Wednesday, June 27, 2007

स्टेनलेस स्टील

स्टेनलेस स्टील हा प्रकार ज्या कोणा महाभागाने शोधून काढला त्याला माझे कोटी कोटी प्रणाम!!! जगातल्या इतर कुठल्याहि शोधापेक्षा सामान्य माणसाला या शोधाइतका फ़ायदा झाला नसेल.
स्टील म्हणजे मायमराठीत खरं तर लोखंड!!! स्टेनलेस म्हणजे डाग नसणारे....(दाग अच्छे होते है वगैरे विसरा!!!) काय कमाल कल्पना आहे....लोखंड म्हणलं कि वाटतं जड वस्तू, आठवतो तो लाल गंज.... कधी हिरवी करडी बुरशी. (पाण्याचा पाईप बघितला असेल तर सहमत असालच). पण स्टेनलेस स्टीलने हे सगळं खोडून काढलं... हे ना जड, ना याला गंज चढतो. स्पर्श पण इतक सुखद कि जणू रेशमी साडी वरून हात फ़िरवावा. स्टेनलेस स्टील हे भारतात internet पेक्षाहि लवकर प्रसिद्ध झालं असावं. पितळी भांडी वापरणारी आजी स्टेनलेस स्टीलची भांडी कधी वापरू लागली तिलाच कळलं नाही :) घासायला सोपी, दिसायला छान...म्हणून सगळ्यांनीच स्वागत केलं. आज हि काहि खेड्यात वीज नसेल पण स्टेनलेस स्टील नक्कि असेल.
मला तर स्टेनलेस स्टील फार मनापासून आवडतं. कारण भांडी घासायचा मनस्वी कंटाळा आहे...त्यामुळे शक्यतो जमेल तितकि भांडी कामवाल्या बाईकडून घासून घ्यायचा माझा प्रयत्न असतो. बाईला स्टीलची भांडी द्यायला बरी ना!! acralic किंवा काचेची भांडी दिली तर उगाच ती फुटतील, तडा जाईल अशी भिती जास्त....(आई अशी भांडी घरी घासायला लावते...मग तर मल स्टेनलेस स्टील ची जास्तच आठवण येते) पाहिजे त्या आकाराची स्टेनलेस स्टीलची भांडी मिळत असताना लोक कशाला त्या महागड्या dinner set च्या मागे लागतात कळत नाही. एक तर महाग महाग म्हणून जपून वापरायचं आणि कधीकाळी वापरलंच कि स्वत: घासत बसायचं...सांगितलाय कोणी नसता त्रास? मस्त branded steel आणा (neelam वगैरे).छान टिकाऊ असतं...लहान मुल घेईल का...मग ते फ़ुटेल का....चिंता नको!!! साध्या आपटण्याने वा पडण्याने स्टेनलेस स्टील ला काहिहि होत नाही....ते काय काचेचं भांडं नाही एक चरा, टवका गेला तरी विद्रूप दिसायला. परत अगदी स्वत: घायायची वेळ च आली तर साबणाचा एक हात फ़िरवा कि स्वच्छ नि पूर्ववत सुंदर :) No tention!!!
मला तर त्या अति महाग भांड्यांचा मुळीच सोस नाही नि कौतुक तर त्याहून नाही, जी भांडी घरच्या बाईलाच त्रास देतात ती भांडी काय कामाची??? अशा गोष्टी दुकानातल्या शोकेस मध्येच बऱ्या. मी तर खुष आहे स्टेनलेस स्टील वर आणि त्याच्या जनकावर!!!

Wednesday, June 13, 2007

गोळे बाई

गोळे बाई.... माझ्या मनात एक विशिष्ठ स्थान असलेली व्यक्ती. मनाचा एक संपूर्ण कप्पा मी गोळे बाईंना दिलाय असं म्हणलं तरी अतिशयोक्ती ठरू नये!!!
