Monday, August 27, 2007

खवय्ये पुणेकर!!!!

पुणेकर म्हणलं कि अ-पुणेकराच्या मनात अनेक विशेषणं घोळू लागतात.... जसे कि पेठी पुणेकर, शुद्ध भाषा बोलणारा पुणेकर, "पाणी देऊ का?" असं विचारणारा पुणेकर, स्पष्टवक्ता पुणेकर वगैरे वगैरे(असो...माझ्याच शहराबद्दल मी किती लिहू?) यात खरं किती आणि काय हे जाऊ दे. पु.ल. नी पुणेकर, मुंबईकर आणि नाग्पूरकर लिहिलं च आहे.
मी तर अतिशय अभिमानाने सांगते कि मी पक्कि पुणेकर आहे. कित्येक जण विचारतात "म्हणजे नक्कि काय?" यावर मी म्हणते..
"१. मला लोकांना अमक्या दिवशी अमक्या वेळी आमच्या घरी याच असं म्हणता येत नाही. कधीहि या असंच मी म्हणते.
२. जागोजागी दुकानं असून सुद्धा लक्ष्मीरोड वर जाऊन आल्यशिवाय मला खरेदि केल्यासारखं वाटत नाही.
३. गणपती हा मला दिवाळीपेक्षा मोठा सण वाटतो.
४. दुपारी दुकाने बंद असण्यात मला काहि गैर वाटत नाही. दुकानदारांना पण वामकुक्षीची गरज असते म्हणलं!!!
५. कुठलंहि बिल मी शेवटच्या तारखेच्या आधीच १-२ दिवस भरते.
६. बाहेर जायचं म्हणलं कि दुचाकिशिवाय पर्याय नाही असं माझं ठाम मत असतं
७. मुलीनी गाडीवर स्कार्फ ने आपला चेहरा झाकणं अत्यंत गरजेचं आहे हे मला मान्य आहे.
८. मला खायला प्रचंड आवडतं"

प्रसंगी यात अजून २-३ मुद्दे येत असतील पण इतके तर नक्किच :) यात शेवटचा खायचा मुद्दा जास्त कोणी लक्षात घे नाही. त्यावर कोणी बोलत पण नाही. पण खरं तर पुण्यासारखे खवय्ये लोक महाराष्ट्रात नाहीत!!! त्यातहि बाहेरची खवय्येगिरि!!!
मुंबईमध्ये लोक गरज म्हणून बाहेर खातात...इथे आम्ही ठरवून, खास थांबून बाहेर खातो :) म्हणूनच गेले कित्येक वर्ष इथे लोक ठराविक च पदार्थ विकून सुध्दा टिकून आहेत. दूधवाले चितळे सर्रास मिठाईवाले झाले. इतर कुठल्या शहरात हे इतक्या पटकन आणि सहज झालं नसतं. पुण्यात केवळ अमुक एक गोष्ट खाण्यासाठी दुकानांसमोर रांग लागलेली दिसते.
चितळे ची बाकरवडी, आंबाबर्फी हे तर प्रसिद्धच आहे पण जनसेवा चे मसाला दूध, बेडेकर ची मिसळ, बुधानी चे वेफर्स, पुष्करणीची भेळ, आप्पाची खिचडी, संतोष बेकरी चे पॅटिस, क्रिमरोल, गणेश ची दाबेली, सुजाता ची मस्तानी, दवेंचा ढोकळा, वाडेश्वरची इडली, वैशाली ची SPDP, कल्पना ची पाणिपुरी, कयानीचा केक, ममता चे सामोसे (कॅफे नाज चे पण...पण आता ते पाडलं:()......लिहिता लिहिता तोंडाला पाणी सुटलंय. किती नावं लिहू?? माझ्या काकाचं तर लस्सीचं पण एक खास दुकान ठरलं आहे. वर दिलेल्या सगळ्यांची आपली अशी एक खासियत आहे आणि त्यांनी ती जपली आहे...खवय्ये पुणेकरांनी ती उचलून धरली आहे.
सगळ्यात जास्त महाराष्ट्रियन डायनिंग हॉल पुण्यात असावेत.... पोळी भाजी पासून उकडीच्या मोदकापर्यंत इथे सगळं मिळणारी "खास" ठिकाणं आहेत. पण याचा अर्थ लोक घरी खात नाहेत का? तर असं अजिबात नाही..... घरी खाऊन पिऊन निघून देखील ठराविक ठिकाणी पुणेकराला खास काहि खायचा मोह होतोच....आणि पुणेकर जिभेचे चोचले पूर्ण करतोच!!!

