Tuesday, December 02, 2008

१०वी अ आणि सरमिसळ वही

कायापालट झालेल्या घरात अजूनही सामान पूर्ण लावून झालेच नाही.... नक्की काय ठेवायचं, काय देऊन टाकायचं नि काय टाकूनच द्यायचं यावर आमच्या सगळ्यांची डोकी चालूच आहेत आणि माझे-आईचे, माझे-दादा चे वाद पण! :)
नवीन सगळंच एकदम झकास झालेलं असलं तरी, जुन्याची आठवण आहेच. त्या जुन्या जागांचे, सामानाचे संदर्भ आठ्वून मग मन हळवंहि होतंच.
असंच काही आवरताना आख्खी दोन पोती पुस्तकं (अभ्यासाची!!!!) आणि काही शाळा-कॉलेज(सुवर्णकाळ..) मधल्या वह्या सापडल्या... पुस्तकांमध्ये अर्थातच कॉलेजची जास्त होती. अगदी cobol, data structures पासून servlets, ASP.NET पर्यंत सगळं, शिवाय मोठ्या दादाचे mechanical चे TOM, SOM इ. ठोकळे आहेतच. परत त्यातही आमची विभागणी चालूच...काय ठेवायचं किंवा कोणा होतकरूला द्यायचं, काय रद्दीत घालायचं आणि काय जाळून टाकायचं. तसं बघितलं तर सगळंच जवळपास कमीतकमी १० वर्षापूर्वीचं...पण जीव अगदी काल घेतलेल्या वस्तूप्रमाणे त्यावर जडलेला आणि अडकलेला.... मग सगळं आवरता आवरता एका खोलीत मी आणि चारही बाजूने आम्हा भावंडांचा तो शाळा-कॉलेज चा सुवर्णकाळ असं झालं. ३-४ तास तरी ते तसंच असणार...
अशातच सापडलेली माझी १० वी मधली शाळेची एक वही... माझी १० वी!!! कित्ती वर्ष झाली??? पण २ वर्षापूर्वी शाळेत जात होते कि काय इतक्या अजून आठवणी ताज्या आहेत. सकाळी ८:३० ते ११ क्लास, मग १२ ते ५:३० शाळा... आत्ताच्या मानाने तसं कमी व्यस्त वेळापत्रक...पण तेव्हा किती "बिझी" आहोत असं वाटायचं :) बरं एवढं सगळं करताना अभ्यास वगैरे जेमतेमच. १० वी चं वर्ष असूनही biology च्या journalमधल्या frog vissera टाईप अवघड आकृत्या गौतमी कडूनच काढून घेतलेल्या... आणि तेव्हाच ठरवलं की भविष्यात आपण biology घेऊन काहीही दिवे लावू शकत नाही! कदाचि गौतमी नसती तर माझे ते journal १० मार्कहि गेलेच असते :)
क्लास नि शाळा असं सगळं मिळून माझं दप्तर टम्म फुगायचं! मग मी आणि स्वाती (वर्गात शेजारी बसायची) ने डोकंच लढवलं. शाळेतल्या तासांची निम्मी पुस्तकं तिने आणायची आणि निम्मी मी :) वह्या पण मी बिन पुठ्ठ्याच्या कव्हर च्या आणल्या होत्या...त्यातलीच एक २०० पानी वही परवा सामान आवरताना सापडली. मस्त पंचरंगी पोपटाचं चित्र असलेली...(पुढे result मध्ये व्हायचा तो आमचा पोपट झालाच!!!)
पहिल्या पानावर छान (?) अक्षरात नाव, तुकडी वगैरे... मग phyiscs चा अभ्यास... जेमतेम ३०-४० पानं भरलेली. म्हणजे वही दिवाळी नंतर काढली असणार आणि जेमतेम १-१.५ महिना वापरली असणार. मग पुढे घरी अभ्यास(??) वगैरे करताना काहीबाही लिहिलेलं...मराठी वाक्प्रचार वगैरे.... परत बरीच पानं कोरी! काहीतरी आठवून मी वही एकदम मागच्या पानापासून बघायला सुरूवात केली. काय असेल शेवटच्या पानावर :) हसू येतं आता... मागून biology चा अभ्यास (कि आभास!!!). किती नावडतं होतं biology कि वहीतही मी त्याला मागून सुरूवात केली होती. मग एक-एक पान करत मागे-मागे बघत चालले. phyiscs ची निदान ३०-४० पानं तरी होती, इथे biology चं सगळं १५-२० पानातच उरकलं होतं. So much I hated this subject!!!! मग १-२ ठिकाणी जाने-फेब्रु मधलं अभ्यासाच (त्यापेक्षा कधी झोपायचं याचंच जास्त) वेळापत्रक... मग काही संस्कृतची सुभाषितं, त्यांचे अर्थ. क्वचित ठिकाणी chemistry च्या reactions देखील!!! गणित हा स्वतंत्र आवडता प्रांत असल्याने या वहीत त्याचे घुसखोरी झाली नसावी! मग कधीतरी परिक्षा झाल्यावर मी आणि दादाने टेप करून आणायच्या गाण्यांची केलेली यादी. त्याचा आवडता किशोर आणि मी सगळी त्या वेळ्ची नवीन गाणी यादीत घेतलेली.... cassette च्या एका साईड ला ९ गाणी बसताता या हिशोबाने त्याने त्याची १८ आणि मी माझी १८ गाणी निवडून टिपून ठेवलेली. आई ग!!! काय धमाल होते दिवस!
रिझल्ट लागल्यावर बरंच काही रद्दीत गेलं असणार... मग कॉलेज सुरू झाल्यावर पण शाळेतले हे दिवस थोडे विसरल्यासारखेच झाले असणार. पण ही वही कशी कोण जाणे माझ्याच कप्प्यात राहिली..आणि आज आवरता आवरता माझ्या मनाचे किती कप्पे सताड उघडून गेली?? :)

