Tuesday, April 21, 2009

झोपी गेलेला...........

"काय करणार weekend ला?" मी काल एका मित्राला विचारलं
"काही नाही गं. झोपणार आहे :)" तो तसा प्रामाणिक च!
"हम्म, बरोबर आहे. office ची सवय अशी घरी मोडवत नसेल."
"अगदी अगदी.... घरी ८ तास, बस मधले २ तास आणि office मधले ४-५ तास..इतकी झोप हवीच ना. शिवाय IT मध्ये सध्या recession मुळे किती ते tension. त्यामुळे तर झोपेची गरज वाढलीच आहे. लोकांची tension मुळे भूक वाढते ना, तशी माझी झोप वाढलीये बघ :)"

लहानपणा पासून एकमेकांना खेचण्याची कला आम्ही अगदी मनापासून जोपासली आहे. आणि आमचा ग्रुप म्हणजे अगदी कुंभकर्णाचे वंशज. तो निदान ६ महिने तरी जागा असायचा (म्हणे)..पण आम्ही तर अगदी निद्रादेवीचे प्रामाणिक भक्त! तिला कधी नाही म्हणायचं नाही.."आलीस? ये...आल्यासारखी आता जरा शेजारी पण जाऊन ये...आणि ८-१० तास थांबच कशी!!!" वगैरे आमचे नि तिचे संवाद.

लहान असताना एक नरक चतुर्दशी सोडली तर मी कधी घड्याळात सकाळचे ५ बघितले नव्हते. ट्रिप वगैरे असेल तरी जास्तीत जास्त उशिरा ऊठायचं नी पटापट आवरायचं, हे ठरलेलं. आणि देव तारी त्याला कोण मारी? पूर्ण शालेय जीवनात माझी फ़क्त ३ च वर्ष सकाळची शाळा होती. प्राथमिक पर्यंत तर मी ९:३० पर्यंत वगैरे झोपायचे...आईने मग ब्रश, आंघोळीचं पाणी सगळं तयार ठेवून मला उठवायचं, दणादण आवरून मी शाळेत परत वेळेत हजर! एकदा ऊठलं कि गाडी जोरात, पण एकदा झोपलं कि मग ज्याचं नाव ते.

"झोप म्हणजे झोप म्हणजे झोप असते, तुमची आमची ती मुळीच सेम नसते" :) तुम्ही घरी झोपलेले आहात आणि बाहेर गेलेले आई बाबा दार वाजवून थकले...इतके कि त्यांनी घरावर दगड फेकून मारावे असं झालंय? बरं, आता त्या दगडाचा आवाज ऐकून झोपेतून बळंच ऊठून दाराऐवजी बाल्कनीचं दार उघडलं असं कधी झालंय?? झोपेचा वारसा आमचा वडिलोपार्जित आहे... माझी आजी झोपाळू. तिला त्या वेळच्या जीवनपद्धतीनुसार बरंच काम करावं लागायचं, पण ती झोप वगैरे कायम तब्येतीत काढायची. मग आमचे बाबा... कोयनेचा भूकंप पुण्यात बराच जाणवला... बाबा त्यावेळी घरात झोपले होते...आणि शेजार्यांनी येऊन ऊठवे पर्यंत बाबांना काहीही पत्ता नव्हता.माझी आत्येबहीण जे.जे ला MBBS करत होती... रात्री जागून परत पहाटे उठून अभ्यास. मग असंच एकदा २ ल झोपून परत ४:३० चा गजर लावून झोपली. २.३० तास पटकन गेले...आणि गजर झाला. इतकी साखरझोप या घड्याळाने मोडली...झालं...झोपेतच ते उचलून तिने खिडकी बाहेर फेकून दिलं. hostel चा watchman वेडाच व्हायचा बाकी राहिला असणार :) तिचाच अजून एक किस्सा.. मुंबई हून रत्नागिरीची गाडी...गाडी पहाटे रत्नागिरीला पोचली, हिने सवयीप्रमाणे ताणून दिली होती. कंडक्टर ने उठवलं..
"ताई, रत्नागिरी आलं"
"५ च मिनिटं झोपू दे" ही अजून झोपेतच :)
परत ५ मिनिटानी "ताई, ऊठा आता... गाडी आत मध्ये लावायची आहे."
"५ मिनिटं झोपू दे ना पण!!!"
"मग झोपा आणि चला परत मुंबईला"
मग एकदम खाडकन उठली. आता तीच ताई सलग ३२-३४ तास काम करते. पण आमचा कोणाचाच प्रश्न जागाण्याचा नाहीच आहे. एकदा झोपलो कि मग मात्र ऊठवणे हा एक project आहे!

माझा दादा :) बाबा त्याला रोज सकाळी ऊठवायचे..संस्कृतचं पाठांतर कर म्हणून... बाबा ६ ला ऊठवायला लागायचे, दादा दर वेळी ५-५ मिनिट्म करून ३०-४० मिनिटं झोपून घ्यायचा. एकदा तर "बाबा, ५ च मिनिटं.. स्वप्न पडतंय" असं म्हणाला होता. बाबांना हसावं कि रागवावं कळ्लं नसणार त्यावेळी. हाच दादा अगदी पेपरला जाताना पण १० मिनिटं झोप काढूनच जायचा..वर तसं केलं तर पेपर बरा जातो हे logic! आईच्या सहनशक्तीचा अगदी अंत पाहिला आमच्या झोपेने. मी तर अजूनही २ मिनिटं आहेत असं बघूनहि परत झोपू शकते. झोपायला (अति) जास्त मिळावं म्हणून मी बाकिचं भराभर आवरायला शिकले...म्हणजे उठले सगळं आवरून मी ३०-३५ मिनिटात बाहेर पडू शकते..आणि याचा onsite ला फ़ार फ़यदा झाला :)

कॉलेग मध्ये चष्मा असलेल्या लोकांचं बरं असं वाटायचं. टयुबचा प्रकाश पडला कि डोळे बंद काय उघडे काय काही कळत नाही. असंच एकाला सरांनी खडू मारून दचकवलं होतं. कंपनीच्या बस मध्ये लोक जबरी मस्त झोपतात.. विप्रो मधला एक almost पडायचा बाकी राहिला होता. मी एकदा बस मध्ये ताणून दिल्याने २-३ stop पुढे उतरले आहे. मग झोप आली कि आता मोबाईल वर गजर लावूनच झोपते. परत earphone, vibrator सगळं चालू ठेवायचं! आत्ताच्या ऑफिस मध्ये एक tester कोपर्यातल्या cubicle मध्ये झोपायचा.. मला जाम हेवा वाटायचा त्याचा. पण मग पुढे त्याच्या manager ने त्याला एकदम highway cubicle मध्येच बसवला. त्यानंतर त्याचं वजन २ महिन्यात ४ किलो ने कमी झालं असं आम्ही त्याला चिडवतो :)

कित्ती प्रयत्न केला तरी मला अजून सकाळी लवकर ऊठायची सवय लागलेली नाही. आई कडून सगळ्यात जास्त मी या बाबतीत रागावून घेतलं असेल... हल्ली तिला रात्री झोप उशीरा लागते म्हणून मग सकाळी जाग येत नाही, तर मी ऊठल्यावर का ऊठवलं नाही म्हणून परत माझ्याच वर चिडते. :) पण मला झोपायला आवडतं त्यामुळे असं छान झोपणार्याला मी सहसा ऊठवत पण नाही. झोप म्हणजे सुख असतं... ते जग तुमचं असतं...तुम्ही वाटेल ती स्वप्न त्या जगात बघू शकता. सुदैवाने झोप उडावी असं भयंकर भीतीदायक किंवा तरल आल्हाददायक दोन्ही कधी फारसं कधी झालं नाहीये... म्हणजे भयंकर भीतीदायक कोणाच्याच बाबतीत नको म्हणा...आणि ठराविक तरल आल्हाददायक चालेल... म्हणजे झोप नाही तर निदान साखरझोप तरी मिळते. :)

अन्न हे पूर्ण्ब्रह्म आहे खरंच... पण अन्नाची चोरी करता येते. झोप पण अन्नाइतकीच गरजेची आहे माणसाला...पण ती चोरता येत नाही. ज्याच्या नशिबात जितकी तितकीच त्याला ती प्रसन्न होणार. आज मी चार तासच झोपणार म्हणलं की ७-८ तास झोप लागते. आणि आज जास्त झोपू म्हणलं की २ तासात जाग येते. आपल्याकडे इतके देव आहेत आणि त्याची आपण अगदी व्यवस्थित पूजा करतो...मग कोणी "निद्रा"देवी ची पूजा का नाही करत? म्हणजे या घरातल्या लोकांना शांत झोप मिळू दे..त्यांना जास्तीत जास्त स्वप्न बघता यावीत असं का कोणी त्या देवीकडे साकडं घालत?

चला...खूप च लिहिलं...झोप आली :) तसही हे पोस्ट मी ३ दिवस लिहिते आहे...लिहायला घेतलं की निद्रादेवी यायच्या, मग आमचं तत्व "आलीस? ये...आल्यासारखी आता जरा शेजारी पण जाऊन ये...आणि ८-१० तास थांबच कशी!!!" वगैरे :))

देवीची कृपा अशीच सगळ्यांवर राहो....

॥ श्री निद्रादेवी प्रसन्न॥

Wednesday, January 14, 2009

आवाज कि दुनिया

आज नेहमीप्रमाणे बस मध्ये वाचत बसले होते. शेजारचा माणूस मोबाईल वर गाणी ऐकत खिडकीतून बाहेर बघत बसला होता... ’झेन गार्डन’ वाचत होते... मस्त कथा...त्यामुळे मी एकदम तंद्रीमध्ये. अचानक एक विचित्र "हॅलो" ऐकू आला..चमकून बघितलं तर शेजारचा तो फोनवर बोलत होता. तो दिसायला एकदम आडवा माणूस...केस थोडे पांढरे..चेहर्यावर एक गंभीरपणा आणि आवाज एकदम पातळ... मला एकदम हसूच आलं. म्हणलं केवढा माणूस आणि कसा आवाज!!!!

पण हे असं खूप वेळा बघितलं आहे, आवाज आणि दिसणं यातली विसंगती. पण विसंगती कशी? म्हणजे अमूक अमूक आवाजाची व्यक्ती अशीच असेल हे तर मनाचा खेळ झाला. आणि मग तशी ती व्यक्ती नसेल कि मला आलं तसं एकदम हसू येतं, आश्चर्य वाटतं, क्वचित भ्रमनिरास, अपे़क्षाभंग वगैरे.

मला आठवतंय माझ्या दादाचा एक मित्र होता...एकदम गोरा गोमटा, खात्या-पित्या घरचा. तो पहिल्यांदा घरी आला तेव्हा दार मीच उघडलं... आणि त्याचा आवाज ऐकून पळत जाऊन दादा ला सांगितलं कि "मुलीच्या आवाजाचा तुझा मित्र आला आहे". नंतर तो आमच्याकडे खूप वेळा आला, हळूहळू माझी ओळख वाढली तसं माझ्याशीही बोलायला लागला आणि मग त्याच्या त्या आवाजाची सवय झाली. पण माझ्या त्या निरोपामुळे मी त्याला त्याच्या नावाच्या feminine version नेच हाक मारायचे. मग मोठी झाले...आता त्याचं लग्न झालं नि मग कधीतरी मी त्याला त्याच्या मूळ नावाने हाक मारायला सुरूवात केली. :)

शाळेत एक बाई होत्या... मी शाळेत असताना चांगलं(??) गायचे वगैरे..त्यामुळे त्यांचा आनि माझा बराच संबंध आला. तबला सुरेख वाजवायच्या. पण आवाज एकदम फ़ाटलेला. त्या बोलायला लागल्या कि यांनी तबला भाषा शोधून काढावी असं वाटायचं.

आधीच्या कंपनीत माझ्या टीम मध्ये एक IIT fresher होता. डोकं एकदम मस्त. पण आवाज म्हणजे हसू आवरायचं नाही. त्याला ऑफिस मध्ये एकदा एका credit card साठी फोन आला. हे credit card वाले जनरल फोन करत असतात. ते ext. कोणाचं आहे हे त्यांना माहीतच नसतं. तर याने फोन घेतला..
"हॅलो"
"I m xyz from a bank."
"ok"
"mam, आप credit card में interested हो?"
"I m not a mam. My name is Susheel" (name changed here)
बास हे ऐकून आम्ही त्या cubicle मधले सगळे हसून पडायचे बाकी राहिले होतो. कित्येक दिवस आम्ही त्याची या एका dialogue वरून खेचायचो.

अजून एक मित्र आहे त्याचा आवाज एकदम भारदस्त आहे..पण दिसायला अगदी fresh out of college वाटतो. आणि असा त्याला अगदी official feedback मिळाला आहे :)

"स्नेहल, आज च्या बंड्याचा उद्या तुला verification call घ्यावा लागेल" असं मला आमचा HR सांगतो. हे असं पूर्वी पण अनेकदा मी केलंय...आता सवय झालीये. पण पहिल्यांदा असं करायचं होतं तेव्हा झेपलंच नव्हतं कि मी असं न बघितलेल्या माणसाचं कसं काय verification करणार? Telephonic interview नंतर हाच "तो" यासाठी हे सगळे खटाटोप. मग "त्या" चा आवाज, काही उत्तरं पडताळून बघायची आणि verification करायचं..असलं काहीतरी अजब तंत्र. म्हणजे मग मी आधी बोलले आणि verification केलं त्यात मध्ये त्या माणसाचा आवाज बसला असेल तर? पण हे असले प्रश्न मी मनात च ठेवते.

सगळी आवाजाची जादू, मजा आहे. आज च्या "नेट" च्या युगात तर चेहर्याआधी आवाजाची च ओळख होते. मायबोली, blog मुळे तर मी कित्येकांशी आधी फोन वर बोलले मग भेटले आहे. मजा येते कधीकधी. आवाज आणि ती व्यक्ती असं काही अजब सूत्र मनाशी मांडताना.

नोकरीमध्ये काम बदलत गेलं तसतसं आता मला distributed teams बरोबर काम करावं लागतं. तिथे तर अनेकदा फोन वर च बोलणं होतं. Client team तर सगळी आवाजानेच परिचीत असते. अशीच एक business analyst आहे..फोन वर तिचा आवाज कायम तोंडावर कोणी हात ठेवावा तसा येतो. त्यावरून मला वाटलं होतं कि एकदम मोठी, उदास बाई असेल... मग एक दिवस तिचा फोटो बघितला.. कमालच होती...ही बाई माझ्याच वयाची आणि सुंदर म्हणावी अशी आहे. तिचीच सहकारी आवाजावरून तरूण वाटते तर ती निघाली ४५ वर्षाची :)

हे तर झालं माझ्या सारख्या इतर काही लोकांचं. पण जे प्रतिथयश लोक असतात त्यांचा पण आवाज कित्येकदा गमतीशीर असतो. राणी मुखर्जी!!! कायम या बाईला सर्दी झालीये असा आवाज. श्रीदेवी... प्रचंड नकोसा वाटणारा अनुनासिक, अल्लड आवाज...सुनिल शेट्टी..उगाचच घसा बसल्यावर बोलतो तशातला काहीतरी आवाज. हेमामालिनी चा आवाज जरा भारी आहे. त्यात तिचा accent पण दाक्षिणी आहे. अजून च गंमत येते त्यामुळे! सचिन... काय अफ़ाट खेळतो, तोड नाही.. पण आवाजात मार खाल्ला आहेच.