माझ्या वयाच्या तिसऱ्या - चौथ्या वर्षी आमची गट्टी जमली. अर्थात...त्या माझ्या बालवर्गाच्या शिक्षिका होत्या. प्रसन्न हसरं व्यक्तिमत्व... मोतिया गोरा रंग, अगदी माझी मैत्रिण होऊन माझ्याशी बोलणं. मला सगळंच आवडलं होतं...अगदी पहिल्या दिवसापासून. आई-बाबा आजहि सांगतात कि मी शाळेच्या पहिल्या दिवशीदेखील अजिबात रडले नाही. याचं कारण गोळे बाईच असाव्यात. इतक्या छान बाई मिळाल्यावर का रडेन मी? आज अचानक मला त्यांची आठवण यायचं कारण म्हणजे नुकताच शाळेत जाऊ लागलेला माझा भाचा... काल शाळेत रडला....म्हणलं साहजिक आहे "त्याच्या शाळेत गोळे बाई नाहित!!!" इतकं बालवर्ग आणि बाईंचं गणित माझ्या डोक्यात पक्कं आहे. :)
गोळे बाई म्हणजे एकदम tip top बाई... मला तर त्या अगदी हेमामालिनी च वाटायच्या!!! deam girl सारख्या माझ्या dream बाई :) केसांचा यू कट, त्याला एखादी छानशी क्लिप लावलेली. डाव्या हातात गोऱ्या मनगटावर शोभून दिसणारं काळ्या पट्ट्याचं घड्याळ, चेहऱ्यावर लोभस हासू, शक्यतो हलक्या फिकट रंगाची पान-फुलाचं डिझाईन असलेली साडी....खांद्याला पर्स, त्यात नेहमी ४-५ गोळ्या, चॉकलेट्स. आजहि मला त्यांचं हे रूप जसच्या तसं आठवतं...जणू मी आत्ता अर्ध्यातासापूर्वी भेटलेय त्यांना. मी शाळेत जाणं कधीहि टाळलं नाही...अगदी आई बाबा एखाद दिवशी म्हणाले तरीहि.... कारण मग मी माझ्या लाडक्या बाईंच्या भेटीला मुकायचे!!!
बाईंना पण मी खूप आवडायचे....त्या आधीच माझ्या लाडक्या अन मी त्यांची लाडकी म्हणून मग त्या माझ्या अजून खूप खूप लाडक्या :) बाई कशा बोलतात, कशा बसतात, कधी काय करतात याचं मी अगदी बारिक निरिक्षण करत असे.... घरी आलं कि आईने दिलेला खाऊ खाऊन लगेच मी "गोळे बाई" व्हायची (शाळा शाळा हा माझा आवडता खेळ!!!) माझा खेळ बघून घरी सगळ्यांना आज शाळेत काय झालंय ते कळायचं, इतकं त्यात साम्य असायचं..... बड्बड्गीत, गोष्टी सांगण्यात बाई पटाईत. फळ्यावर त्या अशा काहि चित्र काढायच्या कि वाटावं पुसूच नये. जसे टपोरे डोळे तसंच टपोरं अक्षर..... कुठलाहि सण असला कि आदल्या दिवशी त्याची गोष्ट, महत्त्व सांगायच्या...सुसंगत चित्र फळ्यावर काढायच्या. All rounder बाई!!!
