके फटाके शोधायचे आणि दारू करायची :) फटाक्यांचे packing चे प्लास्टिक गोळा करायचा आणि ते जाळून ’शेंबूड शेंबूड’ असा गलका करायचा. प्रचंड धूराची वायर, नागगोळी.....सही असायचं सगळं. आता कितीहि फटाके आणा, ती मजा येतच नाही. ’गेले ते दिन गेले......’

आता दिवाळी म्हणजे चार दिवस वेगळं खायला काय करायचं वगैरे प्लॅन्स असतात. लहानपणी खाण्यात लक्षच नसायचं. आई खेळातून खेचून आणून खायला लावायची. आता तितकं खेळायचं म्हणलं तरी जीवावर येईल.

आता सगळं समीकरणच बदललं. सगळ्यात आधी तर वेळ नाही. आणि आजकाल सगळंच नेहमी मिळतं, आर्थिक परिस्थीती बदलली. जीवनशैली बदलली. सगळीकडेच पैसे जास्त झाले..... मग खरेदी मनात येईल तेव्हा, हॉटेल तर कधीही. माझ्या मैत्रिणीसारखा "काय घेऊ? सगळं आहे" असं असणारे लोक वाढले आहेत. फराळाचं आकर्षण पण संपलं. मुलांना खेळायला जागा नाही, आई कडे वेळ नाही....मग ते जातात ट्रेक ला, शिबिराला वगैरे. दिवाळी येते नि जाते..... पण अजूनहि मनात रेंगाळते आणि अनुभवावीशी वाट्ते ती दहावी-बारावी च्या आधीची दिवाळी!!