काहीकाही आवाज मात्र वेड लावतात... श्रेया घोशाल, सुरेश वाडकर, लता, आशा, मन्ना डे, जगजित सिंग, हरीश भिमानी, अमिताभ... बरेच जण आहेत. पूर्वी दूरदर्शन वर बातम्या देणारे प्रदीप भिडे यांनी तर संपूर्ण करीअर जाहीराती, निरनिराळे कार्यक्रम यात आपल्या आवाजाचा ठसा उमटवत पुढे नेलं. कमाल असते.

आवाज हि देणगी आहे. आपण फ़ार फ़ार तर तो जपू शकतो...त्यातला fineness थोडा वाढवू शकतो.. पण तो एका मर्यादेपुढे कमावता येत नाही. ती शक्ती माणसाकडे नाही. जसा तुमचा-माझा रंग, उंची देव च ठरवून पाठवतो तसाच आवाजही. तरीही हसू आणणारे आवाज आहेत..वेड लावणारे आहेत तसेच चीड आणणारेही आहेत.

मी कित्येक मित्र-मैत्रीणींना फोन केल्यावर म्हणते... कामामुळे भेटणं होत नाही निदान आवाज तरी ऐकावा म्हणून फोन केला. नुसता त्यांचा आवाज ऐकला तरी जुन्या आठवणी जाग्या होतात..कोणी आसपास आहे असं वाटतं. अशा अनेकांचा आवाज एकमेकांना पोचवणार्या त्या Telecom industry ला खरंच सलाम!!!

नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा..
मेरी आवाज ही पेह्चान है..
गर याद रहे :)

आवाज कि दुनिया में आपका स्वागत है :)

Tuesday, December 02, 2008

१०वी अ आणि सरमिसळ वही

कायापालट झालेल्या घरात अजूनही सामान पूर्ण लावून झालेच नाही.... नक्की काय ठेवायचं, काय देऊन टाकायचं नि काय टाकूनच द्यायचं यावर आमच्या सगळ्यांची डोकी चालूच आहेत आणि माझे-आईचे, माझे-दादा चे वाद पण! :)
नवीन सगळंच एकदम झकास झालेलं असलं तरी, जुन्याची आठवण आहेच. त्या जुन्या जागांचे, सामानाचे संदर्भ आठ्वून मग मन हळवंहि होतंच.
असंच काही आवरताना आख्खी दोन पोती पुस्तकं (अभ्यासाची!!!!) आणि काही शाळा-कॉलेज(सुवर्णकाळ..) मधल्या वह्या सापडल्या... पुस्तकांमध्ये अर्थातच कॉलेजची जास्त होती. अगदी cobol, data structures पासून servlets, ASP.NET पर्यंत सगळं, शिवाय मोठ्या दादाचे mechanical चे TOM, SOM इ. ठोकळे आहेतच. परत त्यातही आमची विभागणी चालूच...काय ठेवायचं किंवा कोणा होतकरूला द्यायचं, काय रद्दीत घालायचं आणि काय जाळून टाकायचं. तसं बघितलं तर सगळंच जवळपास कमीतकमी १० वर्षापूर्वीचं...पण जीव अगदी काल घेतलेल्या वस्तूप्रमाणे त्यावर जडलेला आणि अडकलेला.... मग सगळं आवरता आवरता एका खोलीत मी आणि चारही बाजूने आम्हा भावंडांचा तो शाळा-कॉलेज चा सुवर्णकाळ असं झालं. ३-४ तास तरी ते तसंच असणार...
अशातच सापडलेली माझी १० वी मधली शाळेची एक वही... माझी १० वी!!! कित्ती वर्ष झाली??? पण २ वर्षापूर्वी शाळेत जात होते कि काय इतक्या अजून आठवणी ताज्या आहेत. सकाळी ८:३० ते ११ क्लास, मग १२ ते ५:३० शाळा... आत्ताच्या मानाने तसं कमी व्यस्त वेळापत्रक...पण तेव्हा किती "बिझी" आहोत असं वाटायचं :) बरं एवढं सगळं करताना अभ्यास वगैरे जेमतेमच. १० वी चं वर्ष असूनही biology च्या journalमधल्या frog vissera टाईप अवघड आकृत्या गौतमी कडूनच काढून घेतलेल्या... आणि तेव्हाच ठरवलं की भविष्यात आपण biology घेऊन काहीही दिवे लावू शकत नाही! कदाचि गौतमी नसती तर माझे ते journal १० मार्कहि गेलेच असते :)
क्लास नि शाळा असं सगळं मिळून माझं दप्तर टम्म फुगायचं! मग मी आणि स्वाती (वर्गात शेजारी बसायची) ने डोकंच लढवलं. शाळेतल्या तासांची निम्मी पुस्तकं तिने आणायची आणि निम्मी मी :) वह्या पण मी बिन पुठ्ठ्याच्या कव्हर च्या आणल्या होत्या...त्यातलीच एक २०० पानी वही परवा सामान आवरताना सापडली. मस्त पंचरंगी पोपटाचं चित्र असलेली...(पुढे result मध्ये व्हायचा तो आमचा पोपट झालाच!!!)
पहिल्या पानावर छान (?) अक्षरात नाव, तुकडी वगैरे... मग phyiscs चा अभ्यास... जेमतेम ३०-४० पानं भरलेली. म्हणजे वही दिवाळी नंतर काढली असणार आणि जेमतेम १-१.५ महिना वापरली असणार. मग पुढे घरी अभ्यास(??) वगैरे करताना काहीबाही लिहिलेलं...मराठी वाक्प्रचार वगैरे.... परत बरीच पानं कोरी! काहीतरी आठवून मी वही एकदम मागच्या पानापासून बघायला सुरूवात केली. काय असेल शेवटच्या पानावर :) हसू येतं आता... मागून biology चा अभ्यास (कि आभास!!!). किती नावडतं होतं biology कि वहीतही मी त्याला मागून सुरूवात केली होती. मग एक-एक पान करत मागे-मागे बघत चालले. phyiscs ची निदान ३०-४० पानं तरी होती, इथे biology चं सगळं १५-२० पानातच उरकलं होतं. So much I hated this subject!!!! मग १-२ ठिकाणी जाने-फेब्रु मधलं अभ्यासाच (त्यापेक्षा कधी झोपायचं याचंच जास्त) वेळापत्रक... मग काही संस्कृतची सुभाषितं, त्यांचे अर्थ. क्वचित ठिकाणी chemistry च्या reactions देखील!!! गणित हा स्वतंत्र आवडता प्रांत असल्याने या वहीत त्याचे घुसखोरी झाली नसावी! मग कधीतरी परिक्षा झाल्यावर मी आणि दादाने टेप करून आणायच्या गाण्यांची केलेली यादी. त्याचा आवडता किशोर आणि मी सगळी त्या वेळ्ची नवीन गाणी यादीत घेतलेली.... cassette च्या एका साईड ला ९ गाणी बसताता या हिशोबाने त्याने त्याची १८ आणि मी माझी १८ गाणी निवडून टिपून ठेवलेली. आई ग!!! काय धमाल होते दिवस!
रिझल्ट लागल्यावर बरंच काही रद्दीत गेलं असणार... मग कॉलेज सुरू झाल्यावर पण शाळेतले हे दिवस थोडे विसरल्यासारखेच झाले असणार. पण ही वही कशी कोण जाणे माझ्याच कप्प्यात राहिली..आणि आज आवरता आवरता माझ्या मनाचे किती कप्पे सताड उघडून गेली?? :)

Monday, September 22, 2008

पडदा

१३ वर्षापूर्वीचं घर... त्यावेळी घरात ५ माणसं असायची...आज त्याची ९ (२ बच्चे) झाली! ९ पैकी ३ आता जरा अंतरावर वेगळीकडे राह्तात... पण आठवड्यातून ४ वेळा तरी या जुन्या घराच्या ओढीने इकडे येतातच. या घरी राहायला आलो तेव्हा माझं भविष्य अजून काय आकार घेणार ते पण माहित नव्हतं. आणि मधल्या दादाला निदान त्याचा किरण दिसत होता; मोठ्या दादाचं त्या मानाने बरंच स्पष्ट होतं. बाबांनी अवघ्या आयुष्याची कमाई या घरात घातलेली... आमच्या आधीच्या घरातलं सामान घेऊन या घरात प्रवेश केला होता.
नवीन घरी लग्गेच सगळं नवीन घेणं शक्य नव्हतं.... पण पडदे तर हवेच होते. आधीच्या घरी आम्ही दार च फक्त रात्री झोपताना लावायचो तिथे पडदे कशाला? तिथे माणसं मनाचे आणि घराचे दरवाजे उघडे ठेवून च फ़िरत. तर मग नवीन घरी आल्याआल्या त्याच आठवड्यात आई-बाबा पदद्याचं कापड आणायला गेले होते. आधीचं घर आकाराने लहान, त्यात पडद्याची आवश्यकताच नाही अशी साधी राहणी. आई ने कपाटाला, एका खिडकीला वगैरे पडदे शिवले होते पण ते आपली तिची घर सजवायची आणि शिवणकाम करायची हौस म्हणून. पडदा पाहिजेच असा आमचा कोणाचाच आग्रह नसायचा. मी तर घरात कमी नि बाहेर जास्त असला प्रकार... :) मग माझ्या लहानपणी आईच कधीकधी मैत्रिणींबरोबर जाऊन पडद्याचं कापड आणत असे...कसा शिवायचा वगैरे चा मनात बेत करत असे. आम्हा भावंडांना पडदा म्हणजे येताजाता लोंबायला, हात पुसयला, खेळता-खेळता लपायला इतकाच तो त्याचा उपयोग माहित होता. पडदयाला याहून जास्त महत्त्व त्यावेळी आमच्या कोणाच्याच आयुष्यात नव्हतं.
मग नवीन घरी कोणी एक माणूस येऊन खिडक्यांची मापं घेऊन गेला.... त्यावरून खर्चाचा अंदाज दिला. अबब!!! २१ मीटर कापड लागणार होतं. माझ्या कल्पनेपलिकडचंच होतं... पडदे शिवून आले... ते लावायला खास बार, कडेला शो च्या मुठी वगैरे पण आले....काहीतरी झाकायला लागणारा पडदा स्वत:च इतका सजला कि क्या बात है!! नवीन घर बघायला येणारे लोक पण "पडदे छान आहेत हो" असं म्हणू लागले. या सगळ्या प्रकारामुळे मी पण कोणाकडे गेले कि त्या घरातले पडदे लक्ष देऊन बघू लागले. हळूहळू मग कळत गेलं कि पडदा हा गृहसजावटी मधला महत्त्वाचा भाग आहे. त्यात निरनिराळ्या प्रकाराचे कापड असते, शिवण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्याच्या रंगसंगतीमुळेहि घराच्या शोभेत बराच फ़रक पडतो वगैरे मौलिक भर पडत गेली. पण तरी पडदा हे प्रामुख्याने आई चे आणि नंतर आई-वहिन्यांचे क्षेत्र राहिले... मी नवीन/ धुतलेले पडदे लावणे आणि कसे आहेत यावर प्रतिक्रिया देणे या व्यतिरिक्त जास्त कधी काही केलं नाही.
आता आमच्या याच १३ वर्षापूर्वीच्या घराचा काहिसा कायापालट करायचा आम्ही घाट घातला... अगदी रितसर interior वाल्याला काम देऊन वगैरे. या रविवारी पडद्याचं कापड बघायला जायचं ठरलं... कधी नव्हे ते मी पण येते म्हणाले... आई ला नेमकं बरं वाटत नसल्याने ती येऊ शकली नाही. लक्ष्मी रोड वरच्या काही दुकानात गेलो. काय सुरेख व्हरायटी असते... अगदी त्या रंगीत दुनियेत गुंडाळल्यासारखं वाटलं. साडीच्या दुकानात साडी ड्रेप करून दाखवतात तसा इकडे पडदाहि ड्रेप करून दाखवतात!! परत दुकानात निरनिराळे samples होतेच display ला. पडदा, तो बांधायला शोभेचं अजून काही.. पडद्यात पण sheer वगैरे प्रकार. हे sheer म्हणजे एक पारदर्शक, झुळझुळीत कापड. मनात आलं असला पडदा काय कामाचा? हेच भाव कदाचित चेहर्यावर उमटले तसा interior वाला म्हणाला "फार सुंदर दिसतं हे", कि लागलीच दुकानदार ते ड्रेप करून दाखवू लागला. इतकंच काय त्या दुकानवाल्याने चहा/कॉफी घेणार का इतपत विचारलं. पडदे खरेदी बरीच सुखदायक असते कि! :) २-३ दुकानातले samples घेऊन परत निघालो.
१३ वर्षापूर्वीच्या संपूर्ण घराच्या पडद्याची किंमत आता एका पडद्याला जेमतेम पुरत होती. आणि इतकं करून लहानपणी मी ज्याला मनासारखं हात पुसायचे, लपायचे तसलं काहीही करू शकणार नव्हते :( वाटलं...स्नेहल नुसतं घर बदललं, त्याचे पडदे बदलले असं का आहे? आधीच्या घरातून इकडे येताना तू पण किती बदललीस? तिकडे सहज कोणाच्याहि घरात शिरणारी, कुठेहि भटकणारी, सगळ्या जनतेला "मुतालिकांची मुलगी" म्हणून माहित असलेली ..नवीन घरात किती कोशातली झाली? वय हे एक कारण असेल... पाचव्या वर्षी जशी मैत्री होते तितकी सहज ती १८ व्या वर्षी नाहीच होऊ शकत! म्हणजे मनाने पण नवीन पडदे च घेतले तर... पण मग पडदे घर सजवतात, काही न दाखवाव्या अशा गोष्टी पडद्यामागे लपतात...माझं तसं च आहे?? कि मनाचे हे पड्दे कसे आहेच याचा मी कधी विचारच नाही केला? ते माझी शोभा वाढवताहेत कि माझी शोभा करताहेत? कधी विचारच नाही केला.... या पडद्यांमुळेच कदाचित मला बरंच चांगलं काही दिसलं नाही, त्यामुळे मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्नच केला नाही. नवीन आलेल्या त्या sheer सारख्या पारदर्शक पडद्यासारखा एखादा तरी sheer माझ्या मनात आहे? आणि त्यातून मी जगाला आणि जग मला अस स्वच्छ बघू शकत आहोत का? कोण जाणे. कायापालट झालेल्या घरातल्या नवीन पडद्याबरोबर मी पण जरा मनाचे हे पडदे बदलून बघेन... निदान प्रयत्न तर नक्कीच करेन.

Thursday, September 04, 2008

बाप्पा... हसू कि रडू?

