Thursday, September 04, 2008

बाप्पा... हसू कि रडू?

बाप्पा...दरवर्षीप्रमाणे ठरल्या वेळेला तुम्ही आलात. फ़ार आनंद वाटला... आज-कालच्या दिवसात दिलेला शब्द आणि ठरलेली वेळ पाळणारे फ़ार थोडे. या पार्श्वभूमीवर नित्यनियमाने एक तुम्ही येता.. तुमसे बढकर कौन? इथे देशात काहीच वेळेवर होईना झालंय.
कॉलेजचा प्रवेश असो, घराचं बांधकाम असो, पाऊस असो कि निवडणूका असोत. सगळ्याचीच वेळ बदलली आहे. ऑगस्ट मध्ये कॉलेज सुरू कि लगेच ऑक्टोबर मध्ये submissions! अधला-मधला वेळ असाच welcome party वगैरे मध्ये गेलेला.... पाऊस पण जून मध्ये दडी मारतो नि आता बघताच आहात कि तुम्ही यायची वेळ झाली तरी कसा बिनदिक्कत बदाबदा कोसळतोय. लोक तर निवडणूक या प्रकाराला इतके सरावले आहेत कि जणू शाळेतल्या वर्गात सेक्रेटरी निवडावा. :( सगळं आबादी आबाद आहे बाप्पा!
आंबेडकरांनी सांगितलं होतं कि सवलतींवर जगू नका, आज इथे सवलतीशिवाय कोणी जगायला नको म्हणतोय. माणसांच्या शरीराची जाडी वाढतेय नि मनं संकुचित होत चालली आहेत. शिक्षणाने लोक उदात्त कमी झाले नि कोते जास्त. पंचविशीतला मुलं सरळ सांगतात कि "माझं आई-बाबांशी पटत नाही", अरे पण हा विचार करायला याला समर्थ कोणी केला? लहानपणी जास्त त्रास देतो म्हणून तुला सोडलं का आई-बाबांनी??
सगळं जीवनच व्यस्त झालंय... पैसे जास्त-वेळ कमी, घर मोठं-माणसं कमी, शरीर मोठं-कपडे कमी, देखावा जास्त-आपलेपणा कमी, झोप जास्त-स्वप्न कमी, नेते जास्त-आदर्श कमी, चोरी जास्त-निर्मिती कमी! चेहरा खराब झाला तर निरनिराळे लेप लावून स्वच्छ करतात..पण आमच्या मनावरच्या जळमटांचं काय? बाप्पा... मनासाठी एखादं parlour काढता येईल का? वयात येणार्या मुला-मुलींना आहार नियमांबरोबर विचार नियम किती जण समजावून देत असतील?
आजच वर्तमानपत्रात तुमचं अगदी वाजत-गाजत स्वागत झाल्याची सचित्र बातमी वाचली.... पण जरा शेजारी नजर जाते तर अमेरिकेने अणुकरारात केलेली दिशाभूल दिसली. विद्यमान सरकारने स्वत:ची तोंड लपवण्यासाठी केलेला विश्वासघात दिसला. एका आडरानात दरोडेखोरांनी महिलांवर केलेला अत्यचार दिसला. "एक लाखात कार" प्रकल्पाच्या अजून नवीन बातम्या वाचल्या. बिहार मधील लोकांचे हाल दिसले... विदर्भात पाणी नाही म्हणून माणूस मरतोय आणि बिहार मध्ये पाणी आलं म्हणून माणूस मरतोय! पाणी म्हणजे जीवन ना रे... मग जीवन सुद्धा अति झालं कि त्रासच होतोय!
तू म्हणशील काय आज वर्षानी आलो तर मला काही माहित नसल्यासारखं सगळं सांगते आहेस. तुलाच सगळं माहित आहे रे... तूच कर्ता आणि करविता! पण सगळंच इतकं दाहक नको ना करूस. माणूस चुकला...चुकतो आहे. पण तू त्याला योग्य त्या मार्गावर लवकरात लवकर आण.
आता म्हणशील इतकं काही वाईत नाहीये ....ते पण खरंच आहे. वर सांगितलेल्या सगळ्या परिस्थीतीतच प्रकाश-मंदा आमटे आहेत, अभिनव बिंद्रा आहे, भारतीय त्रिदल सेना आहे. पण महाभारताप्रमाणेच सुष्ट आणि दुष्ट हे व्यस्त प्रमाणात आहेत. मान्य आहे रे हे सगळं आमच्यामुळेच... पण तू आला आहेस तोवर मन मोकळं करून घेतलं. दहा दिवसात तू बघशीलच सगळं.... मग पुढच्या वर्षी येताना हे कमी करण्याच्या योजना घेऊनच ये. यंदा जाता जाता शक्य तितक्या लोकांना सुष्ट व्हायच्या मार्गावर नेऊन सोड. आणि पुढच्या वर्षी मला "बाप्पा... हसू कि रडू?" असं लिहावंसं न वाटता "बाप्पा... हसूच हसू" असं वाटायला पाहिजे.

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

गणपती बाप्पा मोरया!!!

3 comments:

Monsieur K said...

aalyaa-aalyaa, kiti tension det aahes bappa laa! :)
to saangel-ch "dont worry, be happy!" :)

कोहम said...

Swapneel....

Shailesh said...

माज़ा आणि शाबदांचे फारसे सख्य नाही....त्यामुळे असा काही लेखा पहिला की फार नवल वाटत....
किती छान लिहितेस...कस जमता तुला?
मी तर तुज़ा फॅन होईन बसलो आहे. पण एक तक्रार आहे...तू नियमीत लिहीत नाहीस...

शैलेश देवस्थळी