Monday, September 22, 2008

पडदा

१३ वर्षापूर्वीचं घर... त्यावेळी घरात ५ माणसं असायची...आज त्याची ९ (२ बच्चे) झाली! ९ पैकी ३ आता जरा अंतरावर वेगळीकडे राह्तात... पण आठवड्यातून ४ वेळा तरी या जुन्या घराच्या ओढीने इकडे येतातच. या घरी राहायला आलो तेव्हा माझं भविष्य अजून काय आकार घेणार ते पण माहित नव्हतं. आणि मधल्या दादाला निदान त्याचा किरण दिसत होता; मोठ्या दादाचं त्या मानाने बरंच स्पष्ट होतं. बाबांनी अवघ्या आयुष्याची कमाई या घरात घातलेली... आमच्या आधीच्या घरातलं सामान घेऊन या घरात प्रवेश केला होता.
नवीन घरी लग्गेच सगळं नवीन घेणं शक्य नव्हतं.... पण पडदे तर हवेच होते. आधीच्या घरी आम्ही दार च फक्त रात्री झोपताना लावायचो तिथे पडदे कशाला? तिथे माणसं मनाचे आणि घराचे दरवाजे उघडे ठेवून च फ़िरत. तर मग नवीन घरी आल्याआल्या त्याच आठवड्यात आई-बाबा पदद्याचं कापड आणायला गेले होते. आधीचं घर आकाराने लहान, त्यात पडद्याची आवश्यकताच नाही अशी साधी राहणी. आई ने कपाटाला, एका खिडकीला वगैरे पडदे शिवले होते पण ते आपली तिची घर सजवायची आणि शिवणकाम करायची हौस म्हणून. पडदा पाहिजेच असा आमचा कोणाचाच आग्रह नसायचा. मी तर घरात कमी नि बाहेर जास्त असला प्रकार... :) मग माझ्या लहानपणी आईच कधीकधी मैत्रिणींबरोबर जाऊन पडद्याचं कापड आणत असे...कसा शिवायचा वगैरे चा मनात बेत करत असे. आम्हा भावंडांना पडदा म्हणजे येताजाता लोंबायला, हात पुसयला, खेळता-खेळता लपायला इतकाच तो त्याचा उपयोग माहित होता. पडदयाला याहून जास्त महत्त्व त्यावेळी आमच्या कोणाच्याच आयुष्यात नव्हतं.
मग नवीन घरी कोणी एक माणूस येऊन खिडक्यांची मापं घेऊन गेला.... त्यावरून खर्चाचा अंदाज दिला. अबब!!! २१ मीटर कापड लागणार होतं. माझ्या कल्पनेपलिकडचंच होतं... पडदे शिवून आले... ते लावायला खास बार, कडेला शो च्या मुठी वगैरे पण आले....काहीतरी झाकायला लागणारा पडदा स्वत:च इतका सजला कि क्या बात है!! नवीन घर बघायला येणारे लोक पण "पडदे छान आहेत हो" असं म्हणू लागले. या सगळ्या प्रकारामुळे मी पण कोणाकडे गेले कि त्या घरातले पडदे लक्ष देऊन बघू लागले. हळूहळू मग कळत गेलं कि पडदा हा गृहसजावटी मधला महत्त्वाचा भाग आहे. त्यात निरनिराळ्या प्रकाराचे कापड असते, शिवण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्याच्या रंगसंगतीमुळेहि घराच्या शोभेत बराच फ़रक पडतो वगैरे मौलिक भर पडत गेली. पण तरी पडदा हे प्रामुख्याने आई चे आणि नंतर आई-वहिन्यांचे क्षेत्र राहिले... मी नवीन/ धुतलेले पडदे लावणे आणि कसे आहेत यावर प्रतिक्रिया देणे या व्यतिरिक्त जास्त कधी काही केलं नाही.