बाप्पा...दरवर्षीप्रमाणे ठरल्या वेळेला तुम्ही आलात. फ़ार आनंद वाटला... आज-कालच्या दिवसात दिलेला शब्द आणि ठरलेली वेळ पाळणारे फ़ार थोडे. या पार्श्वभूमीवर नित्यनियमाने एक तुम्ही येता.. तुमसे बढकर कौन? इथे देशात काहीच वेळेवर होईना झालंय.
कॉलेजचा प्रवेश असो, घराचं बांधकाम असो, पाऊस असो कि निवडणूका असोत. सगळ्याचीच वेळ बदलली आहे. ऑगस्ट मध्ये कॉलेज सुरू कि लगेच ऑक्टोबर मध्ये submissions! अधला-मधला वेळ असाच welcome party वगैरे मध्ये गेलेला.... पाऊस पण जून मध्ये दडी मारतो नि आता बघताच आहात कि तुम्ही यायची वेळ झाली तरी कसा बिनदिक्कत बदाबदा कोसळतोय. लोक तर निवडणूक या प्रकाराला इतके सरावले आहेत कि जणू शाळेतल्या वर्गात सेक्रेटरी निवडावा. :( सगळं आबादी आबाद आहे बाप्पा!
आंबेडकरांनी सांगितलं होतं कि सवलतींवर जगू नका, आज इथे सवलतीशिवाय कोणी जगायला नको म्हणतोय. माणसांच्या शरीराची जाडी वाढतेय नि मनं संकुचित होत चालली आहेत. शिक्षणाने लोक उदात्त कमी झाले नि कोते जास्त. पंचविशीतला मुलं सरळ सांगतात कि "माझं आई-बाबांशी पटत नाही", अरे पण हा विचार करायला याला समर्थ कोणी केला? लहानपणी जास्त त्रास देतो म्हणून तुला सोडलं का आई-बाबांनी??
सगळं जीवनच व्यस्त झालंय... पैसे जास्त-वेळ कमी, घर मोठं-माणसं कमी, शरीर मोठं-कपडे कमी, देखावा जास्त-आपलेपणा कमी, झोप जास्त-स्वप्न कमी, नेते जास्त-आदर्श कमी, चोरी जास्त-निर्मिती कमी! चेहरा खराब झाला तर निरनिराळे लेप लावून स्वच्छ करतात..पण आमच्या मनावरच्या जळमटांचं काय? बाप्पा... मनासाठी एखादं parlour काढता येईल का? वयात येणार्या मुला-मुलींना आहार नियमांबरोबर विचार नियम किती जण समजावून देत असतील?
आजच वर्तमानपत्रात तुमचं अगदी वाजत-गाजत स्वागत झाल्याची सचित्र बातमी वाचली.... पण जरा शेजारी नजर जाते तर अमेरिकेने अणुकरारात केलेली दिशाभूल दिसली. विद्यमान सरकारने स्वत:ची तोंड लपवण्यासाठी केलेला विश्वासघात दिसला. एका आडरानात दरोडेखोरांनी महिलांवर केलेला अत्यचार दिसला. "एक लाखात कार" प्रकल्पाच्या अजून नवीन बातम्या वाचल्या. बिहार मधील लोकांचे हाल दिसले... विदर्भात पाणी नाही म्हणून माणूस मरतोय आणि बिहार मध्ये पाणी आलं म्हणून माणूस मरतोय! पाणी म्हणजे जीवन ना रे... मग जीवन सुद्धा अति झालं कि त्रासच होतोय!
तू म्हणशील काय आज वर्षानी आलो तर मला काही माहित नसल्यासारखं सगळं सांगते आहेस. तुलाच सगळं माहित आहे रे... तूच कर्ता आणि करविता! पण सगळंच इतकं दाहक नको ना करूस. माणूस चुकला...चुकतो आहे. पण तू त्याला योग्य त्या मार्गावर लवकरात लवकर आण.
आता म्हणशील इतकं काही वाईत नाहीये ....ते पण खरंच आहे. वर सांगितलेल्या सगळ्या परिस्थीतीतच प्रकाश-मंदा आमटे आहेत, अभिनव बिंद्रा आहे, भारतीय त्रिदल सेना आहे. पण महाभारताप्रमाणेच सुष्ट आणि दुष्ट हे व्यस्त प्रमाणात आहेत. मान्य आहे रे हे सगळं आमच्यामुळेच... पण तू आला आहेस तोवर मन मोकळं करून घेतलं. दहा दिवसात तू बघशीलच सगळं.... मग पुढच्या वर्षी येताना हे कमी करण्याच्या योजना घेऊनच ये. यंदा जाता जाता शक्य तितक्या लोकांना सुष्ट व्हायच्या मार्गावर नेऊन सोड. आणि पुढच्या वर्षी मला "बाप्पा... हसू कि रडू?" असं लिहावंसं न वाटता "बाप्पा... हसूच हसू" असं वाटायला पाहिजे.

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

गणपती बाप्पा मोरया!!!

Monday, September 01, 2008

बालीश बोल

परवा रविवारी दुपारी चार च्या सुमारास अचानक अंधारून आलं नि ४:३० च्या सुमारास एकदम धो-धो पाऊस पडायला लागला. गणपती बाप्पाचे आगमन अगदी २ दिवसावर आले असल्याने अनेक लोकांप्रमाणे आम्हालाही गणपतीच्या आरासीचं सामान आणायचं होतं. पण पाऊस काही थांबायचं नाव काढेना.... माझा भाचा (वय- सौव्वा ३ वर्ष) सारखा विचारत होता कि कधी जायचं बाप्पाचं सामान आणायला.... शेवटी अगदी वैतागून त्याने आबांना (आजोबा) विचारलं

"ए आबा, पाऊस का रे पडतो??"
"अरे, पाऊस हवा आहे सगळ्यांना"
"पण का??"
"पाऊस नसेल तर पिक.... (इथे आबांच्या लक्षात आलं कि नातवाला पिक वगैरे झेपणार नाही) आपण कपडे कसे धुणार??"
"पण कपडे का धुवायचे?"
"ते खराब होतात, मळतात ना! मग धुवावे लागतात...आपण धुतो कि नाही रोज"
"अले(अरे), पण मग त्यासाठी पाऊस कशाला? आपल्या मशिन (वॉशिंग) ला पाणी आहे कि..."

हे ऐकून आबा आणि मी खो खो हसत होतो...

Tuesday, July 29, 2008

Corporate दुखवटा

नवीन(??) आर्थिक वर्ष चालू होऊन आता ते जुनं व्हायची वेळ आली.... मार्च मध्ये सुरू झालेली appraisal cycle मे पहिल्या आठवड्यात उरकली गेली. त्यात मिळालेलं rating बघून २५% लोक आधीच नाराज होते...उरलेले काही माझ्यासारखे आशावादी अजूनही उरला सुरला उत्साह टिकवून होते. दरम्यान Infy, CTS, Capgemini, IBM वगैरे बड्या कंपन्यांमध्ये पगारवाढ जाहीर होत होती. $ घसरण्याच्या निमित्ताला सगळ्या कंपन्या टेकलेल्या होत्या, management, HR सगळी लोकं आपापली गाजरं अगदी होलसेल भावात विकायला बसली होती.... Onsite चे कमीतकमी chances, बढती नाही वगैरे वगैरे नेहमीच आहे..यंदा भर पडली ती एक अंकी पगारवाढीची!
शेअर मार्केटने पण अशी काही मान टाकली कि नकोच ते चढ-उतार track करणं, तो portfolio बघणं असं वाटू लागलं. पेट्रोल महाग झालं, पर्यायाने सगळ्याच वस्तू महाग झाल्या. Inflation 11% च्या वर गेलं. याच सगळ्या गोंधळात मध्ये मी एका investment plans ची माहिती देणार्या माणसावर पण चिडले :)
मे मध्ये पगारवाढीची पत्रं मिळतील ही आमच्या सारख्या लोकांची साधी आशा आमच्या कंपनीने अगदी धुळीला मिळवली. मग नुसत्या अफ़वा....लोक वाट्टेल ते बोलत होते. बस मध्ये, canteen मध्ये सगळीकडे आडून आडून याच गोष्टीची चर्चा! कंपनी अधिकृतरित्या काही सांगत नव्हती आणि लोक इकडे हवालदिल झाले होते.करता करता शेवटी जून च्या शेवटी एक e-mail आली ज्यात आम्हाला जुलै मध्ये पगारवाढीची पत्रं मिळतील असं म्हणलं होतं.... चला! परिस्थिती अगदीच वाईट नव्हती तर!!!
जुलै सुरू झाला. काहीतरी जबरदस्त suspense असावा अशा थाटात कंपनीने अगदी २८ ला सकाळी ई-पत्रं पाठवली. सगळा फ़ुगा फुटला होता. इकडे पण बहुतांश लोकांना एक अंकी पगारवाढ आहे. Inflation 11% आणि पगारवाढ एक अंकी! बहुत नाइन्साफी है! salary restructure करून उगाचंच एक खोटं मानसिक समाधान दिलंय. कालपासून बरेच लोक नाराजी व्यक्त करत आहेत. बाहेर पडायचं कि अजून एक वर्ष इथे काढायचं अशा चर्चा आता रंगत आहेत. पण एकूण चित्र दुखवट्याचं आहे. इतर सगळ्या दुखवट्याप्रमाणे हा पण १०-१२ दिवसावर काही टिकत नाही. लोक सरावतात.... न सरावून पर्याय नसतो.
तुम्ही अनुभवला असेलच असाच एखादा Corporate दुखवटा!

Friday, July 18, 2008

तूच खरा गुरू!!!

मला आठवतं तेव्हापासून...म्हणजे जवळ जवळ गेले २५ एक वर्ष तो माझ्यासोबत आहे. अगदी पहिलं कधी भेटलो वगैरे आता आठवत नाही, पण खात्री आहे भेटला तेव्हापासूनच मला तो माझा वाटला असणार आणि त्याने पण मी कायम तुझ्यासोबत असेन असं हसून म्हणलं असणार :) म्हणजे अगदी लहान होते तेव्हा काय केलं कि आई-बाबा माझं ऐकतात, पाहुणे आले कि कसं वागायचं हे पण यानेच शिकवलं.
मग मोठी झाले... शाळेत जाऊ लागले. आई-बाबांच्या चिमुकल्या गोड विश्वातून एकदम ३०-४० मुलं, आई सारख्याच दिसणार्या बाई इतक्या त्यावेळी अफ़ाट, भन्नाट वाटणार्या जगात वावरू लागले. बाईंना कशी वागणारी मुलं आवडतात, मी काय केलं तर मला शाबासकी मिळेल हे सगळं मला यानेच शिकवलं. बाई शाळेत सांगायच्या ती गाणी, गोष्टी, अ आ इ ई च्या पलिकडचं असं काहीतरी तो मला नेहमी सांगायचा. आणि सगळ्यात मला आवडायचं म्हणजे घर, शाळा, खेळ सगळीकडे माझ्यासोबत! सगळे म्हणायचे आई-बाबांना किती मोठी आणि शहाणी झालीये स्नेहल... मी पण मस्त भाव खाऊन घ्यायचे!

सायकल शिकताना तर जाम मजा आली. मला वाटलं होतं कि मला काय सहज जमेल सायकल...त्याचाच बहुतेक त्याला जरा राग आला आणि मी सायकल शिकणार म्हणलं कि हा लांब जाऊन बसायचा. करता करता २ वर्ष गेली...सायकल चालवता यायची काहि चिन्ह दिसेनात :( मग त्यालाच माझी दया आली....हळूच माझ्या कानात येऊन म्हणाला, गधडे, आधी हाफ़ पेडलिंग कर, handle कडे बघू नकोस समोर बघ. मला रडूच यायचं बाकि होतं. तसा म्हणाला, रडतेस काय? मी आहे ना! आलोय ना आता. चला मग... आणि खरंच मला ४-५ दिवसात बर्यापैकी सायकल चालवता येऊ लागली :)

अभ्यास कसा करायचा, शिकलेलं ल़क्षात कसं ठेवायचं वगैरे शिकवायची याची खास पद्धत! आई-बाबा, शिक्षक यांचं ऐकायचंच ही याची शिस्त. तसं नाही केलं कि मग मात्र शिक्षेला तयार रहावं लागायचं. पण ऐकलं कि मग दुनिया मुठ्ठी में! असंच शिकत, गद्रे बाईंच ऐकत गाणं शिकले आणि ज्यादिवशी संपूर्ण शाळेत गाण्यात पहिला नंबर आला तेव्हा काय आनंद झाला होता! आणि माझा गुरू छान हसत होता माझ्या त्या आनंदाने फुललेल्या चेहर्याकडे बघून :)

college चं तर जग च गुलाबी! आपण मोठे झालो ही भावना, निरनिराळी प्रलोभनं...त्यामुळे काहिसं माझं गोंधळून जाणं. पण हा मस्त होता... याचं ठरलेलं काहि गोष्टी करून बघच; कारण मगच मी तुला नीट शिकवू शकेन. गाडी No Parking दिसलं तरी एकदा लावून बघ, अभ्यासातलं काहि ठरवून option ला टाकून बघ, घरी न सांगता सिनेमा बघ...सर्दी झाली तरी परत भिज, आई शी एकदा खोटं बोलून बघ, कामवाल्या बाईच्या मुलीला गणित शिकव, स्वत:चा कप्पा नीट आवरून बघ, आई घरी नसताना पोळ्या कर ...खूप काहि गोष्टी करायची मुभा देतो तो, अजूनही!!! जमलं तर ठीक आहे नाहीतर मग सरळ याचं म्हणणं ऐकायचं.

मैत्रीत तर किती शिकवलं याने मला... मित्र-मैत्रिण कसे निवडायचे, किती विश्वास ठेवायचा, कोणाशी कसं वागायचा....मैत्रीची सीमा काय ओळखायला शिकवलं!
परिक्षेत मार्क्स मिळाले म्हणजे मी नोकरी मिळवायला लायक आहेच असं नाही हे तर खूप कठोरपणे शिकवलं..पैसे मिळवायचे तर संघर्ष, कष्ट करायला शिकवलं. आता नोकरी करायला लागूनच ८ वर्ष होतील... किती बदलले मी या काळात! किती काय काय शिकले त्याच्याकडून! दरवेळी मिळणारी शाबासकीची थाप, होणारं कौतुक यात याचा किती मोठा वाटा असतो! एखादी चूक परत केली कि मिळणारी शिक्षा पण भयंकर असते.

नेहमी वेगवेगळ्या रूपात त्याचं मला भेटणं, एखाद्या खर्या मित्राप्रमाणे मला काहि गोष्टी करायला प्रोत्साहन देणं, चुकले तर कधी आई सारखं समजावणं, कधी रागावणं... मी कशीहि वागले तरी आजतागायत त्याने माझी सोबत सोडली नाही. मी मोठी काय कशीहि झाले असते, पण आज जे काही चांगलं वागू शकते त्यात माझ्यावर झालेले संस्कार आणि या गुरूचा च वाटा आहे.

असा हा गुरू..."अनुभव" त्याचं नाव! त्याने मला जे दिलंय ते अवर्णीय आहे. खरं तर अमोल ऋण आहे त्याचं ते. आणि ते ऋण वाढतच राहिल याची मला खात्री आहे. अशा या माझ्या आजन्म गुरूला आज "गुरूपौर्णिमे"च्या दिवशी शतश: प्रणाम!!! पुढच्या आयुष्यात माझ्यासोबत असाच सतत राहा आणि माझं जीवन समृद्ध कर. तुझ्यासारखा गुरू या जगात दुसरा नाहीच!!!!