शाळेत पहिल्या शिक्षक दिनाला मी त्यांच्या साठी गुलाबाचं फूल घेऊन गेले होते...ते देऊन मी त्यांना नमस्कार केला. बाईंना इतका आनंद झाला होता, कि त्यानंतर मी जवळ जवळ एक-दोन दिवसाआड त्यांच्यासाठि फूल घेऊन जायचे. आणि कधी ते फूल त्यांच्या साडीच्या रंगाला matching झालं तर मला अगदी आभाळाला हात लावल्यागत व्हायचं. बाईंना पण याआधी किती वेळा विद्यर्थ्यांनी फुलं दिली असतील....पण दर वेळी त्या त्याच आनंदाने हसायच्या आणि फुल डोक्यात घालायच्या. कधी कधी मला दुसऱ्या दिवशी येऊन सांगायच्या "स्नेहल, फुल छान होतं असं अंजू मंजू ने सांगितलंय". अंजू मंजू या त्यांच्या जुळ्या मुली...माझ्याहून ३-४ वर्षांनी मोठ्या. असंच बाई एकदा म्हणाल्या "अगं, अंजू मंजू ने त्यांच्या नवीन बाहुलीचं नाव ’स्नेहल’ ठेवलंय"...वा!!!! "आज मै उपर, आसमान नीचे" हा अनुभव मी पहिल्यांदा त्या दिवशी घेतला. म्हणजे जितकि बड्बड मी घरी त्यांच्याबद्दल करायची तितकीच त्याहि माझ्याबद्दल करयच्या तर.... (केवळ एक वेगळं नाव म्हणून अंजू मंजू ने ते नाव ठेवलं असेल असा खडूस विचार तेव्हा माझ्या चिमुकल्या मनातहि आला नाही)
मी शाळेत जायला कधी उशीर केला नाही.....शाळा कधी बुडवली नाही. ्सगळ्या स्पर्धेत भाग घेतला, नंबर मिळवला, शिकवलेलं बरंच आपोआप लक्षात राहायचं....बाईंची लाडकि व्ह्यायला इतकि कारणं पुरेशी होती...मला आपलं उगाच वाटायचं कि माझे गोरे गुबगुबीत गाल बाईंना आवडतात नि मी त्यांना फूल देते म्हणून पण मी त्यांना आवडते.
बघता बघता शाळेतलं पहिलं वर्ष संपलं...बाईंनी "उत्तम" असा शेरा मारून प्रगती पुस्तक हातात दिलं. पुढच्या वर्षी आता गोळे बाई नसणार शिकवायला हे कळलं त्याक्षणी मला रडूच आलं होतं. शाळा नकोशी झाली. मग त्यांनी आणि आई ने मिळून माझी समजूत घातली..... वर्गात नसले तरी बाई माझे लाड करत राहतील अशी खात्री झाल्यावरच मी रडं बंद केलं.
जून मध्ये परत शाळा सुरू झाली. सवयीप्रमाणे मी गोळे बाईंच्या वर्गात (म्हणजे बालवर्गात) गेले.... बाईंनीच मग दुसऱ्या वर्गात पाठवलं....
त्यानंतर मात्र बाईंनी मला वर्गात असं कधीच शिकवलं नाही.....पण आम्ही भेटायचो...दर शिक्षकदिनाला फुल, गुरूपौर्णिमेला नमस्कार.....कुठलंहि बक्षिस मिळालं कि बाईंची शाबासकि हे अगदि ठरलेलं. जणू मी आम्ही दोघींनी ते सगळं गृहित धरलं होतं.
चवथी नंतर शाळा बदलली.... आता बाईंची भेट क्वचित होत असे. पण मनात त्या तशाच होत्या. मी पुढे पुढे जात राहिले...शाळा, कॉलेज, नोकरी...... चार वर्षांपूर्वी अशाच अचानक डेक्कन वर भेटल्या....तेच सुंदर हासू घेऊन!!! मी आता नोकरी करते....IT मध्ये..याचं काय कौतुक त्यांना!!! बोलता बोलता कळलं कि त्या एक वर्षात निवृत्त होणार...म्हणलं "बाई, मग आपल्या बालवर्गाचं काय? तुम्ही नाहित तर मुलं खूप काहि गमावतील" माझ्या त्या भाबड्या प्रेमाला बाई नी हसत माझी पाठ थोपटत प्रतिसाद दिला.
आता बाई निवृत्त झाल्या असतील.....जे त्यांच्याकडे शिकले ते खरेच भाग्यवान!!! आणि मी सगळ्यांहून जास्त...कारण माझ्या पहिल्या शिक्षिकेवर मी जितकं प्रेम केलं त्याहून कितीतरी पट अधिक त्यांनी माझ्यावर केलं.

Friday, June 08, 2007

परिपक्वता...