आता आमच्या याच १३ वर्षापूर्वीच्या घराचा काहिसा कायापालट करायचा आम्ही घाट घातला... अगदी रितसर interior वाल्याला काम देऊन वगैरे. या रविवारी पडद्याचं कापड बघायला जायचं ठरलं... कधी नव्हे ते मी पण येते म्हणाले... आई ला नेमकं बरं वाटत नसल्याने ती येऊ शकली नाही. लक्ष्मी रोड वरच्या काही दुकानात गेलो. काय सुरेख व्हरायटी असते... अगदी त्या रंगीत दुनियेत गुंडाळल्यासारखं वाटलं. साडीच्या दुकानात साडी ड्रेप करून दाखवतात तसा इकडे पडदाहि ड्रेप करून दाखवतात!! परत दुकानात निरनिराळे samples होतेच display ला. पडदा, तो बांधायला शोभेचं अजून काही.. पडद्यात पण sheer वगैरे प्रकार. हे sheer म्हणजे एक पारदर्शक, झुळझुळीत कापड. मनात आलं असला पडदा काय कामाचा? हेच भाव कदाचित चेहर्यावर उमटले तसा interior वाला म्हणाला "फार सुंदर दिसतं हे", कि लागलीच दुकानदार ते ड्रेप करून दाखवू लागला. इतकंच काय त्या दुकानवाल्याने चहा/कॉफी घेणार का इतपत विचारलं. पडदे खरेदी बरीच सुखदायक असते कि! :) २-३ दुकानातले samples घेऊन परत निघालो.
१३ वर्षापूर्वीच्या संपूर्ण घराच्या पडद्याची किंमत आता एका पडद्याला जेमतेम पुरत होती. आणि इतकं करून लहानपणी मी ज्याला मनासारखं हात पुसायचे, लपायचे तसलं काहीही करू शकणार नव्हते :( वाटलं...स्नेहल नुसतं घर बदललं, त्याचे पडदे बदलले असं का आहे? आधीच्या घरातून इकडे येताना तू पण किती बदललीस? तिकडे सहज कोणाच्याहि घरात शिरणारी, कुठेहि भटकणारी, सगळ्या जनतेला "मुतालिकांची मुलगी" म्हणून माहित असलेली ..नवीन घरात किती कोशातली झाली? वय हे एक कारण असेल... पाचव्या वर्षी जशी मैत्री होते तितकी सहज ती १८ व्या वर्षी नाहीच होऊ शकत! म्हणजे मनाने पण नवीन पडदे च घेतले तर... पण मग पडदे घर सजवतात, काही न दाखवाव्या अशा गोष्टी पडद्यामागे लपतात...माझं तसं च आहे?? कि मनाचे हे पड्दे कसे आहेच याचा मी कधी विचारच नाही केला? ते माझी शोभा वाढवताहेत कि माझी शोभा करताहेत? कधी विचारच नाही केला.... या पडद्यांमुळेच कदाचित मला बरंच चांगलं काही दिसलं नाही, त्यामुळे मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्नच केला नाही. नवीन आलेल्या त्या sheer सारख्या पारदर्शक पडद्यासारखा एखादा तरी sheer माझ्या मनात आहे? आणि त्यातून मी जगाला आणि जग मला अस स्वच्छ बघू शकत आहोत का? कोण जाणे. कायापालट झालेल्या घरातल्या नवीन पडद्याबरोबर मी पण जरा मनाचे हे पडदे बदलून बघेन... निदान प्रयत्न तर नक्कीच करेन.

Thursday, September 04, 2008

बाप्पा... हसू कि रडू?