Thursday, August 16, 2007

स्वातंत्र्यदिन

काल १५ ऑगस्ट २००७.... मी काहि वेगळं सांगायला नकोच १५ ऑगस्ट बद्दल. आपण सगळ्यांनीच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देश, स्वातंत्र्य, सैनिक, हुतात्मे, प्रगती, क्रांती, वाटचाल वगैरे बद्दल पुष्कळ ऐकलं असणार. :) कदाचित ऐकून सोडून दिलं असणार.
काल आणि आज हि मी अनेकदा हे एक ऐकलं.... भारताचा ६० वा स्वातंत्र्यदिन!!! मला कळत नाही ६० वा कसा? ६१ वा ना? मी शाळेत शिकले तेव्हा तरी आपण १९४७ साली स्वातंत्र्य मिळवलं (हो, मिळालं या क्रियापदाचा मला राग आहे. मिळत काहिच नाही...मिळवावं लागतं) मग १५ ऑगस्ट १९४७ हा झाला पहिला स्वातंत्र्यदिन!!! मग २००७ साली ६१ व ना?
स्वातंत्र्य मिळ्वून ६० वर्षे झाली...एकदम मान्य. पण स्वातंत्र्यदिन म्हणाल तर तो ६१ वा हो!!! पटतंय का?
काल बड्याबड्या लोकांनी भाषणं केली....आज रस्त्यात मोठे मोठे बॅनर बघितले....सगळे आपले ६० वा स्वातंत्र्यदिन म्हणत बसले आहेत. स्वातंत्र्यदिनाला इतर काहि नाही तर निदान जे बोलतो आहोत ते कितपत बरोबर आहे ते तरी बघा लोक हो!!!

Friday, August 10, 2007

खरेदिचं वेडं वेड

रात्रीचे ८.३० वाजले होते.... ग्राहक काकांशी गप्पा मारून खाट्खाट मशिन बंद केलं नि बससाठी पळत सुटले. बस आली.... पटकन मिळेल ती जागा बघून बसले. बस मध्ये नेहमीप्रमाणे रेडिऒ मिर्ची ठणाणत होतं. मला एकतर मिर्ची वाल्यांची ती धेडगुजरी मराठी (कि हिंदि) भाषा ऐकायला जाम आवडत नाही त्यात रात्री काम करून दमल्यावर तर नाहीच नाही. पण इवल्याशा बस मध्ये ४ स्पीकर असताना मला दुसरा चॉईस नसतो.

"अरे सुनो, आज सबके लिये समोसे और मिठाई लेके आना"
"क्यों साब, कोई लॉटरी लगी क्या?"
"अरे जब एक और बिग बजार खुला है तो समझो लॉटरी हि लगी है"