साधारण सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे.... आईने मला विचारलं "तुला सांगली ला जायला जमेल का या गुरूवारी?"
"का गं? एकदम सांगली??"
"लग्न आहे ’तिचं’ "
"अरे वा!!! मजा आहे. अगं पण असं अचानक अवघड आहे जमणं.... कधी ठरलं लग्न?"
"बरेच दिवस झाले.... बरंच समजावून झालं, रडून झालं...पण ती ऐकत नाही म्हणून मग आई बाबांनी करून द्यायचं ठरवलं"
मग या नंतर आईने मला स्टोरी जरा डिटेल मध्ये सांगितली.
’ती’ माझी एक लांबची मावसबहिण. लहानपणापासून हुषार...हुषार म्हणून आधीच हौशी असलेल्या आई बाबांनी जास्तच लाडात वाढवलेली. तिचा दहावी, बारावी चा निकाल म्हणजे ९० च्या पुढे किती हेच कळायचं बाकि असायचं...तिथेपर्यंत ती जाणार याची खात्रीच!!! मग इतर ४ हुषार पण ठरलेल्या वाटेने जाणाऱ्यांप्रमाणे तिनेहि Computer Engineer व्हायचं ठरवलं.
करता करता ३ वर्ष पार पडली. चवथे सुरू होताच campus drive चालू झाला. एखाद दुसरी कंपनी निसटली असेल..आणि तिचं एका मोठ्या कंपनीत सिलेक्शन झालं. वा!!! परत अपेक्षित कौतुकाचा वर्षाव. लठ्ठ पगार, पुण्यात नोकरी..... सगळेच जणू हरखून गेले होते. शेवटचं वर्षहि झालं.....ती पुण्यात आली. कदाचित खूप स्वप्न उराशी घेऊन.....
काळजी घे, वेळेत खात-पित जा.....वगैरे सूचना आई बाबांनी दिल्याच. पैशाची काळजी करू नकोस......वगैरे पण होतंच. या सगळ्यात एकच सांगायचं राहिल..."आम्हाला काळजी वाटेल असं काहि वागू नकोस"
तिचं आता स्वतंत्र आयुष्य सुरू झालं..... कोषातलं फुलपाखरू जणू बागेत अचानक सोडलं गेलं. नवीन कंपनी, नवीन वातावरण......सगळच मखमली, गुलाबी!!! आमच्यासारखे काहि नातेवाईक होतेच पुण्यात....पण तिने नेहमीच येणं-जाणं टाळ्लं. दिवसातले ११-१२ तास तर कंपनीतच जात होते....आर्थिक स्वयंपूर्णता हि होती.
अशा वेळी मोहाचे क्षण म्हणजे जणू तुमची सावली असतात. २२-२३ चं वय.... मित्र मैत्रीणींचा गराडा. इतके दिवस निर्णयात आई बाबा असतात...आता सगळं स्वत:च ठरवायचं. thrilling वाट्तं सगळंच. आपण चुकू असं चुकूनहि मनात येत नसावं. कारण तसा विचार करण्याची शक्ती च मिळाली नाहि कधी!!!
पुढचं एखादा चित्रपट वाटावा इतकं साहजिक आहे...... ती एका मुलाच्या प्रेमात पडली....तो पण. तो हरियाना मधल्या कुठल्या तरी गावातला. तो पण हुषार..... गुलाबी रंग अजूनच गडद झाला, मखमल अजूनच मऊ!!! तिने घरी सांगितलं... कडाडून विरोध ठरलेला..... एकदा, दोनदा....अनेकदा........ शेवटी आई बाबांनी लग्न करून द्यायचं ठरवलं. ती अशी का वागतेय किंवा ते का इतका विरोध करताहेत हे दोघांनीहि विचारात घेतलं नाही. "आमची इतकि हुषार मुलगी अशी वागेल असं वाटलं नव्हतं" असं ते म्हणतात. "मला सगळं देणारे आई बाबा लग्नाला का विरोध करताहेत" असं ती म्हणते. गैरसमजाची भिंत.... कोणी तोडतच नाहिये...कि त्यांना ती दिसतच नाहिये???