बाप्पा...दरवर्षीप्रमाणे ठरल्या वेळेला तुम्ही आलात. फ़ार आनंद वाटला... आज-कालच्या दिवसात दिलेला शब्द आणि ठरलेली वेळ पाळणारे फ़ार थोडे. या पार्श्वभूमीवर नित्यनियमाने एक तुम्ही येता.. तुमसे बढकर कौन? इथे देशात काहीच वेळेवर होईना झालंय.
कॉलेजचा प्रवेश असो, घराचं बांधकाम असो, पाऊस असो कि निवडणूका असोत. सगळ्याचीच वेळ बदलली आहे. ऑगस्ट मध्ये कॉलेज सुरू कि लगेच ऑक्टोबर मध्ये submissions! अधला-मधला वेळ असाच welcome party वगैरे मध्ये गेलेला.... पाऊस पण जून मध्ये दडी मारतो नि आता बघताच आहात कि तुम्ही यायची वेळ झाली तरी कसा बिनदिक्कत बदाबदा कोसळतोय. लोक तर निवडणूक या प्रकाराला इतके सरावले आहेत कि जणू शाळेतल्या वर्गात सेक्रेटरी निवडावा. :( सगळं आबादी आबाद आहे बाप्पा!
आंबेडकरांनी सांगितलं होतं कि सवलतींवर जगू नका, आज इथे सवलतीशिवाय कोणी जगायला नको म्हणतोय. माणसांच्या शरीराची जाडी वाढतेय नि मनं संकुचित होत चालली आहेत. शिक्षणाने लोक उदात्त कमी झाले नि कोते जास्त. पंचविशीतला मुलं सरळ सांगतात कि "माझं आई-बाबांशी पटत नाही", अरे पण हा विचार करायला याला समर्थ कोणी केला? लहानपणी जास्त त्रास देतो म्हणून तुला सोडलं का आई-बाबांनी??
सगळं जीवनच व्यस्त झालंय... पैसे जास्त-वेळ कमी, घर मोठं-माणसं कमी, शरीर मोठं-कपडे कमी, देखावा जास्त-आपलेपणा कमी, झोप जास्त-स्वप्न कमी, नेते जास्त-आदर्श कमी, चोरी जास्त-निर्मिती कमी! चेहरा खराब झाला तर निरनिराळे लेप लावून स्वच्छ करतात..पण आमच्या मनावरच्या जळमटांचं काय? बाप्पा... मनासाठी एखादं parlour काढता येईल का? वयात येणार्या मुला-मुलींना आहार नियमांबरोबर विचार नियम किती जण समजावून देत असतील?
आजच वर्तमानपत्रात तुमचं अगदी वाजत-गाजत स्वागत झाल्याची सचित्र बातमी वाचली.... पण जरा शेजारी नजर जाते तर अमेरिकेने अणुकरारात केलेली दिशाभूल दिसली. विद्यमान सरकारने स्वत:ची तोंड लपवण्यासाठी केलेला विश्वासघात दिसला. एका आडरानात दरोडेखोरांनी महिलांवर केलेला अत्यचार दिसला. "एक लाखात कार" प्रकल्पाच्या अजून नवीन बातम्या वाचल्या. बिहार मधील लोकांचे हाल दिसले... विदर्भात पाणी नाही म्हणून माणूस मरतोय आणि बिहार मध्ये पाणी आलं म्हणून माणूस मरतोय! पाणी म्हणजे जीवन ना रे... मग जीवन सुद्धा अति झालं कि त्रासच होतोय!
तू म्हणशील काय आज वर्षानी आलो तर मला काही माहित नसल्यासारखं सगळं सांगते आहेस. तुलाच सगळं माहित आहे रे... तूच कर्ता आणि करविता! पण सगळंच इतकं दाहक नको ना करूस. माणूस चुकला...चुकतो आहे. पण तू त्याला योग्य त्या मार्गावर लवकरात लवकर आण.
आता म्हणशील इतकं काही वाईत नाहीये ....ते पण खरंच आहे. वर सांगितलेल्या सगळ्या परिस्थीतीतच प्रकाश-मंदा आमटे आहेत, अभिनव बिंद्रा आहे, भारतीय त्रिदल सेना आहे. पण महाभारताप्रमाणेच सुष्ट आणि दुष्ट हे व्यस्त प्रमाणात आहेत. मान्य आहे रे हे सगळं आमच्यामुळेच... पण तू आला आहेस तोवर मन मोकळं करून घेतलं. दहा दिवसात तू बघशीलच सगळं.... मग पुढच्या वर्षी येताना हे कमी करण्याच्या योजना घेऊनच ये. यंदा जाता जाता शक्य तितक्या लोकांना सुष्ट व्हायच्या मार्गावर नेऊन सोड. आणि पुढच्या वर्षी मला "बाप्पा... हसू कि रडू?" असं लिहावंसं न वाटता "बाप्पा... हसूच हसू" असं वाटायला पाहिजे.

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

गणपती बाप्पा मोरया!!!