रेडियो वर एक जाहिरात चालू आहे.....
हे सध्या आपल्याकडे नवीनच....मॉल संस्कृती!!! काहि हजार स्के. फ़ूट जागेत टोलेजंग इमारत..... शहरीजीवनात लागणारं आवश्यक अनावश्यक सगळं यांच्याकडे उपलब्ध. आणि कमी किंमतीत असा यांचा दावा! मग हे लोक वेगवेगळ्या आकर्षक योजना सुरू करतात...अगदि काहिहि..... यांचे सभासद कार्ड घ्या. मग प्रत्येक खरेदिवर काहि गुण मिळवा...आणि मग कधीतरी त्यावर काहितरी मिळवा. किंवा रु. ५०० च्या खरेदिवर रु. २५ ची फळे मोफत!! आणि हे सगळं लोकांपर्यंत पोचावं म्हणून सतत माध्यमांद्वारे जाहिरातींचा मारा! वर्षातून अनेक वेळा हे लोक सेल लावतात.....कधी काहि % सूट तर कधी २ वर १ मोफत तर कधी अजून काहि. माझ्या लहानपणी सेल वर्षातून एकदाच लागायचे आणि म्हणून दुकानांबाहेर तेव्हा रांग लागायची...पण आता दर महिन्याला कुठे ना कुठे सेल असतोच तरीहि गर्दी आटत नाहिये. कमाल आहे.
मुळातच आम्ही जास्त चंगळवादी झालो आहोत. गरजेपेक्षा पैसा जास्त, जबाबदाऱ्या कमी...आम्हाला मिळालं नाही ते तुम्हाला मिळतंय तर उपभोग घ्या अशा उदार विचारांची आई बाबांची पिढी. एकूणच काय "कोई रोकने टोकने वाला नहिं" अशी परिस्थिती!! पूर्वी आम्ही फक्त गुढीपाडवा, गौरी-गणपती, दसरा-दिवाळी अशा वेळी खरेदी करायचो....आता यात भर पडली ती अनेक "डे" ची...आज काय friendship day, उद्या boss day, मग कधीतरी fathers day, mothers day, in-laws day. मग परत त्या त्या दिवशी त्या त्या व्यक्ती साठी काहि भेट!!! खरेदिला अजून वाव :)
आक्षेप खरेदिला नाहिये....अवास्तव खरेदिला आहे. काय घेताय त्याची खरंच गरज आहे का?, आपण ते वापरणार आहोत का? आणि त्यापलिकडे जाऊन देतोय ती किंमत योग्य आहे का? याचा विचार करा.... माझ्या निरिक्षणानुसार आजकाल उच्च मध्यमवर्गीय माणूस साधारणपणे २५% वेळा अनावश्यक खरेदी करतो. विचार न करता...मला वाट्लं, आवडलं आणि शक्य होतं म्हणून घेतलं....या प्रकारात ती खरेदि मोडते.
आणि मग याची सवय लागते. झिंग चढते. आज मी रु १५०० चं घड्याळ वापरते, खरं तर रु. ४००० चं आवडलं आहे. मग मी अजून आटापिटा करेन...आणि स्वत:ला रु. ४००० सहज उडवण्याच्या जागी नेऊन ठेवेन. मग त्यासाठी काहिहि.... १२ तास काम करेन...रोज ३० कि.मी इतक्या लांब ऒफिसला जाईन. मग या सगळ्यापायी मी खाजगी आयुष्यातलं काय गमावतेय ते बेहत्तर. सगळं का??? तर मला "lifestyle" हवी. म्हणजे काय तर मी स्वत:च्या गरजा अवाढव्य वाढवून ठेवायच्या.... २ BHK मध्ये राहू शकत असताना ३ BHK घ्यायचा (घरात माणसं ३ च का असेनात!!!)...मग ते महागड्या वस्तूंनी सजवायचं.... खरेदी संपत नाहीये, पैसा पुरत नाहीये...वेळ उरत नाहीये. सगळंच निसटून चाललंय.
एका घरात दोन TV...कशासाठी?? अरे एकत्र बसून गप्पा मारा ना!!! आणि साध्या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमासाठी का तुम्हाला तडजोड करता येत नाही?? सगळे दागिने असताना परत आवडला म्हणून अजून एक नेकलेस!!! भले आम्ही साड्या वर्षातून १० च दिवस नेसू पण पैठणी मात्र माझ्याकडे २ हव्यात.... ३ वर्षाचा मूल....एका जागी १० मिनिट बसत नसेल पण त्याला किनई आम्ही स्वतंत्र study table घेणार.... खरेदी चक्र फिरत राहतंय...अनावश्यक. साधी राहणी काळाआड चालली आहे.
बाजारपेठेने अशी काहि जादू केली आहे कि बाजात आमच्यासाठी कि आम्ही बाजारासाठी? कळेनासं होतंय.... कदाचित कळतंय पण आजूबाजूचे चार लोक करतात म्हणून मी..... पूर्ण समाजालाच खरेदिचं वेड लागलंय!!!