Thursday, May 10, 2007

स्वभाव

मनुष्यस्वभावाला औषध नाही म्हणतात ते अगदी खरंय. संस्कार, शिक्षण, आजूबाजूचा परिसर याने काहि चांगल्या सवयी माणूस लावून घेऊ शकतो आणि अशा सवयींमुळे स्वभावात थोडेफार बदलहि होतात. पण लक्षात कोण घेतो? माणसाच्या व्यक्तिमत्वातील हि अतिशय महत्वाची बाजूच अनेकदा दुर्लक्षित राहते असं माझं मत आहे. कित्येकदा स्वभावदोषाला खतपाणीच घातलं जातं.
त्यातहि स्वभावात काहि काहि लोक टोकाचे असतात...कोणी अति तापट, अतिशय सरळ, नको इतके स्पष्टवक्ते, साखरपेरणी करून स्वार्थ साधणारे..असे अनेक. कुठलीच व्यक्ती हि सगळ्यांशी समान कधीच वागत नाही असं मला वाटतं. आपण समोरच्याशी काय बोलतो, वागतो याचा समोरची व्यक्ती सोडून अनेक गोष्टींशी संबंध असतो...जसे तुम्हा दोघातले आधीचे नाते, चालू असलेला चर्चेचा विषय, त्या क्षणाचे तुमची मानसिकता, समोरच्या व्यक्तीचे वय वगैरे वगैरे. म्हणूनच तर "तू माझी अमुक-तमुक आहेस म्हणून ठीक नाहीतर दाखवलं असतं", "आधीच माझा मूड नाहीये त्यात अजून तुझं परत नको", "आजोबा, वयाकडे बघून सोडून देतोय" अशी वाक्ये आजवर कित्येकदा ऐकली असतील. आपण स्वत:हि कित्तीतरी वेळा विचित्रपणे बोलत असतो किंवा समोरच्याच्या बोलण्याचा सोयीस्कर अर्थ काढत असतो. अगदी त्या व्यक्तीला आगाउ, नाटकी, शिष्ठ वगैरे लेबलं लावून मोकळे होतो.
आपलं रूप, बुद्धी जशी निसर्गदत्त आहे तसंच स्वभावाबाबतीत म्हणावं लागेल. पण मूळच्या स्वभावाला थोडं वेगळं वळण देता येतं ते संस्काराने, शिक्षणाने.... आता हे वळण म्हणजे नक्कि काय? तर आपल्या स्वभावातील जो dominating गुण आहे त्याला काबूत ठेवायला शिकणे. तापट माणसाने ऊठ्सूट आरडाऒरडा केला तर कोण त्याच्याशी मैत्री करायला धजेल? नको इतके सरळ असाल तर दुनिया तुम्हाला हातोहात विकेल...तुमच्या दरवेळी अति स्पष्ट्वक्तेपणामुळे किती लोक निष्कारण दुखावले जात असतील देव जाणे. स्वत:च्या स्वभावाचे असे टोकाचे कंगोरे लक्षात घेऊन काहि सकारात्मक कृती केली, प्रयत्न केला तर खरं शहाणपण. गुण आणि अवगुण यात एक धूसर रेषा असते....ती धूसर असली तरी त्याची खूणगाठ मनाशी पक्कि कराल तर बरंच जग, लोक तुमच्या जवळ येईल. कारण स्वभाव नि लोकसंग्रह हे सरळ प्रमाणात असतात. आपला स्वभाव सगळ्यात जास्त फायदा किंवा नुकसान आपलं स्वत:च करत असतो. जितके चांगले संस्कार होतील, चांगले वातावरण असेल, चांगले वाचन होईल तितक्या लवकर हि गोष्ट माणूस आत्मसात करू शकतो.
रूप निसर्गदत्त असलं तरी आपण अधिक चांगले दिसायचे प्रयत्न करतोच कि...मग हेच स्वभावाच्या बाबतीथि करून पाहूया. "मी अशीच आहे", "मला बदलणं शक्य नाही" हि वाक्य निष्कारण आत्मघातकि ठरायला नकोत..... शेवटी परिपक्वता म्हणजे काय? ती स्वभावाची एक अशी अवस्था आहे जिथे तुमचा स्वभाव सगळ्यांना आपलंस करू शकतो, समजून घेऊ शकतो. rational behaviour हे अनेकदा प्रयत्नपूर्वक मिळवलेलं असतं. कुठलीहि गोष्ट प्रयत्नानेच मिळते.... चांगली व्यक्ती होण्यासाठी उत्तम स्वभाव असावा लागतो...आणि त्यासाठी कष्ट घ्यावेच लागतील.

1 comment:

Chinmay 'भारद्वाज' said...

आपल म्हणण मला पूर्ण पटत. मुळ स्वभाव कसाही असो तो थोडा-बहुत बदलण शक्य तर आहेच पण आवश्यकही आहे. मला वाटत की स्वभाव बदलण पुस्तक वाचन किंवा संस्कार पेक्षा मनुष्य, स्वानुभवातुन किती शिकायला तयार आहे यावर अवलंबुन असत. पुढे पाठ मागे सपाट अशी अवस्था असेल तर स्वभाव बदलण कठीण आहे.