Monday, September 01, 2008

बालीश बोल

परवा रविवारी दुपारी चार च्या सुमारास अचानक अंधारून आलं नि ४:३० च्या सुमारास एकदम धो-धो पाऊस पडायला लागला. गणपती बाप्पाचे आगमन अगदी २ दिवसावर आले असल्याने अनेक लोकांप्रमाणे आम्हालाही गणपतीच्या आरासीचं सामान आणायचं होतं. पण पाऊस काही थांबायचं नाव काढेना.... माझा भाचा (वय- सौव्वा ३ वर्ष) सारखा विचारत होता कि कधी जायचं बाप्पाचं सामान आणायला.... शेवटी अगदी वैतागून त्याने आबांना (आजोबा) विचारलं

"ए आबा, पाऊस का रे पडतो??"
"अरे, पाऊस हवा आहे सगळ्यांना"
"पण का??"
"पाऊस नसेल तर पिक.... (इथे आबांच्या लक्षात आलं कि नातवाला पिक वगैरे झेपणार नाही) आपण कपडे कसे धुणार??"
"पण कपडे का धुवायचे?"
"ते खराब होतात, मळतात ना! मग धुवावे लागतात...आपण धुतो कि नाही रोज"
"अले(अरे), पण मग त्यासाठी पाऊस कशाला? आपल्या मशिन (वॉशिंग) ला पाणी आहे कि..."

हे ऐकून आबा आणि मी खो खो हसत होतो...

Tuesday, July 29, 2008

Corporate दुखवटा

नवीन(??) आर्थिक वर्ष चालू होऊन आता ते जुनं व्हायची वेळ आली.... मार्च मध्ये सुरू झालेली appraisal cycle मे पहिल्या आठवड्यात उरकली गेली. त्यात मिळालेलं rating बघून २५% लोक आधीच नाराज होते...उरलेले काही माझ्यासारखे आशावादी अजूनही उरला सुरला उत्साह टिकवून होते. दरम्यान Infy, CTS, Capgemini, IBM वगैरे बड्या कंपन्यांमध्ये पगारवाढ जाहीर होत होती. $ घसरण्याच्या निमित्ताला सगळ्या कंपन्या टेकलेल्या होत्या, management, HR सगळी लोकं आपापली गाजरं अगदी होलसेल भावात विकायला बसली होती.... Onsite चे कमीतकमी chances, बढती नाही वगैरे वगैरे नेहमीच आहे..यंदा भर पडली ती एक अंकी पगारवाढीची!
शेअर मार्केटने पण अशी काही मान टाकली कि नकोच ते चढ-उतार track करणं, तो portfolio बघणं असं वाटू लागलं. पेट्रोल महाग झालं, पर्यायाने सगळ्याच वस्तू महाग झाल्या. Inflation 11% च्या वर गेलं. याच सगळ्या गोंधळात मध्ये मी एका investment plans ची माहिती देणार्या माणसावर पण चिडले :)
मे मध्ये पगारवाढीची पत्रं मिळतील ही आमच्या सारख्या लोकांची साधी आशा आमच्या कंपनीने अगदी धुळीला मिळवली. मग नुसत्या अफ़वा....लोक वाट्टेल ते बोलत होते. बस मध्ये, canteen मध्ये सगळीकडे आडून आडून याच गोष्टीची चर्चा! कंपनी अधिकृतरित्या काही सांगत नव्हती आणि लोक इकडे हवालदिल झाले होते.करता करता शेवटी जून च्या शेवटी एक e-mail आली ज्यात आम्हाला जुलै मध्ये पगारवाढीची पत्रं मिळतील असं म्हणलं होतं.... चला! परिस्थिती अगदीच वाईट नव्हती तर!!!
जुलै सुरू झाला. काहीतरी जबरदस्त suspense असावा अशा थाटात कंपनीने अगदी २८ ला सकाळी ई-पत्रं पाठवली. सगळा फ़ुगा फुटला होता. इकडे पण बहुतांश लोकांना एक अंकी पगारवाढ आहे. Inflation 11% आणि पगारवाढ एक अंकी! बहुत नाइन्साफी है! salary restructure करून उगाचंच एक खोटं मानसिक समाधान दिलंय. कालपासून बरेच लोक नाराजी व्यक्त करत आहेत. बाहेर पडायचं कि अजून एक वर्ष इथे काढायचं अशा चर्चा आता रंगत आहेत. पण एकूण चित्र दुखवट्याचं आहे. इतर सगळ्या दुखवट्याप्रमाणे हा पण १०-१२ दिवसावर काही टिकत नाही. लोक सरावतात.... न सरावून पर्याय नसतो.
तुम्ही अनुभवला असेलच असाच एखादा Corporate दुखवटा!