Thursday, June 12, 2008

उगाचंच काहितरी

दिवस कसा सुरू झाला आणि कसा संपला कळतंच नाही आजकाल. एकामागून एक कामं येत राहतात आणि मी ती जमेल तशी टोलवत/ झेलत राह्ते.
असाच आजचा एक दिवस... ऑफिसला पोचायच्या आधीच एक फोन... "कधी येत आहेस? client कडून अमूक-अमूक escalation आहे. मला तो data हवाय." मनात आलं.."च्या मारी. सगळ्या e-mails वर कॉपी तर करते मी. मग मी नाही ऑफिस मध्ये तर data साधा compile करता येऊ नये??" पण असं कितीहि मनात आलं तरी तसं ते बोलता येतंच असं नाही.मग तुमच्या मनात काही खूप छान असो वा "च्या मारी.." टाईप काही. काही गोष्टी फक्त मनाशीच बोलाव्या लागतात. असो....
ऑफिस मध्ये आल्यावर मग सगळ्यात आधी client escalation परतवून लावलं. त्यासाठी मोठ्या लोकांपासून, लहानांपर्यंत २-३ meetings :(... मग खायला वेळ नाही...म्हणून diet वगैरे विसरून एक कुरकुरे! कामाचा ताण वाढला कि माझं वजन का वाढतं हे आत्ता मल कळलं.
एक एक काम उरकता उरकता ७:३० ची बस चुकली. सहज म्हणून मग g-talk ला login झाले. तर एक अगदी जुना नेट-मित्र भेटला. त्याचा अगदी अनपेक्षित प्रश्न खरं तर मला हे पोस्ट टाकायची खुमखुमी देऊन गेला. आत्तापर्यंत मी त्याला ४-५ वेळा तरी सांगितलं असेल कि माझा ब्लॉग वाच...अमूक पोस्ट..मायबोलीवरचं तमूक वगैरे... पण हा अगदी काला अक्षर भैंस बराबर सारखा माझे ब्लॉग वाचणं टाळतो. तर असा हा आज मला विचारत होता "howz ur blogging"... दिवसभराच्या वैतागानंतर त्याच्या प्रश्नाचं हसूच आलं. त्याला म्हणलं "काही सुचत नाहीये. आणि जे सुचतं ते लिहिण्याइतपत मोठं/ चांगल नाहीये".. तो नुसताच त्याच्या style मध्ये lol ला.
मी या आधीच पोस्ट टाकून जवळ जवळ ५ महिने झाले... केतन, प्रिया वगैरे मंडळी लिही लिही असं सांगून दमली. ब़याच जणांनी विचारलं कि लिहीत का नाही आहेस. यावर मी अगदी झोपेत देखील उत्तर दिलं असतं की "काही सुचत नाहीये".
खरंच सुचत नाहीये. कशावर लिहू? कंपनीने मला नवीन जबाबदारी देऊन ओझ्याचं गाढव केलं यावर...कि महिनाभर वेगवेगळ्या गाड्या चालवून मी zen estilo च का select केली यावर की गाडी चालवताना येणार्या जबरदस्त अनुभवांवर की रत्नागिरीला केलेल्या धमाल २ दिवसांबद्दल कि टेलर ने ड्रेस बिघडवल्यावर त्याच्याशी केलेल्या भांडणावर की google story वाचता वाचता sergey brin किती आवडला यावर?
लोकांचे ब्लॉग वाचले कि मजा वाटते..कसलं सुचतंय यांना!! आमचीच कुठे बोंब होते कळत नाही. पण काहीही असो.... माझे पोस्ट्स अगदी नियमीत वाचणारे मला लिहायला भाग पाडू शकले नाहीत ते काम ज्याने एकही पोस्ट वाचली नाही त्याने केलं. असं होतं का कधी कधी... कोणी काही म्हणलं म्हणून उगाचंच काहीतरी करावंस वाटतं ना?

Monday, January 28, 2008

एक लाखात कार



दिल्ली मध्ये Auto Expo त रतन टाटांनी नॅनो launch केली आणि भारतात अजून तरी चैन समजली जाणारी कार देशातल्या गल्लीत पोचली. एक लाख हि आता तशी फ़ारशी मोठी रक्कम राहिलेली नाही. (रिलायन्स पॉवर मध्ये तर कित्येक ’किरकोळ’ गुंतवणुककरांनी एक लाख अडकवले आहेत!) तर अशा एक लाखात आता चारचाकी मिळणार..... ज्याला त्याला वाटू आता कार आपल्या आवाक्यातली वाटू लागली. मला तर नॅनो कार्टून वाले अनेक ई-मेल्स देखील आले.
सगळीकडे १-२ दिवस चर्चा झाली...कि पुण्यात आधीच ट्रॅफिकचे बारा वाजले आहेत त्यात आता नॅनो आली कि तेराच वाजणार!

पण मग मी विचार केला कि खरंच नॅनो इफेक्ट इतका जबरदस्त असणार आहे का?? एक लाखात बेसिक गाडी आहे.... मारुती - ८०० जी १.८० लाखात बेसिक गाडी येते त्याचाच interior भयानक असतं, आत मध्ये शब्दश: पत्रा असतो, dashboard पण यथातथाच! मग एक लाखात टाटा अशी काय जादू घडवून आणून वेगळं काही देणार? बरं इंजिन पण ६०० CC चं...म्हणजे स्पीड नसणारच. बर्याच लोकांचं म्हणणं आहे कि सध्याचा high end bike customer नॅनो घेईल. पण एक तर बाईक आणि नॅनो च्या किमतीत जवळ जवळ १००% चा फरक आहे. शिवाय बाईक घेणारा fuel efficiency ला प्राधान्य देतो. अगदी फॅन्सी बाईक देखील आरामात ४५ कि.मी. प्र. लि. देते...नॅनो जेमतेम २०-२२ देईल. म्हणजे दुप्पट किंमत देऊन ५०% average मिळवा! काय शहाणपणा आहे हा? कार घेणं आणि नियमीत चालवणं यात फ़रक आहेच.
दुसरी गोष्ट म्हणजे पार्किंग... आपल्यापैकी अनेकजणांकडे कार लावायला घराजवळ पुरेशी जागा आहेच असं नाही. दुचाकी कुठेहि फटीत बसू शकते, पण चारचाकीचं काय??
आता राहिले रिक्षावाले. नॅनो हि जवळपास रिक्षाच्याच किंमतीत मिळेल....पण रिक्षा देखील ३० चे average देते. नॅनो २० देईल....या फ़रकामुळे भाडेदर वाढवावा लागेल ज्याने परत रिक्षावाल्यांच्या उत्पन्नात फ़रक पडेल.
नॅनो हा खर्या अर्थाने चांगला पर्याय आहे टॅक्सी ला!मुंबई सारख्या शहरात नॅनो जास्त चालेल. पण परत नॅनो मध्ये डिक्की नसल्याने लांबच्या प्रवासासाठी नॅनो फ़ारशी उपयोगी ठरणार नाही.
म्हणजेच नॅनो मुळे मला नाही वाटत कि सगळीकडे कारच कार होतील...ट्रॅफिकची समस्या अगदी टिपेला जाईल वगैरे...
तुम्हाला काय वाटतं??

Wednesday, December 26, 2007

शिवरायांचे आठवावे रूप

कर्मयोगातला (नोकरी) पंचम अध्याय (पाचवा जॉब) सुरू झाल्यापासून ब्रेक असा काय तो घेतलाच नव्हता. २५ ला मंगळवार..२४ ला एक दिवस रजा घेऊन ४ दिवस भटकंतीचा विचार मनात आला. आपल्या कोकणातला गुहागर-दापोली भाग अजून बघितला नव्हता. तिकडे जायचं ठरलं. कोकण म्हणल्यावर प्रचंड सुंदर ट्रिप हे सांगणे नकोच!
गुहागर जवळ दिड तासाच्या अंतरावर डेरवण नावाचे गाव आहे. तिथे शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग भिंतीवर मूर्तीरुपात (चांगला आणि योग्य शब्द सुचवा) उभे केले आहेत. अतिश्य देखणं काम आहे. परिसर प्रचंड स्वच्छ आणि प्रवेश विनामूल्य आहे. इतर कुठे असे काहि असेल तर रु.२० तिकिट नक्की! तिथले सगळे काम मी माझ्या कॅमेरामध्ये टिपले आहे.

१. शिवबाचा जन्म


२. दादोजींचे धडे


३. राज्याभिषेक


४. अफझलखानाचा वध



५. शाईस्तेखानाची बोटे कापली




६. जिजाईचा आशीर्वाद


७. न्यायनिवाडा



८. प्रजेचा आशीर्वाद



९. रामदास स्वामींचा आशीर्वाद



१०. धार्मिक कार्य


११. बाजीप्रभूंचा शेवट



१२. असे सैनिक



हे सगळे पुतळे इतके जिवंत वाटतात. फार सुरेख बारकावे घेतले आहेत. नऊवारी साडी नेसलेली बाई वाकल्यावर कशी दिसते, मावळे घोड्यावर बसल्यावर त्यांचे पाय कसे असतात (हा फोटो नाहीये इथे) वगैरे. महाराजांचा चेहरा पण सगळीकडे अगदी एकसारखा आहे. मला सगळ्यात जास्त आवडला तो शिवराज्याभिषेकाचा प्रसंग. जवळ जवळ ३० जण आहेत यात...आणि सुबकता तोंडात बोटं घालायला लावणारी!!

असं काम करणं हा एक भाग आहे आणि केलेलं जपणं, परिसर देखणा ठेवणं हा दुसरा भाग आहे. या प्रकल्पासाठी ज्यांचा ज्यांचा सहभाग होता आणि आहे त्या सगळ्यांना माझा सलाम! ऐसा राजा पुन्हा होणे नाही...नि अशा राजाचा जीवनपट अशा रूपात उभा करणे यासारखा दुसरा स्तुत्य उपक्रम नाही.

Monday, December 03, 2007

नको तो गाण्याचा कार्यक्रम!

गाणं हा माझा जिव्हाळ्याचा विषय! मग ते कुठलंही गाणं असो....नवीन, जुनी अशा बंदिस्त आवडी नाहीत.... जे कानाला आवडेल, ज्याचे शब्द स्पष्ट ऐकू येतात असं कुठलही गाणं मला आवडतं. स्वत: गाणं शिकलेले असल्याने काहि काही गोष्टी (बहुतेक) जास्त कळतात (असं मला वाटतं) आणि मग ऐकताना साधं वाटणारं गाणं, विशेष काहि समजल्याने जास्त आनंद देऊन जाते.
पण हल्ली या गाण्याच्या stage shows ने अगदी उत आणला आहे. "अमुक-तमुक" कि "सुनहरी यादें", "अमुक-तमुक" ना "श्रद्धांजली"... वगैरे साच्यातले कार्यक्रम अगदी नकोसे झाले आहेत. जुनी गाणी आणि गायक-वाद्यवृंद नवीन! मग त्या जुन्या गाण्याच्या गीतकार, संगीतकाराची वारेमाप स्तुती करणारे निवेदन! "क्या बात है" टाईप च्या त्याच त्या प्रतिक्रिया...अगदी शक्यच असेल तर "त्यां"च्या बरोबर त्या काळी काम केलेल्या लोकांच्या काही आठवणी, "ते" महान कसे होते वगैरे वगैरे!!! जुनी गाणी अलौकिक सुंदर आहेत, जुने गीतकार, संगीतकाराची अत्यंत प्रतिभाशाली होते...एकदम मान्य!! याविषयी माझं दुमत नाहीच आहे. पण किती वेळा तेच ते ऐकायचं? नवीन गायक आहात ना? मग नवीन गाणी म्हणा ना... लाखो लोकांनी हजारो वेळा ऐकलेलं लठ्ठ तिकिट देउन परत यांच्या तोंडून काय ऐकावं? बरं आजकाल music systems इतक्या सुंदर आहेत कि original track मिळवा आणि गाण्याचा आनंद घ्या!! गाण्यातला छोट्यातला छोटा आवाज स्पष्ट ऐकू येतो! नवीन लोकांनी नवीन काही करून प्रसिद्धी मिळवावी यासारखा आनंद नाही. Live performance ची मजा काही और च असते. पण शक्यतो तेव्हा जेव्हा मूळ गायक तो स्वतः देत असतो.
बरं, जुनेच गायचे तर मग ठरविक चार लोकांभोवतीच का फ़िरतात हे लोक? मराठीत बाबूजी, गदिमा, खळे, हृदयनाथ (क्वचितच) तर हिंदित आर.डी, कि.कु. वगैरे! बाबूजी तर जिवंत असताना जितके प्रसिद्ध होते तितकेच किंबहुना जास्तच प्रसिद्धी त्यांना नि त्यांच्या गाण्यांना मरणोत्तर मिळाली. परत एकदा, त्यांच्या प्रतिभेबद्दल मला अजिबात शंका घ्यायची नाही, पण तेच ते ऐकून कंटाळा येतो!! "सा रे ग म प" च्या पहिल्या पर्वात "खळें"च्या गाण्याचा एक भाग झाला. त्या संपूर्ण भागात स्पर्धक हा जणू गौण भाग होते. संपूर्ण कार्यक्रम "खळे गौरव" होता! देवकी पंडीत ला तर "खळे" म्हणलं कि किल्लीच बसते. कमीतकमी ५-६ वाक्य बोलल्याशिवाय बाई काही थांबत नाही.
बरं, जुनी गाणी म्हणताय ना....मग लता ची तार सप्तकातली गाणी म्हणा, मन्ना डे ची जमताहेत का बघा. तर नाही... एक जण कोणी "तेरे मेरे बीच में", "लग जा गले", "लागा चुनरी में दाग" म्हणायचं धाडस करत नाही. नवीन लोकांना जमणार नाही असं मला challenge नाही करायचं आहे, पण ते का करत नाहीत हे जाणून घ्यायचं आहे!
जुन्या चांगल्या गोष्टी जपल्याच पाहिजेत, त्या नवीन पिढीपर्यंत पोचल्या पाहिजेत, हे खरं आहे. पण त्याच बरोबर, नवीन निर्मिती देखील व्हायला हवी. कुठल्याही सुसंस्क्रुत, अभिरूचीपूर्ण समाजाचे ते लक्षण आहे. जुन्या गोष्टी वारसा आहे, तो जपायचा, पुढे न्यायचा. पण तोच उगाळत बसायचा का?
मला तर या "जुन्या" गाण्यांच्या कार्यक्रमाचा मनस्वी कंटाळा आला आहे. "अति झालं नि हसू आलं" असं झालंय बहुतेक. गाणी ऐकायला प्रचंड आवडणारी मी म्हणूनच हल्ली अशा कार्यक्रमाला जायचं टाळते. वाटतं नकोच तो गाण्याचा कार्यक्रम!

Tuesday, November 20, 2007

भाजीत गोम आणि साप

खरंतर मला हे लिहायला खूप उशीर झाला आहे. नंदन ने सुरू केलेल्या "जे जे उत्तम ते" प्रकल्पात विद्या ने मला टॅग केलं पन तेव्हा काहि ना काही कारणाने लिहिणं जमलं नाही. आता लिहित आहे.

--------------------------------------------------------
"माझी जन्मठेप" या पुस्तकातून हा उतारा घेतला आहे. या पुस्तकातला असा एखादा उतारा निवडणं अवघड आहे. सगळच्या सगळं पुस्तक, शब्दनशब्द हेलावून टाकणारा, उर्जा, स्फूर्ती देणारा आहे.
अंदमान जेल मधल्या प्राथमिक हाल अपेष्टांचे हा उतारा प्रतिनीधी आहे असे म्हणायला हरकत नाही.

