Tuesday, May 22, 2007

सामान्य पोलीस

त्यादिवशी तारीख होती १४ एप्रिल..डॉ. आंबेडकर जयंती!!! माझा साप्ताहिक सुट्टीचा वार असल्याने काहि रेंगाळ्लेली कामं उरकायचं मी ठरवलं होतं. त्यातलंच एक म्हणजे digicam च्या service center मध्ये जाऊन माझा कॅमेरा परत घेऊन येणं. आता हे service center बाजीराव रोडला आहे...तिकदे आज जाऊ नये असले मौलिक विचार मला त्यादिवशी सुचले नाहित.
वेळ साधारण संध्याकाळी ६.३० ची असेल. मुख्य रस्त्यावर पार्किंग मिळेल न मिळेल म्हणून मी एका गल्लीत गाडी लावून बाजीरव रोड ला आले. पाहाते तर एक बरीच मोठी मिरवणूक....एका ट्रक्वर स्पीकरची भिंत, कुठलंस असंबद्ध गाणं....भारताचा नकाशा, डॉ. आंबेडकरांचा पुतळा, त्याला हार.......मिरवणूकित साधारण ३००-३५० लोक सामील...त्यातले पन्नास एक जण विचित्र अंगविक्षेप करत स्नायू मोकळे करत होते. दया आली मला......माझी, माझ्या देशाची. खुद्द डॉ. आंबेडकर जरी आज आले तरी त्यांना काहिसं असंच वाटेल. विचार आणि त्यानुसार आचार हा क्रम आणि शक्तीच आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर गमावून बसलो कि काय? मला रस्ता ओलांडायचा होता, पण मिरवणूकिमुळे थोडा वेळ थांबावं लागलं. त्या लोकांबरोबर असलेली ८-१० पोलीसांची फौज मात्र कधी नाचणाऱ्याला आत ढकल, कधी गाड्यांना रस्ता मोकळा करून दे, कधी माझ्यासारखीला "ताई, जरा थांबा" असं सांगणे आणि इतर बऱ्याच गोष्टी करत होते.
कमाल वाटली ती त्या ८-१० पोलीसांची..... त्यांच्यापैकी कोणीच उच्च अधिकारी नसावेत. म्हणजे ते सगळे हुकुमाचे ताबेदार होते. या अशा मिरवणूका पुण्याला नवीन नाहीत. या मिरवणूकांना कुठलंहि सामाजिक, राजकिय कारण पुरे!!! शिवाय दरवर्षी मॅरेथॉन, दोन पालख्या, गणपती हे तर वेगळंच.... कारण काहिहि असो, अशी काहि समाजसमूहाच्या गोष्टी म्हणजे या पोलिसांच्या सहनशीलतेचा अंत असावा!!! गणपती.....मराठी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. एक दिवस तरी घरी राहून बाप्पाचा आशिर्वाद घ्यावासा सगळ्यांनाच वाटत असणार...अगदी नाहीच जमलं तर निदान अनंत चतुर्दशी ला तरी. पण पोलिसाला कसं शक्य आहे ते? मंजूर झालेली रजा जिथे अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रद्द होऊ शकते तिथे नियोजीत वेळी रजा कुठून मिळणार??? घरच्यांचा रोष ओढवत असेल कि.... शिवाय मिरवणूक, मोर्चा म्हणलं कि ते संपेपर्यंत उभी ड्य़ुटी!!! जनतेला शक्य तितक्या सबुरीने आवरायचं...धिंगाणा करणाऱ्यांना सरळ करायचं. पालखी आली, विसर्जन मिरवणूकित गणपती आला कि सगळे लोक दर्शन घेऊन नमस्कार करायला पुढे धावतात....अशावेळी यातल्या किती पोलीसांना देवदर्शन, नमस्कार वगैरे त्याक्षणी शक्य होतं माहित नाही. आपण जरी बाप्पाला "पुढच्या वर्षी लवकर या" म्हणत असू तरी हे पोलीस कदाचित "लवकर निघा, सावकाश जा आणि वेळेत पोहोचा" असं काहिसं बाप्पाला सांगत असावेत. दिवसभर ढोल ताशाने बधिर झालेले कान, गर्दी रेटता रेटता घामेजलेलं शरीर......१०-१२ तास उभं राहून गेलेले पाय या अवस्थेत माणूस यापलिकडे अजून काय भक्ती करू शकतो?