Friday, July 18, 2008

तूच खरा गुरू!!!

मला आठवतं तेव्हापासून...म्हणजे जवळ जवळ गेले २५ एक वर्ष तो माझ्यासोबत आहे. अगदी पहिलं कधी भेटलो वगैरे आता आठवत नाही, पण खात्री आहे भेटला तेव्हापासूनच मला तो माझा वाटला असणार आणि त्याने पण मी कायम तुझ्यासोबत असेन असं हसून म्हणलं असणार :) म्हणजे अगदी लहान होते तेव्हा काय केलं कि आई-बाबा माझं ऐकतात, पाहुणे आले कि कसं वागायचं हे पण यानेच शिकवलं.
मग मोठी झाले... शाळेत जाऊ लागले. आई-बाबांच्या चिमुकल्या गोड विश्वातून एकदम ३०-४० मुलं, आई सारख्याच दिसणार्या बाई इतक्या त्यावेळी अफ़ाट, भन्नाट वाटणार्या जगात वावरू लागले. बाईंना कशी वागणारी मुलं आवडतात, मी काय केलं तर मला शाबासकी मिळेल हे सगळं मला यानेच शिकवलं. बाई शाळेत सांगायच्या ती गाणी, गोष्टी, अ आ इ ई च्या पलिकडचं असं काहीतरी तो मला नेहमी सांगायचा. आणि सगळ्यात मला आवडायचं म्हणजे घर, शाळा, खेळ सगळीकडे माझ्यासोबत! सगळे म्हणायचे आई-बाबांना किती मोठी आणि शहाणी झालीये स्नेहल... मी पण मस्त भाव खाऊन घ्यायचे!

सायकल शिकताना तर जाम मजा आली. मला वाटलं होतं कि मला काय सहज जमेल सायकल...त्याचाच बहुतेक त्याला जरा राग आला आणि मी सायकल शिकणार म्हणलं कि हा लांब जाऊन बसायचा. करता करता २ वर्ष गेली...सायकल चालवता यायची काहि चिन्ह दिसेनात :( मग त्यालाच माझी दया आली....हळूच माझ्या कानात येऊन म्हणाला, गधडे, आधी हाफ़ पेडलिंग कर, handle कडे बघू नकोस समोर बघ. मला रडूच यायचं बाकि होतं. तसा म्हणाला, रडतेस काय? मी आहे ना! आलोय ना आता. चला मग... आणि खरंच मला ४-५ दिवसात बर्यापैकी सायकल चालवता येऊ लागली :)

अभ्यास कसा करायचा, शिकलेलं ल़क्षात कसं ठेवायचं वगैरे शिकवायची याची खास पद्धत! आई-बाबा, शिक्षक यांचं ऐकायचंच ही याची शिस्त. तसं नाही केलं कि मग मात्र शिक्षेला तयार रहावं लागायचं. पण ऐकलं कि मग दुनिया मुठ्ठी में! असंच शिकत, गद्रे बाईंच ऐकत गाणं शिकले आणि ज्यादिवशी संपूर्ण शाळेत गाण्यात पहिला नंबर आला तेव्हा काय आनंद झाला होता! आणि माझा गुरू छान हसत होता माझ्या त्या आनंदाने फुललेल्या चेहर्याकडे बघून :)

college चं तर जग च गुलाबी! आपण मोठे झालो ही भावना, निरनिराळी प्रलोभनं...त्यामुळे काहिसं माझं गोंधळून जाणं. पण हा मस्त होता... याचं ठरलेलं काहि गोष्टी करून बघच; कारण मगच मी तुला नीट शिकवू शकेन. गाडी No Parking दिसलं तरी एकदा लावून बघ, अभ्यासातलं काहि ठरवून option ला टाकून बघ, घरी न सांगता सिनेमा बघ...सर्दी झाली तरी परत भिज, आई शी एकदा खोटं बोलून बघ, कामवाल्या बाईच्या मुलीला गणित शिकव, स्वत:चा कप्पा नीट आवरून बघ, आई घरी नसताना पोळ्या कर ...खूप काहि गोष्टी करायची मुभा देतो तो, अजूनही!!! जमलं तर ठीक आहे नाहीतर मग सरळ याचं म्हणणं ऐकायचं.