---------------------------------------------------------
भाजीत गोम आणि साप

अंदमान मध्ये एक भयंकार जातीची गोम आहे हे आम्ही मागे सांगितलेच आहे. त्या गोमीची लांबी दिड फूट असून विष जाज्वल्य असते. सकाळी बंदिवानांची एक टोळी बंदिगृहाकरिता भाजी आणण्यासाठी धाडण्यात येई. रानात आणि मार्गात ओसाड जागेत त्या देशात अळू यथेच्छ उगवते. त्यातच काही पालेभाज्याही उगवतात. ती टोळी हातात मोठेमोठे विळे घेऊन ही बेटेच्या बेटे सरसहा कापीत जाई व त्या कापलेल्या पाल्याचे ढीगचे ढीग रचून मग ते गाडीत भरून बंदिगृहात धाडण्यात येत.तेच मोठ्मोठ्या जुड्या करून दोन चार विळीवर घाव मारून त्या भाजीच्या प्रचंड डेगेत टाकण्यात येत आणि उबाळले जात. बंदिवानांची भाजी शिजवण्याचा बहुधा हा प्रकार असे. अशा चालढकलीत इतका निष्काळजीपणा केला जाई कि केव्हा केव्हा या भाजीच्या पाल्याच्या ढिगात मोठाल्या गोमी आणि सर्पहि त्या डेगेत शिजले जात! अर्धी-कच्ची ती भाजी तेव्हा वाढण्यात येई तेव्हा तेही सपासप वाढले जात. खाताना भाजीतले पान म्हणून उचलावे तो गोम हाती येई! परंतु अंदमानातील ही सापाची आणि गोमीची भाजी हा जरी एक आश्चर्यकारक मेवा होताच त्याहून आश्चर्यकारक मेवा म्हटला म्हणजे त्या प्रकारच्या भाजीत बारीसाहेबांच्या श्ब्दाचा आणि समर्थनाचा जो मसाला पडे तो! आम्ही एकट्यानेच नव्हे तर आणखीहि बऱ्याच राजबंद्यांनी ह्या गोमी भाजीतून काढून दाखविल्या आहेत. आणि लगेच बारीसाहेबापर्यंत जाऊ नये म्हणून प्रतिवाधी केले आहेत. परंतु त्या निर्ढावलेल्या अधिकाऱ्याने हसून उत्तरे द्यावी "ऒ! इट टेस्टस वेरी वेल!" सुपरीटेंडंट पर्यंत कागाळ्या केल्या तरी तेही होस हो करून निघून जात! निरूपायाने गोम किंवा सापाचा तुकडा फेकून देऊन बंदीवानांनी ती भाजी तशीच खावी. नाहितर खावे कशाशी? आणि खाल्ले नाहीतर कामात थोडीच सूट मिळणार! ते काबाडकष्टी काम करावे कशाचे बळावर? हा पेच बारीस माहित असेल म्हणून तो कोणीही अधिकारी तिकडे फारसे लक्ष देत नसत. केव्हा केव्हा माझ्या आणि माझ्या इतर राजबंदिंच्या प्रतिवादाचा परिणाम होऊन बारीस थोडाफार ठपका मिळत असे. अशा वेळेपैकीच एका वेळेस ह्या गोमीच्या प्रकारावरून बारी मला शांतविण्यासाठी गोंजारीत म्हणाले होते "अहो सावरकर! ह्या बदमाष लोकांचा विचार सोडून द्या. तुमची समाजातील उच्च प्रतीची स्थिती मला माहित आहे. हे पहा मी तुम्हाला एकट्याला पाहिजे तर भाजी करवून देतो. पण तुम्ही ह्या सर्व बंदिवानांसमक्ष अन्नाबिनातील न्यूने उघडकिस आणू नका. ती गुरे आहेत!पाहता पाह्ता ते माझ्या डोक्यावर चढतील. आजवर अशा शेकडो गोमी ह्या लोकांनी गुप्चूप फेकून देऊन भाजी खाल्लेली आहे. पण त्यातला कोणी मेलेला नाही!"
एकूण अशी विषारी भाजी खाऊन बंदिवान मेले; कि मग ती सुधारण्याची योन्य वेळ येईल अशी बारीसाहेबांची समजून होती

Friday, November 09, 2007

मॅच

हितगुज दिवाळी अंक २००७ साठी मी हि कथा पाठवली होती. ती इथे प्रकशित झाली आहे - मॅच

मॅच
"पव्या, बोल हेड की टेल?"

माझा चुलतभाऊ मंदार सोफ्यावर रेलून बसत चिडवण्याच्या सुरात म्हणाला. मंदार माझा नात्याने चुलतभाऊ, पण तसा मित्रच.... केवळ दहा महिन्यांनी लहान. त्यामुळे लहानपणापासून एकत्रच उंडारलो होतो.... अगदी चड्डी न घालता येण्याच्या वयापासून, सेडान कार मध्ये कोणाला फिरवावं या आणि अशा सगळ्या मित्र मैत्रिणी आम्ही शेअर केलेल्या. त्यात पठ्ठयाला चुकून एक सुंदर मुलगी पटली होती आणि तिला ’अक्कल’ जरा कमी असल्याने ती मंद्याशी लग्नाला तयार झाली होती. अशी देवाची कृपा माझ्यावर कधी होते हे बघण्यात कॉलेजची सहा नि नोकरीतली चार वर्षे गेली आणि मग अस्मादिकांनी 'अरेंज्ड मॅरेज' करण्याची मनाची तयारी केली. तर आजचा हा माझा चौथा कांदापोहे कार्यक्रम!! दर वेळी कार्यक्रम झाल्यावर माझी ’खेचायला’ येणारा मंद्या आज आधीच येऊन माझी ’खेचत’ बसला होता.

"काय हेड की टेल? तू ये एकदा..मग कळेल"
"वैतागतो काय यार? बरं..सांग दिल कि दिमाग??"मंद्याची टकळी चालूच होती.
"दोन्ही"
"टॉस केल्यावर एकच काहीतरी मिळतं"
"गधड्या, ही काय मॅच आहे...टॉस करायला???"
"मग काय आहे?? सांग दिल की दिमाग?"
"जाऊन आल्यावर सांगतोssss..." असं म्हणत मी गाडी चालू केली. सोबत आई बाबा होतेच. मंद्याचं शेवटचं वाक्य आठवून मला जाम हसू येत होतं ...

"लग्न म्हणजे मॅच नाहीतर काय आहे?" या मॅच मधले प्रमुख खेळाडू दोन...मी- पव्या उर्फ प्रवीण आणि ती (ठरली की नाव सांगतोच) !!! तर एक खेळाडू दुसर्‍या खेळाडूला भेटायला चालला आहे. आजचा प्राथमिक सिलेक्शनचा राऊंड. इकडून सिलेक्टर्स मी आणि आई..तर तिकडून ती आणि तिची आई. दोन्हीकडचे बाबा न्यूट्रल!!! बरोबर आहे... अध्यक्ष असाच हवा!

मी तसा बर्‍यापैकी अनुभवी खेळाडू म्हटलं तरी हरकत नाही. दोन वेळा भोपळे आणि तीन वेळा मॅच कॅन्सल!!! पण माझा टीम मधला सहभाग, अस्तित्व महत्त्वाचं... काय?? दोन वेळा भोपळे म्हणजे मी एकदा इंजिनीयरिंगच्या दुसर्‍या वर्षाला असताना एकीला आडूनआडून प्रपोज केलं होतं. अपयशी झालो. आणि त्यानंतर पहिल्या नोकरीत एक आवडू लागली हे ज्या क्षणी कळलं त्याच्या पुढच्याच आठवड्यात तिने साखरपुड्याचे पेढे हातावर ठेवले!! पुढे तीन वेळा मॅच कॅन्सल म्हणजे ’लग्नासाठी’ मुली बघायला लागलो तेव्हा प्राथमिक फेरीनंतर ’पिच रिपोर्ट’, ’ढगाळ हवामान’ वगैरे कारणं देऊन मी ती कॅन्सल केलेली. आजची ’ती’ कितपत अनुभवी आहे माहीत नाही.

दोन खेळाडू भेटले....गप्पा, चहा वगैरे झालं. दोन्ही खेळाडूंनी ’होम पिच’ (त्यांची बाग) वर पाय मोकळे केले. एकमेकांची ’स्टाईल’ जाणून घेतली. ती ’स्टाईल’ आपल्या ’स्टाईल’ शी कितपत जुळते वगैरे काही कंपॅटॅबिलिटी टेस्ट झाल्या. मी तिचा एकूण टीमस्पिरीट आजमावला. माझ्या (घरच्या) टीम मध्ये कशी वाटेल वगैरे. शेवटी ’होम पिच’ वरच्या बॅडलाईटमुळे (तिन्हीसांज) खेळाडू परतले. आणि परत गाडी सुरू करून घरी!

मला यावेळी का कोणास ठाऊक, पण ही मॅच होऊनच जाऊ देत असं वाटलं. ’पिच रिपोर्ट’, ’ढगाळ हवामान’, ’बॅड लाईट’ अशा काहीही सबबी आठवल्या नाहीत. (विनाशकाले विपरीत बुद्धी ते हेच वाटतं). उतावीळ मंद्याचा रात्री फोन आलाच...
"काय रे कशी आहे?"
"चांगली आहे..."
"बस क्या!! मुझे शेंडी?? काकू सांगत होती की तू एकदम गाणं वगैरे गुणगुणत आहेस म्हणून"
"काहीही........ आणि बाय द वे, तिला दिल, दिमाग दोन्ही आहे"
"ओह हो.....पण पहिल्या भेटीत तू दिमागवाल्या गोष्टी करत होतास? हरी ओंम!!! पव्या....म्हणून तुला मुलगी पटली नाही बघ" हा मंद्याचा आगऊपणा.
"ही पटणार गड्या...बघ.."
'सुंदरा मनामध्ये भरली' अशी काहीशी माझी अवस्था. आई-बाबांना पण ती पसंत. चला...इकडे सिलेक्शन टीम आणि अध्यक्ष यांचा होकार आला. फोनवर बोलणं झालं नि तिकडून पण अपेक्षित होकार आला. अशा रितीने दोन खेळाडूंची टीम तयार झाली. तिचं नाव ’दिशा’. (माझी दशा नाही केली म्हणजे मिळवलं)

आता मॅच साठी महत्त्वाची म्हणजे खेळाडूंची मानसिक एकात्मता आणि तयारी. त्यासाठी वारंवार भेटणे चालू झाले. अधून मधून मग तिचे नातेवाईक, कधी माझेपण आमची तयारी (??) बघायला म्हणून भेटत असत. वर परत ’हे दिवस एंजॉय करा, नंतर आहेच’ हे असलं कोचसारखं सूचना करणं होतंच!

बाकी आमचं ट्युनिंग चांगलं जमत होतं. सुरूवातीची एकदम अबोल, लाजरी दिशा हळूहळू खुलत चालली होती. मॅचचा आनंद घेण्याच्या दृष्टीने हे फारच महत्त्वाचं होतं. माझ्या काहीकाही स्ट्रॅटेजीजवर ती जाम लाजायची. आणि तसं झालं की मी पार पाघळायचो. तिला मी पहिलं गिफ्ट दिलं तेव्हाचा तिचा चेहरा.....अगदी कपिल देवने १९८३ मध्ये वर्ल्डकप जिंकल्यावर जसा होता तस्साच!!! ती खूप हळवी आहे....एकदा मी तिला विचारलं की माझ्यात असं काय बघितलंस आणि हो म्हणालीस? तर ती म्हणे "पहिल्याच दिवशी भेटलो...तेव्हा बागेत चालताना तू एकदाही मला सोडून पुढे गेला नाहीस. मी चहाचा घोट घेईपर्यंत तू थांबला होतास. जाताना माझ्याकडे बघून, हसून बाय केलास. तुझा हा केअरिंग स्वभाव आवडला." विचारलेल्या सराव प्रश्नाला दिशाने जबरी षटकार लगावून दिला होता. आणि त्या षटकारातला जणू मी बॉल आहे असं मला हवेत तरंगायला झालं होतं.

असं सगळं चालू असतानाच सिलेक्टर्सपासून प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांच्या मनात आमचा एक सराव सामना व्हावा असं ठरलं आणि आम्ही साखरपुड्याच्या तयारीला लागलो. सराव सामना त्यामुळे प्रेक्षक १०० वगैरेच..... शिवाय दिवसभराची मॅच चार तासात उरकली. सराव सामन्यात बराच गोंधळ लक्षात आला होता..जसं फोटोग्राफर दुसरा बघायला हवा.... हॉल जरा जास्त हवेशीर असावा. तिचा आणि माझ्या कपड्यांचा रंग साधारण साजेसा असावा (हे अर्थात तिकडचं म्हणणं). साखरपुड्याला तिची साडी मेंदी कलरची नि माझा शर्ट आकाशी...... म्हणजे जमीन-आसमानाचा फ़रक झाला होता. तर हे सगळं टाळायचं होतं. आता इतकं सगळं चालूच होतं तर एक-दोन वेळा मी पण संधी साधून ’तोंडओळख’ करून घेतली.

या मॅच मध्ये एक्स्ट्रा प्लेयर नसल्याने (आम्हाला नको पण होते!!!) फिटनेस महत्वाचा होता. म्हणून मग केळवणावर बंधने! मॅच मध्ये तिच्या दिसण्याला ’अति’ महत्त्व म्हणून मग एक महिना आधीपासून ब्यूटीपार्लर वगैरे. माझं काहीच नाही.....मी फक्त एक नवीन शेव्हींगकीट आणलं. साला आमच्याकडे बघतोच कोण! (मनातल्या मनात ’भोपळा' वाल्या दोघी डोकावून गेल्या). मॅचचा दिवस जवळ आला तशी धडधड वाढली..

ही पहिली नि शेवटची मॅच!!! हीच इनिंग कायम जपायची. आयला...मला कमिटमेंट फोबिया होतोय का??? छे छे!!! आय ऍम ऑलरेडी कमिटेड. मग कसलं टेन्शन??? तर....तेच तेव्हढं सांगता येत नाही बघा. तुम्हालाही अनुभव असेलच. जवळ जवळ ६००-७०० प्रेक्षक नक्की झाले. गुरूजीच्या नावाखाली अंपायर ठरला. मॅचच्या दिवशीचा मेनू ठरला. आणि तो दिवस आला.

गेले दोन दिवस मी आणि तिने एकमेकांना भेटलो नव्हतो. त्यामुळे एकत्र ज्यांना खेळायचं आहे त्यांनाच मनाचा अंदाज घेता येत नव्हता. एव्हाना मंद्याच्या लग्नाला दोन महिने झाले होते...त्यामुळे तो आपली काही खास मतं, ’टिप्पण्ण्या' देत होता. बहिणाबाईंचे काही फुकट सल्ले चालू होते....असा उभा रहा, तसा हास वगैरे. मला ऐन डिसेंबर मध्ये घाम फुटतो की काय असं झालं होतं. मॅच सुरू व्हायची वेळ अगदी दहा मिनिटांवर आली.

ग्राऊंडवर आधी मी उतरलो. सासूबाईंनी माझं अगदी औक्षण वगैरे करून स्वागत केलं... मी मनात म्हटलं ’अहो तुमच्या मुलीशी संसार हा काय युद्धाइतका भयंकर असणार आहे का?’ पण त्याक्षणी काहीही न बोलता सगळं करायचं असा मंद्याचा एक सल्ला आठवला. दोनच मिनिटात दिशा आली. आपुन खल्लास!!! ती ज ब री दिसत होती. म्हणजे कॉलेज मध्ये असताना मी आणि मंद्याने अनेक वेळा टप्पे टाकण्याचा प्रयत्न केलेल्या त्या ’शीतल’ पेक्षा उच्च दिसत होती. हे मंद्याला सांगायला म्हणून मागे वळलो तर तो कोपर्‍यात हातात डीजीकॅम नाचवत त्याच्या बायको शेजारी उभा होता. मनात आलं, आता इथून पुढे दिशा बद्दलचे असे सगळे हळवे, नाजूक क्षण फक्त माझे आहेत. ते मी अगदी मंद्याबरोबर पण शेअर नाही करणार. गुदगुल्या झाल्या.