इतर कोणीहि नोकरदार माणूस इतकि सामाजिक उपेक्षा सहन करत नसेल जितके हे पोलीस करतात. तुम्ही काम करा वा न करा.....टिका हि ठरलेली. अगदी कॉलेज जाणारी विशीची मुलं पण हे कसे चुकतात आणि त्यांच्यामुळे किती त्रास होतो यावर तावातावाने बोलतील. तुम्ही-मी कोण अशी उपेक्षा इतक्या दिर्घ काळ सहन करू शकेल? जनतेचा राग पण चुकिचा असतो असं माझं म्हणणं नाहिये...पण त्या सगळ्याला हे कनिष्ठ (हुद्द्द्यच्या उतरंडीनुसार) अधिकारी कितपत जबाबदार असतात??? ९५% वेळा यांना केवळ काम बजावले जाते....ते कुठल्या पद्धतीने करावे, कोणी करावे याबाबतीत यांना सहभागी करून घेतलंच जात नाही. आणि बहुतेक वेळा अंमलबजावणीपेक्षा मूळ निर्णयच चुकिचा असतो......पण ज्याचा पूर्ण रोष निर्णय अमलात आणणार्या कनिष्ठ वर्गावर काढला जातो. हे पोलीस म्हणजे काय 'पब्लिक ने ओलीस’ ठेवण्यासाठीच पोलीसखात्यात भरती होतात का?
आज कुठल्याहि क्षेत्रात महिला आणि पुरूष वर्गासाठी वेगळी स्वच्छतागृहे असतात... पोलीसखात्यात या गोष्टीसाठी मागणी करावी लागली होती. हे किती जणांना माहित आहे? ते आमच्या सेवेसाठी आहेत, पण आम्ही त्यांचा किती आदर..आदर जाऊ दे, त्यांना किती सहकार्य करतो??? पोलीसखातं म्हणजे एकदम महान, कार्यदक्ष आहे असं मला अजिबात म्हणायचं नाहिये...पण उठसूठ त्यांच्याबद्दल अनास्था बाळगणं कितपत योग्य आहे?
एका देशासाठी सैनिकवर्ग जितका महत्त्वाचा आणि अभिमानाची बाब आहे तितकाच पोलीसवर्ग पण नाही का? खरंतर पोलीस हे शहर, गाव यांच्या वेशीतले सैनिकच ना!!! चित्रपटात पण सैनिकांवर गाणी आहे....पोलीस तिथेहि उपेक्षितच!!!
निर्णयक्षमता आणि अधिकार असणारे लोक हे खरे या खात्यातील बेजबाबदार लोक आहेत......शहर वाहतूक, कायदाव्यवस्था यासाठी ठळक नियोजन लागतं. तेच नसेल तर कनिष्ठ वर्गाला वेठीस धरून काय उपयोग? तुमचे IAS सारखे अधिकारीच अकार्यक्षम असतील तर मग सामान्य पोलीस...जो दिलेलं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि करूनहि रोषाला सामोरा जातो...त्याच्यावर आगपाखड करणं बंद झालं पाहिजे.

2 comments:

Vidya Bhutkar said...

Sakalich tujha blog vachla pan reply karayla jamala nahi. Tujhe vichar patale, rather asach malahi vatala hota. Maajhe ek kaka dar veli ganapati chya veli busy asatat. tyana nemake festival la security mule jast kaam asata. :-( I remembered that while reading ur post.
Btw, hope ur new job is going well. :-) All the best.
-Vidya

Anonymous said...

Mi tuzya vicharanshi jara asahmat aahe...Police khatya baddalacha experience khup kadawat asato..changalya manasachi himmat hot nahi kuthalya gostisathi police chowki var janyachi..mazya mitrachi gadi chorila geli..to police complaint karayala gela tar complaint sudhaa lihili nahi manale..ki tuch chorali swatah ani insurance sathi try karat aahes..ase kityek experience sangtat ki Gund parawadale polisanpleksha..te gund asatat manun gundache waaikt kame kartat..polisanbaddal kay bolawe..