मैत्रीत तर किती शिकवलं याने मला... मित्र-मैत्रिण कसे निवडायचे, किती विश्वास ठेवायचा, कोणाशी कसं वागायचा....मैत्रीची सीमा काय ओळखायला शिकवलं!
परिक्षेत मार्क्स मिळाले म्हणजे मी नोकरी मिळवायला लायक आहेच असं नाही हे तर खूप कठोरपणे शिकवलं..पैसे मिळवायचे तर संघर्ष, कष्ट करायला शिकवलं. आता नोकरी करायला लागूनच ८ वर्ष होतील... किती बदलले मी या काळात! किती काय काय शिकले त्याच्याकडून! दरवेळी मिळणारी शाबासकीची थाप, होणारं कौतुक यात याचा किती मोठा वाटा असतो! एखादी चूक परत केली कि मिळणारी शिक्षा पण भयंकर असते.

नेहमी वेगवेगळ्या रूपात त्याचं मला भेटणं, एखाद्या खर्या मित्राप्रमाणे मला काहि गोष्टी करायला प्रोत्साहन देणं, चुकले तर कधी आई सारखं समजावणं, कधी रागावणं... मी कशीहि वागले तरी आजतागायत त्याने माझी सोबत सोडली नाही. मी मोठी काय कशीहि झाले असते, पण आज जे काही चांगलं वागू शकते त्यात माझ्यावर झालेले संस्कार आणि या गुरूचा च वाटा आहे.

असा हा गुरू..."अनुभव" त्याचं नाव! त्याने मला जे दिलंय ते अवर्णीय आहे. खरं तर अमोल ऋण आहे त्याचं ते. आणि ते ऋण वाढतच राहिल याची मला खात्री आहे. अशा या माझ्या आजन्म गुरूला आज "गुरूपौर्णिमे"च्या दिवशी शतश: प्रणाम!!! पुढच्या आयुष्यात माझ्यासोबत असाच सतत राहा आणि माझं जीवन समृद्ध कर. तुझ्यासारखा गुरू या जगात दुसरा नाहीच!!!!

Thursday, June 12, 2008

उगाचंच काहितरी

दिवस कसा सुरू झाला आणि कसा संपला कळतंच नाही आजकाल. एकामागून एक कामं येत राहतात आणि मी ती जमेल तशी टोलवत/ झेलत राह्ते.
असाच आजचा एक दिवस... ऑफिसला पोचायच्या आधीच एक फोन... "कधी येत आहेस? client कडून अमूक-अमूक escalation आहे. मला तो data हवाय." मनात आलं.."च्या मारी. सगळ्या e-mails वर कॉपी तर करते मी. मग मी नाही ऑफिस मध्ये तर data साधा compile करता येऊ नये??" पण असं कितीहि मनात आलं तरी तसं ते बोलता येतंच असं नाही.मग तुमच्या मनात काही खूप छान असो वा "च्या मारी.." टाईप काही. काही गोष्टी फक्त मनाशीच बोलाव्या लागतात. असो....
ऑफिस मध्ये आल्यावर मग सगळ्यात आधी client escalation परतवून लावलं. त्यासाठी मोठ्या लोकांपासून, लहानांपर्यंत २-३ meetings :(... मग खायला वेळ नाही...म्हणून diet वगैरे विसरून एक कुरकुरे! कामाचा ताण वाढला कि माझं वजन का वाढतं हे आत्ता मल कळलं.
एक एक काम उरकता उरकता ७:३० ची बस चुकली. सहज म्हणून मग g-talk ला login झाले. तर एक अगदी जुना नेट-मित्र भेटला. त्याचा अगदी अनपेक्षित प्रश्न खरं तर मला हे पोस्ट टाकायची खुमखुमी देऊन गेला. आत्तापर्यंत मी त्याला ४-५ वेळा तरी सांगितलं असेल कि माझा ब्लॉग वाच...अमूक पोस्ट..मायबोलीवरचं तमूक वगैरे... पण हा अगदी काला अक्षर भैंस बराबर सारखा माझे ब्लॉग वाचणं टाळतो. तर असा हा आज मला विचारत होता "howz ur blogging"... दिवसभराच्या वैतागानंतर त्याच्या प्रश्नाचं हसूच आलं. त्याला म्हणलं "काही सुचत नाहीये. आणि जे सुचतं ते लिहिण्याइतपत मोठं/ चांगल नाहीये".. तो नुसताच त्याच्या style मध्ये lol ला.
मी या आधीच पोस्ट टाकून जवळ जवळ ५ महिने झाले... केतन, प्रिया वगैरे मंडळी लिही लिही असं सांगून दमली. ब़याच जणांनी विचारलं कि लिहीत का नाही आहेस. यावर मी अगदी झोपेत देखील उत्तर दिलं असतं की "काही सुचत नाहीये".
खरंच सुचत नाहीये. कशावर लिहू? कंपनीने मला नवीन जबाबदारी देऊन ओझ्याचं गाढव केलं यावर...कि महिनाभर वेगवेगळ्या गाड्या चालवून मी zen estilo च का select केली यावर की गाडी चालवताना येणार्या जबरदस्त अनुभवांवर की रत्नागिरीला केलेल्या धमाल २ दिवसांबद्दल कि टेलर ने ड्रेस बिघडवल्यावर त्याच्याशी केलेल्या भांडणावर की google story वाचता वाचता sergey brin किती आवडला यावर?
लोकांचे ब्लॉग वाचले कि मजा वाटते..कसलं सुचतंय यांना!! आमचीच कुठे बोंब होते कळत नाही. पण काहीही असो.... माझे पोस्ट्स अगदी नियमीत वाचणारे मला लिहायला भाग पाडू शकले नाहीत ते काम ज्याने एकही पोस्ट वाचली नाही त्याने केलं. असं होतं का कधी कधी... कोणी काही म्हणलं म्हणून उगाचंच काहीतरी करावंस वाटतं ना?