मॅचच्या आधी जसे दोन्ही देशांचे राष्ट्रगीत असते त्याच धरतीवर इकडे गुरूजींनी दोन, मग तिच्या आत्याने एक, माझ्या मावशीने एक वगैरे मंगलाष्टके म्हणली (गायली म्हणणं चुकीचंच ठरेल). दर तीस सेकंदांनी अंगावर येणार्‍या अक्षता मानेवर अडकून टोचू लागल्या होत्या.... आणि अंतरपाट खाली आला. दिशाने मला हार घातला नि मी तिला..... अंपायरने 'मॅच सुरू करा'' असा इशारा दिला नि आमच्या मॅचचा पहिला बॉल पडला!

आम्ही दोघेही एकमेकांना ’मॅच’ असल्यामुळेच ही ’मॅच’ सुरू होऊ शकली. आमची ही मॅच ऊन, वारा, पाऊस या सगळ्यात अशीच चालू राहू दे, सिलेक्टर्सपासून प्रेक्षकांपर्यंत आम्हाला सगळ्यांचा प्रतिसाद, पाठींबा मिळू दे. जमेल आणि शक्य असेल तेव्हा चौकार, षटकार मारायला मिळू देत. दोघांचीही इनिंग रंगतदार, बहारदार व्हावी. कर्तव्य नीट पार पाडून देवाने आम्हाला आऊट करावं....आणि मागे राहिलेल्याला ताकदीनं उभं राहायचं बळ त्याने द्यावं.

तर मंडळी....मॅच आता सुरू झालेली आहे... जेवण करून जायचं. आणि मॅच संपेपर्यंत अशीच साथ द्यायची. कसं आहे... प्रेक्षकांशिवाय काही मजाच नाही ना कशाची!!!

Friday, November 02, 2007

आठवणीतली दिवाळी...

"झाली का दिवाळीची खरेदी?" मी चॅट वर एका मैत्रीणीला विचारत होते.
"नाही अगं अजून. पिल्लूची झाली." ती
"तुझी कधी?? काय घेणार आहेस?" परत मी
"अगं, बहुतेक काहिच नाही... काय घेणार? सगळं भरपूर आहे :)"
"डोकं, अक्कल कुठे मिळतंय का बघ. तेच कमी आहे तुझ्यात " माझा आगाऊपणा.
"हाहाहा....." जणू तिची याला पूर्ण मान्यता आहे.

सध्या ऑफिस, घर सगळीकडे एकच विषय आहे...दिवाळी!!! रस्त्यावरून जाता-येता दिवाळी मूड अगदी जाणवतो. रंगीबेरंगी आकाशकंदिल, पणत्या, लाईट्च्या माळा....सगळा गजबजाट! सगळी दुकाने लख्ख सजवलेली.... लोकांची खरेदीसाठी गर्दी. गेले कित्येक वर्ष, किंबहुना प्रत्येकच वर्षी हे अनुभवलंय. या आनंदोत्सवाला गणेशोत्सवाने सुरूवात होते आणि दिवाळीला उधाण येते. ’दसरा-दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ हे अगदी खरंय :)

पण गणपती, दिवाळी...खरं तर कुठल्याही सणाची जास्त मजा असते ती वयाच्या १५-१६ वर्षापर्यंत!!! पूर्ण निष्काळजी जीवन.... परिस्थितीची कमी जाणीव यामुळेच कदाचित निर्भेळ आनंद घेता येतो त्या वयात. कोणाशी तुलना करावी इतकं मोठं ना विश्व असतं ना तेवढा (अति) शहाणपणा असतो. अगदी ’विचार करण” म्हणजे सुद्धा ’स्वप्न बघण’ असतं तेव्हा!!! मला तर अजूनहि माझ्या त्या वयापर्यंतचीच दिवाळी जास्त आवडते.... दिवाळी म्हणलं कि मस्त ३ आठवडे सुट्टी, उन्हाळा नसल्याने अगदी भर दुपारी देखील बाहेर उंडारण्याची आईकडून मिळणारी मोकळीक, सहकुटुंब एकत्र कपडे खरेदी, बाबांनी आणलेले खूप सारे फटाके, आईने केलेले मस्त फ़राळाचे पदार्थ...वा!!!! नुसती ऐश, दंगा-मस्ती!!

सहामाही/ वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लागले कि मला आनंद व्हायचा. का? तर अभ्यास झालाय आणि कधी एकदा पेपर लिहिन म्हणून नाही तर त्यानंतर मोठी सुट्टी आणि त्यात करायच्या गंमतीच्या विचारानी :) मग परीक्षा सुरू झाली जस जसा एक एक पेपर होईल तसतसं मी आई-बाबांना दिवाळीत काय करायचं हे विचारून आणि सांगून वेडं करायचे. सुट्टीतला अगदी ठरलेला कार्यक्रम म्हणजे सकाळी ८-८.३० नंतर उठणे! सुट्टीत मी दूध पिणार नाही, मला चहाच हवा असा मग आईकडे हट्ट :) बाबांना बोनस मिळायचा आणि मग आमची मस्त कपडे खरेदी व्हायची. पण हे बोनस प्रकरण मला फ़ार नंतर कळलं.... माझी आई मला कपडे कधी घ्यायचे ते इतकं बेमालूमपणे समजावून सांगायची कि माझी अगदी खात्री असायची आई म्हणते तेव्हाच बाजारात छान छान कपडे येतात आणि तेव्हाच खरेदी करायची असते. मग ’तो’ खरेदीचा दिवस यायचा...सकाळी लवकर आवरून-जेवून आम्ही खरेदीला बाहेर पडायचो. आई बाबांचे एक ठरलेलं असायचं कि आधी आम्हा भावंडांची खरेदी....मग जे राहिल आणि त्यात जे शक्य असेल ते स्वत:साठी. (त्यांचा हा त्याग कळायला तर मला बरीच वर्ष जावी लागली) खरेदी झाली कि कुठल्यातरी मस्त हॉटेलमध्ये जाऊन तुडुंब पोटोबा व्हायचा. त्यावेळी, म्हणजे अगदी १७-१८ वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये जाणं हि चैन होती. कित्येक वर्ष मी न चुकता मसाला डोसाच खायचे! पंजाबी, पाव-भाजी वगैरे माहितच नव्ह्तं तेव्हा. डोसा, आईस्क्रिम वगैरे खाऊन पोटाने आणि मनाने तृप्तीची ढेकर देत आम्ही घरी यायचो. बाहेर खाल्लं म्हणून घरी काहिच करायचं नाही अशी सवय तेव्हाच्या आयांना नव्हती. (आता माझी पिढी जेव्हा आई झालीये तेव्हा आम्ही घरी खायला सुद्धा बाहेरचे पदार्थे आणतो!) कितीहि पोट भरलेलं असलं तरी थोडा दहिभात खाऊनच मी कित्येकदा झोपलेली आहे. त्याशिवाय सुटका नसायची. तेव्हा त्रास वाटणार्या या आग्रहात किती प्रेम, माया होती हे आज कळतं. काल केलेली कपडे खरेदी आज परत सकाळी, दुपारी काढून बघायची हि सवय तर मला अजूनहि आहे.

आई ची फराळाची तयारी चालू व्हायची..... त्यात मग मी आणि दादा जमेल तितकी लुडबूड करायचो. नुकती भाजलेली गरम गरम भाजणी खाणे हा एकदम चकली खाण्याइतका आवडता प्रकार. रव्याचा गरम लाडू म्हणजे आहा!!!! दिवाळीत माझं अगदी ठरलेलं काम म्हणजे रांगोळी रंग आणणे, ते नीट काढुन ठेवणे आणि रांगोळी साठी एक चौकोन भर काव (गेरू) लावून ठेवणे. एकदा प्रचंड उत्साहाने रांगोळीसाठी एका पेपर ला उदबत्तीने भोकं पाडून ठेवली होती. वाट्लं कि त्याने रांगोळीचे ठिपके नीट एका अंतरावर येतील. पण त्या भोकाटून रांगोळी खाली आलीच नाही :) जाम पोपट!!!! वेळ तर वाया गेलाच शिवाय आईची चिडचिड झाली :(

दिवाळीत मोठ्या माणसांचा अजिबात हस्तक्षेप नसलेला कार्यक्रम म्हणजे किल्ला करणे! एखाद्या सकाळी दादा जाऊन कुठुन तरी माती घेऊन यायचा. मग त्यातले खडे वेगळे काढून टाकायचे. थोडी माती चाळून घ्यायची. गुहा तयार करायला एक डबा, विहिर/ तळं करायला एक हिंगाचा गोल डबा, सिंहासनाची जागा प्लेन होण्यासाठी एक फ़रशीचा तुकडा, ३-४ विटा वगैरे साहित्य आधीपासून च जमवलेलं असायचं. मला आवडायचं ते किल्ल्याच्या पायर्या करायला. गोल गोल फ़िरवत त्या पायर्या वरपर्यंत न्यायच्या.... मग २ बुरूज, भाजीवाली, गवळण यांची जागा...सगळं एकदम ठरलेलं. अगदी जमलंच तर एखादं शेत वगैरे पण! (आता जिम वगैरे पण ठेवावी लागेल :)) सगळं झालं कि मग चाळ्लेल्या मातीने एक फिनिशिंग टच द्यायचा....हळीव पेरायचे कि झालं. मग त्यावर खेळणी मांडायची, पणती लावायची. हरखून जायला व्हायचं. दिवसभर मातीत खेळायला मिळायचं. इतक्या हौसेने केलेला किल्ला नंतर मात्र बॉंब लावून ऊडवून द्यायचा.... आणि वर कोणाचा किल्ला एका बॉंबमध्ये उडाला, कोंणाला २ लागले याचे चर्चा. लहानपण देगा देवा........

बाबांनी कितीहि फटाके आणले तरी सगळ्यात आधी काय तर त्याची सम विभागणी. अगदी लवंगीच्या माळा, पानपट्टी सगळे मोजून वेगळे काढून ठेवायचो. नरक चतुर्दशीला पहिला फटाका कोणाचा याची मित्र मैत्रीणीत स्पर्धा असायची. दादा कधी कधी हातात लवंगी उडवायचा.....ती उडेपर्यंत मी नुसती ओरडत असायचे. दादा मात्र आपण फ़ार शूर असल्याचा आव आणायचा. मन्सोक्त फटाके उडवून झाले कि मग फ़ुसके फटाके शोधायचे आणि दारू करायची :) फटाक्यांचे packing चे प्लास्टिक गोळा करायचा आणि ते जाळून ’शेंबूड शेंबूड’ असा गलका करायचा. प्रचंड धूराची वायर, नागगोळी.....सही असायचं सगळं. आता कितीहि फटाके आणा, ती मजा येतच नाही. ’गेले ते दिन गेले......’

आता दिवाळी म्हणजे चार दिवस वेगळं खायला काय करायचं वगैरे प्लॅन्स असतात. लहानपणी खाण्यात लक्षच नसायचं. आई खेळातून खेचून आणून खायला लावायची. आता तितकं खेळायचं म्हणलं तरी जीवावर येईल.

आता सगळं समीकरणच बदललं. सगळ्यात आधी तर वेळ नाही. आणि आजकाल सगळंच नेहमी मिळतं, आर्थिक परिस्थीती बदलली. जीवनशैली बदलली. सगळीकडेच पैसे जास्त झाले..... मग खरेदी मनात येईल तेव्हा, हॉटेल तर कधीही. माझ्या मैत्रिणीसारखा "काय घेऊ? सगळं आहे" असं असणारे लोक वाढले आहेत. फराळाचं आकर्षण पण संपलं. मुलांना खेळायला जागा नाही, आई कडे वेळ नाही....मग ते जातात ट्रेक ला, शिबिराला वगैरे. दिवाळी येते नि जाते..... पण अजूनहि मनात रेंगाळते आणि अनुभवावीशी वाट्ते ती दहावी-बारावी च्या आधीची दिवाळी!!

Tuesday, October 30, 2007

वचन

हि कथा साधारण वर्षापूर्वी मायबोलीवर टाकली होती. आज इथे देत आहे
****

रविवार ची सकाळ.. आरामात पॅटिस खात पेपर वाचत होते. इतक्यात फोन ची रिंग वाजली...
"हॅलो"
"स्नेहल, निरंजन बोलतोय.. आज संध्याकाळी काय करत आहेस? मी तुझ्या area मध्ये एक बंगला बघायला येतोय. काहि करत नसशील तर तू हि ये. इतक्या वर्षांनी मला त्या भागात फ़िरायला तुझी मदत लागेल च"
"अजून तरी कहि ठरलं नाहीये माझं. ये संध्याकाळी.. जाऊ आपण"
" gr8 , चल.. मग भेटू ५.३० ला"
" ok , नक्कि "
निरंजन हा माझा कॉलेज मधला मित्र.. माझ्यापेक्षा २ वर्षाने मोठा.. पण कॉलेज चा कट्टा आणि gathering
यामुले एका वर्गात असल्यासारखी मैत्री आमची. इथे १ वर्ष job करून US ला गेला... ते आता एकदम ८
वर्षांनी आला.... दरम्यान येत होता देशात.. पण त्याचे आई बाबा दोघेही नाशिक ला.. त्यामुळे पुण्यात आलाच
नाही... आता "स्वेच्छेने स्वदेश" म्हणल्यावर पुण्यात आला. आणि आता मनासारखं घर शोधतोय..
संध्याकाळी ठरल्याप्रमाणे निर्‍या आला... सोबत निधी (त्याची बायको) आणि प्रणव (दिड वर्षाचा मुलगा).
त्याच्या आवडिची मिसळ तुडूंब खाउन आम्ही तो बंगला बघायला निघालो.
"तुला या जागेबद्दल कळलं कसं रे?"
"अग एका estate agent कडून"
"मग तो नाही आला?"
"म्हणाला कि तुम्ही बघून या आधी.. त्या मालकांच्या बर्‍याच अटी आहेत.. ते सगळं मान्य असेल तर पुढच्या वेळी मी येईन.."
" oic .. को. ब्रा. आहे वाटत मालक" मी निर्‍याला टोमणा मारला. तो "साने" आहे.
"मालक पुणेरी आहे म्हटल्यावर त्याची जात गौण आहे स्नेहल." निर्‍याचे प्रत्युत्तर..
एक दोन डावी उजवी वळणे घेत अम्ही plot no. 502 च्या बंगल्याजवळ पोचलो.
बंगला देखणा, टुमदार.. पण बरेच दिवस कोणी रहात नसल्यासारखा दिसत होता. आम्हाला बघून एक सधारण सत्तरीचे ग्रुहस्थ पुढे आले.
"साने का?"
"हो. गनलांकडून आलोय" (गनला हा estate agent )
"या.. त्यांचा फोन आल होता"

बंगल्यात सुंदर बाग, थोडी हिरवळ होती... निधी चे डोळे तिला जागा आवडल्याच सांगते होते.
मालकांनी प्रणव ला उचलून कडेवर घेतलं आणि आम्हाला आत नेलं.
प्रशस्त हॉल, स्वयंपाकघर, देवघरासाठी थोडी वेगळी जागा आणि १ study , १ बेडरूम अशी खालची रचना होती. तर वर दोन हल्लीच्या मानाने बर्‍याच मोठ्या बेडरूम्स, ३०० sq. feet चं टेरेस होतं.
निर्‍या आणि निधी ला पाहताक्षणी बंगला अवडला. कोणालाहि आवडण्यासारखीच जागा होती.
देव्हार्यात एक गणपतीचा फोटो, study मध्ये १ छोटं शोकेस होतं.. वर एका बेडरूम मध्ये छान लाकडी double bed होता.
"घरी सामान म्हणल तर इतकेच. बाकि सगळे आम्ही जुन्या घरी नेलं"
आम्ही सगले फ़क्त स्मित हसलो.
काकांनी खाली बसायला चटई घातली... आणि थर्मास मधला चहा ते plastic च्या पेल्यात ओतू लागले.
"अहो हे सगळं कशाला"
"मला आवडतं म्हणून. थोडा जास्त च गोड असतो चहा आमचा.. चालेल ना?"
" no problem काका" इति निर्‍या.