थोड्याशा अनिच्छेनेच लग्न पार पडलं. वाटलं झालं सगळं सुरळित........ पण कहानी का climax अभी बाकि है!!!
राजा राणीचं नवीन आयुष्य सुरू झालं. प्रेमात पडले, घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलं.... पण लग्नातली जबाबदारी, घ्यायची खबरदारी न यांनी विचारात घेतली ना यांच्या आई बाबांनी.
नोकरी, घर याच्यात ती गुंतून गेली.....त्याचं MBA करायचं आधीच ठरलं होतं, तो त्यामागे होता. लग्नाच्या ३ च महिन्यांनी दोघांना कळलं कि ते आता आई बाबा होणार आहेत!!! या गोष्टिला मानसिक तयारीच नाही...... त्याला MBA करायचं आहे....आणि तो शिकणार म्हणून तिला नोकरी गरजेची आहे. आता काय?? काहि नाही...... show must go on!!!
हे सगळं ऐकून मावशीला त्रास झाला.... साहजिक आहे. काल्पर्यंतची मुलगी, उद्या आई होणार...या नाजूक अवस्थेत नवरा सोबत नसणार (तो परगावी असणार). "काय हि गडबड? इतके शिकलेले लोक...असं कसं करतात?" हे आणि वर सगळ्या मोठ्या लोकांचं मत.....
पण मी म्हणते सगळी चूक त्यांचीच आहे????? पालक, मोठे म्हणून तुम्ही काहिच चुकला नाहि??? मुलीला (मुलाला देखील) शिकायला, नोकरीसाठी बाहेर पाठवताना काहि गोष्टिंची कल्पना आई बाबांनी द्यायला हवी. बाहेर काय प्रलोभनं असतात, चार लोकांमध्ये चांगला माणूस कसा ऒळखावा वगैरे. सतत आई बाबांजवळ राहिल्याने विचारशक्तीला खूप मर्यादा आलेल्या असतात..... बाहेर पडल्यावर आपली आपण चौकट ठरवायची आणि पाळायची असते. पण हे कोणीतरी सांगायला हवं होतं ना? आजकाल च्या जगात निर्णय मुलांनीच(अपत्य) घ्यायचा आहे, पण तो निर्णय बरोबर घेण्याची क्षमता आई बाबा म्हणून तुम्ही द्यायला हवी ना? तिचा त्याच्याशी लग्न करायचा निर्णय बरोबर असेल (कारण तो शिक्षण, नोकरी वगैरे दृष्टिने योग्य आहे) पण मग आता जी जबाबदारी तिला एकटिला पेलावी लागेल(त्याचं MBA होईपर्यंत) त्याचं काय? मुलीचं लग्न म्हणलं कि साड्या, दागिने, हळवं होणं इतकंच......कि त्यापुढे जाऊन तिला काहि महत्त्वाच्या गोष्टि सांगायला हव्यात??? आपल्या देशात अजून तरी सांगायलाच हव्यात. निदान २२-२५ या वयापर्यंत तरी!!!
खूप शिकलेले लोक याबाबतीत चुकतात....सरळ आहे. आपलं शिक्षण आपल्याला तांत्रिकदृष्ट्या परिपक्व बनवतं...... पण मानसिक परिपक्वता कुठलंच लौकिक शिक्षण देत नाही. तिथे महत्त्वाचे ठरतं upbringing, आई बाबा नी तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावं म्हणून घेतलेले कष्ट....संस्कार......तुमची जगाकडे बघण्याची आणि आकलन करण्याची शक्ती. या सगळ्यात पालकांचा वाटा खूप मोठा आहे. निर्णय पुढच्या पिढिलाच घेऊदेत...पण तुम्ही त्यांना योग्य निर्णय घेण्याची परिपक्वता द्या. त्याने तुमचा उतार वयातील त्रास नि पुढच्या पिढिचा तरूणाईतला मनस्ताप नक्किच कमी होईल.