Monday, January 28, 2008

एक लाखात कार



दिल्ली मध्ये Auto Expo त रतन टाटांनी नॅनो launch केली आणि भारतात अजून तरी चैन समजली जाणारी कार देशातल्या गल्लीत पोचली. एक लाख हि आता तशी फ़ारशी मोठी रक्कम राहिलेली नाही. (रिलायन्स पॉवर मध्ये तर कित्येक ’किरकोळ’ गुंतवणुककरांनी एक लाख अडकवले आहेत!) तर अशा एक लाखात आता चारचाकी मिळणार..... ज्याला त्याला वाटू आता कार आपल्या आवाक्यातली वाटू लागली. मला तर नॅनो कार्टून वाले अनेक ई-मेल्स देखील आले.
सगळीकडे १-२ दिवस चर्चा झाली...कि पुण्यात आधीच ट्रॅफिकचे बारा वाजले आहेत त्यात आता नॅनो आली कि तेराच वाजणार!

पण मग मी विचार केला कि खरंच नॅनो इफेक्ट इतका जबरदस्त असणार आहे का?? एक लाखात बेसिक गाडी आहे.... मारुती - ८०० जी १.८० लाखात बेसिक गाडी येते त्याचाच interior भयानक असतं, आत मध्ये शब्दश: पत्रा असतो, dashboard पण यथातथाच! मग एक लाखात टाटा अशी काय जादू घडवून आणून वेगळं काही देणार? बरं इंजिन पण ६०० CC चं...म्हणजे स्पीड नसणारच. बर्याच लोकांचं म्हणणं आहे कि सध्याचा high end bike customer नॅनो घेईल. पण एक तर बाईक आणि नॅनो च्या किमतीत जवळ जवळ १००% चा फरक आहे. शिवाय बाईक घेणारा fuel efficiency ला प्राधान्य देतो. अगदी फॅन्सी बाईक देखील आरामात ४५ कि.मी. प्र. लि. देते...नॅनो जेमतेम २०-२२ देईल. म्हणजे दुप्पट किंमत देऊन ५०% average मिळवा! काय शहाणपणा आहे हा? कार घेणं आणि नियमीत चालवणं यात फ़रक आहेच.
दुसरी गोष्ट म्हणजे पार्किंग... आपल्यापैकी अनेकजणांकडे कार लावायला घराजवळ पुरेशी जागा आहेच असं नाही. दुचाकी कुठेहि फटीत बसू शकते, पण चारचाकीचं काय??
आता राहिले रिक्षावाले. नॅनो हि जवळपास रिक्षाच्याच किंमतीत मिळेल....पण रिक्षा देखील ३० चे average देते. नॅनो २० देईल....या फ़रकामुळे भाडेदर वाढवावा लागेल ज्याने परत रिक्षावाल्यांच्या उत्पन्नात फ़रक पडेल.
नॅनो हा खर्या अर्थाने चांगला पर्याय आहे टॅक्सी ला!मुंबई सारख्या शहरात नॅनो जास्त चालेल. पण परत नॅनो मध्ये डिक्की नसल्याने लांबच्या प्रवासासाठी नॅनो फ़ारशी उपयोगी ठरणार नाही.
म्हणजेच नॅनो मुळे मला नाही वाटत कि सगळीकडे कारच कार होतील...ट्रॅफिकची समस्या अगदी टिपेला जाईल वगैरे...
तुम्हाला काय वाटतं??