"जागा छान आहे तुमची" निधी ने सुरूवात केली. "आणि area पण छान आहे."
"ह्म्म.. " मालकांचा फ़क्त हुंकार.
"आम्हाला आवडली आहे जागा.. पण गनला म्हणत होते कि तुमच्या काही अटी आहेत. त्या कळल्या तर बरं होईल" निर्‍या.
"अटी म्हणण्यापेक्षा आपण त्याला इच्छा म्हणूया. आणि जो माणूस त्या पूर्ण करेल.. त्यालाच मी ही जागा विकेन"
"...." आम्ही सगळे blank .

"असं आहे साने, हा बंगला मि १९९८ साली बांधला... त्यावेळची किंमत आणि आताची बघाल तर जमीन आसमानाचा फरक आहे"
"हो ते आहेच.. किंमतीच्या बाबतीत तुमच्या काय अपेक्षा?"
"तर.. अस फ़रक असूनहि मि हि जागा मूळ किंमतीच्या 30% जास्त घेऊन विकणार आहे.. पण"...
"पण... काहि गोष्टी माझ्या ईछेनुसार होणार असतील तर"
"बोला.." निर्‍या काहिसा वैतागून म्हणाला
"आपण बागेपासून सुरूवात करू. या बागेतली हिरवळ तशीच राहिली पहिजे. बागेत तुळस हवीच.
study मधले शोकस आणि वरचा बेड हे वापरलं नाही तरी मोडीत जणार नाही. तुम्ही इथे कायम तुमच्या आई-वडिलांसोबत रहाल. परदेशी स्थायिक होणार नाही. आणि या बंगल्याचं नाव वचन ठेवाल."
काकांनी एक दमात सगळ्या अटी (इच्छा) सांगितल्या.

"बाग आणि आई बाबांबद्दल ठीक आहे... पण हे नाव आणि परदेशा बद्दल ची अट..." निधी चा प्रश्न.
"सांगतो... मी हि जागा १९७८ साली घेतली. माझा मुलगा, अजित,पाचवीत होता. त्याच्या दहावी नंतर इकडे घर बांधून ययचा विचार होता. पण मला तेंव्हा पैशाची अडचण होती म्हणून जमले नाही. मग तो IIT साठी बाहेर पडला... नंतर MS केलं.. तिकडेच job ही मिळाला.... त्याची बौद्धिक प्रगती होत होती. आणि आम्ही त्यात सुखी होतो. मी आणि माझी बायको दोघेही निवृत्त झालो. हतात एक रकमी बराच पैसा आला. म्हणून मग हा बंगला बांधला. याच बंगल्यात योग्य वेळी त्याचे त्यच्या मनातल्या मुलीशी लग्न करून दिले. घरात लक्ष्मी आली. (लक्ष्मी सून) आमची कर्तव्य आता पार पडली होती. लग्न झल्यावर 3-4 वर्षानी अजित इकडे येणार म्हणला होता. आम्ही त्याच आनंदात होतो. वर्षाआड तो येत होता.. दोनदा आम्ही तिकडे जाउन आलो. पण आता मन थकत चललं होतं. अजित ने आपल्यबरोबर असावं अस वाटायचं. त्याच्याकडे विषय कढला कि नेहमीच टाळाटाळ.. त्याला मुलगी झाली.. म्हनल आता तरी ये. तुमच्या मनाप्रमाणे झाली ना ती US citizen .. मग आता अम्हाला खेळू दे तिच्या बरोबर... परत काहिबाहि उत्तर दिली. नाही म्हणायला.. नातीच्या दुसर्‍या वाढदिवसाला अजित इथे महिनाभर राहून गेला. तेंव्हा त्याच्यासाठी खास तो वरचा बेड करून घेतला.
वाटल.म कि आता एक महिना येतोय तर इथे कयमचा येण्याचा विचर असेल अजित चा." काकांच्या डोळ्यात पाणी...
"पण अजित इथे येउन २ आठवडे झाले आणि एक दिवस त्याने सांगितलं..."
"आई, बाबा मी इथे परत याव असं तुम्हाला वाटतंय मल माहित आहे. पण.. पण मला इथे फरसा scope नाही. शिवाय रुची (अजित ची मुलगी) ला तिथे जितक्या सुविधा मिळतील त्या इथे मिळणार नाहीत. म्हणून आम्ही असा
विचार केलाय कि US मध्येच settle व्हायचं. आणि वर्षातून एकदा येऊ च कि. शिवाय फोन, e-mails आहेतच."
"किती सहज परस्पर ठरवून मोकळा झाला अजित. या सगळ्यात आमचा विचार कुठेच नव्हता. आयुष्याच्या संध्याकाळी फोन वर बोलून का मन रमणार आहे आमचं? आणि हा म्हणतो याला इथे स्कोप नाही? आम्ही अस विचार केला असता तर? याच्या दहवीच्या वेली मला promotion वर आगरतळ्याला बदली मिळत होती. चांगला गलेलठ्ठ पगार मिळणार होता... स्विकरली असती बदली तर हा बंगला तेव्हाच बांधता आला असता. पण याच्या शिक्षणाचा विचार केला आणि बदली नाकारली. याच्या IIT 3rd year laa मला पहिला attack आला.. पण त्याच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून हिने एकटीने सगळे सहन केलं. आम्हला त्याला खूप शिकवायचं होतं..खूप मोठं झालेल.म बघायचं होतं. पण शिकता शिकता तो स्वार्थी कधी झाला कळलंच नाही." काकांच्या डोळ्यातून दोन मोती ओघळले.
"तुम्ही मुलं खूप शिकता पण शिकल्यावर कसं विसरता रे आई बापाला? त्यांच्या कष्टाचे चीज तुम्ही मिळवलेल्या पैशात नसून उतारवयात त्यांना दिलेल्या आनंदात जास्त असते. आता मझ्यापेक्षा आमचा गवळी नशीबवान वाटतो मला... त्याचा मुलगा सधा M.Com आहे.. पण इथे चांगल्या bank मध्ये नोकरिला आहे... छान लग्न करून आई बाबांसोबत राहतो आहे. पिकल्या पानाला याहून वेगळं सुख काय हवं असतं? आणि आम्ही फार मागतोय का रे? तुमच्या आयुष्याची पहिली १० वर्ष तुमचे हट्ट पुरवले, पुढची १२-१३ वर्षे तुम्हाला मनासारखे शिकू दिले... नंतर नोकरी, लग्न सगळं तुमच्या मनासारख करू दिलं... ३४-३५ वर्ष आयुष्य गेल्यावर जर आई बापाने तुमच्याकडून ४-५ वर्ष सोबत मागितली तर ते चुकलं?? इतकं नाही करू शकत तुम्ही?? कधी कधी वाटतं मुलाला इतकं शिकवलं हेच चुकलं."

"म्हणून मझी अट आहे पोरी आहे परदेशी स्थायिक न होण्याची. आणि तुम्ही मला दिलेलं हे वचन असेल याची
आठवण सतत रहावी म्हणून बंगल्याचं नाव ही वचन ठेवायचं आहे."
"पण मग काका तुम्ही का नाही रहत इथे?" मी
"नाही रहावत इथे. हे घर बांधताना अजित बरोबर राहिल अशी स्वप्न बघितली होती. ते काही आता शक्य नाही. दोघांना इतकी मोठी जागा करायची काय? इतके दिवस विकायचं पण मन होत नव्हतं पण मग विचार केला कि आम्ही गेल्यावर तर काय उपयोग या वास्तूचा? म्हणून मग बंगला विकून ते पैसे इथल्या अंधशाळेला द्यायचे ठरवले आहेत. म्हातरपणी काय करू ५० लाख घेऊन?"

चहाची रिकामे पेले टाकायला काका उठले. आम्ही तिघेही एकदम शांत. निर्‍या परत आला आहे पण परत जायचं
च नाही असं त्याने काही ठरवलं नसावं. काकांच्या बोलण्याने तो अंतर्मुख झाला असावा. काका परत आले.

"साने, नीट विचार करा. या जागेचा नाही, मी काय म्हणतोय त्याचा. "
"काका, मी २ दिवसात काय ते कळवतो तुम्हाला" निर्‍या म्हणला... आणि आम्ही निघालो.

Monday, October 22, 2007

भूतकाळाचे भूत...

गेले कित्येक दिवस काय होतंय ते कळत नाहीये. emotional downtime चालू आहे बहुतेक. मन सतत भूतकाळात जातं आणि तिथून त्याचा पाय निघत नाही. खरंतर आजवरच्या भूतकाळात इतकं रममाण होण्यासारखं काहिच नाही...आणि जे थोडंफार होतं, ते तर आता कायमचं गमावून बसले आहे (जसे कि बालपण). मग का सतत जुने दिवस आठवत असतील?? कि खास असं काही का घडलं नाही याचाच मागोवा घेतेय मी?? मन वर्तमान काळात १० मिनिटे आणि भूतकाळात २० मिनिटे अशा प्रमाणात आहे.
काहि जुन्या दिवसांच्या आठवणीने उगाचच गहिवर येतो.... सगळं आपण किती सहजतेने निसटून दिलं असं वाटतं. पण खरंच, निसटून चाललंय हे तेव्हा कळतंच नव्हतं. आणि आता ते इतकं लांब आहे कि तिथपर्यंत ना माझा हात पोचतो ना हाक!!! आणि समजा ते सगळं मला परत आणता आलं तरी मी स्वत: आता कुठे पूर्वीची तशी आहे??? तेव्हा ज्या गोष्टी जशा बघितल्या, अनुभवल्या तसं आत्ता जमेलच मला असं कुठे मी खात्रीने सांगू शकते?
काहि आठवणी इतक्या गोड आहेत कि आता तसं काहि घडत नाही याचं वाईट वाटतं. मोठी होत गेले नि निरगसत्त्व हरपलं. निर्व्याज आनंद देणाऱ्या गोष्टी कमी झाल्या. आता कधी कधी तर आनंद ’मानावा’ लागतोय...होण्याचे क्षण आहेत आजहि...पण संख्या नक्कीच कमी.
विचार करता करता दिवस निघून जातो. झोप येईपर्यंत विचार..... त्यामुळे झोप पण उशीरा!!! मग स्वप्न पण भूत-वर्तमान चे fusion वाटावे असे काहितरी. मग पुन्हा दुसरा दिवस. त्यात आता कालच्या अजून एका दिवसाची भर...आज तर ’काल’ पण भूतकाळ झालेला....

Wednesday, September 26, 2007

जल्लोष!!!

"ए स्नेहल, चलो अभि..." अंकुश
"हा, ये एक मेल डालके आती हू. तब तक अपना cricinfo है ना!!! " मी

मेल करून निघायला ५:२५ होऊन गेले.... वरती गेले तर canteen full. बाप रे!!! पटकन चहाचा कप उचलून मी एक बरी जागा शोधली. अंकुशपण दाबेली घेऊन आला. त्याच्यामागोमाग चेतना...त्रिकुट जमलं :) (आमच्याकडे जोश नावाची एक टिम आहे...जी आम्हाला दर शुक्रवारी एक सिनेमा आणि काहि महत्त्वाच्या मॅचेस दाखवते)

"अरे आज सेहवाग नही है" अंकुश
"हा..injured ना" मी
"युसुफ पठाण को लिया है. साले का नसीब देखो...debut match क्या भारी मिला उसे" अंकुश
"युसुफ पठाण कौन??" चेतना ने अक्कल पाजळली.
"अरे ढक्कन, इरफान का भाई. अब इरफान कौन मत पुछो" वैतागून अंकुश
"इरफान का भाई batsman कैसे??" परत चेतना
"क्युं...तेरी बेहेन कहा IT मै है?" अंकुश
"अरे ये सब किधर जा रहे है??" मी
"national anthem....यार मे क्यु २ लडकियों के साथ match देखने आया हू?" परत वैतागून अंकुश

इकडे match साठी जमलेल्या २००-३०० लोकांनी टाळ्या वाजवायला सुरूवात केली... राष्ट्रगीत सुरू झाले. सगळे एका क्षणात उभे राहिले. झाल्यावर "भारत माता कि जय!!!" चा जोरदार नारा. काहि लोक अजूनहि येतच होते.

गंभीर आणि युसुफ पठाण आले. इकडे टाळ्यांचा नुसता कडकडाट. निम्म्या लोकांना मॅच दिसतच नाही....मग मागचे लोक खुर्चीवर उभे वगैरे....
गंभीर पहिल्या बॉल साठी तयार...इकडे परत टाळ्या.... बॉल आला..... हलका पुश...आणि एक रन साठी पळायला सुरूवात. युसुफ पठाण जेमतेम पोचतो तोवर एकाने बेल्स उडवलेल्या..
"ओह्ह्ह्ह्ह्ह्ह" एक सामुहिक प्रतिकिया

आता रिप्ले चालू..... सगळ्यांना कळलं युसुफ पठाण आऊट नाही... परत टाळ्या!!! आता बसलेले लोक पण उभे राहू लागलेले.... अधून मधून शिट्ट्या वगैरे.... वातावरण मस्त तयार झालेलं. आमच्याइथे हे असं होतं तर तिकडे जोहान्सबर्ग ला काय असेल??? मग एक ४, मध्ये मध्ये सिंगल्स..... इकडे बॉल बॅटला लागला कि लगेच टाळ्या!!! असाच एक शॉट मारताना युसुफ पठाण चुकला....आणि आऊट झाला. त्याचा score १५...

"क्या है, १५ पे आऊट?" चेतना
"अबे, तू जब fresher थी, १५ lines का code भी लिखा था क्या पेहले दिन?" अंकुश
"ए, चुप रहो यार....पेहले ६ ओव्हर मे विकेट नही जाना चाहिये था" मी
"उथप्पा आया देख" अंकुश

परत जोरदार टाळ्या.....मॅच पुढे चालू....आता माझं लक्ष सारखं घड्याळाकडे. ६:१५ ला मला परत जायचं होतं. माझ्यापुढे इतके लोक उभे होते कि मला उभं राहूनदेखील umpire च्या टोपीशिवाय काहि दिसत नव्हतं. काय घडतंय हे बघायच्या नादातच कळलं...उथप्पा आऊट!!!! तेव्हा ६.१० झाले होते. मी माझ्या desk वर यायला निघाले.
desk वर येऊन बघितलं तर मीटींग अजून सुरू झाली नव्हती....लगेच cricinfo.com उघडलं... युवराज येऊन ५-७ मिनिटे झाली होती आणि त्याने अजून एकहि ६ मारली नव्हती...श्या....माझी मनातच चिडचिड. गंभीर मात्र चांगला खॆळत होता!!!

माझी मीटिंग चालू झाली.....अर्थात ग्राहक bowling करत होता आणि मी batting चा प्रयत्न. माझा कधी गंभीर होत होता, कधी युवराज!!! खेळ सगळा!!! :) मधून मधून वर कॅंटिन्मधल्या लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. तेव्हडच जरा समाधान... माझं सोडा पण निदाम आपल्या cricketers ना तरी बॅटिंग जमत(??) होती तर...
मीटिंग संपली नि cricinfo वर टिचकी मारली.....आपली बॅटिंग झाली होती.....१५७/५ :(( score बघून मी निराश झाले....निदान १८० तरी हवे होते. pitch report चांगला होत!!! एकतर पाचवा bowler नाही...... जाऊ द्या झालं.

’ते’ batting साठी आले. वरून commom India अशी जोरदार आरोळी....पुढच्या २ च मिनिटात प्रचंड टाळ्या........बघते तर पहिली विकेट गेली होती......वा!!!! मला खरं तर वर जाऊन मॅच बघायची होती पण...माझ्या मीटिंगधल्या खेळाने काहि कामे माझ्या पदरात टाकली होती. ती करत बसणे भाग होते. काम सुरू केलं.... वरून काहि जोरात आवाज आला तरच स्कोर बघणं चालू होतं. इतक्यात अंकुश आला.... त्याने काहि ऑंखों देखा हाल संगितला...मी मनात चरफडत काम करत बसले होते. समाधान ते एक कि अंकुश पण काम करत बसला होता :)

सगळं झालं..ग्राहकाला शेवटची मेल केली....८:३३ झाले होते....माझी बस ८:४५ ला असते....आता वर जाऊन मॅच बघणं अशक्य होतं. मॅच मध्येहि प्रचंड tense situation होती...कधीहि काहिहि होऊ शकत होतं....त्यांनी एकाच ओव्हर मध्ये ३ सिक्स, १ फ़ोर असं काहि धुतलं होतं...... पण ८ विकेट पण गेल्या होत्या. बाप रे!!! ८:३८ झाले..... शेवटचे काहि बॉल बाकि आहेत.... काय करू? मॅच कि बस?? मॅच कि बस??? मॅच कि बस???? ...बस च....कारण नंतर २ तास थांबावं लागेल.

"ए अंकुश, मै जाती हू. मुझे फोन करना...ओके" मी

लिफ्टने खाली आले तो च वरून प्रचंड आवाज....माझा लगेच अंकुश ला फोन.
"क्या हुआ?"
"कुछ नही...वाईड गया."
"तो...इतना हंगामा????"
इतक्यात वरून मोठा आवाज, शिट्ट्या......
"अरे..शायद विकेट गयी" अंकुश
"शायद क्या देख के बता ना....."
"अरे....नेट पे आने मे टाईम लगता है ना!!!"

माझ्या समोरचा security guard टोपी उडवून नाचत होता. नववी विकेट गेली. मला मॅच सोडून आल्याचा पश्चाताप होत होता. बाहेर आले तर समोरच्या दुकानात TV बघणाऱ्यांची ही गर्दी!!! माझ्यासारखे मॅच सोडून आलेले फोनवरून कोणाकोणाशी बोलत होते..... सगळीकडेच एक तणाव.

अशीच फोनवर बोलत असलेली एक मुलगी ओरडली.."आऊट!!!!"..."क्या? सिक्स???? ओह नो!!!!!!!!!!!!!!!!!!!"
मला काहिच सुचत नव्हतं......धडधड धडधड धडधड!!!!

"आऊट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! Yes................." परत मगाशीचीच मुलगी ओरडली.
समोरच्या दुकानातली लोकं पण नाचायला लागली......मागून वर आकाशात एक मोठा शोभेचा फटाका!!!

आपण जिंकलो!!!! T 20 चा पहिला world cup.... पाकिस्तानला हरवून आपण मिळवला!!!

बस आली....सगळे तेच बोलत होते.....चारी बाजूंनी फटाक्याचे आवाज. रस्ता मात्र एकदम मोकळा.....निम्म्या वेळात माझी बस SSPMS पर्यंत आली होती.... JM road वर तर काहि गणेश मंडळे ढोल ताशा च्या नादात नाचत होते. सगळीकडे नुसता उत्साह, आनंद!!! बघावा तो माणूस खुशीत दिसत होता. कर्वे रोड ला आले.....आता रस्त्यावर गर्दी होऊ लागली होती. काहि अति उत्साही (?) तरुण बाइकचा ताफा, झेंडे घेऊन रस्त्यावर ओरडत चालले होते.

एव्हाना गणपती बाप्पाने पण इतर देवांपर्यंत भारताची कामगिरी पोचवली असेल. कुठल्या देवाने धोनीशी संपर्क पण साधला असेल.

इकडे लगेच राज्यसरकारने आगरकर आणि रोहित शर्मा ला प्रत्येकि १० लाख रुपयांचं बक्षिस जाहीर केलं.....अजून कितीतरी कोटीचं बक्षिस संघाला ..... (कारगिल मध्ये आपल्या जवानांनी कामगिरी केली ती याहून कमी होती जणू!!!)

आपण जिंकलो....... मलापण आनंदच झाला.....मीही (मनातल्या मनात) नाचलेच!!! पण, पण ....... केवळ T 20 ला प्रसिध्दी मिळावी म्हणून किंवा मार्च २००७ मध्ये आपण लवकर बाहेर पडल्याने झालेलं नुकसान भरून काढावं असा business angle ठेवून.....काहि युक्त्य प्रयुक्यांनी भारत फ़ायनल पर्यंत पोचला असेल आणि आपण जिंकलो असू तर.....तर कसला जल्लोष??

Friday, September 14, 2007

अवघी गजबजली पुनवडी...



आले रे आले रे गणपती आले....

लोकमान्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव आज या शहराच्या सामुहिक उर्जेचं केंद्रस्थान बनला आहे. मंडळ कार्यकर्ते खूप आधीपसून च या कामासाठी झटत असतात...पण माझ्यासारख्या लोकांना गणेशोत्सवाची चाहूल लागायला लागते ती राखीपौर्णिमेनंतर.... जिथे जिथे म्हणून आधी राखीचे स्टॉल होते तिथे तिथे शिवाय इतर अनेक ठिकाणी गणपतीच्या सुंदर सुंदर मूर्ती दिसू लागतात.... हजारो, लाखो!!!! मग बाजारात दिसू लागतं गणपती आरासाच्या वस्तू. झुरमुळ्या, चंदेरी-सोनेरी बॉल्स, थर्माकॉल ची मखर-मंदिर. गेल्या ५-६ वर्षात यात भर पडली त्या गणपतीसाठी सोन्या-चांदिच्या दागिन्यांची. मुकुटापासून मोदकापर्यंत सगळं चांदीचं.... यामुळे भक्तांचा काय अनुभव ते माहित नाही पण तमाम सराफ लोकांची मात्र ’चांदी’ झाली आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांइतकेच गणेशोत्सवासाठी मेहनत घेणारे म्हणजे शाळेतील मुले.... मला इथे मराठी शाळेतील मुलं असं आवर्जून सांगावंस वाटतंय. निरनिराळ्या पथकाकरता ही १२-१५ वयोगटातील मुले महिना-दिड महिना सराव करतात. सगळी मेहनत बाप्पा ला या वर्षी करता निरोप देताना असा काहि दणका उडवून देण्यासाठी कि बाप्पाने पुढच्या वर्षी जास्त लवकर यावे.
१०-११ दिवस असे धामधुमीत जातात कि बघणार्याला वाटावं...हि सगळी सामान्य माणसं वर्षभर खातात तरी काय नि हि सगळी सकारात्मक उर्जा, शक्ती आणतात कुठून? पण हे सगळं आम्हाला परंपरेने दिलं आहे....असं नाहि झालं तर आश्चर्य आहे, असंच होतं यात काहिच नाहि.
१०-११ दिवस बाप्पा येतील.... आपल्यामध्ये असतील. परत त्यांचे त्यांनाहि व्याप आहेतच!!! मग पुढच्या वर्षी लवकर या असे सांगत आपण त्यांना वाजत-गाजत निरोप देउ. २ दिवस जरा मरगळ जाणवते..... मग चालू होते नवरात्राची धामधूम... पूर्वी घरोघरी होणारा भोंडला हा प्रकार आता सार्वजनिक मंडळात (च) होतो. जोडीला गर्बा, दांडिया आहेच. साडे तीन मुहूर्तापैकि दसरा येतो.... बाजारात प्रचंड उलाढाल होते. सगळेच जण काहिनाकाही खरेदी करतात. सरस्वतीपूजन होते.
द्सरा झाला कि लक्ष्मी रोड कपडे खरेदी साठी फुलून जातो. अगदी गरीबातला गरीब देखील काहितरी नवीन कपडा घेतोच. घरोघरी फराळ, फटाके.... लक्ष्मी पूजन!!! परंपरा बघा कशी, आधी गणपती पूजन, मग शक्ती पूजन, मग सरस्वती पूजन आणि नंतर लक्ष्मी पूजन. संपूर्ण शहर विद्युत रोषणाई ने लखलखीत होऊन जाते. संपूर्ण वर्षाची पुणेकरांची ’जान’, ’जिगर’ दिसतं ते याच काळात!!!
सगळे होता होईता २-३ महिने जातात.... इतके दिवस सजलेलं शहर अचानक थंडिमुळे शाल ओढून बसणार. पण हे २ महिने पुणे मस्त असतं. गजबजलेलं, धामधूमीचं.....

बोला रे...
गणपती बाप्पा मोरया!!!!

Wednesday, September 12, 2007

जगी सर्व सुखी असा कोण आहे?

सकाळी ऑफिसला जायला निघाले आणि वाटेत असतानाच माझ्या आधीच्या कंपनीतल्या एकाचा फोन आला..
"स्नेहल, सॉरी काल बॅटरी संपली म्हणून परत फोन नाही केला....."
"हो का? बरं, काय म्हणतोय प्रोजेक्ट? offshore ला पण घेऊन आलास का ते काम?"
"अगं, घेऊन तर आलोय, पण म्हणावं तसं कामच नाही. आता मॅनेजर म्हणतोय कि बेंगळूरला जा"
"वा!! मग??"
"मग काय?? बायको सोडेल मला.... लग्न झाल्यापसून स्थिरत्व नाही. आधी बेंगळूर मग ऑस्ट्रेलिया..आता जरा पुण्यात घेतलेल्या घरात राहिन म्हणतो तर परत बेंगळूर!!!"
"पण मग पडा कि बाहेर....काय पण ते फ़ेविकॉल वाल्या खुर्ची वर बसल्यासारखं चिकटून बसला आहेस"
"हो ना... तेच तर! तुझ्या कंपनी मध्ये असेल काहि तर सांग ना!!"
"अरे, सध्या तरी नाहिये काहि. पण सध्या ’त्या’ कंपनी मध्ये आहे. मला ऑफर आहे, पण पैसे, काम कशात काहि फरक नाही म्हणून नाहि जात आहे मी. तू बघ."
"हो, बघतो ना. इथे बसून काहि भलं होईल असं वाटत नाहीये. तुझं बरं झालं, वेळेत बाहेर पडलीस"
"बस का.... तुला ना लेका, हवं होतं तेव्हा onsite पाठवलं ते विसरलास का?"
"पण काय उपयोग? बायको नाही रमली ना तिकडे. मग काय??"
"हम्म्म, बरं मी सांगते कुठे काहि आहे असं कळलं तर "
"please यार. चल मग नंतर बोलूयात ३-४ दिवसांनी. आता जरा मॅनेजरला बेंगळूरला जात नाही अशी मेल मारतो."
"ओके. बाय"

-------------------------------------------------------------
ऑफिस मध्ये आले. पाचच मिनिटात एक मैत्रिण बोलायला आली. काहि कारणाने ती गेले २ आठवडे ऑफिसला आली नव्हती.
"हाय स्नेहल"
"हाय!! मी पाहिलं तुला...मॅनेजरच्या केबिन मध्ये"
"अग हो ना. कसा आहे ग तो" प्रचंड वैतागून ती सांगत होती.
"का? काय झालं?"
"मी म्हणाले रिलीज हवाय प्रोजेक्ट मधून.... तर सरळ नाही म्हणतो. मला म्हणे तुला हवी ती flexibility देतो.... उशीरा ये, लवकर जा...अगदीच जमत नसेल तर एखाद दिवस सुट्टी घे. पण रिलीज नाही."
"हम्म्म्म्म"
"असं कसं म्हणू शकतो हा? माझी कंडिशन त्याला सांगूनहि असा का वागतो हा? म्हणजे मी इतके दिवस चांगलं काम केलं हे चुकलंच का?"
"chill madam!!! किती चिडचिड करते आहेस? आपण जरा दुसरं काहि सुचतंय का बघू ना!! तू घरी पण बोल"
"अगं पण....मला नाहिच जमणार आहे इतक्या लांब यायला आता. आणि आहे ना गावात ऑफिस..मग?"
"हो हो....चल आता जेवायला जाऊ. तू जरा icecream वगैरे खा :) थंड होशील :))"

-------------------------------------------------------------

"हॅलो स्नेहल, xxxx बोलतोय."
"येस xxxx"
"ते आपलं मेट्रिक्स शीट आहे ना... त्यात जरा चेंजेस करायचे आहेत"
"म्हणजे परत manipulation??"
"नाही नाही....आधीचं manipulation काढून टाकायचं. realistic data ठेवायचा. so delete that manipualed row, and send it across"
"ok. But was there any utilization issue raised"
"we will discuss it later. For now, change it and send, ok?"
"yes"

मी काहिशी चिडून excel sheet modify करायला घेते. मागच्या आठवड्यात जेव्हा मी xxxx ला म्हणाले होते कि इतकं manipulation नको... तर मला म्हणे "we should show it at least near to 95% though not 100%"
आणि म्हणून मी तेव्हा modify केलं... आज आता ते काढा... इकडे ग्राहकाने पण काम देऊन ठेवलंय, ते पण करा :(( भगवान उठा ले रे बाबा. मेरे को नहिं.....

-------------------------------------------------------------

"ए स्नेहल, बिझी आहेस का?"
"का रे?"
"५ मिनिटं काम होतं जरा"
"बोल ना.."
"ते खराडी कुठे आलं?"
"इथून ५-६ कि.मी असेल. याच रोड ने सरळ पुढे जायचं आणि सोलापूर हायवे साठीच्या वळणाला उजवी कडे वळायचं. पण तुला का जायचंय तिकडे?"
"एका कंपनीत उद्या HR round आहे"
"पाटिल, किती offer घेणार आणि कितींना लटकवणार आहात? पुरे कि आता... तुझं ठरलं आहे म्हणालास ना? मग???"
"हो गं, पण जाऊन बघावं म्हणतो.... देत असतील जास्त पैसे तर बघू"
"काय हे!!!"

-------------------------------------------------------------

काल एकाच दिवसात घडलेल्या या घटना.... सगळयांनाच काहि ना काहि अजून हवंय.... अजून चांगलं!!! आहे त्यात कोणीच समाधानी नाही, सुखी नाही. प्रत्येकालाच वाटतंय कि मला जे मिळतंय ते कमी आहे वगैरे.... म्हणून मग चालू आहे रेस.... धावपळ!!!

हे प्रसंग खरं तर प्रातिनिधीक आहेत.... आपल्या प्रत्येकाच्या भोवती, भोवती कशाला...प्रत्येकाच्या बाबतीत थोड्याफार फरकाने असंच काहि घडत असतं. आपण सुख वस्तूत शोधायला जातो....जे चांगलं आहे ते मला मिळायलाच हवं असं काहिसं सगळ्यांनाच वाटतंय. त्या नादापायी सुख निसटून जातंय... व.पु. म्हणतात ना "सुख हे फुलपाखराप्रमाणे असतं. मागे धावलात तर उडून जातं, शांत बसलात तर अलगद हातावर येऊन बसतं"
आम्हाला हे कळतं...पण मग आजूबाजूचे धावताना बघितले कि आम्हाला पण पळावंस वाटतं.... आणि मग आम्ही पळतंच राहतो. खरंच..जगी सर्व सुखी असा कोण आहे???